December 31, 2011

जागतिक महायुद्धे नादाविना

आय-टेक्नोमॅन, रेमीची स्व-प्रतिमा
अहंकार उर्मट उच्च-तंत्रज्ञाचा
झडपा लेवून, हिमालयाएवढ्या उंचीचा
निर्मीतो कॉम्प्यूटर, उपग्रह, महानगर
अन् करी कायमची भगदाडे खोलवर,
उल्कांहूनही, धरतरीच्या उरावर :
जागतिक
महायुद्धे नादाविना.
* * *
(मधुकोष गोंडवनी या ब्लॉगवर प्रसिद्द केलेल्या मूळ "WORLD WARS WITHOUT BANG" इंग्रजी कवितेचा अनुवाद)
रेमीजीयस डिसोजा | मुंबई | २८-१२-२०११

कांही इंग्रजी दुवे - १. Missed Target of 9/11, २. iTECHNOMAN
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.

December 27, 2011

मनोगत : औद्योगीकरण की पश्चिमीकरण

मनोगत: पश्चिमेचा समाज तीनशे वर्षे औद्योगिकरणाबरोबर वाढला. सहाजिकच त्याचा परिणाम त्यांची संस्कृती व भाषा यांवरही झाला. इंडीयात आम्ही फक्त उसनवारी करून घोकंपट्टी केली. मग मायबाप सरकारने समित्या नेमून परिभाषा कोश तयार करविले. पण प्रथम -- वाचणार कोण, आणि दुसरे, वापरणार कोण? ... इथे चार बुके शिकायचे वांधे!


~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape

December 25, 2011

पशू-पक्षी-वानसांची बोली

पशू-पक्षी-वानसांची बोली
जर कधी असती समजली
(टॉम जेरीची मायावी चित्रे पाहिली
व्यर्थ; व्यर्थ पंचतंत्र-जातके वाचली)
तर औकातील व्याप टळले असते
निदान सुधरली असती रेमीची बोली


रेमीजीयस डिसोजा | मुंबई |
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.

December 18, 2011

मनाची रात्र काळोखी (कविता)

 अंधारी रात्र हवी विश्व दर्शनाला
पंच-मूल-तत्त्वे
मनाची रात्र काळोखी
मी निरखी
विश्व चमत्कारी


रेमीजीयस डिसोजा हायकू
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.

December 15, 2011

मनोगत: शेतकरी

मनोगतः जोवर ग्रामीण जनतेला, यातील तीस टक्के लोक शहरांतील झोपडपट्टींत खितपत पडले आहेत, कायदा व व्यवस्था यांपुढे जावून न्याय मिळत नाही तोवर लाचलुचपत, आतंक, अतिरेक, दंगली, भाववाढ, अवर्षण, पूर, दुष्काळ आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या यांचा सुकाळ असणार.


रेमीजीयस डिसोजा 
 ~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape

December 09, 2011

रेमीची मुक्ताफळे - १८ : लोकशाही


शंभर कोटी दुय्यम दर्जाचे भारतीय अनुभवाने शिकतात (व शहाणे होतात).
परिणामतः कंपू (युती/आघाडी)  करून तगलेल्या लोकसभा!
पण राजकारणी लोक धडा घेत नाहीत... 
~ ~ ~ ~ ~ 
© Remigius de Souza. All rights reserved.

December 01, 2011

भारतात समकालीन समाज व सामाजिक कार्य

लोक-उर्जा
 सूचक शब्द- समाज, संस्था, सृष्टीचे संधारण, लोकसंधारण, ग्राम-शिक्षण

कोणतिहि घटना वाचली, पाहिली की मी अंतर्मुख होतो, माझ्या पांयांखाली काय जळतंय व सभोवतीं काय घडतंय तें बघतो, अगदी नजर पोहचेल तेथवर... जीं साधने उपलब्ध असतील त्यांनी.
२. समज आल्यापासून मी ज्या चारही जगतांतून — तृतिय जगत भारत (किसान), पंचम जगत भारत (विस्थापित), चतुर्थ जगत भारत (आदिवासी), व प्रथम जगत इंडिया (औद्योगिक) — राहिलो, फिरलो, काम केले व अनुभव घेतले, त्याचा चित्रपट झर्रकन समोरून जातो.

समाज
भारतीय समाजाची सांस्कृतिक विविधता
३. समाज हा शब्द आपण सर्व मानवसमूहांना सर्रास वापरतो. या समूहांत कांही विषेश भिन्नता आहेत. कांही नागरसमाज आहेत. कांही आदिम व वंशविशिष्ट जमाती आहेत.
४. कांही आदिम किंवा आदिवासी जमाती आहेत. याना जमाती म्हणणे युक्त आहे. कारण त्याची घडण नागरसमाजांप्रमाणे श्रमाच्या विभागणीवर, वर्ण किंवा वर्ग यावर आधारलेली नाही. इथे प्रत्येक व्यक्ति संपूर्ण जमातिचा प्रातिनिधिक घटक असतो. आदिम जमातीत वेश्या नसतात, हें विशेष!
५. कांही वंशविशिष्ठ जमाती असतात. उदा. केरळात आजही एक मातृसत्ताक जमात आहे. आर्य इंडियात येण्यापूर्वी कर्नाटकात मातृसत्ताक कुटुंबपद्धति होती (भारतीय संस्कृतिकोश, संपादक : पं. महादेवशास्त्री जोशी). शिवाय लमाण, धनगर आदि जमाती पण आहेत.
६. भारतात जशी जैवविविधता आहे तशी सांस्कृतिक-विविधता पण आहे. ही सृष्टीचीच मानवाला मिळालेली देणगी! यासाठी उच्च शिक्षणाच्या सर्व शाखांत मानवशास्त्रचा समावेश करणे जरूरीचे आहे.

संस्था
७. विलायतेहून फिरंग्यांनी इथे औद्योगिकरण आणले. त्याने कुणाच्या ध्यानात येण्यापूर्वी सारा सुशिक्षित व अशिक्षित समाज व्यापला. ही क्रांति नव्हती, उसनवारी होती. औद्योगिकरण आले, बरोबरच अनेक "संस्था" आल्या, क्लिष्ट कायदे आले. त्यांनी व्यक्ति व समष्टीचे खाजगी व सार्वजनिक जीवन कबजांत घेतले. आणि दोन्ही आपली स्वावलंबन व स्वयंनिर्णयाची स्वायत्तता गमावून बसले.

सामाजिक कार्य
८. सामाजिक कार्य करणारया संस्था, चळवळी, चळवळे (activists)... इ. देशातील अमानुष आर्थिक सामाजिक विषमतेतून कालपरवां सुरू झाल्या. आपण मंचावर उभे राहून बोलतो तेव्हा मंचाखाली असलेली वस्तुस्थिती गृहित धरतो, जी सतत बदलत असते. आपण "आहे हे असंच चाललंय - चालायचे" म्हणायचे. आणि बरे करायचे तोटके, curative measures, शोधायचे. एवढेच कातडी-बचाऊ काम प्रशिक्षिताना उरते. सर्जनशीलता, मौलिकता काय करायचीय?
९.  शिक्षक, डॉक्टर, तंत्रज्ञ, इंजिनीयर, आर्किटेक्ट, सरकारी-निमसरकारी सेवक, नगरनियोजक, अर्थज्ञ, शास्त्रज्ञ... पोलिस यांचे काम "सामाजिक कार्य" नसते का ? ते सर्वजण समाजाचा भाग नाहीत का ? अर्थातच अधोगत, अवनत, भग्न समाजांत — मग ते पश्चिमात्य असोत कि पौर्वात्य — असें घडत नाही हे दिसतेच आहे. आपण मात्र आपापला अहंकार भावूकपणे गोंजारत असतो. एवढेच!

सेवाभावी संस्था
१०. उदात्त उद्धिष्ठानी सुरू झालेल्या कांहीं संस्थांना कार्यकर्त्यांचा पगार देण्यासाठी पैसे जमा करणे व तगून राहाणे एवढेच कार्य उरते. तर काहींचे लक्षण सरंजामदारीचे दिसते. ग्रामीण भागांतील बहुतेक संस्था मागासल्या समजल्या जाणार्‌या निरक्षर किसान व आदिवासींना "अशिक्षित" समजून त्याना शिकवायला आलेले असतात; या शहरी सार्वजनिक वा सामजिक कार्य करणार्‌या लोकांना त्यांच्याकडून "शिकण्यासारखे" कांहीच नसते.

शिक्षण
११. विसाव्या शतकाच्या सुरवातीला – रानडे-गोखले याचा काळ – दोन टक्के लोक "सुशिक्षित" होते. गोखले तेव्हा 'मोफत व सक्तिचे प्राथमिक शिक्षण' विधेयक प्रीव्ही कौन्सिलात आणायची धडपड करित होते. त्याला शंभर वर्षे झाली!
१२. शिक्षण – शिकणे, शिकवणे – व्यवसाय झाले आहे; तें प्रशिक्षित, व्यवसायिक, प्रव्यवसायिक उमेदवार नोकरी-धंद्यासाठी तयार करते.पण ही "सार्वजनिक शिक्षण-संस्था" बहुसंख्य जनतेला गेल्या साठ वर्षांत साक्षर व शिक्षित मात्र करू शकली नाही. हा "राजदुर्विलास" नव्हे तर काय?

सर्वप्रथम सुयोग्य शिक्षण
१३.  प्रचलित शिक्षणपद्धतीवर माझा रोष इयत्ता दुसरीपासून सुरू झाला. त्यावेळी तो फारच विरल होता. पण तो मानसिक अवरोध नव्हता! माझा व्यक्तिनिष्ट रोष कालांतराने निरिक्षण, विश्लेषण, संश्लेषण, तर्क, तर्काचा अंत इत्यादि प्रक्रियेतून बदलत वस्तूनिष्ठ होत गेला.
१५.  त्यामुळे पुढचे शिक्षण, श्रम (काम), नोकरी, व्यवसाय – तसेच अर्थार्जन अन् व्यय – या सर्वांवरच एक अदृश्य सावली नेहमीच राहिली, आजतयागत. ती सावली म्हणजे "सामाजिक बांधिलकीची जाणीव". त्या जाणीवेतून व आजवरच्या प्रवासातून काढलेले कांही निष्कर्ष येथे नमूद केलेले आहेत.
१६. प्राथमिक शाळेपासून महाविद्यालयीन शिक्षण / व्यवसायिक प्रशिक्षण कुणाच्या खर्चाने होते? एक उदाहरण- एका वास्तूविदाच्या शिक्षणासाठी सुमारे पंधरा ते वीस लाख रुपये खर्च येतो; आता याहून अधिक येत असेल. याचा बोजा अखेरीं जनतेच्याच डोक्यावर पडतो. वास्तू (शिल्प-शास्त्र-विद्या) या अभिजात शाखेचा उगम आणि विकास (?) "निवारा" या मूलभूत गरजेतून झालेला आहे. पण कुणालाच माहित नाही की आमच्या थोर लोकशाहीत "बेघर" लोक किती आहेत!

