December 31, 2010

निर्माल्य (Nirmalya)

निर्माल्य (Nirmalya): 
याला इंग्रजी शब्द मला माहित नाही. 
 ॥ निर्माल्य ॥
येणार्‌या फुलांची असती नावे अनेक ।
जाणार्‌या फुलांचे नाव एकच निर्माल्य ॥ 


  निर्माल्य : ज्याना आमच्या मुंबैत दर्या दूर पडतो ते शेजारच्या रस्त्यावर असलेल्या पिंपळावरच निर्माल्य सोडतात, बुंध्यावर खिळा ठोकून त्यावर. कोणी जवळपासच्या चुकल्यामाकल्या तळ्यावर जातात; ते तळे कधीकधी पाण्याऐवजी निर्माल्यानेच भरलेले असते! त्यांचा उपसा कधीच होत नाही. आमच्या मुंबईत तळी राहिलीत कुठे? ब्रिटिशांनी कधीच तळी बुजवली, खाड्या बुजवल्या. दर्या बुजवला. (आम्ही ऐकले की त्याना पाण्याची एलर्जी आहे. म्हणून ते पाण्याऐवजी कागद वापरतात.) ज्या आहेत त्यांच्या गटारगंगा झाल्या. 

मुंबईच्या पावसाळ्यात रस्त्यांवर नद्या वाहतात. तर कोरड्या दिवसात रस्त्याखालच्या गटारांना भरती येते. मग पावसाळा माथ्यावर आला की म्युन्सिपालटी गटारांचा उपसा सुरू करते. आतातर विस्थापितांच्या आयुष्याचे - जीवनाचे - झालेले निर्माल्य रस्तोरस्ती पाहायला  मिळते. फुलांचे निर्माल्य! पाण्याचे निर्माल्य! जित्याजागत्या माणसांच्या आयुष्यांचे निर्माल्य! जमीन - जळ - जीवन कसणार्‌यांचे, त्यात स्त्रियापण आहेत, निर्माल्य. बाल्य होते अकाली निर्माल्य. बाजारू आकडेमोडीत फसलेल्या आयुष्यात जीवन झाले निर्माल्य!    
रेमीजीयस डिसोजा  
ख्रिस्त जयंती २०१०
मुंबई

 ~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape

December 22, 2010

मराठी भाषा, परिभाषा व पर्यायी शब्द

भाषा, परंपरा, संस्कृती व प्रकृति या सर्वाँचे एकमेकाशी अतिप्राचिन घनिष्ट नाते आहे, अगदी जगातील सर्व नागर संस्कृतिंच्या उदयापुर्वीचे, माणूस अस्तित्वात आल्यापासूनचे आहे. माणसाचे अध्यन अध्यापन (शिक्षण) जन्मल्या क्षणापासून सुरु होते. अर्थातच ते मायबोलीत होते यात आक्षेपार्ह काहीच नाही!
मायबोली : मी कोकणचा रहिवासी, माझी मायबोली कोकणी. सरकारने आता कोकणीला राजभाषेचा दर्जा दिलेला आहे. कोकणी भाषेत अनेक बोली आहेत, त्यांपैकी मुख्य बोली मालवणी, गोमंतकी व कारवारी होत. आमची मायबोली कोकणी असली तरी ती मराठीचीच एक बोली असे आम्हास नेहमीच वाटत आले. विंदानी मालवणीत व बोरकरानी गोमंतकीत कविता रचलेल्या आहेत. कोकणीत नोंदणी केलेले व न केलेले लोकसाहित्य अपार आहे.  

मायभाषा: इंग्रजांच्या राजवटीत आमचे शिक्षण मराठीतच झाले. तरीही मराठीला बोलीचा (vernacular) दर्जा होता. लहानपणी शाळेत वाचलेल्या एका कवितेच्या दोनच ओळी ध्यानात आहेत
"मराठी असे आमुची मायबोली जरी आज ती राजभाषा नसे.
... ... ... ... ... ... ... … ... ...
तिचे पुत्र आम्ही तिचे पांग फेडू."
(
शाळेत वाचलेली कविता. कवीचे नाव आठवत नाही. फक्त
पहिली व शेवटची ओळ आठवते, मेंदूत कायमचे कोरलेली! . 

राजभाषा मराठी: महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यावर मराठीला भाषेचा दर्जा सरकारने दिला. तोवर राजभाषा इंग्रजी होती. तरीही अनेकांच्या परिश्रमानी मराठी संपन्न होत राहिली. आता मात्र भाषांमध्ये राजकारणाने जागा पकडली आहे. उदा. केंद्र सरकारने हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा दिला. त्याने भाषांची व शिक्षणाची कशी प्रगती होते हे काळच ठरवेल

भाषेची समृध्दी: तेवढ्याने भाषेची समृध्दी होईल याची हमी देता येत नाही. त्यासाठी सर्वात प्रथम साक्षरतेची गरज आहे. त्या उपरांत शिक्षण व लेखी-छापील साहित्य व आता इ-साहित्य येतात. साक्षरता पसरवण्यात व यशस्वी करण्यात लोकबोली महत्वाचा वाटा उचलू शकतात. कारण लोकबोलीतही साहित्याची वाण नाही. त्याना हवी असते लिपी व त्यांच्या साहित्याची लेखी नोंदणी. ही त्याना दिलेल्या मानत्येची पहिली पोहोच समजा

लोकबोली: लोकबोलीभाषांची महत्ता आहे त्यांच्या प्रादेशिक जैवविविधतेत. सृष्टीचे वैविध्य भाषांची जडणघडण व समृध्दी करते. त्यात कैक पिढ्यांचे अनुभव, शिक्षण, शहाणपण व कौशल्ये गुंफलेली असतात. या सर्वच भाषा देशाचा अमूल्य सांस्कृतिक वारसा आहेत. भाषेच्या राजकारणात त्या नष्ट व्हायला किती काळ लागेल? भाषेचा वापर करण्याने ती टिकून राहते; विविध व्यवहारांसाठी वापर केल्याने ती संपन्न होते यात शंकाच नाही

मराठी भाषा: मराठी भाषेत सुमारे एक लाख शब्द आहेत असे सांगतात. तेव्हा अनाहूतपणे इंग्रजीत पाच लाखाहून अधिक शब्द असल्याची आठवण पण केली जाते. येथे तुलना करायचा प्रश्नच येत नाही किंवा वैषम्य वाटायचे कारण नाही. मराठी भाषेत कधी एका शब्दाचे अनेक अर्थ होतात. कधी अनेक शब्दांचा एकच अर्थ होतो, जसे विष्णूची सहस्र नावे, पृथ्वी, पाणी, वेश्या इ. शब्दांसाठी मराठीत अनेक प्रतिशब्द आहेत. कधी एक शब्द फरक करून लिहिता येतो. संस्कृती ही जळ व जमीन पर्यायाने जैवविविधतेची देणगी आहे;  कोणतीही भाषा संस्कृतिची (culture) अभिव्यक्ती असते व ती एकमेवाद्वितीय असते. ज्या विषयाचा व्यासंग त्यात नैपुण्य
 
सृष्टीचे भाषेशी नाते: सृष्टी सर्व जीवमात्राची जन्मदात्री - आई आहे. ती सर्व जीवांना पोषण देते. आणि मानवाला संस्कृती देते. आपल्या देशात जैवविविधता अजूनही संपन्न आहे, थोडीफार टिकून आहे. आपल्या सर्व परंपरा, कला, शास्त्रे, . तसेच भाषापण येथील जैवविविधतेने घडवल्या. (आधुनिकतेच्या अथवा इतर कितीही वावटळी आल्या तरी हे अभिमानपूर्वक नेहमी ध्यानी ठेवायला हवे, व तिचे निष्ठापूर्वक संवर्धन करायला हवे. कदाचित कोणत्याही नीतीशास्त्रात हे लिहिलेले नसेलही.) आपल्या देशातील जैवविविधतेचे "वैद्यक" हे एकच उदाहरण पुरे!  