सामाजिक बांधिलकी
१७. सामाजिक बांधिलकी याचा अर्थ काय व ती कुणास लागू होते?मेलेल्या माणसास अग्नी, मूठमाती देणे किंवा मृत व्यक्तिच्या (माहित असल्यास) श्रध्देप्रमाणे अंतक्रिया करणे, या कार्याचा, मला वाटते, सामाजिक बांधिलकीत सर्वांत वरचा नंबर लागावा. कल्पना करा मढं वेळेवर उचललं नाही तर समाजावर काय प्रसंग ओढवेल?
१८. पण समाजाला, धर्मसंस्थेला किंवा व्यक्तीला त्याच्या या बांधिलाकिची कांही चिंता नको. सृष्टी समर्थ आहे. तिने त्या मुडद्याची विल्हेवाट लावायची व्यवस्था अगोदरच करून ठेवलेली असते. करोडो जीवाणू त्याच कलेवरात जन्माला येऊन त्याचा फडशा पाडतील, आणि ते मरून त्यांची माती पण होईल.

सामाजिक बांधिलकीचे एक सामान्य उदाहरण
१९. आमच्याकडे मुंबईतल्या घरी अस्पृश्य जातीची, झोपडपट्टीत राहणारी अशिक्षित बाई घरकामाला होती. एकदा रस्त्यावरच्या एका आजारी, बेवारशी, मरायला टेकलेल्या म्हातार्‌याला ती आपल्या झोपडीत घेऊन आली. त्याची सुश्रुषा केली. दोनेक दिवसानंतर त्याची अंतःक्रियापण तिनेच केली. खरं सांगूं? माझ्याकडून हें झालें नसतें.

सृष्टीचे संधारण (conservation)
२०. गीतेवर विनोबांनी केलेल्या भाष्यात तीन योगक्रिया – यज्ञ, दान व तप – सांगितल्याचे आठवते.
१. यज्ञ – सृष्टीकडून आपण जेजे घेतो त्याची भरपाई करणे : उदा. जमिनीतून अन्नधान्य घेतो म्हणून तिची मशागत करणे, खतपाणी देणे. सृष्टीची झीज भरून काढणे हा यज्ञ.
२. दान – मनुष्य-समाज, आईबाप, गुरू, आप्तेष्ट इ. आपल्यासाठी मेहनत घेतात, त्यांचे उतराई होण्यासाठीं, झिज भरून काढण्यासाठी दान करणे. हा परोपकार नव्हे.
३. तप – आपण शरीर – मन, बुद्धि, इंद्रियें – वापरतो. त्यांची झीज भरून काढणें, त्याची विकारांपासून शुद्धी करणें. हे झालें तप. समाज व शरीर सष्टीबाहेर नाहीत. तसेच या तीनही क्रिया यज्ञच आहेत. (संदर्भ : विनोबा भावे, गीता-प्रवचनें, अध्याय १७)
२१. पिरामिड, ताजमहाल, अंतराळयानें... बांधायला लागणारा पैका सरकारी टांकसाळीत का तयार होतो? मानव वापरत असलेली सर्व साधनसंपदा मूलतः भूईतून येते. सर्व संपत्ती तेथेच उगम पावते. पण त्या भूईवर सर्व जीवमात्राचा समान हक्क आहे. वरील उदाहरणे व्यक्ती, वर्ण किंवा वर्ग यांच्या सरंजामदारशाहीचे लक्षण आहे. दुर्दैवाने आजच्या लोकशाही राष्ट्रांत याची पुनरावृत्ती होत असलेली दिसते. आणि धरती कुणाची मालमत्ता नाही. कुणालाच तो मालकीचा नैतिक अधिकार नाही. पांच हजार वर्षांच्या इतिहासात नागरी समाजाने या भूमिचा किती उच्छेद केला असेल!

लोकशाहीत राज-कारभाराचे लक्ष्य
२२. कोणत्याही लोकशाही राज्य-कारभाराचे लक्ष्य जनता हेच असायला हवे :  जनता हेच "साधन व साध्य". सर्व योजना, प्रकल्प, कायदे, नियोजन कसे करावे वा कसे तडीस न्यावे यांचे मार्गदर्शन व उत्तरे केवळ जनतेकडूनच मिळणार. सरकार वा इतर संस्था फक्त निमित्तमात्र असतात, असाव्या, याहून अधिक काही नाही.
२३. सरकार व विविध संस्था केवळ बिनचेहर्‌याचीं अवजारे आहेत. त्यांचे प्राथमिक कर्तव्य आहे जनतेच्या मूलभूत गरजांचे — श्रम, विश्राम, आरोग्य, अध्ययन व प्रजनन — संरक्षण करणे, आणि बदलणार्‌या परिस्थितिनुसार सुधारणा व विकासाचे प्रकल्प जनतेला सुलभ, उपलब्ध करून देणे.

सुयोग्य शिक्षणाची गरज
२४. अन्न-निवारा-वस्त्र या मूलभूत गरजा आहेत हे हाडूक कोट्यवधी वेळां जाणकारांनी सार्वजनिक पीठावर चघळले असेल. हे मान्यवर एक वस्तुस्थिती शहाजोगपणे विसरतात : मुक्या जनावरानांपण हे ज्ञान उपजत असते. हे शिकवायला नाही राजाची गरज, ना गुरूची, ना कोणा तज्ञाची, नाही सुपरमॅनची ना स्पायडरमॅनची!
२५. ज्या सृष्टीने जन्माला घातले त्या सर्व जीवमात्राला — प्राणी अन वनस्पती — या गरजा भागवण्याची सक्षमता आणि स्वायत्तता दिलेली आहे. त्यासाठी लागणारी स्वयत्त पंचकर्में — श्रम, विश्राम, आरोग्य, अध्ययन व प्रजनन — सर्व जीवमात्राला दिलेली असतात. त्यांचा मक्ता  कोणत्याही मानवी सत्तेला आणि संस्थेला सृष्टीने दिलेला नाही.
२६. तसेच पुनः पुन्हा इतिहासाची उजळणीपण करायची 'गरज' नाही. आज तो अवशिष्ट रुपाने आपल्या समोर आहे. प्रश्न आहे तो यावर इलाज काय ? चुकीची मूलभूत दुरुस्ती करायची की नविन तंत्र शोधायचे की जुजबी फेरफार करून "जैसे थे" धोरण चालू ठेवायचे की आयते परदेशी तंत्र आयात करायचे? सर्जनशीलता, मौलिकता काय करायची?

लोकसंधारण व सामाजिक संतुलन
२७. शेतकरी लागोपाठ आत्महत्या करताहेत. ३० कोटी माणसे दारिद्र्य रेषेखाली आहेत. ४० कोटी निरक्षर भारतीय जनता आताच्या ग्रेगरीयन शकाच्या एकविसाव्या शतकात कॉम्प्युटर-साक्षरतेच्या युगात आहे. शहरांतील गलिच्छ वस्तींत सडणारे किती लोक आहेत त्यांचा सुमार नाही. ती जनता यापुढे "टेक्नोक्रसी"कडून येणार्‌या बलिदानाला कसे तोंड देणार?

सहा लाख खेड्यांसाठी नवी शिक्षण पद्धती
२८. कुणासाठी कोणते शिक्षण योग्य आहे हे कसे ठरवणार? कोणाला किती केव्हा प्राधान्य (priority) देणार?
देशात सहा लाख खेडी आहेत. तेथे सुमारे नव्वद कोटी माणसे राहतात (लोकसंख्या नव्हे). तेथे अन्न, पाणी, शिक्षण, आरोग्य, उपज... यांची काय दैन्यावस्था याची खात्रीलायक माहिती कोणती संस्था, कोणते संप्रेषण माध्यम देऊ शकेल? यासाठीच सत्तेचे विकेंद्रीकरण करणे अत्यंत निकडीचें झाले आहे.
२९. प्रचलित शिक्षणपद्धती वेळोवेळी जुजबी फरक करून साठ वर्षें चालू ठेवण्यात आलेली आहे. त्यात कांहीही मूलभूत फरक करायचा असेल तर पुढील मुद्यांची दखल घ्यावी लागेल. आणि त्यांची तपशीलवार नोंदणी करावी लागेल.

लाख गांवांच्या स्थानिक वस्तुस्थितीचे सर्वेक्षण
३०. हे सर्वेक्षण अर्थातच सर्व गांवकरी लोकांच्या सहभागानेच करायला हवे. असे सर्वेक्षण लोकशिक्षणाचा भाग तर होतोच, पण इथे लपवा-छपवी करायला जागा राहत नाही. कारण हे काम स्थानिक पातळीवर करायला हवे;
३०.१. स्थानिक पर्यावरण : नैसर्गिक, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय इ. पर्यावरणाच्या सर्व शाखा;
३०.२. पारिस्थितिकी : लोक-बोली व भाषा, आणि त्यांची मौखिक ज्ञानसंपदा, लोककला, चरितार्थाचे पारंपरिक ज्ञान व साधने;
३०.३. ऊर्जा : जलवायूमान, मानव-ऊर्जा, प्राणी-ऊर्जा, जैव-ऊर्जा, खनिज संपत्ती, आणि वन संपत्ती, जसे अन्न, तेलबिया, औषधी-सुगंधी-रंगरोगण-इमारती-तंतू वानसें, इत्यादि. वानसे जळ व जमीनीतली. वानसे तृणे-शैवालांपासून वेली-महावृक्षांपर्यंत;
३०.४. भौगोलिक स्थान आणि प्रादेशिक संलग्नता (linkages)

३१. ग्राम-शिक्षणात येणारे विषय
३१.१. जळ संधारण, जमीन संधारण, कृषी व फलोद्यान, पशुपालन, जैवतंत्रशास्त्र;
३१.२. व्यापार वाणिज्य, ऊर्जा साधन निर्मिती;
३१.३. स्थानिक स्वराज्य संस्था, जमीन महसूल व तत्संबंधीं कायदे;
३१.४. हे शिक्षण प्रात्यक्षिकावर आधारलेले असावे.
३१.५. या शिक्षणसोयी - शाळा - सर्व वयाच्या मुलाना व प्रौढाना, स्त्री-पुरुषाना, उपलब्ध करायला हव्या.

सरता पालव
बदलत्या परिस्थितीनुसार स्वावलंबी होण्यासाठी बहुसंख्य जनतेला साक्षरतेबरोबर सुयोग्य शिक्षण आवश्यक व निकडीचे आहे. सहा लक्ष खेड्यांची व तेथील 'जनते'ची ओळख आमच्या देशांत किती 'नागरिकां'ना आहे? कोणत्या नकाशावर आहे त्यांचे अस्तित्व बघायला मिळते? तळहाताएवढ्या नकाशातपण आम्ही पाहतो दिल्ली मुंबई कोलकता चेन्नाई... आणि आम्ही देशप्रेमाने राष्ट्रभक्तीने भारून जातो. खेड्यांना त्यांच्या हक्काचा वांटा मिळायलाच हवा. नाहीतर आतापर्यंत केलेली प्रगती केवळ पुच्छप्रगती ठरेल. अरबस्तानात "अरब स्प्रिंग" आला, भारतात दुसरे कुरुक्षेत्र येईल.
सृष्टीयोग
टीप: गेल्या वीस वर्षांत शिक्षण या विषयावर कांही संशोधन केले, प्रयोग केले, लेख लिहिले. ते सर्व लिखाण हेतुपूर्वक इंग्रजीत लिहिले. हे लेख नियतकालिकांत प्रसिध्द झाले होते. व आता माझ्या इंग्रजी ब्लॉगवर आहेत.  त्यापैकी काहींचे दुवे येथे देतो.
१. Politics of Literacy in India : Challenges of 21st Century
२. Farming: Politics of Education in India
३. Letters and Numbers, plus ‘Things to Make'
४. Work-Leisure-Health-Learning-Propagation

~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.

November 28, 2011

रेमीची मुक्ताफळे -१७ : विश्व-लोक-ऊर्जा


विश्व-लोक-ऊर्जा
सामाजिक वर्गांची विभागणी सत्तेच्या केंद्रीकरणाला आधारभूत असते.
जेवढ्या वर्ग-विभागण्या अधिक तेवढी केंद्राची सत्ता अधिक. 
७ अब्ज-लोक-ऊर्जा येई संपुष्टात, ऊर्जेच्या जागतिक युद्धात.

टीप: ट्विटर वरील संदेशाचे भाषांतर
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.

November 25, 2011

मी अण्णा हजारे नाही: डायरीचे पान

मी अण्णा हजारे नाही. लोकपाल विधेयक किंवा जन लोकपाल विधेयक, एकाचाही मसुदा मी वाचलेला नाही. आता पर्यंत या विषयावर झालेल्या गदारोळांत एवढी ऊर्जा वाया गेलेली आहे! पण वर्तमानपत्राचे एक पान या विधेयकांचा मसुदा प्रसिद्ध करण्यासाठी वापरले नाही; ना सरकारने ना चळवळ्यानी. असं कांही फुकटात वाचायला मिळाले असते तर त्यावर मी माझा अभिप्राय अवश्य लिहिला असता.

कोणतेही विधेयक पास होवो. हितसंबंधी लोक त्याचा बोर्‌या वाजवणार, ते हायजैक करणार. मग ते राजकारणी असतील, उद्योजक असतील, सरकारी कर्मचारी असतील किंवा सफेद कालरवाले गुंड असतील. जेथे कायदा करणारेच कायदा धाब्यावर बसवतात म्हणून आज तुरुंगांत बसवले आहेत, हे आपण पाहतोच. तेथे इतरांचे काय?

अण्णानं जर लोकसहभागाने गांवांना हरीत करण्याची मोहिम चालू ठेवली असती, आजुबाजूच्या चार गांवांत नेली असती तर वेगळा इतिहास घडला असता. हे 'हरित गांव' विधायक काम आहे, पण एवढे एक अण्णाच गांव पुरेसे नाही. त्यानं काय आकाशाला ठिगळ लावणार? नाही तरी आम्हाला एका पिसाने मोर व्हायला आवडते.
[२१:५९, शनिवार १७-०९-२०११]
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.

November 22, 2011

घायपात बहरे मुंबई शहरी

घायपात बहरे मुंबई शहरी

फोटो १- घायपात, मुंबई
अलभ्य लाभ ! मुंबईत रस्त्याच्या चौकात हे वानस बघायला मिळणे दुर्मिळ, आणि शहरातपण कुठेही. कुणी समंजस कलावंताने त्याचा उपयोग उपवन वानस म्हणून केला होता. तोही सुबक रीतिने : वहानवाहक व पादचारी यांच्या दृष्टीला अडथळा न आणता.

आणि मी पाहिले माझ्याशिवाय तेथे आणखीही कोणी होते. त्या होत्या छोट्या मधमाशा, घरमाशीपेक्षा लहान. मी फोटो घेत होतो, त्या मध घेत होत्या.

घायपात त्याच्या मजबूत तंतूसाठी प्रसिद्ध आहे. आणि खेडूत त्याचा यथायोग्य उपयोग करतात. भारताच्या जैविविधतेत तंतू देणारी अनेक वानसे आहेत : माड, कपास, अंबाडी, भेंड. शेवरी, केळ, अननस, ताग इत्यादि.

घायपाताच्या पानांतून तंतू मिळतात. तर अंबाडीच्या फाद्यांतून ६-८ फूट लांब तंतू काढता येतात. शेतकरी, कोळी, आदिवासी इ. लोक यांच्यातून मासेमारीची जाळी विणतात.

हे दोर सिंथेटिक दोरापेक्षा अधिक टिकाऊ असतात. हीं जाळीं जेवढी पाण्यात भिजतात तेवढी अधिक मजबूत होतात. या उलट सिंथेटिक दोर व जाळीं कोरडी राहिली कि कांही दिवसांनी आपोआप विशीर्ण होत जातात.

फोटो २- घायापाताचा फुलोरा, मुंबई
या चित्रातील घायपात बंदिस्त जागेत वाढवलेली उपरी वानसे आहेत. यांचा फुलोरा पाहिला कीं कुणाच्याही ध्यानात येईल हीं झाडें बाहेरून दिलेल्या खत-पाण्यावर पोसलेलीं आहेत. त्यांना जमिनीतून काहीही पोषण मिळत नाही. थोडक्यात हीं परावलंबी झाडें आहेत.

या पर्यावरणाचा त्यांच्या वाढीवर परिणाम झाल्यावाचून कसा राहिल ? नैसर्गिक मोकळ्या अवस्थेत यांची पाने पांच फूटाहून अधिक वाढली असतीं.

पिंजर्‌यातले पक्षी, कांचेच्या टांकीतले मासे, कुंडीत लावलेलीं झाडें आणि मुंबईच्या फूटपाथवर लावलेली शोभेची झाडे यांचे पण असेच होते.

मग आपलें - शहरवासियांचें - काय होत असेल बरें? हीं शहरें आमचें व्यक्तिस्व सर्वार्थाने शारीरिक, मानसिक (व आत्मिक) बहरायला, फुलायला कारणभूत होतात का?

असे हे प्रश्न माझे मीच स्वतःला विचारायचे, आणि उत्तरही मीच शोधायचे. गंमत अशी : या प्रश्नांतच त्यांचे उत्तर आहे !

~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.

November 18, 2011

रेमीची मुक्ताफळे -१६ : पर्यावरण


सृष्टीच्या कार्यात "पर्यावरण, पारिस्थितिकी व ऊर्जा" यांचे स्वतंत्र खातेवाटप नाही; ते परस्परसंबंधी व अधिव्यापी घटक असतात. सृष्टीच्या निर्मितीत काटोकाट मितव्यय असतो आणि त्या वस्तूचे जैव अथवा अजैव आयुष्य संपल्यावर अवशिष्टाचे पुनश्चक्रण (recycling) होते.
आधुनिक औद्योगिक संस्कृती मात्र हा पाठ शिकली नाही.

~ ~ ~ ~ ~ 
© Remigius de Souza. All rights reserved.

November 15, 2011

रेमीची मुक्ताफळे-१५


 सृष्टीयोग
 सृष्टीने दिलेल्या या जीवनाचा मी केवळ परिरक्षक, आणि शारीरिक व मानसिक शक्तिंचा विश्वस्त आहे. वांट्याला आलेल्या या एका आयुष्याचे सार्थक मीच करायचे.


~ ~ ~ ~ ~ 
© Remigius de Souza. All rights reserved.

November 10, 2011

काळाचा महिमा

काळाचा महिमा
प्रतिमा: अस्थिवर चंद्र-कला (सुमारे ३०,००० वर्षांपूर्वी)
काळ अर्थात "मृत्यू" व "समय" दोन्हीही. ही आमची देशी समज. पण औद्योगिक किंवा पाश्चिमात्य जगांत काळ म्हणजे फक्त वेळ, 'time', जो केवळ घड्याळाच्या कांट्यावर, कैलेंडरच्या पानांवर एकमार्गी चाल चालतो.

खरं पाहतां काळ, Time, चालतबिलत नाहीं. आमचा देशी 'समय', घटका पळं प्रहर... कांहींही म्हणा, पृथ्वी, चंद्र, सूर्य, नक्षत्रमाला यांच्याबरोबर चक्राकार फिरत असतो, cyclic असतो. तो अर्थातच सृष्टीशी जोडलेला असतो. यास्तव आपण सहज बोलून जातों, 'काळ आला होता पण वेळ आली नव्हती'.

हा दोन समाजांतील सांस्कृतिक फरक आहे. संस्कृती ही सृष्टीची मानवाला त्याच्या उत्पत्तिपासून मिळालेली देणगी आहे. जेव्हा समाज-धर्म-राज्य-न्याय इ. संस्था कांही स्वार्थी बलिष्टांनी निर्माण केल्या नव्हत्या तेव्हापासून !

खरं तर काळ बदलत नाही. बदलत असते सामाजिक परिस्थिती कांही बलवानांच्या इशार्‌यावर. बदलतों आम्ही; बदलतात आमच्या संवयी आणि श्रद्धा; आणि त्याच आमचा धर्म होऊन बसतात; त्याच अंतिम सत्य आहेत वाटूं लागते. यांना धक्का लागलेला आपणांस खपत नाही.

तर्क आणि विवेकबुद्धी वापरून कोणत्याही विधानाचा, घटनेचा वा परिस्थितीचा छडा लावणे आपण टाळतो, क्रिकेट असो कि कारगिल.

त्याऐवजी आपणास 'शब्दाप्रमाण्यावर' वर विश्वास ठेवणे सोयीचे वाटते. वस्तुनिष्ठेपेक्षा व्यक्तिनिष्ठा, विभूतीपूजा आपणास अधिक भावते. शारिरिक, मानसिक, बौद्धिक गुलामगिरीचे जूं मानेवर घ्यायला आपण नेहमीच तत्पर. डोक्याला त्रास नाही! गोपाळ गणेश आगरकर किती लोकांस आठवतात बरें!

औद्योगिक समाजावर वेळेचा पगडा विलक्षण आहे. रोजव्यवहारात एक म्हण आहे : "Time is Money", समय म्हणजे पैसा; असं वेळेचं मूल्य-मापन केलं जातं. जसं जमीन व जळ यांनापण पैशानं मोल लावलं जातं. खरंच, वेळेचं मूल्य, किंमत, उपयोग व लायकी जीवनाकडे पाहतां काय आहे? अशा वेळेला पैशाचे मोल लावायच्या कल्पनेला कोणी आव्हान दिल्याचं ऐकिवात नाही. पण तीही वेळ येईल.