वैद्यक: एकेकाळी मुंबईच्या बाजारांतील करियाणांना शेजारच्या रायगड जिल्ह्यातील कातकरी आदिवासी नियमित वनौषधी पुरवत. मुंबई बांधण्यात रायगड जिल्ह्याची जंगले संपली. कातकर्‌यांची कला गेली. आणि इंग्रजी औषधे आली. आयुर्वेदात असंख्य औषधींची नोंदणी आहे. पण ग्रामिण जनता व आदिवासी जे निसर्गनिवासात राहतात त्यांच्या पारंपरिक, मौखिक ज्ञानाची कुठे नोंदणी कुठे आहे? आदिवासी भाषांतील वनौषधींच्या नावांची नोंद कुठे असणार? आता येथील वानसांची ग्रीक-लातीन भाषेत जंत्री केली जाते

परिभाषा: असा संयोग येतो की जेव्हा समाज काळानुसार एक किंवा अनेक स्थित्यंतरांतून जात असतो. इंडियात अनेक स्थित्यंतरे आली. यांचा भाषा, कामे व जीवनशैली यांवर बदल करणारे परिणाम झाले. फिरंगी सत्ता देशावर आल्या तेव्हा अशी विषेश परिस्थिती निर्माण झाली. आतापावेतो भाषा-कला यांवर प्रमुख्याने देवदेवता, धर्मकर्म, पुराणे, महाभारत, रामायण वा स्मृति यांचा प्रभाव होता. श्रुती, वेदवेदांगे इ. पंडित पुरोहित यांचे क्षेत्र होते.  

त्याशिवाय वर्णाश्रम व्यवस्था, धर्म-अर्थ-काम-मोक्ष, अध्यात्म . मूळ विकसित वा विडबन झालेल्या संकल्पना बहुसंख्य समाजात अजून रूढ होत्या, आजही असतील. त्यातील अलुतेदार - बलुतेदार ही एक सामुहिक सर्जकतेची नमुनेदार व्यवस्था म्हणता येईल. हा बहुसंख्य समाज म्हणजे ग्रामिण शेतकरी 'वर्ग' होय, सदाचा सावकार, राजेरजवाडे, सरदार, ईनामदार यानी अव्याहत नाडलेला, व साक्षरतेला वंचित राहिलेला. या समाजात अनेक लोककलांची परंपरा आजही जिवंत आहे.  

इंग्रजानी हा खंडप्राय देश एका अंमलाखाली आणला. आपली यांत्रिकी-औद्योगिक संस्कृति वा समाजधारणा येथे आणली. कारभारासाठी कारकून हवे म्हणून शाळा - सांघिक शिक्षण - सुरू केल्या. या घटना आज आपण गृहित धरतो. गेल्या शतकाच्या सुरवातीस (१९०१) देशाची लोकसंख्या सुमारे २० कोटी होती. त्यात जेमतेम ५ ते ६ टक्के लोक शिक्षित होते. हा रानडे-गोखले यांचा जमाना. आज १२० कोटी जनतेत ४८ कोटी लोक निरक्षर आहेत. जे शिक्षित व सु-शिक्षित आहेत ते शिक्षणाचा कसा सद्उपयोग करतात हा प्रश्न वेगळा

पश्चिमी औद्योगिक युग इंडियात आले नवे यंत्र-मंत्र-तंत्र विधी घेऊन. शतकानुशतके आमच्या व्यासंगाचे विषय वेगळेच होते हे सांगायला नकोच. परमार्थाच्या नावाने जातपात, सोवळेओवळे, कर्मकांड, टीकासमिक्षा यात पंडित अडकलेले. शेतीभातीत अशिक्षित शेतकरी गुंतलेला. कणाद, आर्यभट, शून्याचा शोध इ. कधीच मागे पडले होते. भौतिकी शास्त्रांच्या व्यासंगाचा अभावच म्हणाना. याचे मुख्य कारण ही शास्त्रें कधी बहुजन समाजापर्यंत पोहोचली नाही हे असावे. अर्वाचीन काळात ४० टक्के माणसे, संख्या नव्हे, साक्षरतेपासून अजूनही वंचित आहेत. ही गेल्या ६० नव्हे ६००० वर्षांची आमची थोर परंपरा आहे 

तरिही बहुसंख्य जनता प्राकृतिक निसर्गाच्या सान्निध्यात रहात आली; विशेषतः आदिवासी, याना तर सृष्टियोगीच म्हणायला हवे. याचे एक आत्यंतिक उदाहरण: अलिकडच्या सुनामीत अंदमान-निकोबार येथील आदिवासी वेळीच उंच जागी निघून गेले होते व सारे बचावले. दृश्य सृष्टीच्या अंगप्रत्यंगाच्या अनुभवाचा हजारों वर्षे जतन केलेला ठेवा त्यांच्यापाशी आहे 

देशातील जीवघेण्या विषमतेच्या वणव्यात तो ठेवा कितपत टिकेल याची घोर शंकाच आहे. सत्तेच्या महानगरात बसून देशप्रेमावर भाषणे देणे सोपे आहे. देश म्हणजे नकाशा नव्हे. पदव्या, बिरूदे, अधिश्रेण्या, पैशांची गंगाजळी त्यागून किती हरीचे लाल निसर्गनिवासात आपल्या अद्यावत ज्ञानाच्या बळावर टिकून रहायला तयार होतील?  

शिक्षण: महाराष्ट राज्य सरकार मराठीत वाङ्मय, भाषा, कृषी, भू, भूगोल, जीव, भौतिकी, रसायन, अर्थ, राज्य , वाणिज्य इ. अनेक शास्त्रांचे उपयुक्त परिभाषाकोश गेली चाळीस वर्षें तयार करित आहे. शिवाय मराठी लोकभाषा यावर काही पुस्तके प्रसिध्द केलेली आहेत, मात्र ही इंग्रजी भाषेत आहेत; बरोबरच देवनागरी पण समाविष्ट केली असती तर तीं अधिक सुगम झालीं असतीं. मात्र पारिभाषिक शब्द रोज व्यवहारात वापरले तर भाषा संपन्न होत जाते.  

पर्यायी शब्द: मराठीत सांघिक शिक्षण (mass education) आणि विविध विषय जसे उपलब्ध व विस्तृत होत गेले तसे पारिभाषिक शब्दांची पण गरज भासू लागली. अर्थातच अनेकदा संस्कृत सुलभपणे उपयोगास येते, उदा. 'प्राणवायू',  'क्षेपणास्त्र', व असे अनेक शब्द!  

अनेक नवनवीन विदेशी संकल्पना पण येत राहिल्या, विषेशतः सामाजिक संदर्भात. उदा. community participation (community, लोकसमूह; participation, सहभाग) हा शब्दसमूह सध्या फार चलनात आहे. याला पर्यायी शब्द कोशांत नाही. यांचा जोडशब्द बोजड होईल. शिवाय 'लोकसमूह' हा युक्त वाटत नाही. 'जमात' / 'जमाती' अधिक जवळचा आहे. आता दोन पर्याय शक्य होतात: लोकसहभाग व जमातसहभाग / जमातीसहभाग. पण रायगड जिल्ह्यात आगरी समाजाच्या भाषेत 'झोळ' हा शब्द प्रचलित आहे जो तंतोतत जुळतो. असे शब्द अनेक लोकभाषेत गवसतील

'झोळ' म्हणजे 'community participation ', ही आमची प्राचीन लोकपरंपरा आहे, जरी ती नागरी उच्चभ्रू लोकाना आयात केलेले कल्पना वाटली तरी. तसेच water conservation, 'जलसंधारण, ज्यासाठी प्रदेशांनुसार अनेक देशी परंपरा आहेत, आणि त्यांची रीतसर नोंदणी पण काही संस्थांनी केलीय. पण लक्षात कोण घेतो!  
'... युध्दोत्तर बेकारीमुळे शिक्षणाचा जुगार झाला आहे ...' गो. वी. (विंदा) करंदीकर (बेडूक, शब्दकोडी आणि संस्कृती, [जुलै, १९५२]  करंदीकरांचे समग्र लघुनिबंध, पॉप्युलर प्रकाशन, पृष्ट २९) 
आजचे समीकरण आहेः शिक्षण म्हणजे नोकरी, व्यवसाय किंवा धंदा करण्याचे साधन. पण हे खरे नव्हे; याची कोणही हमी देऊ शकणार नाही. शिक्षणाचा धंदा करणार्‌या पूंजीवादी भांडवलदारानी आणि त्यांच्या नोकरशाही कठपुतळ्यानी उठवलेली ही अफवा आहे.   

* * * 
टीपा: 
१.  ना. गोपाळ कृष्ण गोखले (मे ९, १८६६ - फेब्रुवारी १९, १९१५) यांनी इंग्लंडच्या प्रीव्ही कौन्सिल मध्ये १९१० साली "प्राथमिक शिक्षण सक्तीचे करावे व प्रादेशिक परिस्थितीनुसार असावे" असा ठराव ठेवला होता. ते गेल्यावर १९१८ साली बहुतेक राज्यांत ते अमलात आणले गेले.
२. पूरक माहितीसाठी पहा: 
२.१. "British Educational Policy and Growth of Modern Education";
 
शीर्षक: "मराठी भाषा, परिभाषा व पर्यायी शब्द
लेखक: रेमीजीयास डिसोजा | मुंबई | २०१०   
~ ~ ~ ~ ~ 
© Remigius de Souza. All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape

December 15, 2010

मीच तेजोमय आभास (प्रेमगीत)

जवळ आलीस हरवलीशी
पुळणीवरची विरणारी लाट
स्मिताच्या शुभ्र फेनील गुदगुल्या
खिन्न तळपायांना करता करता
सावरत ओचेपदर
खळाळणारया  हास्याचा लोट
बागडत गेलीस लाटेलाटेवर
छायाप्रकाशाच्या धूसर
क्षितिज रेषेपार अंतर्धान

मी त्यात सूर शून्यात
घनघटांच्या बरसातीत
भिरभिरलो भूलभुलैयात
सहस्त्रधारा तुझ्या रुपाचा
भ्रम ओघळला
अबोध रेषा गुणगुणल्या कानांशी
मीच तेजोमय आभास
या महासागराच्या उधाणावरचा
अनंतापर्यंत.

-- रेमीजीयस डिसोजा
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape

December 13, 2010

टिटवी आमची बरी

टिटवी ट्वीटर वर

ट्वीटर पेक्षा टिटवी बरी ।
भाकीत करी; येती सरी ।
चुली पेटती घरोघरी ।
 

~ ~ ~ ~ ~ 
© Remigius de Souza. All rights reserved.|
Page copy protected against web site content infringement by Copyscape

हायकू मात करी

हायकू आणि ट्विटर

ट्वीटरवरी हायकू मात करी 
हायकू वसे हजारोंच्या मनी   


* * * * * 
© Remigius de Souza. All rights reserved.|
Page copy protected against web site content infringement by Copyscape

December 10, 2010

पाचोळा - २

पाचोळा २

प्रत्येकासाठी कुणीतरी साद घालत असावं 
जन्माला आल्यापासूनच 
कुणी ऐके 
कुणी काणाडोळा करतं 
आणि आयुष्यभर वणवण करीत जातं 
भिरभिरत  जातं
कानोसा घ्यावा आणि चुकावं 
असही होत असावं. 
वावटळीतला पाचोळा कुठतरी स्थिर व्हावा 
आणि जीवनचक्र पुन्हा परत सुरू व्हावं 
भिजणं सडणं कुजणं आणि अन्नब्रम्हाच्या कारणी लागावं 
वैराणातून मार्ग काढीत 
-- जंगल - वैराण - महापूर - महानगर -- 
आणि सर्व जीवनेच्छा पणाला लागावी  
विरघळत जाणारा मी आणि माझे मीपण  

*****

© Remigius de Souza. All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape

December 01, 2010

उधळण

उधळण  
केली मनाच्या सांदी कोपऱ्याची 
अगदी आतडं पिळवटून तरीही 
तुझा पीळ उसवणार नाही
अळवाचं पान ओलावणार नाही -
भिजणार नाही.  

 
रेमीजीयस डिसोजा 
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape

November 27, 2010

क्षण सर्जनाचा (कविता)

क्षण गोठलेला 
काळकामवेगाचे गणित
थांबवून राहिलेला
एकाकी तरी तीनही काळ
व्यापून राहिलेला
क्षण संभवाचा - समभावाचा
जननमरणाच्या सीमारेषेवरचा



रेमीजीयस डिसोजा 

~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape

November 11, 2010

साक्षी आकाशाचे पुराण

उल्का खंडित पाषाण 
साक्षी आकाशाचे पुराण
एकाकी रस्त्याचा ताण
भिरभिरत्या माळावर
दिवा दूरचा गतिमान 

माळ वेडा उघडा बागडा
काजळलेल्या दिशातील
जगलावणार्‌या कवडशात
चक्रावलेला

रस्ता थांबलेला लांबलेला
निष्टूर आपलासा, कडेला 
अनामिक पाणपोई तृषार्त 
करीत सहन त्याची व्यथा 

न बोलता.

(ऐहोळी, पुलकेशीच्या जमान्याचे अवशेष, पाहून परतताना)
मे १९७१
 

 ~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.|
Page copy protected against web site content infringement by Copyscape

November 05, 2010

लंपट

बिनबाह्यांच्या कांचोळीआड
लपेटलेली लंपट नजर
खाजवते त्याची लालसा
अर्धपारदर्शक चोळीतील
स्तनाग्रे उभार
करतात गुदगुल्या
घट्ट नितंबांच्या वक्र रेषा
डोळे मिचकावतात. 

 
२९-९-१९८९


~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.| Page copy protected against web site content infringement by Copyscape

November 01, 2010

इंडीयाचे संतकवी- २

मनोगतः कबीर ते तुकाराम या सुमारे तीनशें वर्षांच्या काळात सर्व देशभर अनेक भाषांत अनेक संतकवी झाले. तेव्हा (अन आताही) सामान्य जनांसाठी पाठशाळा नव्हत्या. संतांसाठी प्रसारमाध्यमे व राजाश्रय नव्हते. तरीही आजपावेतो लाखो लोकाना ते तोंडपाठ आहेत. त्यांच्या रचना लोकभाषेंत आहेत; त्याना गेयता आहे; ध्यानात ठेवायला सोप्या. व सर्वात महत्वाचे, त्या लोकाभिमुख आहेत. कथा, कीर्तन, भवई इ. माध्यमे आणि संतकवी हे जनसामान्यांना आजही चालत्या बोलत्या पाठशाळा आहेत. 
साळसूद पाचोळा यांनी केलेल्या टिप्पणीने पुढील तपशील लिहिण्यास मला प्रवृत्त केले. त्यांचा मी अत्यंत आभारी आहे. 

आता आमचे राज्य आहे. आजच्या कालमानाप्रमाणे ज्याना ज्या लोकशिक्षणाची अत्यंत निकडीची गरज आहे त्याना ते मिळते का? असे शिक्षण देण्यासाठी अनेक माध्यमे पण उपलब्ध आहेत. मग घोडं कुठं अडलं? संत कि बुवाबाजी ते जावू द्या,
सामाजिक बांधिलकीची माझ्या परीने जाणीव ठेऊन गेल्या काही वर्षात शिक्षण या विषयावर वेळोवेळी लेखन केले. मी माझ्या परीने काही प्रश्र्नांची युक्त उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला.


त्यातिल काही लेख नियतकालिकांत प्रसिध्द झाले. काही माझ्या इंग्रजी ब्लॉगवर प्रसिध्द केलेले आहेत. 

त्यांचे दुवे पुढे देत आहे. कृपया ते अवश्य पहावे.
1. Indian Schooling
2. Farming and the Politics of Education in India
3. Politics of Literacy in India
शिक्षण या विषयावर एकूण २७ लेख आहेत. इंग्रजीची एलर्जी नसल्यास जरूर वाचा.
 

~ ~ ~ ~ ~ 
© Remigius de Souza. All rights reserved.| Page copy protected against web site content infringement by Copyscape

October 21, 2010

इंडीयाचे संतकवी

 मनोगतः कबीर ते तुकाराम या सुमारे तीनशें वर्षांच्या काळात सर्व देशभर अनेक भाषांत अनेक संतकवी झाले. तेव्हा (अन आताही) सामान्य जनांसाठी पाठशाळा नव्हत्या. संतांसाठी प्रसारमाध्यमे व राजाश्रय नव्हते. तरीही आजपावेतो लाखो लोकाना ते तोंडपाठ आहेत. त्यांच्या रचना लोकभाषेंत आहेत; त्याना गेयता आहे; ध्यानात ठेवायला सोप्या. व सर्वात महत्वाचे, त्या लोकाभिमुख आहेत. कथा, कीर्तन, भवई इ. माध्यमे आणि संतकवी हे जनसामान्यांना आजही चालत्या बोलत्या पाठशाळा आहेत.