। कालाय तस्मै नमः ।

Scale-drawing by Marshak A. (1970)

"गॅलिलियोचा दोलक"

अलिकडच्या 'काळीं' गॅलिलियोने 'वेळ' या आधुनिक संकल्पनेचा व साधनाचा शोध लावला, जसे न्युटनचे 'सफरचंद'. चर्चमध्ये बसला असता त्याने वर दोलायमान होत असलेले झुंबर पाहिले मात्र ! हा गॅलिलियोचा 'दोलक' (दुवा पहा : Galileo and the Pendulum) ! आज विज्ञान व्यवसाय (proffesion) झाले आहे, कधी ते कारागिरी (vocation) होते. गॅलिलियो (संक्षिप्त चरित्र) अर्वाचीन विज्ञानाचा जनक समाजाला जातो.

 टीप: वरील चित्र मी प्रथम John C. Eccles यांच्या "Evolution of the Brain: Creation of the Self " या पुस्तकांत व त्याच्या मुखपृष्ठावर पहिले. चित्रातील (b) हे प्रमाणबद्ध रेखाचित्र  Marshack, A. (१९७०) या वैज्ञानिकाने केले होते (Source: Internet). ही चित्रे येथे निवडायचं कारण: यात "काळा"चं प्रतिक चित्रित केलेलं आहे. 

या शिल्पाची कला, विज्ञान वा खगोलशास्त्र अशी वर्गवारी लावणे चूक ठरेल. या आदिमकाळातील कांही भित्तीचित्रेशिल्पे संशोधकांना सापडली आहेत.

वरील चंद्र-कला कोरताना या कलावंताने केलेला साधनांचा मितव्यय (economy) विशेष महत्वाचा आहे. नाहीतर आमचे बॉलीवूड-टेलीवूड वरचे कार्यक्रम पहा! वेळेचा आणि पैशाचा धूर! तूप नाही; तेल नाही; हातीं धुपाटणं घेऊन परतायचं!

त्यांच्या नृत्य, काव्य, संगीत इ. कलांची कल्पनापण आज करता येणार नाही. पण त्यांची प्रतिभा, मौलिकता, कल्पकता व सर्जनशील निर्मिती कोणत्याही युगापेक्षा रतीभरही उणी नसणार. तीपण अत्यंत बिकट वातावरणांत केलेली! मग आपण सुधारणा म्हणतो ती कुणाची / कशाची?
~ ~ ~ ~ ~ 
© Remigius de Souza. All rights reserved.

October 27, 2011

॥ जेथे जातो तेथे ती माझी सांगाती ॥

॥ जेथे जातो तेथे ती माझी सांगाती ॥

रेखाचित्र, शब्दचित्र, शिल्पचित्र, छायाचित्र, चलत्‌चित्र... वा कल्पनाचित्र सारें कांहीं सृष्टीतून आलें; आणि व्यापार-उद्योगांत विरून गेलें.
 
की त्यांचे लक्ष्मी (तिजोरी) -पूजा व दुर्गा (युद्धें-अतिरेक-आतंक-सत्ता...) -पूजा यांत सार्वजनिक परिवर्तन झालें?
 
या धबडग्यांत सरस्वती-पूजा कुण्या वाळवंटात लुप्त झाली माहित नाही. मग सार्वजनिक शारदोत्सव कुठून ?

अनादि काळापासून जळ-जमिन-जीव यांनी - मूलतः सर्वच ज्ञात व अज्ञात सृष्टीने मानवाला संस्कृती प्रदान केली; त्यांचे भरण पोषण संवर्धन केले अशी माझी श्रद्धा !

त्या काळांत नागरी समाज अस्तित्वात नव्हते; ते निर्माण केले त्यांच्या स्वयंकेंद्रित सत्तेच्या आकांक्षेने !
 
हा अलिखित इतिहास आजही वर्तमान परिस्थितीत गम्य आहे. नागरतेच्या तथाकथित प्रगतीत, विषेशतः आजच्या औद्योगिक समाजाच्या मनात सृष्टीमातेचे काय स्थान आहे सांगायला नकोच. ते त्याच्या कृतीने सिद्ध होते.
अर्थात सृष्टीला त्याचे ना सोयर ना सुतक ! ती त्याचे वरदान व दंड - स्वर्ग व नरक - येथेच देते.
 

अधिक वाचा >> Civilization Trap In Our Era

दिवाळीचा पाडवा भातशेती झाली की येतो. शालिवाहन शक आणि अनेक पौर्वात्य शक वसंताच्या आगमनाने सुरु होतात. या व अशा अनेक परंपरा सृष्टीशी निगडीत आहेत. या सर्व संस्कृतीच्या अभिव्यक्ती ! मानवी संस्कृती सृष्टीतून उगम पावते व तिच्यात लोप होते. आता या परिस्थितीत माणसाच्या कर्तुताने फरक होत चालला आहे... व त्याचे परिणाम रोज पाहायला मिळतात.

मुंबई | दीपावली २०११
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.

October 22, 2011

एक कालातीत कवी : बालकवी - त्र्यं. बा. ठोमरे

एक कालातीत कवी : बालकवी
बालकवींची सृष्टी
(बालकवी - त्र्यंबक बापूजी ठोमरे, जन्म- १३ ऑगस्ट १८९०, मृत्यू- ५ मे १९१८)

शंभरीनंतरी बालकवींच्या कविता आजही नुकत्याच उमलणार्‌या कळीसारख्या ताज्या आहेत.

आज नागरी समाजाच्या जीवनशैलीत, भाषेत, अभिरुचीत फरक झाला आहे. पण आजही या कवितांच्या नाविन्यावर कांहिंही परिणाम झालेला मलातरी जाणवला नाही.

'समग्र बालकवी' [टीप १] हें पुस्तक वाचनालयातून आणले. तेथे समजले, एका संस्थेने हें ब्रेल लिपीत लिहिण्यासाठी नेलें होतें. ऐकून फार आनंद झाला.

पुस्तक घेतल्यावर प्रथम पहिल्या पानापासून शेवटपर्यंत चाळले, कुठे काय आहे पाहिले. ओळखीच्या दोन कविता भेटल्या.

'ती फुलराणी' मी शाळेंत असताना वाचली होती. पहिले चार चरण मात्र कायमचे ध्यानांत राहिले होते. तेंच 'आनंदी आनंद गडे' या कवितेचे. चार ओळी का असेनात पण कायम आठवणींत कोरल्या गेल्या, अन त्या वेळोवेळी आठवतात पण. यांनी बालमनावर केलेले संस्कार पण कधीं पुसले जात नसावेत.

गेल्या शंभर वर्षात अनेक समर्थ साहित्यिकांनी, समिक्षकांनी, अभ्यासकांनी त्यांच्यावर व कवितांवर विविध लेखन केलें, टीका लिहिल्या, संपादन केले, प्रबंध लिहिले. अगदी काल परवांपर्यंत.

॥ बालकवींची सृष्टी ॥
 अवतरण १
_______________________________________________
॥ सृष्टि ॥
चाल : अरुण
सृष्टि मला हांसविते। स्वर्गसौख्य दाखविते
शांतीने पालविते। आनंदें डोलविते
मन माझें टाकि गडे नित्य गुंगुंनी ॥१
(अपूर्ण कविता पृ. २१७) 
_________________________________________________

"सृष्टी" हा शब्द कवितांत बत्तीस वेळां येतो. कांही नजरेतून सुटले असतील. ते वेगवेगळी रुपे घेऊन आलेत. त्यांत एक आहे "अंत:सृष्टी". तसेच निसर्ग, जग, विश्व इ. शब्द या संदर्भाने येतात. त्यांच्या कविता सृष्टीने - निसर्गाने, प्रकृतिने - अंतर्बाह्य समृद्ध केलेल्या आहेत हें सर्वांना माहित आहे. पण त्यांची सृष्टी प्रातिनिधिक नाही, सांप्रदायिक नाही हे विशेष आहे.

ती सृष्टी वास्तव आहे, इंद्रियगम्य आहे. सूर्य चंद्र तारे... ब्रम्हांडापासून जळ जमीन जीव... गवतापर्यंत सर्व जैव-अजैव निसर्ग तिच्यांत सामावतो. एवढेंच नाही तर तिचें आंतरिक अस्तित्वपण संवेदना, भावना, प्रज्ञा, विचार... यांनी प्रतीत झालेले जाणवते.

"सृष्टी" शब्दाचे कांही निवडक उल्लेख

सृष्टीचे मंजुळ ताल
... ... ...
         ही सृष्टीचीं
         निगूढतेचीं
         तत्त्वें साचीं
सांग उकलुनी आह्मांतें
गा गा गा विहगा गीतें ॥२॥ (८३),

| मनोवेधका सृष्टीसतीच्या अगा चिमुकल्या बाळा (६८) | हें तान्हें । सृष्टीचें गोजिरवाणें! (९१) | सृष्टि बालिका (२१८) | सृष्टीदेवीच्या सगुणा बाळा (११९) | सृष्टि तुझी ही --- हेंच तुझें घर --- विहार (१५०) | सृष्टिसतीने साज घेतला (१८८) | दिव्यरूपिणी सृष्टी (१९२) | ती आशा मग सृष्टीबंधनीं पुन्हां जीवास घे गोंवुनी (२०७) | हालवीत कचभार सृष्टीचें उत्थापन बोले (२१९) | हे रवी शशी तारका तसे ग्रहगोल. / ही सृष्टिसुंदरी मजला गाया शिकवी, / हीं चराचराचीं निगूढ गीतें कांहीं. (२३५) | हर्षविल अंतःसृष्टी मला (२४९) | विविधा सृष्टी (२५९) |कविता शीर्षक, 'सृष्टीच्या गायकास' पृ. 83. । "कवीच झाला सृष्टि, सारी सृष्टि झाली कवी" (प्रस्तावना, संदर्भाचा उल्लेख नाही, पृ. बत्तीस) ।

साकल्याने [टीप २] पाहिल्यास, त्यांच्या सर्व कवितासंभारांत जाणवते की मानवाला सृष्टीपासून वेगळे अस्तित्व नाही, तसेंच ती भोग्य वस्तूपण नाही. दिव्य, देवता, दिव्यत्व इत्यादि उल्लेख पाश्चिमात्य Divinity या धार्मिक कल्पनेपेक्षा आत्मिकतेवर -- religiousness -- आधारलेले आहेत; जशी त्यांची पहाट स्थल-विशिष्ट नाही तर वैश्विक आहे.

॥ बालकवी : एक कालातीत कवी॥

त्यांच्या अनेक कवितांत वेगवेगळ्या नव्या अपारंपरिक देवतांचे उल्लेख येतात, त्यांत मानव नव्हे, 'श्रीमानवता'देवी सुद्धा येते. आणि त्या अभावितपणे सृष्टींत उगम पावतात. यामुळे त्यांची सृष्टि-देवता व आत्मिक-ता नास्तिकाला किंवा अज्ञेयवाद्याला पण नाकारता येणार नाहीत. 
आज जडवाद व चंगळवाद यांच्या वावटळी संप्रेषण-माध्यमांतून फोफावत आहेत. या आधुनिकतेने लोकांचे आयुष्य चाकोरीबद्ध तर केले आहेच व त्यांची त्रेधा पण उडवलेली आहे. याची सुरवात ब्रिटीश राजवटीत झाली.
 