~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.|
Page copy protected against web site content infringement by Copyscape

October 06, 2010

मुंबईच्या एका चौपाटीवर (कविता ): मुंबईत आपला परिसर

मुंबईच्या एका चौपाटीवर  
अनेक दर्प, गंध, सुगंध अगणित    
खसखस नायलॉनची 
किलबिल कुणाची    
फडफड पदराची  
वारा येतो गर्दी शोधीत   
गजबज इथे बजबजपुरी  
त्यात तू एक  
अन मी एक  


मीही एक गर्दी शोधीत  
माझे एकटेपण कुरवाळीत गोंजारीत   
उबगलेले उच्छ्वास टाकणयासाठी   
जागा शोधीत   
चौपाटीच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत ---  
इथल्या पुळणीतसुध्दां संस्कृतीने घाण करून ठेवली आहे ---  
ढुंगण टेकवीन म्हटले तर.  

मधूनच बाहूला तंग चोळीचा मृदू स्पर्श   
बोटात गुंतवलेली बोटे   
एकांत शोधतात    
कोपरखळी आडोसा शोधीत    
पुराण्या संकेतांचे संवाद   
जवळीक करू पाहतात.     

इथल्या वाळूत वाकडी पावले बोचत नाहीत
इथे असती संवाद - विसंवाद - वाद सतत  
ही एक बजबजपुरी   
त्यात तू एक   
अन मी एक   .
*    *    *    *    *
लेखन १९६५     
टीप: १. मजा अशी कि चाळीस वर्षांनंतर मुंबईचे वातावरण / पर्यावरण किती सुधारले / किती बिघडले हे नागरिकांनी ठरवायचे. चित्रातील वरळी-सी-लिंक बघायला  आकाशात कोण जाणार? सिनेमा - टीवी वरच्या जशा "सेलिब्रिटीज" तसाच हा पूल!! दोनीही नागरिकांच्या खिशाला कात्री लावतात - निष्क्रीय करमणूक करतात. आणि समाजातील एक - दोन टक्के लोकांचे खिसे भरतात.
२. छायाचित्र  रेमीजीयस डिसोजा, मुंबई   

~ ~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape

September 30, 2010

वळणावळणाने जाणारी वाट माझ्या दारी

वळणावळणाने जाणारी वाट माझ्या दारी   
ओलावतो कातळ काळा मध्यान्ही    
वळून पाहशील तेव्हा  
हरवलेली वाट वळणावर  
अबोलीच्या वळेसरात,  
माडराईत, बांबूच्या बेटात,   
वळणाशी शृंगार वाऱ्याचा फुलेल,   
पायरव हरवेल आभासात.  

(सावंतवाडी - सिंधुदुर्ग.
१६ - ०५ - १९७०)  
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape

September 23, 2010

नारळीचे नागरीकरण: आपला परिसर

नवी मुंबईला गेलो होतो. इथे बरंच काही मुंबई सारखेच आहे. फक्त जुन्या इमारती नाहीत. निवासी संकुलांची बांधकामे जोरात चालू आहेत. दहा - वीस मजली टोलेजंग इमारती बांधल्या जात आहेत. इथे राहायला आलेले घर मालक हौशी आहेत. रस्त्यांच्या कडेला अरुंद फ़ूटपाथवर कुणी अशोकाची कुणी पांगारयाची  झाडे लावलीत. झाडांच्या भोवती कांक्रीटाची फरशी,.माती जवळ जवळ नहीच.   
 

रस्त्याच्या कडेस जमिनीच्या एका चिंचोळ्या पट्टीवर नारळी लावल्या आहेत. दोन झाडांमधले अंतर जेमतेम दीड - दोन वाव असेल. सुदैवाने सभोवती माती आहे - फारश्या नाहीत. ही झाडे वाढली कि त्यांची सूर्य प्रकाश मिळावा म्हणून चुरस लागेल. झावळ्या एकमेकांना आलिंगने चुंबने द्यायला लागतील. 
 




वरील दुसरे चित्र कोंकणातील सावंतवाडी येथील संमिश्र शेतीचे आहे.
 
असे सांगतात: ज्या प्रकारच्या नगरात - परिसरात लोक राहतात त्याचा त्यांच्या स्वभावावर परिणाम होतो. जमिनीपासून दूर लहान - मोठ्या चौकोनी खुराड्यात राहणाऱ्या लोकांचा स्वभाव या झाडांच्या लागवडीत (वाटल्यास त्याला उपवन म्हणा) प्रतिबिंबित झालेला दिसतो. लहान - मोठ्या गाळ्यांत राहणारी कुटुंबें उद्या वाढणार - हे सरकारला तसेच वास्तुविदाना, नागरानियोजकाना पण माहित नसते. मग येथे राहणाऱ्या कुटुंबियांना नारळीला किती जागा लागते कसं माहित असणार? ते थोड्या जमिनीला जास्तीत जास्त कसे राबवायचे याचा विचार करतात. माळ्याला तरी माहित असावे! पण तो पडला हौशी हुकुमाचा ताबेदार.  

जागेच्या स्वभावावरून एक आख्यायिका आठवली. बडोद्याला एकदा आम्ही वयोवृध्द प्राध्यापक मुजुमदार यांना भेटायला गेलो होतो. त्यांनी या संदर्भात पुढील म्हण सांगितली.

"सुरतनी नार सुंदरी       
खंभातनी नार गोजिरी
वडोदरा नी वांकी नारी
अमदाबादी हरामजादी" 
(टीप: वांकी - चतुर, बडोद्यात बायकांचा हा गुण मात्र मी अनुभवलाय. या कवितेत सांगितलेली वैशिष्ट्ये अर्थातच काही नियम नव्हे.)
~ ~ ~ ~ ~ 
© Remigius de Souza. All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape

September 13, 2010

समकालीन त्रिशंकूचे गाणे

मीपण माझे कुरवाळीत असे मी निरंतर  
माझ्याच कल्पलोकात.   
अठराविश्वे  अन्नान्नगत  दारिद्र्य    
तीस कोटी माणसे मायदेशी भोगत असले तर?     
तर मला काय त्यांचे?   
ते भोगतात त्यांच्या दैवाची फळे!    

मग मी का बरे शोधतोय माझी तोंड-देखली     
जात-जमात आंतरंजालाच्या     
मायावी वास्तवाच्या प्रतिविश्वात     
महागड्या उपग्रहावर संदेश पाठवून?      
माझ्या बलवत्तर दैवाने        
एक पुष्पक विमानच का नाही खरेदी केले?    
"नशीब गांडू तर काय करी पांडू?"     

अरेऽमी असा आसामी!    
यंत्र-मंत्र-तंत्र  विधींच्या आधुनिक विश्वामित्राने    
सुखसमृद्धीचे प्रतिविश्व निर्माण करून   
द्यायची ग्वाही देऊन केला माझा त्रिशंकू!    

आणि हाडामांसाच्या, रक्ताकुडीच्या, जित्याजागत्या 
घरच्याच माणसांना लाविले की रे    
माझ्या हव्यासाने देशोधडीला!    
असा मी उर्मट उद्याम समकालीन त्रिशंकू!   

रेमीजीयस डिसोजा | मुंबई | १०-०८-२०१० 

~ ~ ~ ~ ~ 
© Remigius de Souza. All rights reserved.|
Page copy protected against web site content infringement by Copyscape

September 04, 2010

नाच माझा आठव्या जन्मीचा

स्त्री व पुरुष सांगाड्यांची रचना 
 हे स्मशानवत भयाण काहीसे  
माझे मन ठेचाळत  
सरपटत या अंधारात  
या कवट्या कवटाळत छातीशी...   
वारा एक वेडाच फुंकर मारतो
या कनातून त्या कानातून  
मग सर्वच कवट्या शीळ घालतात   
त्यांचं विरूप संगीत  
मला पिसाळते  
छातीत धडकते  
पडघम बडवल्यासारखे   
हाडकांच्या टिपरयानी  
आवाज येतात.  

इथं अंधारात कुणाचं थडगं ठेचाळतं!  
माती...   भुसभुशीत जमीन...  मांस सडलेलं  
त्यातून दोर आतड्याचा हाती लागतो  
सात वार लांब  
मी तो तटकन तोडतो  
आत कुठंतरी असह्य कळ येते  
हे तर माझेच आतडे!  
परवाच नाही का दफन झाले! 
ही माळः  
सात जन्मीच्या सात कवट्यांची...    
आणि ही परवाची  
अजूनही सडतेय  
म्हणून हिला दर्प अहंकाराचा!  
इच्यावरचं मांस पुरतं सडून जाईल  
तेव्हा हा दर्पही नाहीसा होईल.  
तेव्हा हिच्यातून सात सूर निघू लागतील.    
 