बालकवींच्या कवितेत कधीकधी निराशेचे जे सांवट दिसते त्याचे कारणही यांत असावे असे मला वाटते. पण त्यांचा सहजधर्म व सर्जनशीलता या स्थितिला पुरून उरणारी होती. बालकवींची कविता या आधुनिकतेच्या फार पुढे गेलेली आहे.
 
वडाचें बीज मोहरीपेक्षाही लहान असते. आणि ते कोठेही रुजते, खडकावरपण. पण त्यांत या महावृक्षाचे संपूण आलेखन (DNA) लिहिलेले असते हें  कदापि विसरून चालणार नाही. बालकवी - त्र्यंबक बापूजी ठोमरे यांनी आधुनिकतेची नाडी बरोबर ओळखली होती.
अशा वेळी अनेक लोकांस त्यांची कविता नैतिक आधार देऊ शकेल. आणि ही अत्यंत निकडीची गरज आहे असं मला प्रांजळपणे वाटते.
अवतरण २
________________________________________
 श्रीमानवता ॥
चाल : सूर्यकांत (समुदितमदना)
ग्रंथारंभीं नमन देवते श्रीमानवते तुला ।
दिव्यदेवता विविधरूपिणी तूंच एक निस्तुला ॥
(
पृ. २०९)
_____________________________________

॥ चिरयौवना सृष्टी ॥

 ॥ जेथे जातो ती माझी सांगाती ॥ ( रेमी डिसोजा)

मला अभिप्रेत असलेली सृष्टी: ती सतत सर्जनशील निर्मितीत रममाण असते. ती जीवाणू ते वानसें-मानव यांना समान लेखते. ती मानव समाजांतील भेद - उच्च - नीच, त्यांची शास्त्रें - नीतिनियम, त्यांचे ईश्वर - अवतार - महात्मे, कशालाच वोळखत नाही. एकदा संपूर्ण जीवलोकाला पोषण, संवर्धन, संरक्षण इ. साधने दिल्यावर तिचे पुढील काम - शौचाचे परिवर्तन (recycle) - चालू राहते. जेव्हा साध्य आणि साधन यांच्यांत दुजाभाव असतो तेव्हा अराजक (chaos) निर्माण होते. सृष्टीयोग म्हणजे साध्य आणि साधन, दोनही एकच - सृष्टी - असते.

आयुष्याच्या दिशा
बालकवींच्या अल्प-आयुष्यांत त्यांची भटकंती; मराठी, संस्कृत व इंग्रजी साहित्याचा अभ्यास; व भौतिक परिस्थितीशी केलेला सामना साकल्याने पाहता जाणीव होते की हा असामान्य कवी काळाच्या फार पुढे गेला होता, नव्हे काळाला पुरून उरलेला आहे.

टीप  १ :  "समग्र बालकवी" । लेखक : त्र्यंबक बापूजी ठोमरे । संपादक : नंदा आपटे । प्रस्तावना, संपादित आवृत्त्या, संदर्भसूची : एस. एस. नाडकर्णी । पॉप्युलर प्रकाशन मुंबई । प्रथम आवृत्ती, २००५ । किंमत रु. ४००/- । बालकवींच्या एकत्रित कविता आता उपलब्ध नाहीत. या पुस्तकाने ती एक फारच मोठी उणीव भरून काढलेली आहे. सर्व अवतरणें व संदर्भ या पुस्तकांतून घेतलेले आहेत. या पुस्तकाचे कॉपीराइट प्रकाशकाच्या स्वाधिन आहेत.
टीप २ : Holistic: In nature a whole is larger than the sum of all its parts. साकल्य : निसर्गाची पूर्ण कृति तिच्या सर्व भागांच्या बेरजेपेक्षा अधिक असते.उदाहरण: पाण्याची वैज्ञानिक व्याख्या जरी "H2O" असली तरी पाणी त्याहूनही अधिक असते. बालकवींच्या कविता वेगवेगळ्या करून साहित्य शास्त्राच्या व सौंदर्य शास्त्राच्या चौकटीतून पाहिल्या की बरेंच कांही हातातून निसटून जाते.

© Remigius de Souza. All rights reserved.|

October 18, 2011

॥ आई ॥

॥ आई ॥
रेमजीयस डिसोजा

आईविना पोरक्या पोरी
वणवण तुही वाळवंटीं
आई नाही दारी घरी
आई नाही हाटी बाजारी
आई नाही तरुवरी
आई नाही शेतावारी
आई नाही कड्याकपारी
आई नाही तरीवरी
आई नाही रानझरी
आई नाही देवाचे मंदिरी
आई नाही राजदरबारी
आईविना पोरक्या पोरी
हरवलीशी आठोप्रहारी
आईविना पोरक्या पोरी
परवड तुही कवण्या दिशी?
* * *
२७-२-१९९४
(टीप: इथे आई कोण आणि मुलगी कोण हे वाचकाने ठरवायचे)
~~~~~~

© Remigius de Souza. All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape

October 10, 2011

बाप माझा - एक महाकाव्य

बाप माझा - एक महाकाव्य

विस्मरणाच्या धुक्यातून ते क्षण
मावळतीच्या किरणांत
लख्ख चमकले क्षणभर!

तेव्हा माझा बाप चालता बोलता
महायात्रेस निघून गेला होता.
त्याच्या कलेवराच्या चेहरयावर
तेव्हासुघ्धा तृप्तीचे शांत
भाव चिकटून होते.
आणिक अंगावर फक्त
हातभर सूती लंगोट.

सुखी माणसाचा सदरा शोधणारया राजास
माझ्याच बापाने तर फसवले
नव्हते ना?
पण त्याने मला तर
नक्कीच फसवले होते.

शेत बंधाऱ्यावर आड्याओढ़्यांत
मुळ्या काटक्या गवत पाल्यांत
या लंगोटी बहद्दराला गवसले
रहस्य विश्वाचे
ज्याच्यासाठी विश्वामित्राने
घोर तपस्या केली होती म्हणे
आणि संपला होता प्रतिविश्व
निर्माण करण्याच्या महत्वाकांक्षेत.

माझा हेकेखोर
अंविश्वासाने भारलेला बाप
फक्त लन्गोटीच्या एका कमाईवर
राहीला जन्मभर
आणि त्याचे जडीबुटीचे गुपित
उराशी घेऊन मेला.

माझ्या विलायती पदव्या
आणि माझी शल्यविद्या
कशाला कशाला त्याने नाही जुमानले
आपल्या जुनाट बुरसटलेल्या कल्पनांची
आणि अंधश्रद्धेची खातिर करताना.

म्हणे विद्धेचा व्यापार करायचा नाही;
एकादशीला जेवायचे नाही;
'बाहेरच्या' बाईचे वारे घ्यायचे नाही;
सामिष अन्नास स्पर्श नाही;
शेणमातीच्या जमिनीवर बसायचे
आणि बांबूच्या तरटावर झोपायचे।


म्हणायचा, 'तू पोपट सोनेरी पिंजरयातला;
ही विद्या देऊन तुला
मुक्ती नाही मिळणार मला
जन्मोजन्मी'.
सर्वच नन्नाचा पाढा.

आता माझ्या मरणशय्येवर या
पंगू शररिराला जीवदान देणाऱ्या
नालिकानी ढगाळलेल्या
अवकाशात जाणिवेच्या
हा आठवणीचा किरण येतो
कुठूनसा आणि स्पर्श करतो
माझ्या विकलांग मनास.

नदी केव्हाची वाहून गेलीय;
राहिलेत फक्त रेताडाचे पूर
आणिक एक किरण जाणीवेचा।
~~~~~
© remigius de soujaa. al rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

September 30, 2011

बा. भ. बोरकरांची "कृतार्थ जीवित" आणि पांच कविता

बालकृष्ण भगवंत बोरकर (१९१०-१९८५)
 "कृतार्थ जीवित" ― कविता बोरकरांची झाली माझी प्रार्थना

    ॥  कृतार्थ जीवित ॥ 

ओळखतिल जे मला आणि मज
दावितील मम यथार्थ ओळख.
कणकणिं माझ्य, देतिल किंवा
अवघ्या ब्रम्हांडाची पारख.
असीम त्यांवरि प्रेम करुनियां
करीन मी हें कृतार्थ जीवित .    ॥ १ ॥

निसर्गसम जे संतत सुंदर
नित्य निरामय जे बाह्यांतर.
सुखदुःखाच्या स्थित्यंतरिं जे
अखंड आनंदाचे निर्झर.
असीम त्यांवरि प्रेम करुनियां
करीन मी हें कृतार्थ जीवित.    ॥ ३ ॥

आकाशापरि कवळिति जग जे
उजळिति, जिवविति तेजें अविरत,
ढग जे येती भाळीं त्यांच्या
धुळींत पिकते त्यांनी दौलत.
असीम त्यांवरि प्रेम करुनियां
करीन मी हें कृतार्थ जीवित .    ॥ ३ ॥

सागरसम जीं विशाल हृदयें
गगन धराया करिती तडफड
अपेश जडलें तरि जयांना
धडपडण्याची दुर्दम आवड.
असीम त्यांवरि प्रेम करुनियां
करीन मी हें कृतार्थ जीवित.    ॥ ४ ॥

(दूधसागर, १९४७; बोराकरांची समग्र कविता, २००५| पृष्ठ २२९) 
शाळेच्या पाठ्यपुस्तकात ही कविता शिकलो होतो. अगदी तोंडपाठ. पुढे आयुष्यभर ती कधी मनातल्या मनांत, कधी मुक्त आवाजात गात आलो. पण एकदा वाचकाच्या एका टिप्पणीला प्रतिसाद देताना ही कविता शान्ता ज. शेळके यांची आहे असा उल्लेख केला होता. त्या चुकीची जाहीर दुरुस्ती इथं करतो. टागोरांच्या "उच्च जेथा शिर..." या कवितेप्रमाणे "कृतार्थ जीवित" ही पण आयुष्यभर माझ्यासाठी प्रार्थना झाली.

* * *
     ॥ मागणें ॥

माझें थकलें मागणें तुझें सरेना दान
गिमामागून अमाप तुझें पिके समाधान

दिसा वरुषे चांदणें स्वर्ग रात्रीचा आंदण
दाही दिशांच्या तीर्थांनी माझा तुडुंबे रांजण

आतां खुंटली रे तृष्णा माझें कुंठलें मागणें
मीच झालो तुझ्या हातीं तुझें लाडकें खेळणें

तुझें माझें दयासिंधो जगावेगळालें नातें
तुझ्या माझ्या जिव्हाळ्यांत उभें त्रैलोक्यच न्हातें

माझ्या मागण्याहुनी रे तुझें देणेंच शहाणें
'तुझें-माझें' हेहि आतां फक्त शब्दांचे बहाणे

६ .१२ .१९५९ (चित्रवीणा, १९६० | बोरकरांची कविता, १९६०  | बोरकरांची समग्र कविता, २००५, पृष्ठ ४३१)
बोरकरांनी कोणाला उद्धेशून ही कविता लिहिली हें स्पष्टच आहे. मला मात्र हा ज्याचा अनुभव घेतां येतो असा निसर्ग दिसतो - सृष्टी दिसते.
* * *
 ॥ भाताचें रोप ॥ 

चिमणें इवलालें बीज
रम्य त्यांत होती शेज
दीड वितीचें कुणी रोप
घेत तिथें होतें झोप

ऊन म्हणालें, "ऊठ गड्या !"
पाऊस वदला, "मार उड्या
जगात येरे या उघड्या
करीं जळाच्या पायघड्या."

वायु बोलला, "ऊठ किं रे
माझ्याशीं धर फेर बरें
हसलें जर आपणां कुणी
दावुं वाकुल्या नाचोनी!"

भूमि म्हणाली, "चल बाळा,
वाजव पाण्याचा वाळा
आंगी हिरवी सोनसळा
घालुनि ही दावी सकळां. "

झोप झटकुनी तें उठलें
नंदबाळ जणुं अवतरलें
पाउस, वारा, ऊन तसें
जमले भवंतीं गोप जसे

अद्भुत याचा खेळ अहा!
जरा येउनी पहा तरी
उगवे, चमके पहा पहा
मोरपिसांचा तुरा शिरीं

केपें, ८.८.१९४० (बोरकरांची कविता, १९६० | बोरकरांची समग्र कविता, २००५ पृष्ठ  ३२७)
मी माझ्या निकटच्या लोकांना सांगतो तुमच्या लहान-मोठ्या मुलांना हंगामांत भातशेती दाखवायला "ट्रीप" काढा. डिस्ने-लॅंड नाही पहिले तरी चालेल.
* * *

    ॥ माडाचें भावगीत ॥

ताठ उंच मी उभा नभास नित्य बाहुनी
राहिलो तुझ्याचसाठिं बाहु हे उभारुनी

स्वर्ग सांडिला मुदें तुझ्याच मुक्तिकारणें
देव वाहिला तुला, तुलाच वाहिलें जिणें

तापतां उन्हीं तुला दिली प्रशान्त सांवली
भागवावया तहान गोड गार शाहळीं

मेघ वारिले किती सुरम्य बांधुनी मठी
खावया दिलीं तुला फळें रसाळ गोमटीं

स्नान उष्ण घातलें तनूस तेल लावुनी
घास लाविले मुखा मुठेल तया मुठेल त्यात वाहुनी

रात दाटतां घरीं सुवर्णदीप लाविले
कुंतलीं प्रभातकालिं दैन्य सर्व झाडिलें

लग्नकारणीं, सणासुदीस, दुःखसंकटीं
साह्य मीं दिलें तुला सदैव बांधुनी कटी

स्वर्ग दाविण्या तुला स्वतःच जाहलों शिडी
चांदण्यांचिया तुला दिल्या भरून कावडी

गीत ऐकुनी तुझें तरारलों, थरारलों
नी चितारुनी भविष्य मी सहर्ष डोललो

तू परी कृपेमुळेंच होसि नित्य आंधळा
अन्‌ सुखामुळेंच जासि दुर्गतीचिया तळा

शंभु ठाकतां समोर गांगतीर्थ सांडुनी
कंठिंच्या हलाहलास जासि शीघ्र मोहुनी

कोटितीर्थ, मानवा ! असून माझाया शिरीं
तूं विषार्थ लाविली गळ्यास माझिया सुरी

स्वर्ग लाभतां करीं तयास नेसि रौरवा
धन्य धन्य बुद्धि रे तुझी विचित्र मानवा !

दुर्गतींत परी तुला करीन साथ मी
भावबद्ध मी तुला, तुझाच मित्र नेहमीं

भाविलें तुझ्यासवेँ रमेन दिव्य गौरवीं
स्वप्न तें विरून आज मी विषण्ण रौरवीं !

मुंबई, २६.५.१९४६ (आनंदभैरवी, १९५० | बोरकरांच्या कविता, १९६० | बोरकरांची समग्र कविता, २००५  पृ. २८२-२८३)
हल्लीच एक विज्ञान विषयक लेख वाचला. (दुवा : Coconuts and sunshine will power South Pacific islands )   आता नारळापासून वीज तयार करण्यात येणार आहे. आमच्या अतिउत्साही राजकर्त्यांनी जर असा प्रकल्प सुरु केला तर तो आणखी किती शेतकरी लोकांचा बळी घेईल? दक्षिण अमेरिकेत मक्यापासून डिझेल तयार करण्याचा कट तर जगजाहिर झाला आहे. भांडवलशाहीची हवस कोठवर जाईल याला मर्यादा नाही. म्हणून का माड म्हणतो मी विषण्ण रौरवीं?
* * * 

  ॥ कवि कोण ? ॥

देवलसी जीव सदाचा उदासी
                  फुकाचा सुखाची पार नसे
भावनेचा फूल भक्तीचा गोसावी
                  दिसे तसें गोंवी काव्याभासें
लोण्याहून मऊ मायेचे अंतर
                  दुर्बळा अंतर देत नसे
देवाचे संदेश उकलुनी दावी
                  विश्वासी सुखवी आत्मज्ञानीं
मनाने बालक बुद्धीने जो वृद्ध
                  तोडितो संबंध जगे जरी
सौंदर्याचा भोगी जीवनी विरागी
                  निद्रेतही जागी जगासाठीं
कर्तव्याची चाड कुडीच्यापरीस
                  दगडा परीस करूं शके
मतीने कृतीने उक्तीने निर्मळ
                 तेजाने उजळ करी जना
हाच खरा कवी प्रीत पाझरवी
                  तेजें दिपे रवि ईश्वर हा

धारवाड १९२८ (प्रतिभा, १९३० | बोरकरांच्या कविता १९६० | बोसक. २००५ पृष्ठ ७०)
बोरकरांनी अठराव्या वर्षीं लिहिलेली ही कविता त्यांचे "दिशाभिमुखन" (orienetation) दाखवते. व्यक्तीच्या पुढील आयुष्याची मांडवळ संगोपन, अध्ययन, पर्यावरण व दिशाभिमुखन पहिल्या पंधरा ते अठरा वयापर्यंत होते, त्याचा हा दाखला. नंतरच्या काळांत त्यांनी एका संमेलनांत "संत कवी" आणि "साहित्यिक कवी" यांतला फरक स्पष्ट केला होता.
#
टीप : या कविता निवडक नाहीत. पण त्यांना प्रातिनिधिक म्हणता येईल. बोरकरांच्या कविता म्हणजे "आरसा". म्हणून या कविता आवड - नावड अशी प्रतवारी लावून निवडलेल्या नाहीत. तरीही अशी एक कविता, "मी अश्रांत प्रवासी", जिने माझ्यातल्या भटक्याला स्पर्श केला, ती इथे उद्धृत केलेली नाही.

 ॠणनिर्देश : या कविता "बोरकरांची समग्र कविता - खंड : १ " या पुस्तकांतून घेतल्या आहेत. (प्रकाशक: देशमुख आणि कंपनी (पब्लिशर्स) प्रा. लि. पुणे | २००५ | मूल्य : ४५० रुपये | पृष्ठें : एकवीस + ४४९) या पुस्तकांत ३४३ कविता संग्रहित केल्या आहेत.  


Images: Sorce: Google Sites

© Remigius de Souza. All rights reserved.| Page copy protected against web site content infringement by Copyscape

September 24, 2011

सिद्धेश्वर मंदिर, सोलापूर, महाराष्ट्र : एक ओयासिस

सिद्धेश्वर मंदिर
सिद्धेश्वर मंदिर, सोलापूर, महाराष्ट्र  
ऐन रखरखित उन्हाळ्याचे कोरडे दिवस होते. अन्‌ मी अचानक विजापूरला माझ्या यात्रेला निघालो. चक्क वेडेपणा! पहिला मुक्काम सोलापूर. कुठे जायचे, काय पाहायचे, काहीच ठरवले नव्हते. पायीं भटकत निघालो आणि सिद्धेश्वराच्या मंदिरापाशी पोहोचलो, चुंबकाने ओढल्यागत!

मंदिराच्या प्रांगणात उतरलो आणि चकित झालो, भारावलो. सारी दुपार तेथेच काढली. संकुलात सभोवार भटकलो. कधी झाडांच्या सावलीत ताणून दिली. आणि आठवणीसाठी त्याचा एक आराखडा रेखाटला. जवळ कॅमेरा होता, पण एकही फोटो टिपला नाही. सारा वेळ तेथील शांत शीतळ वातावरणाचा सर्व संवेदना एकवटून आस्वाद घेत राहिलो.

सोलापूर, विजापूर जिल्हे कमी २५ ते ३० ईंच पावसाचे, उष्ण-कोरड्या हवामानाचे. अर्थात येथे पाण्याची कमतरता! आणि इथे पाहातो तर पारंपरिक वास्तुशिल्पाने ओयासिस निर्माण केले होते.

आजच्या सुधारलेल्या युगात पर्यावरणाचा बराच गवगवा होतोय. पण व्यवहारात मात्र उलटेच होत असलेले दिसते.

शहरांत इमारतींची उंची वाढत जातेय तर खेडोपाडीं पाण्याचं दुर्भिक्ष्य वाढतेय. कोंकणात १००-१२०  इंच पाऊस पडतो पण जमिनीतील पाणी १५० मात्र फूटाहून खाली गेलेय. मुंबई महानगरात पाण्याची कशी वाताहात होतेय विचारू नका!

वास्तू-महाविद्यालयात भारतीय वास्तूशिल्पाच्या इतिहासाचा अभ्यास करताना या मंदिराचा उल्लेख कधी आला नाही. अर्थात ती पुस्तके परदेशी विद्वानांनी लिहिली होती.

या वास्तू-इतिहासाचा अभ्यास करताना (शिकवताना व शिकताना) समकालीन नैसर्गिक, तसेच सामाजिक, राजकीय व आर्थिक पर्यावरणाचा विचार कधी शिवलाच नाही. केवळ सौंदर्यशास्त्राच्या रूढ संकेतांचा रट्टा मारणे चालत असे.

मूलतः वास्तू व पर्यावरण यांचा घनिष्ट संबंध आहे. किबहुना पर्यावरणात बदल करणे हा वास्तूचा मूल उद्देश आहे, मग ती झोपडी असो की प्रासाद असो, शेती असो वा उपवन असो, विहीर असो वा तलाव असो (हे सर्व वास्तशिल्पाचे प्रकार). पर्यायाने वास्तू पारिस्थितिकीत पण बदल करते आणि ऊर्जेचा व्यय पण करते.*

जेथे जळ आले तेथे जीवन आले, तेथे जलचर आले, तेथे वानसे आली, तेथे वनचर आले, त्याने समृद्धी आली.