सात जन्माच्या कवट्या गळ्रयात बांधून   
त्याच्या भेसूर संगीताबरोबर  
मी नाच करतो आठव्या जन्मीचा.  


(काही समाजांत मरणानंतर पुरण्याची प्रथा आहे. तसेच कोण पुनर्जन्म मानतात, कोणी मानीत नाहीत. येथे "मी" हा कवी आहे असे समजायचे कारण नाही. देशी कलाशास्त्रांत नवरस मानले जातात, त्यापैकी एक येथे आहे. कुणी या कवितेला अतिवास्तववादी  (surrrealist ) पण म्हणतील. लिहिताना हा विचार केला नव्हता.)   
-- रेमीजीयस डिसोजा
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape

August 19, 2010

पर्यावरण आणि वन्य जीवन

प्रतिमा १. अतिसूक्ष्म शैवाले जी फक्त इलेक्ट्रोनि सुक्ष्मदर्शीतून दिसतात.

 सूचक शब्द: पर्यावरण अर्थात पर्यावरण, परिस्थितीकी व ऊर्जा ही तीन ही एकत्रित; वन्य जीवन अर्थात सर्व जीव सृष्टी, केवळ वाघ सिंह, इ. हिंस्र श्वापदेच नव्हेत; जैवविविधता (biodiversity )   

प्रतिमा २. प्रवाळ खडक
सोबतच्या चित्रातील प्रवाळ खडक तळहातावर राहिल एवढा, ४" x  5 " आहे. मालवणच्या सिंधूदुर्गाच्या किनारयावर असे पुष्कळ लहान मोठे प्रवाळ खडक पडलेले आहेत. हा तेथून आणला होता.
कधी हा फुलझाडाच्या कुंडीत, तर कधी घरगुती मत्स्यालयाच्या टाकीत ठेवला जातो. आता पावसाळ्यात याच्यावर शेवाळ उगवलेले आहे. सोबतीला दोन तीन रोपे उगवलेली आहेत. एक चिमुकली गोगलगाय सफर करते आहे, आणखीही जीव जिवाणू असतील. एक छोटासा परिवार!
कुंडीत नियमित पाणी घातले जाते तरी हा प्रवाळ कोरडा राहतो. माशांच्या टाकीत मात्र विरळ शेवाळ येते. पण पावसाळा सुरू झाला की मात्र याच्यावर वन्य जीवन बहरते. हा सृष्टीचा चमत्कार नाही तर काय!
शैवाले आतापर्यंत निकृष्ट वनस्पती समजली जात होती. पण आता संशोधनामुळे किती बहुउपयोगी आहे हे शास्त्रज्ञांच्या ध्यानात आलेले आहे. अन्न, नत्रयुक्त खत, ते जागतिक हवामान चक्रात शैवालांचे महत्वाचे योगदान आहे. 
प्रतिमा ३. गुलाबाची कुंडी


पर्यावरणाची काळजी करणार्‌या आमच्या सरकारने प्राथमिक शाळेच्या पहिल्या यत्तेपासून  या विषयाची पुस्तके नेमलेली आहेत. पुस्तकांसाठी टनावारी लाकूड खर्च होते. पुन्हा पुस्तके बदलली की आणखी टनावारी झाडे बळी जातात. शेवटी सुशिक्षित होऊन हे देशाचे "भविष्य" काय करणार? आणखी पंडिती पुस्तके लिहितील. हे मातीत राबणार नाहीत, झाडे लावणार नाहीत, त्यांचे संगोपन करणार नाहीत. ते काम शेतकऱ्यांचे. आम्ही फक्त आख्याने सांगणार - व्याखाने देणार.


एवढ्या टीचभर जागेत जैवविविधता (biodiversity) बघायला मिळते. तेवढ्यासाठी पण पाऊस पडायला हवा. पण वनेच  खपली तर पाऊस कुठून येणार? पुस्तके घोकून भाराभर मार्क मिळाले तर का भरघोस पाऊस पडणार की जंगलें वाढणार? कदाचित काही मोजक्याच लोकांच्या खिशात पैशाचा पाऊस पडेल. व बरचसे लोक बेकारीच्या वाळवंटात भाजून निघतील.


असे सांगतात, घडणीच्या वयात, १७-१८ वयापर्यंत मुलांचे संगोपन, अध्ययन दिशाभिमुखन होते, त्यावर त्यांच्या पुढच्या आयुष्याची दिशा ठरते. पर्यावरण काय हे झाडे, वेली, पक्षी, जनावरे, आणि सूक्ष्म शेवाळे व जीवाणू या सर्वाना समजते, अगदी नवजात अर्भकांना पण कळते. फक्त काळात नाही ते लोभी राजकारणी, सत्ताधीश, उद्योगपती, व्यापारी, व आधुनिक पुरोगामी सुधारलेल्या समाजाला; पंडित पर्यावरणाच्या नावाखाली लठ्ठ ग्रंथांचे भारे उभे करतात. मग आमचे सरकार वेडे होते आणि मुलांच्या पाठीवर बुकांचा भार  वाढत जातो.  
जसे सरकार तसे मास्तर-मास्तरणी, तसे पालक ...  या सर्वांची निसर्गापासून केव्हाच फारकत झालेली आहे. निसर्ग फक्त दृष्टीसुख घेण्यासाठी राहिला आहे. या महानगरात पर्यावरण व जैवविविधता निर्माण झालेली व त्यांचा अनुभव घ्यायला वीतभर तरी जागा कुठे आहे?


पर्यावरणाची समज सर्व जीवमात्राला - जातींना (species) उपजतच असते. ही समज संवेदनशीलतेतून, ज्ञानइंद्रियांद्वारे आणि बोधनेतून येते.  जसे धंदा व्यवसायाची समज येते तशीच पर्यावरणाची पण समज मानवाला येते. ती कमी अधिक प्रमाणात असेल.


पर्यावरण (Environment) केवळ हवामान तापमान नव्हे. परिस्थितीकी (Ecology)  व ऊर्जा (Energy) हे दोनही पर्यावरणाचे अविभाज्य भाग आहेत. हे तीनही शरीर (व्यक्ती), कुटुंब (समाज), घर, परिसर, शहर एवढेच नव्हे तर सामाजिक, आर्थिक व राजकीय पर्यावरण सुध्दा ते सामावतात. पण राजकारणी व हितसंबंधीयांनी या सर्वाना राजरोस बाजूला सारलेले आहेत, त्यांना वेगवेगळ्या रकान्यांत बसवलेले आहेत. 


याचे कारण साधे आहे: कारण आहे केवळ "भेदानिती" - विभाजन करा आणि सत्ता घ्या (Divide and Rule!) - हे सर्वश्रुत आहे. साम, दाम, दंड आणि भेद या चौकडीतील हि अत्यंत जालीम चौथी नीति! आजच्या आमच्या वैयक्तिक व सामाजिक जीवनात या चारही नीतिंचा अमर्याद वापर होत असलेला दिसतो व अनुभवास पण येतो. कोण करतात हा वापर?

आज व्यक्तीच्या व समष्टीच्या जीवनत येनकेन प्रकारेण अनेक संस्थांचा (सरकारी, बिनसरकारी, व गैर-सरकारी संस्था / संघटना) हस्तक्षेप आपणास बघायला व अनुभवायला मिळतो. आजचा 'संघ समाज' (mass society) याला सहजपणे बळी जातो. अलीकडचेच सरकारी उदाहरण म्हणजे SEZ (special economic zone)! हे सारे सत्तेचे खेळ आहेत.या सत्तेवर अंकुश आणायचा असला तर सत्तेचे विकेंद्रीकरण हा एकच पर्याय आहे.


हे विकेंद्रीकरण फक्त व्यक्ती व कुटुंबाच्या रूपाने समष्टी अंमलात आणू शकतील, कोणत्याही सामाजिक, आर्थिक व राजकीय संस्था / संघटना नव्हे. असे झाले कि अनाहूतपणे सत्तेच्या केंद्रीकरणाचे - विकासाचा सोनेरी मुलामा दिलेले - पितळ उघडे पडेल. 

वीतभर जमिनीवर निर्माण होणारे "वन्य जीवन" पहिले तरी अशी क्रांती संवेदनशील बोधनेतून निर्माण होईल. सर्व दर्शने, ज्ञाने, विज्ञाने, कला... आपले अस्तित्व पण सृष्टीची  - Mother Nature - देणगी आहे. 

टीप: चित्र १, ही शैवालांची चित्रे  आंतरजालावरून घेतलेली आहेत.  शैवालांच्या ७०००० हून अधिक जाती आहेत. ही खार/गोड पाण्यात, ओलसर भिंतीवर, ओल्या लाकडावर, झाडांवर वाढतात. वेंगुर्ला, सिंधुगुर्ग येथील कृषि विद्यापिठात यांच्यावर संशोधन केले जाते.   
चित्र २ व ३ छायाचित्रे: रेमीजीयस डिसोजा.    

~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.|
Page copy protected against web site content infringement by Copyscape

August 14, 2010

आईने दिलेले बाळकडू

आमची आई बाळपणी आम्हा भावंडाना "बाळकडू" देत असे. अनेक वनौषधी एकत्र करून, कुजवून (fermetation) ती स्वत:च बाळकडू घरी तयार करायची. हे मला माहित कारण मी माझ्या लहान भावंडांच्या वेळी पहिले होते. पहिले मूल झाले तेव्हा तिचे वय जेमतेम १८-१९ असेल.

हे बाळकडू तेव्हा बाजारपेठेत सीलबंद बाटलीत तयार मिळत नसे. असल्यास माहित नाही. निदान खेडेगावात तरी नाही. तो तर परंपरेने आलेला आजीचा वारसा. त्याच्यावर बौद्धिक मालकी हक्काचे लेबल नव्हते.

गोऱ्या कातडीच्या फिरंग्यांनी -- त्यानंतर त्यांच्या देशभक्त देशी चमच्यानी -- त्या परंपरेची कधीच विल्हेवाट लावली; अजूनही चालू आहे.त्या
बाळंकडूची चव कधीतरी अनुभवाच! कडू-आंबट-तिखट-तुरट अशी त्याची मिश्र चव असते. माझा देशाभिमान मला आठवण करून देतो: जशी संस्कृती -- विद्या-कला-दर्शने-धर्म इ. -- जळ आणि जमीन यांची देणगी आहे तसेच "बाळकडू पण.

वनविनाशाबरोबर "बाळकडू" गेले, पाणी गेले, जमिनीचे रेताड होत चालले, नैसर्गिक पर्यावरण नाहीसे होत चालले, पारंपारिक लोकाविद्या - लोककला नाहीशा होत चालल्या.राहिले रुपेरी पडद्यावर व टीवी अन पीसीच्या स्क्रीनवर त्यांची व्यंगचित्रे, आणि उथळ उत्श्रंखल घोषणा आणि हर्बल उत्पादनाची जाहिरातबाजी!. त्यांच्या निर्मात्यांना आता वारंवार चित्रणासाठी परदेशी जायला लागते!! 
     
कोणत्या परंपरांचे संवर्धन - संधारण करणार? संस्कृती - परंपरा वस्तूंत नसतात, त्या लोकजीवनात असतात. एकशेवीस कोटी माणसांच्या लोकजीवनचे संवर्धन - संधारण कोण व कसे करणार? दिल्ली-मुंबई येथे कायदे करून का ते होणार? कि मिडिया करणार? ते केवळ वादंग माजवतात, उर्जेचा विनाश करतात. माझा हा ब्लॉगपण याला कदाचित अपवाद नसावा?

एक मात्र झाले. जसजशी वेळ जाते माझे लेखन मात्र बनते माहितीच्या अरण्यातून काढलेल्या मुळ्यांचा अर्क!

 -- रेमीजीयस डिसोजा
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape

August 09, 2010

प्रलय


 "The Great Wave" by Katsushika Hokusai (1760-1849) colour woodcut

सर्व अंगागांतील प्राण  
एकवटले पापणीआड  
अन् पांच हजार वर्षांचा  
पाखंडाचा बांध उलथला  
प्रलयाचे थैमान घेऊन आला  
दंभाचे महावृक्ष उलथून गेला  
- - - 
२३ - ५ - १९९७  

टीप: चित्र-सदर्भ - "The Great Wave " "द ग्रेट वेव", चित्रकार कात्सुशिका होकुसाही (१७६०-१८४९) याचा  रंगीत वुडकट.
पावसाचा हंगाम सुरू झाला की लोक जीव मुठीत घेऊन असतात, वेगवेगळ्या कारणासाठी -- पाऊस पडेल का, वेळेवर पडेल का, की अवर्षण की पूर येतील का, वर आलेली शेती बुडेल का? 
पण कोणता प्रलय - सामाजिक की नैसर्गिक - किती हानिकारक आहे की लाभदाई ठरेल हे कोण व कशाच्या आधारावर ठरवणार?  
माझा लाडका तुकाराम मात्र मला ऐकू येतो: "महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती".  कितीक युद्धे - महायुद्धे गेली पाचशे वर्षे चालूच आहेत. तरीही (गरिबांची) लोकसंख्या वाढतेच आहे; त्यांना जगायला पुरेसे जेवण मिळत नाही मग औषधपाणी कुठले? का हे कोणी महाभाग शास्त्रज्ञ का ते सांगू शकत नाही. याच्यात निसर्गाचा वाटा किती आणि तथाकथित आधुनिक मानवीय सुधारणेचा वाटा किती? 
~ ~ ~ ~ ~ 
© Remigius de Souza. All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape

August 05, 2010

इंडीयन आयडॉल ५ (Indian Idol 5)

सूचक शब्द: लोककला, मायावी वास्तवता, संस्कृती, आदिवासी    


इंडीयन आयडॉल ५ दूरचित्रवाणीवर चालले आहे. मी स्वरूप खानचे राजस्थानी लोकगीत ऐकतो. आणि हेलावून जातो. मी अवकाशात उचलला जातो, उंच उंच थरावर, कितीतरी वर्षांनंतर.
मी डोळे मिटून घेतो. टीवी च्या पडद्यावरील रोषणाई नजरेआड करतो.
वाळवंटात दूरवर जाणाऱ्या गाण्याच्या ताना मी अंतर्यामात पाहतो, ऐकतो. माझा "देस", माझी धरतरी, माझे अनामिक लोक,  सारे काही नजरेत येते. सर्व अंगांगाला स्पर्श करतात. गंगा यमुना मुक्त होतात.
मनोमन मी आशा करतो, येणाऱ्या काळात स्वरुपचे आणि त्याच्या लोककलेचे बॉलीवूडच्या मायावी
वास्तवापासून रक्षण होऊदे, त्यांना टिकून राहूदे.
एक काळ असा होता जेव्हा लोककलेतून अभिजात कला जन्मल्या आणि वाढल्या, इथेच नव्हे, सर्व जगभर. आता फक्त  कलेच्या नावाने वारंवार विडंबन आणि विटंबना पाहायला मिळते. आता मानलेल्या गुरूंची नक्कल बघायला मिळते.
हा काळाचा नव्हे मुक्त बाजाराचा (फ्री मार्केट) महिमा आहे. 


इथे इंडिया शब्दाचा अर्थ "प्रथम  जगत इंडिया" जेथे "तृतीय जगत इंडिया" व "चतुर्थ जगत इंडिया" (आदिवासी व वनवासी जमाती) यांना स्थान नाही. तरीही बहुविध जन माध्यमामुळे स्वरुपसारखे तरुण आपले नशीब अजमावयास येतात. इतर वाहिन्यावर  असे तरुण अधून मधून बघायला मिळतात. समता फक्त घटनेत लिहिलेली आहे. ती कधी अस्तित्वात येईल याचे भाकीत कोण करू शकेल?   

प्रथम जगत इंडियाचे नागरिक कालही अल्पसंख्यांक होते, आणि वाढत्या लोकसंख्येबरोबर आजही आहेत. सत्तेचे - आर्थिक, राजकीय, सामाजिक - लगाम जोवर त्यांच्या हातीं आहेत तोवर समता व लोकशाही कल्पलोक राहणार. 
दुसरी गोष्ट: इतर स्पर्धकांबद्दल काय सांगणार? ते सर्व धादांत नकलाकार! Crafty!! अर्रर्र, न-कलाकार!!! नकली  मालाला बाजारात फार मागणी आहे म्हणतात.   