उजाड फतेपूर सिक्री : ही वास्तू मोगल बादशहा अकबराने आपल्या नव्या राजधानीसाठी बांधली. हे सर्वश्रूत आहे. तेथे खास तानसेनसाठी एक छोटा कृत्रिम तलाव बांधलेला आहे व मध्यभागी गाण्यासाठी बैठक आहे.

अकबराने सर्व लवाजमा घेऊन त्याच्या नव्याकोर्‌या राजधानीत स्थलांतर केले. पण काही दिवसांनंतर तो आपला बाडबिस्तरा घेऊन परत मागे गेला. कारण तेथे पाणी पुरवठा नव्हता. मुंबईची पण अशी अवस्था व्हायला फार काळ जाणार नाही!

उजाड पडलेली फतेपूर सिक्री 'वास्तूशिल्पा' चे एक वस्तूसंग्रहालय musium होऊन राहिली.

सिद्धेश्वर मंदिराची वास्तू निवांतपणे पाहिली. मंदिराच्या चारी बाजूंना सिद्धेश्वर तलावाचे पाणी आहे. विशेष म्हणजे पाण्याचे नियोजन व संधारण यांचे हे अनन्यसाधारण जीवंत - जागृत - उदाहरण आहे! अशा इतरत्र अनेक विहिरी, तलाव, मंदिरे, मशिदी, राजवाडे, गांवे, किल्ले, उपवने, शेतीवाड्या इ. वास्तू सर्व भारतभर आहेत. प्रत्येक वास्तू एकमेवाद्वितीय! पण यासम ही! एक सुजलाम सुफलाम वास्तू!

अशा पारंपरिक वास्तू लोकशिक्षणाची लोकाभिमुख साधने असतात असा माझा निष्कर्ष आहे आणि श्रद्धा पण! जो शिकला नाही तो करंटा. येथे प्रात्यक्षिकाने, उदाहरण देऊन व्यावहारिक पाठ दिले जातात असे मला प्रांजळपणे वाटते. याला देव पावले म्हणायचे नाही का?

माणसे ध्रुवीय प्रदेशांपासून विषुववृत्तीय प्रदेशापर्यंत लक्षावधी वर्षें चित्रविचित्र नैसर्गिक परिस्थितीत राहात आले.

सृष्टी मानव समाजाना ओळखत नाही मग तो समाज आपल्या कल्पनेप्रमाणे मागासलेला असो वा पुढारलेला. सृष्टी मानवाच्या सामाजिक अधिश्रेणी वा हुद्दे ओळखत नाही, मग ते सम्राट-पंतप्रधान, संत-महंत वा काळे-गोरे-पिवळे-ब्राऊन असोत. सृष्टीच्या लेखी जीवाणू व मानव यांत काहीच फरक नाही.

ती सर्वांचा भार वाहण्यास समर्थ आहे. सृष्टीचे अलिखित नियम जाणून त्यानुसार वागले तर दुसऱ्याचा भार उचलायची गरज राहणार नाही; खऱ्या अर्थाने लोकशाही यशस्वी होईल. मात्र उद्दाम उर्मट माणूस समाजातील आपल्या सत्तेच्या जोरावर हे विसरतो.

इथून पुढची माझी यात्रा विजापूर, ऐहोळी, पडत्कल (इंग्रजी अपभ्रंश - Pattadakal), बदामी - लेणी व गांव; नंतर बागलकोट - बेळगांव मार्गें माझ्या घरी कोंकणात. मायला माझा अवतार पाहून रडूं कोसळले. दहा दिवसांत माझे दहा किलो वजन घातले होते.

मग आठवडाभर घरी असताना रोज सकाळी सड्यावर लक्या धनगराच्या वाड्यावर जायचे, अनशापोटी शेळीचे धारोष्ण दुध ग्लास भरून प्यायचे हा माझा रोजचा क्रम. आठवड्याभरात माझ्या गालांवर गुलाबी आली.

आयुष्यभर केलेले भटकणे केवळ यात्रा होत्या, प्रवास (tours) नव्हते, की कधी प्रवासवर्णने लिहिली नाहीत. उद्धेश केवळ अध्ययन. वर लिहिलेले प्रवासवर्णन नव्हे. मी काय शिकलो त्याची केवळ नोंद आहे.

टीप: घर आणि परिसर झोपडी, प्रासाद, शेतीवाडी, उपवन, तलाव, विहीर, इ. सर्वांचा वास्तूमध्ये समावेश होतो.
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.| Page copy protected against web site content infringement by Copyscape

September 03, 2011

॥ कर्मसन्याशाची जलसमाधी ॥

॥ कर्मसन्याशाची जलसमाधी ॥

किरिस्तावांची दफनभूमी (फोटो : रेमी डिसोजा)
आजच्या सुधारलेल्या नागर समाजात जगणे  तर  महागले, त्याहूनही मरण महागले. 
नैसर्गिक जगणे व  नैसर्गिक मरणही आता दुरापास्त झाले.
 
त्याच्या तर्काच्या अंती होतसे  काम-लोप
ना ऊर्जा-विनियोग ना श्रम,
जे गेले त्याच्यामागे  नाही जाणे
नाही अनुताप जरी,
वा जे न परते कदापि
वातावरणात अशा,
असो वैरभावी वा उभयभावी
स्वाभाविक वर्तन परी
जेव्हा तन अणि मन
अन आत्मा असती सुसंवादी

अंतर्यामी अंतरीक्ष स्वायत्त
नसे अचेतन जड वस्तू
नसे गुलाम ना राहे अलिप्त
बाह्य जगतापासून
असे तेथे निर्भय जावानल
कदापि विझवता न येणारा
क्षूद्र यकच्र्छित सांघिक वेडांना,
जीं येती लाटामागून लाटानी
ज्या उंचावती, कोसळती नी नाहीशा होती.
स्वेच्छेचे निर्वाण अंतर्ज्योतीचे

मीलन योजिले जीवनदात्या जळीं.

मुंबई
(मूळ इंग्रजीचे (Non-action Action) भाषांतर)
* * *
टीप १ : एक कल्पनाविलास
आभाळाचा टिचभर तुकडा त्याला होता पुरेसा जगायला, ज्यावर नाही कुणाची सत्ता. जन्मतः होती त्याच्या पायांवर भिंगरी. ती त्याला घेऊन फिरली जन्मभर घरवाडी बकोटीला मारून गांवोगांव, विंचवाचे बिर्‌हाड पाठीवर म्हणतात तसे; असा होता एक दरवेश!
त्याने कधीं  नाही केला संग्रह, नाही ठेवल्या आकांक्षा, अपेक्षा, ना ध्येय, ना लक्ष्य. या गोष्टी जीवनाने त्याला कधी सांगितल्याच नव्हत्या. ती सारी गणिते होती नागरी सत्तेने मांडलेली आणि सत्तेच्या भक्तांची व गुलामांची. ती गणिते होती नागरी संस्कृतिने जन्मास घातलेल्या सत्तेच्या दुष्टचक्रात जे अडकले त्यांनी निर्माण केलेली.
सत्तेच्या या चक्राने नैसर्गिक जगणे व मरणे माणसाला दुरापास्त करून ठेवले. यातूनही त्याने मार्ग काढला.
सर्वांत सहज असा मार्ग : मरणोत्तर नाही जाळणे - ऊर्जेचा व्यय टाळणे, नाही गाडणे - जगायला जमीन नाही मग महागले मरणे.
राहिले जळ - जेथे जीवन गवसले तेथेच अर्पिणे.
Underwater life & death
 चित्रसंदर्भ : इंटरनेट
टीप २ : नुकतीच बीबीसीवर बातमी वाचली : New body 'liquefaction' unit unveiled in Floridafuneral home (BBC News Science-Environmrnt). फार गम्मत वाटली. एकीकडे पर्यावरणाच्या नावाने बोंबा मारायच्या आणि सर्व मानवजातीला कारणीभूत ठरवायचे, दुसरीकडे नैसर्गिक पर्यावरणाचा विनाश करायचे नवेनवे मार्ग शोधायचे!

~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.| Page copy protected against web site content infringement by Copyscape

August 15, 2011

कुरूक्षेत्रानंतर..., महाश्वेतादेवी (समीक्षा)

मुखपृष्ठ: चंद्रमोहन कुलकर्णी
'कुरूक्षेत्रानंतर...', महाश्वेतादेवी । अनुवाद : वर्षा काळे । प्रकाशक : मेहता पब्लिशींग हाऊस, पुणे । २०१० । किं. साठ रुपये ।

अनुवाद: वर्षा काळे यांनी इंग्रजी भाषांतर चपखलपणे मराठीत बसवलेय. कांही नवीन पण समजायला सोपे शब्द आजच्या परिस्थितीनुसार येतात हे स्वागतार्ह आहे. जसे: राजवृत्त (राजा?) लोकावृत्त (प्रजा?) हे तत्कालीन परिस्थितीला योग्यच आहेत; जो बळी तो राजा. जे दुर्बल ते प्रजा! असे अनेक शब्द संवाद - गाणी - वर्णने यांत येतात. आणि विशेष म्हणजे राजवृत्तातील व लोकवृत्तातील सारी माणसे एकच बोली बोलतात. 'लोकांच्या' तोंडीं गांवठी भाषा घातलेली नाही.
अवतरण -१ अनुवादिकेचे मनोगत, 'कुरूक्षेत्रानंतर...', महाश्वेतादेवी
अनुवादिकेचे मनोगत : ही प्रस्तावना प्रसंगानुरूप लांबी-रुंदी-खोलीसह आहे. हे महाश्वेतादेवींचे मराठीत पहिलेच पुस्तक असावे! वर्षा काळे यांनी लेखिकेचा, आपला व दोघांचा संबंध याचे पुरेसे वर्णन केलेले आहे. नाहीतर हे पुस्तक अपुरे राहिले असते.

महाश्वेतादेवी यांचे 'कुरुक्षेत्रानंतर...' हा अनुवाद अंजुम सन्याल यांनी केलेल्या 'After Kurukshetra' या इंग्रजी भाषांतरावरून केलेला आहे. त्यांचे साहित्य, भाषांतरीत का असेना, मी पहिल्यांदाच वाचत होतो.
त्यांच्याविषयी - त्यांचे साहित्य, सामाजिक कार्य व त्याना मिळालेले पुरस्कार यासंबंधात - वर्तमानपत्रांत येणार्‌या बातम्या वाचत होतो. पण मुद्दाम शोधून कथा-कादंबर्‌या वाचणे मला जमत नाही. व सहज हाती आलेले साहित्य दर्जेदार असले तर मी वाचायचे टाळीत नाही.

प्रस्तुत समीक्षा एक मुक्तचिंतन
 महाश्वेतादेवींना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांचे फलीत काय झाले वा होतेय किंवा होणार हे माहित नाही, पण कोणीही कल्पना करू शकेल.

'कुरूक्षेत्रानंतर...' यांत तीन कथा आहेत. महाभारत-युद्धाने केलेल्या संहारानंतर राजवृत्तातील व लोकवृत्तातील स्त्रियांच्या अवस्थेवर या कथा आहेत. त्या उत्तरा, कुंती आणि सौवाली यांच्या भोवती गोवलेल्या आहेत.

या कथा राजवृत्त, उच्चभ्रू (elite) समाज व लोकवृत्त, शूद्र / आदिवासी (peasant /aborigine) जमाती यांच्या स्त्रियांना जोडतात, आणि दोन समाजांतील सांस्कृतिक (cultural) द्विभाजन (dichotomy) दाखवतात.
आज  हे चित्र अधिकाधिक स्पष्ट होत असलेले तर दिसतेच आहे आणि विकोपास जातेय हेपण दिसते.

पहिली कथा: 'पंचकन्या': उत्तरा ऐन तारुण्यात विधवा झालीय, अवाक, विमनस्क आहे. तिला रिझवायला भग्न रणांगणावरून पांच तरुणी तिच्या सख्या होतील या अटीवर आणल्या जातात; त्या दासी म्हणून यायला तयार नसतात. त्या उत्तरेच्या वयाच्या होत्या. त्यापण या युद्धात विधवा झाल्या होत्या, आपल्या पतींची कलेवरं शोधायला कुरुजंगलातील त्यांच्या गावातून आल्या होत्या.

अवतरण-२  'पंचकन्या', 'कुरूक्षेत्रानंतर...', महाश्वेतादेवी
अवतरण-३  'पंचकन्या, 'कुरूक्षेत्रानंतर...', महाश्वेतादेवी
राजवाड्यातील सर्व विधवा ज्या व्रतस्त आहेत आणि आदिवासी विधवा ज्यांना भविष्य आहे. अशी ही कथानकाची अत्यंत युक्त व परिणामकारक मांडणी आहे.

दुसरी कथा: 'कुंती आणि निषादीन' (निषाद आदिवासी स्त्री). वारणावत नगरातील लाक्षागृहात आपल्या पांच मुलांसह एक निषादीन आदिवासी स्त्री, कुंती व पांडवांच्याऐवजी जळून मेली होती. ही कथा सर्वांना माहित आहे. पण तिचे विश्लेषण येथे येते जे नजरेआड राहिले होते.
कुंती वानप्रस्थाश्रमात धृतराष्ट्र व गांधारी यांच्यासह अरण्यात राहात होती. त्या निषादिनीची ज्येष्ठ सून तिला शोधून काढते. ती कुंतीला तिच्या कपट कारस्थानाची आठवण करून देते व जाब विचारते. पण ती निरुत्तर होते.

तिसरी कथा : 'सौवाली' ही वैश्य स्त्री धृतराष्ट्राची दासी होती. त्यांचा अनौरस मुलगा सौवाल्य जो युयुत्सू नावाने ओळखला जातो. युद्धात तो पांडवांना जावून मिळाला होता.

अवतरण-४  'सौवाली', 'कुरूक्षेत्रानंतर...', महाश्वेतादेवी
'सौवाली' या कथेत कुंती, गांधारी व धृतराष्ट्र रानातल्या वणव्यात जळून मेले. व युयुत्सूने बापाचे तर्पण केले. (लेखिकेचे संदर्भ- 'महाभारत सरनौबत', लेखक - राजशेखर बसू। सौवाली: संदर्भ- 'पौराणिक अभिधान', लेखक- सुधीनचंद्र सरकार)

या कमीअधिक लांबीच्या तीनही पौराणिक कथेत लेखिकेने तत्कालिन सामाजिक, सांस्कृतिक व नैसर्गिक वातावरण निर्माण केलेले आहे. शब्दांचा मितव्यय डोळ्यांत भरणारा आहे.

महाभारत वाचताना तत्कालीन वातावरण आपल्या ध्यानात- नजरेसमोर क्वचितच येते. तत्कलीन लोकसंख्या किती असेल हा विचारपण आपल्या मनास कधी शिवत नाही. किंबहुना आपले लक्ष गोष्ठीत गुंतलेले असते.

लेखिकेला हे कसे साध्य झाले याचे कारण ती नागरसमाजाचा एक भाग आहे, व तिचा आदिवासी जमाती व लोकसमुहांचा व्यासंगपूर्ण अभ्यास. आदिवासी प्रागैतहासिक काळात आजही रहात आहेत असं म्हणता येणार नाही.

आदिवासी संस्कृती जतन करायचा वैश्विक वारसा
पण त्यांची सांस्कृतिक मूल्ये व जमातीचा एकसंध आकारबंध मात्र अबाधित आहेत, जी त्याना निसर्गमातेशी जोडून ठेवतात. पांच हजार वर्षे सर्व जगभर नागरसमाजांनी केलेल्या उच्छेदांतूनही ते टिकून आहेत त्याचे हेच कारण. गेल्या पांचशे वर्षांत मात्र वसाहतवाद्यांनी अनेकांचे शिरकाण केले.

या कथांत आदिवासींची निसर्गाशी संवाद साधून राहाण्याची धारणा व जीवनरीती (जीवनशैली नव्हे) ही त्यांच्या घर-परिसराची प्रसंगोचित वर्णने, संभाषणे, गाणी,  प्रसंगयोजना यांतून लेखिकेने सूचकपणे दाखवली आहेत.

त्याचबरोबर युद्धाच्या भीषणतेचे सम्यग दर्शनपण येथे आहे! खरं पाहाता पहिले व दुसरे जागतिक महायुद्धें, गेल्या शतकात जगभर झालेली अनेक युद्धें, कलिंगचे युद्ध, पानिपतचे युद्ध आणि या पौराणिक यद्धांत काहीच लाक्षणिक फरक नाही.

फक्त एकदा वेगळे घटित घडले : सम्राट अशोकाची उपरती व मन:पालट. अन् त्याचा इ. स. दोनशे वर्षांपूर्वीचा अहिंसक वसाहतवाद! अनन्यसाधारण!

महाभारत एक कालातीत ((timeless) कृती! त्याची आतापर्यंत अनेक रूपांत, माध्यमांत - दशावतारापासून कार्टूनपर्यंत - कोट्यवधी पारायणे जगभर झाली असतील.

या तीन कथा मात्र त्यांतील एका दुर्लक्षित भागावर नजर टाकतात. हा आहे आदिवासी संस्कृती आणि नागरी समाज यांतील द्वैत (dichotomy) व त्यांतून निर्माण होणारा संघर्ष.

तसं पाहिल्यास एकलव्य, नागवंशी आदिमजमातीच्या निसर्गनिवासाचा, खांडव वनाचा, विनाश आणि त्याचे पर्यावसान म्हणून पांडवांचा झालेला कुळक्षय या ठळक कथा अनेकांस माहित आहेत. पण तत्कालिन नैसर्गिक व सामाजिक पारिस्थितिकीवर होणार्‌या परिणामांचा विचार कोणी केला असल्यास माहित नाही.

मानववंश व पुरातत्व या शास्त्रांचा उदय गेल्या दोन शतकांतला. आपल्या देशातील बहुतत्वी समाजाला 'मानववंशशास्त्र' या विषयाचा अभ्यास शिक्षणाच्या सर्वच शाखांत अत्यंत निकडीचे आहे. विषेशतः इतिहास विषयात याचा सर्व शैक्षणिक स्तरांवर समावेश केला पाहिजे. सरकारी अंमलदार-दरकदार-सांसद-आमदार-खासदार यांस विशेष धड़े देण्याची व्यवस्था करायला हवी!

आजच्या सुशिक्षितांसाठी आधुनिक शिक्षणाची गरज 
पर्यावरणाच्या शास्त्रोक्त विचाराला चालना मिळाली ती गेल्या पन्नास वर्षांत. पण प्राणी व वानसें मात्र पर्यावरणासंबंधांत अज्ञान नसतात; नवजात बालकपण संवेदनशील असते. कृषीवलांचा तर पर्यावरण, पारिस्थितिकी व ऊर्जा यांच्याशी रात्रंदिवस संबंध येतो, भले ते उच्चभ्रू वर्गासरखे वाचाळ नसतील!

आमच्या सरकारने तर आता इयत्ता पहिलीपासूनच पर्यावरण हा विषय शिकवायला सुरवात केलीय. खरं पाहता पंतप्रधान-मुख्यमंत्र्यापासून ते पटेवाल्यापर्यंत सर्वांसाठी या विषयाच्या खास सक्तीच्या शिकवण्या द्यायला हव्या. मग प्रगतिची कोणत्या क्षेत्रात अधिक गरज आहे ते सरकारला थोडेफार कळेल.

महाभारतातील एक अवतरण वाचलेले आठवते. पांडव अज्ञातवासात होते. ते वनात रहात असताना तेथल्या ऋषीँनी त्यांना सांगितले, "त्या वनांत त्यानी एकाच जागी तीन दिवसांहून अधिक काळ वसती करू नये. नाहीतर वनाचे जळ-जमीन-वानसे-वनचर नैसर्गिक संतुलन बिघडते."
हे अवतरण अर्थातच सर्व युगांतील व प्रदेशांतील सरकारांना उद्धेशून आहे. पण व्यवहारात याचा उपयोग फ़क्त अवतरणापुरता मर्यादित राहतो.

दुर्गा भागवत, लेखक व मानववंशशास्त्रज्ञ, यांनी अदिवासींचा अभ्यास व संशोधन त्यांच्या परिसरांत जाऊन केले होते, व बरंच साहित्य पण इंग्रजी व मराठीत लिहिलं. त्यानी आदिवासींच्या लोककथापण मराठीत आणल्या. दुर्गा भागवतांनी 'व्यासपर्व' या पुस्तकात लिहिलेली एकलव्याची व्यक्तिरेखा (मोहरीतली ठिणगी) आठवणीत कायम लेणं कोरून राहिलेली आहे.

महाश्वेतादेवींच्या या तीन कथा ('कुरूक्षेत्रानंतर...') आपले स्थान ध्रुव तार्‌यासारखे कायम करतात. कारण साधेच आहे : उत्तर/ दक्षिण/ पूर्व/ पश्चिम, कोठेही गेलो तरी ही अवस्था अनेक अवतारानी सतत नजरेस येते. मानवतेची नागरी संस्कृतिच्या शापातून कधी सुटका होईल माहित नाही?

टीप: आदिवासी घर व परिसर (पहाः Tribal Housing and Habitat -1) या विषयाचा, आणि त्या अनुषंगाने येणारी इतर अंगांचा (पहा:TRIBAL SKILLS - आदिवासी हुन्नर), अभ्यास मी काही वर्षें केला. त्यातून बरंच काही शिकायला मिळाले. त्याची नोंदणी नंतर केली. या पुस्तक-परिक्षणाची पाळेमुळे माझ्या या स्वतंत्र अभ्यासात आहेत आणि त्याचे श्रेय सर्व आदिवासी जमातींना जाते.

रेमीजीयस डिसोजा
१५ ऑगस्ट २०११ 
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.| Page copy protected against web site content infringement by Copyscape