टीप: छायाचित्रे - १ वारली आदिवासी मुंबईच्या मागील दारी राहतात. यांच्यावर इंग्रजीत लिहिलेला संशोधन निबंध माझ्या ARCHETYPES INDIA या ब्लॉगवर प्रसिध्द केलेला आहे (दुवा).
२ भिल्ल आदिवासींच्या होळी उत्सवावर व आदिवासी लोकजीवनावर
सचित्र पोस्ट याच ब्लॉगवर पहा (दुवा). 
३ ही सर्व छायाचित्रे व लेख माझ्या मते "मायावी वास्तवता" आहे, यांचा अर्थ आपण आपापल्या बोधानेप्रमाणे समजतो. 

~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape

July 27, 2010

भाज्यांचे तंतूमय जीवन

 कापूस. काथ्या, आंबाडी, ज्यूट, केळ, घायपात, अननसाची काटेरी पाने इत्यादी वनस्पतीजन्य सेंद्रीय तंतू आपल्याला माहित आहेत. त्यांचे दैनंदिन जीवनात अनेक उपयोग आहेत, विशेषत: ग्रामीण जनतेला.

अलीकडे पश्चिमी राष्ट्रांत शाकाहारी जेवणाचा बराच बोलबाला होत आहे. बरोबरच सेंद्रीय खतावर पोसलेल्या अन्न धान्ये, भाजा फळे यावर पण विशेष भर दिला जातो; मात्र त्यासाठी अधिकारपूर्वक दिलेले प्रशस्तीपत्र हवे असते. त्यांच्या जीवनशैलीत मात्र काहीच फरक होत नाही. त्यांच्याकडून पृथ्वीच्या जळ - जमीन - हवा यांचा उच्छेद चालूच आहे. म्हणतात ना, "सौ चुहे खाकर बिल्ली हज करणे चली".


माझी बालवाडी शाळा (nursery school) गावातील आमचे मातीचे घर आणि परिसर असल्याने,  शाक-भाज्या, फळ-भाज्या यांचे दर्शन लहानपणीच झाले होते. घराच्या परसात अनेक भाज्या पावसाळ्यात वाढवल्या जात. वेलींवर / झाडांवर बियाण्यासाठी ठेवलेली फळे पिकून पूर्ण तयार झाल्यावर त्यांत तंतूंचा गुंता बघायला मिळायचा.


वरील चित्रात एक तयार झालेले घोसाळे व दुसऱ्यात कठीण कवच काढल्यावारचे आतील तंतू दिसतात. यातील क्षार व खनिजे असलेला जलमय गर नाहीसा झालाय. दुसऱ्यात सुटे केलेले जाड उभे तंतू दिसतात, ते देठापासून सुरु झालेले आहेत. ते आतील तंतूमय गर, वर बाहेरची साल, तसेच देठ यांना एकत्र बांधून ठेवतात. हे फळाच्या आकाराशी व वजनाशी पण प्रमाणबध्द आहेत. (यास्तव भोपळा जमिनीवर सोडवा लागतो; त्याचा वेल मांडवावर चढवता येत नाही.) यात कुठेही विनाउपयोग वापरलेला भाग नाही.


निसर्गाच्या आलेखनावर (design) एका शास्त्रज्ञाने केलेले
भाष्य मूळ इंग्रजीत इथे उदृत करतो. हे भाष्य, व्याख्याच म्हणा, आधुनिक वास्तुविदाना फारच उद्बोधक ठरेल.

“In whole organism, randomness structure is uncommon. Everything seems finely tuned by the brutal rigours of natural selection. There are no spare limbs to be found and hardly any dispensable organs. This forced economy of whole organism design has always limited the use of bodily form as an evolutionary timepiece” (Martin Jones, ‘MOLECULE HUNT: How Archaeologists are Bringing the Past Back to Life’, Penguin, 2002, p. 48)”.

मात्र आधुनिक नागर समाजाच्या (civilized society) विकासाचे लक्षण म्हणजे त्यांच्या "वाढणाऱ्या संपत्तीबरोबर वाढणारा अपव्यय" करण्याची क्षमता" झालेले आहे. मग ती जीवनशैली असो, कि त्यांचे घर-परिसर असो, कि आराम-विश्रामासाठी कुबड्या वापरण्याची हवस असो.

~ ~ ~ ~ ~ 
© Remigius de Souza. All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape

July 15, 2010

संधिप्रकाश मंडल: विसाव्या शतकाचे श्राध्द

 (मूळ "Twilight Zone" (१६-०८-१९९९)  या प्रकाशित इंग्रजी कवितेचे स्वैर भाषांतर: पहा दुवा )
संधिप्रकाश  (Image Source: Internet)
गवाक्ष कुटीचे - नजर जगतावर 
सरकते पुढे पुढे, ढगांच्या पंखांवर
यात्रा दिवस-रात्रीच्या संधीवर 
जेथे धरती व तारकांचा वसे परिवार 
येथे ना कुणी स्पर्शू करू शके, येथे ना
स्थान कःपदार्थ सिध्दांताना
व्यापार, राजकारण अन् दर्शनांच्या; 
अन भूचरांना जयाना नसे घरोबा 
वसुंधरा व दिवाकराशी, जे जगतात
आत्मप्रतारणेत अन फुगवलेल्या वादंगांत
प्रमाणाबाहेर. काम - काम - काम,
काम जो सोडीजे मागे भव्य भग्नावशेष 

दैवते, भगत, जे जगती देऊन प्रवचने   
मुक्तीच्या आशेची व उभारती स्मारके
रक्ताच्या साड्यांवर भूचारांच्या, जे जखडलेले 
सर्वकाळ अराजकांच्या साखळदंडांत.









पावन आहेत गांडुळे दुरस्त 
सार्वजनिक नजरेआड, ते नाही निर्मित
धर्मशास्त्रे वा स्मारके आपल्या

विष्टेतून वारसांसाठी, वा  संहार जीवनाचा.



रेमीची स्-प्रतिमा 
*    *    *    *    *
टीप: १. प्रतिमा - गांडूळे, मृदा संधारण करणारा पर्यावरणातील एक महत्वाचा जीव, जो अजूनपर्यंत दुर्लक्षित होता.  
२. प्रतिमा - रेमीची स्व-प्रतिमा, विसाव्या शतकाचे प्रतिक - स्वत:चेच एक विडंबन चित्र   
३. प्रतिमा: संधिप्रकाश (source - Internet )

~ ~ ~ ~ ~ 
© Remigius de Souza. All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape

July 06, 2010

वटपौणिमा: मुंबईत आपला परिसर


 सावित्री-सत्यवान ही पौराणिक गोष्ट सवश्रूत आहे. मन, संवेदना, जाणीव व बोधना यांची पकड घेणारी ही सर्वस्पर्शी कथा सार्वकालिक (timeless) आहे; तिला प्रशस्तीपत्रे बहाल करणारा मी  कोण?
पण माझ्या कुवतीनुसार ही कथा व परंपरा यांची काही लक्षणे ध्यानात आली ती मात्र मी इथे नमूद करतो.

सावित्री: 

स्त्रीशक्तीच्या विलक्षण सामर्थ्याचे दर्शन या कथेत होते. ही कहाणी स्त्रीमुक्तीच्या आधुनिक सुधारक जमान्यात कुठे बसते बरे? तिने आपल्या सामर्थ्याने यमाला - मृत्यूला - पण नमवले.
ही कथा किती लोकांनी वर्षानुवर्षे पुन्हा पुन्हा कथा काव्यातून संपादित केली असेल? एका कवितेतील वाक्य आठवते: "सप्त पदे सख्य साधुशी घडते", सावित्री यमाला सांगते. श्री अरविंद यांनी तर इंग्रजीत महाकाव्य लिहिलेय. (मी ते वाचलेले नाही. एक तर माझे इंग्रजी जेमतेम; अन त्याची जाडी पाहून वाचायचा धीर झाला नाही.) यामुळे भारतीय स्त्रीच्या दर्जात काही फरक पडला का?


इंडिक (Indic) संस्कृतीत सामाजिक आणि/किंवा धार्मिक परंपरा --- पूजाअर्चा, विधी, उत्सव, कथा, कीर्तन, लोककला इ. अनेक अभिव्यक्तीनी साकारलेल्या आहेत.जळ, जमीन, वानसे,व प्राणी यांच्यांशी निगडीत आहेत. भूसृष्टी प्रमाणे त्या खसृष्टी व ऋतुचक्राशी पण जोडलेल्या आहेत.
परंपरा म्हणजे जिवंत इतिहास. अन स्त्रियांनी तर परंपरा, पर्यायाने संस्कृती, जपण्यास सर्व काळात व सर्व देशांत फार मदत केलेली आहे.
इंडिक संस्कृतीतील अनेक परंपरांत पर्यावरण (साकल्याने, पर्यावरण, पारिस्थितिकी व ऊर्जा, तीनहि) पायाभूत आहे.
या परंपरा सर्वसमावेशी असल्याने साकल्याचे (holistic) द्योतक आहेत. असा हा यांचा आवाका प्रचंड आहे जो तथाकथित धर्मश्रध्देच्या पार पुढे जातो. 

ज्या काळात आजच्या सारखी सांघिक शिक्षण (mass education) नव्हते तेव्हा या परंपरा पिढ्यान पिढ्या "लोकाभिमुख लोकशिक्षणाचे साधन" झाल्या. 

वट पूजेच्या दुसर्‌या दिवशीच्या भटकंतीत रस्त्याच्या बाजूला अनेक ठिकाणी वडांची पूजा झालेली दिसली. तेथे निर्माल्य पडलेले होते. हे निर्माल्य कोठे जाते?
ते असंख्य जीव जीवाणूंचे अन्न असते, उरले सुरले भूमीत सामावते - अन्न ब्रम्हाच्या कारणी लागते, त्यावर वृक्षांचे पोषण होते. मुंबईत मात्र उरले सुरले अन्न गटारात किंवा शहराच्या कचऱ्यात जाते.   

सावित्रीच्या कथेत तीन पात्रे: सावित्री, सत्यवान अणि यम आहेत. तरीही सर्व पुढील पिढ्यांना वडाची कुणी महाभागाने पूजा करायला लावली. तो (किंवा अनेक) दृष्टा महापुरुष असणार. संशोधक सांगतात,  वृक्षपूजा आदिवासी - आदिम जमाती - यांच्यापासून चालू होती (दुवा: आनंद कुमारस्वामी).     

वटवृक्षाचे महात्म्य:
वड विलक्षण कणखर वृक्ष आहे. ज्या जमिनीत वाढतो तेथे पाण्याचा साठा तयार होतो व वाढतो. या झाडावर पशू पक्षी यक्ष वास करतात. हा वृक्ष हजारो वर्षें जगतो अन याचा विस्तारही विशाल होतो.

"सत्तेचे विकेंद्रीकरण"
वडाचा बहुमोल धडा
विशालकाय वडाचे टिकून राहण्याचे रहस्य आहे त्याच्या अनेक खोडांमध्ये. जसा हा वाढत जातो तशी याची पारंब्यांतून नवीन खोडेपण तयार होत जातात. आणि त्याच्या विस्ताराचा डोलारापण सांभाळतात. गुजरातेत "कबीरवट" स्थान आहे. त्याच्या सावलीत पिकनिकला जाणारे शेकडों लोक एका वेळी आसरा घेतात. माडासारखा उंच वाढला तर एवढा डोलारा घेऊन हा टिकूच शकणार नाही. 

आजचा समाज फार पुढारलेला किंवा सुधारलेला असेल. तरीही अजून लोक वडाची पूजा करतात. पण त्याच्यापासून बरेच काही शिकण्यासारखे आहे हे पण ध्यानात घ्यायला हवे. आणि "सत्तेचे विकेंद्रीकरण" शिकणे तर आज फार अगत्याचे झालेय.

सत्ता असो, राज्य असो, संस्था असो की शहर असो, त्यांच्या वाढीबरोबर त्यांचे विकेंद्रीकरण करणे ईष्टच नव्हे तर अपरिहार्य असते, नाहीतर त्यांचे विघटन अटळ समजाच! कारण मानवी सत्तेला निसर्गाची मान्यता नाही, कधीच नव्हती. पण हे गोऱ्या चामडीच्या लोकांना कधीच समजले नाही; त्यांच्या एतद्देशीय चमच्यांना पण नाही; विज्ञानाच्या आजच्या तथाकथित विकासानंतर पण नाही! हा दैवदुर्विलास तर नाही? नाही, हा सत्ता-दुर्विलास आहे. 


सत्तेचे केंद्रीकरण 

शहर हे सत्तेचे प्रतीक आहे, अगदी इतिहास काळापासून. मग त्या सत्तेचे स्वरूप - धार्मिक, सामाजिक, औद्योगिक, शैक्षणिक वा राजकिय - कोणतेही  असो. केंद्रीत सत्ता अमर्याद वाढली कि कोलमडते. ब्रिटिश साम्राज्य, सोवियट रशिया, रोम शहरातील पोपचे साम्राज्य... चेर्नोबिल ही काही याची उदाहरणे.  
लंडन, न्युयॉर्क, पारिस इ. जागतिक महानगरातील सामान्य माणसाच्या दैनंदीन जगण्याची गुणवत्ता मला माहित नाही, पण त्याबद्दल मला शंका मात्र जरूर आहेत.  
सत्तेचे केंद्रीकरण जसे वाढत जाते तसे सत्तेची बैठक जेथे असते ते शहर पण वाढते. सत्तेच्या प्रमाणात ते नगर, महानगर, जागतिक नगर (Global City) होते.

"अंकोर वट" (कंबोडिया) या बाराव्या शतकातील मंदिरासवे "अंकोर" ही हिंदू राजाच्या राजधानीचे महानगर (सुमारे १००० चौरस मीटर क्षेत्रफळ) होते. तंत्रज्ञानात ते राज्य त्यावेळी पुढारलेले होते. पण सत्तेचे अनिवार केंद्रीकरण  त्या राज्याच्या व शहराच्या विनाशाला कारणीभूत झाले. अशी कैक उदाहरणे इतिहासात आहेत. (दुवा:
http://en.wikipedia.org/wiki/Angkor)

मुंबई महानगर इथे डोळ्यासमोर आहे. येथे सामान्य जनांच्या जगण्याच्या प्रत्येक क्षेत्रात --- पाणी, अन्न, सांडपाणी-मैला, आरोग्य, शिक्षण इ. --- यांचे  व्यवस्थापन कोलमडले आहे. प्रचार काहीही असो. मुंबई केवळ "सूजीचे मोठेपण" मिरवते.
फक्त चांगले तेवढेच पहायचे, बाकी सर्व नजरेआड करायचे म्हणजे स्वतःशीच प्रतारणा करणे, दुसरे काय? हे खरे आपण "भोगवादी" झाल्याचे लक्षण!  

फिरंग्यांच्या संसर्गाने तथाकथित सुधारलेल्या शहरी लोकांनी  निसर्गापासून फारकत घेतली, वेगळेचार केला -- त्याला वेगळ्या खात्यात टाकले; निसर्ग केवळ भोगवस्तू झाली. विधी राहिले, अर्थ हरवले.


बाजारू व यांत्रिकी मुंबई शहराने नागरिकांचे आचार-विचार-सवयींचा ताबा घेतला, सवयी, समजुती, आचार, विचार... साचेबंद झाले, दृष्टीचा ताबा मायावी सृष्टीने /  वास्तवतेने (virtual reality) घेतला. मग "विधायक सर्जनशीलतेचे" काय झाले? विधायक असो कि विघातक असो, सर्जनशीलता समाजातील दोन टक्के लोकांच्या हाती गेली, त्यांची मक्तेदारी झाली; सत्तेसाठी व नफ्यासाठी सर्जनशीलता राबवली गेली - जाते. बाकीच्या लोकांनी फक्त "हो" ला "हो" द्यायचा.       

संधीकाळ
तरीही भल्या पहाटे कोकिळ, कावळे, साळुकी, कुकुडकोंभा इ. पक्षी साद घालतात, कुठेतरी कोंबडा आरवतो. भल्या पहाटे गांडुळे मातीत पुन्हा अदृश्य होतात. भल्या पहाटे सकाळपाळीचे लोक ४:५५  ची लोकल पकडण्यासाठी निघाले आहेत; त्याना माणसांच्या दुनियेबाहेर काय चाललेय याचे भान असते का माहित नाही.  भल्या पहाटे वारली बाया पळस, कुडा इ. पानांचे भारे घेऊन फूलबाजाराचा रस्ता तरातरा पार करतात. त्यांचे मात्र या कॉंक्रिटच्या जंगलातपण अवधान जागरूक असते.  


टिप: १. छायाचित्रे, वट पौर्णिमा १ व २ | रेमीजीयस डिसोजा. २. 'सूजीचे मोठेपण': कोकणी वाक्प्रचार, अर्थ स्पष्ट आहे.
--- रेमीजीयस डिसोजा 
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape