January 23, 2011

बळीराजा पाताळात एकविसाव्या शतकात

वामन-बळीराजा ही पौराणिक कथा आर्य-अनार्य यांच्या वंशभेदाच्या वैमनस्याचा नमुना! वंश-भेद, जाती-भेद, वर्ण-भेद, वर्ग-भेद, लिंग-भेद यांतील संघर्ष चालूच आहेत. त्यांच्या भरीला आता 'प्रथम जगत इंडिया' - 'तृतिय जगत व चतुर्थ जगत इंडिया' यांतील प्रथम-दुय्यम नागरिकत्वांच्या अलिखित संघर्षातून बळीराजाला अमानुष 'पंचम जगत इंडिया'त ढकलायचे कट आता रस्त्यावर आलेत.

 १.
जातीने सारस्वत, कर्माने नवशूद्र (प्रव्यवसायिक आर्किटेक्ट), पण रेमीचा पिंड आहे शेतकरी, धर्माने बाटगा किरिस्ताव, श्रध्दास्थान : सृष्टी (Mother Nature). तो जन्मला, पोसला, वाढला भातशेतीच्या कुणग्यावर कोंकणात. तो शिकला शाळा - कॉलेजच्या चार भिंतीबाहेरच अधिक : देशाच्या मुक्त शाळेत. त्याचा हा गोषवारा!
२. 
बियाणे पेरले की झाली शेती असं नाही; त्या अगोदर व नंतर अनेक कामे असतात. जमिनीची मशागत, बियाण्याचा साठा व निगा, पाचोळा - शेण इत्यादी सेंद्रीय खते, पाण्याचा योग्य पुरवठा जो मुख्यतः पावसाने होतो तसाच ओढे नदी नाले पण करतात, निंदणी, कापणी, झोडणी, भात - बियाणे - गवत - तांदूळ यांचा वर्षभर टिकेल असा साठा करून ठेवणे, कुरमुरे - पोहे - उकडे तांदुळ इ. प्रक्रिया ... अशी अनेक कामे वर्षभर एका पेरणीपासून पुढच्या पेरणीपर्यंत चालू असतात. हे कमीअधिक फरकाने इतर अन्नधान्ये व शाकभाज्यांच्या शेतीला लागू पडते. एवढेच नव्हे तर "आंबोळी, घावन, सांदण, शेवया, पिठले, उप्पीट..." अशा कैक खाद्य प्रकारांचे शोध किसनाच्या झोपडीत लागले. यांचा इतिहास कोणी लिहिला नाही. आणि यांचे संशोधक कोण हेही कोणाला माहित नाही.   
३ 
यास्तव शेतकरी साकल्याने [holistic] बघतो, विचार करतो. त्याला सरकारी नोकरशहा वा प्रव्यवसायिक वा शास्त्रज्ञ यांच्यासारखे चाकोरीत राहून, चालून, पाहून, विचार करून चालणार नाही; अशाने तो टिकूच [sustain] शकणार नाही.

शेतकरी नेहमीच सर्वांच्या नजरेआड राहिला. सारेच शिष्ट प्रतिष्ठीत उच्चभ्रू बोलतात 'भारत शेतीप्रधान देश आहे'. केवळ वायफळ वल्गना! शेतकरी नेमके काय काम करतो, त्या कामात किती मानव ऊर्जा, प्राणी ऊर्जा, सौर ऊर्जा, वायू ऊर्जा, जैव ऊर्जा, आणि जीवज ईंधन (fossil fuel) किंवा खनिज ऊर्जा, किती प्रमाणात वापरली जाते; त्याच्या कामात वर्षभर किती लोकांचा सहभाग असतो; यांची आकडेवारी कोणी कधी काढलेली ऐकिवात नाही. मात्र कारखान्यात तयार होणार्‌या मालाची व श्रमाची किती काटेकोर जंत्री तयार केली जाते बरे! कारण कारखाने - मालक व कामगार - यांच्या संघटना आहेत. कोंकणीत म्हण आहे, "नजरेआड मसाणपाड".

संकरित बिजां नसती नातवंडें 

आमच्या सरकारला गेल्या साठ (+) वर्षांपासून औद्योगिक क्रांती लोकांच्या गळ्यात मारायचा ध्यास लागलेला आहे, जणू काही जादूची छडी हाती लागली होती. त्यातच 'संकरित' बियाण्याची आयात करण्यात आली. 'घी देखी पर बड़गा नही देखा' अशी अवस्था झाली. (यामागचा खरा उद्देश भांडवलदारांचे हितसंबंध हाच असतो हे आतापर्यंत लोकांना समजून आलेले आहे.) 

संकरीत बियाण्याबरोबर रासायनिक खते, ट्रैक्टर, यांत्रिक नांगरणी - पेरणी - कापणी, धरणे-कालवे, धान्याना लागणारे रोग, जंतूनाशके, तृणनाशके, अधिक पाण्याची गरज, इ. आली. आणि कणखर देशी बियाणी नाहीशी झाली. जमिनीचा कस, मगदूर गेला. जमिन आणि जळ, दोनही, विषारी होत गेली.
७  
प्रयोगशाळेत तयार केलेली बियाणी, त्याबरोबर अधिक कसदार रासायनिक खते, आता शेतकर्‌याला बाजारातून विकती घ्यायला लागली. आणि किसानांची स्वायत्तता संपुष्टात आली. ते कर्जबाजारी झाले. शिक्षण व साधने नसल्यामुळे त्याना ही गृहोद्योग वा ग्रामोद्योगाद्वारे तयार करणे शक्यच नव्हते. आतातर जीनीय संकरित - GM - बियाणी आणायला सुरवात झालीय. यातून शेतकरी जगले वाचले तरी येत्या पन्नास ते शंभर वर्षात त्याना पूर्वीची स्वायत्तता पुन्हा प्राप्त होणे अशक्य आहे. काही किसानानी संकरित पिकातून बियाणे घेऊन दुसरे पीक घेण्याचा प्रयत्न केला, ते जेमतेम आले. तिसरे आले नाही. आता जा बाजारी!

सत्तेचे केंद्रीकरण 
८. 
अल्पसंख्य उच्चभ्रू नागरिकांचे 'प्रथम जगत इंडिया' सरकार औद्योगिकरणाच्या नशेने टूण झालेले आहे. कशाला, कोणाला प्राथमिकता द्यायची याचे तारतम्य त्याला राहिलेले नाही. नाहीतरी 'सरकार' शब्दच मुळी नपुंसक. हा राजदुर्विलास नाही तर दुसरे काय? जी संकरीत बीजांची दशा ती आधुनिक सरकारची! याना नाही इतिहास माहित, ना वर्तमानाची ओळख!

'सत्तेचे केंद्रीकरण' सर्वच नागरी समाजांचे (civilized societies) व्यवच्छेदक लक्षण आहे. पूर्वी राजसत्ता धर्मसंस्थेला भागीदार करीत असे, आता ती यंत्रौद्योगांना हाती धरते एवढाच फरक. 'बाजार' (market) हे केवळ त्यांचे साधन - आयुध आहे, सोय नव्हे, सामान्य जनांची तर कदापी नाही. ते झाले 'बाजारा'च्या स्वाधीन अन्‌ बिनचेहर्‌याच्या सत्तेचे गुलाम.
१०
भांडवलदारशाही धार्जिण्या सरकारने अभिनिवेशात येऊन मुक्त बाजार खुला केला. पण दारिद्य्राने पिडलेल्या ९० कोटी ग्रामीण जनतेवर काय परिणाम होईल याचा हिशेब केला नाही. परिणामतः विषमतेची गर्ता वाढत गेलेली आहे. सहा लक्ष खेड्यांचे सर्वेक्षण करायला सरकारकडे यंत्रणा आहे कुठे? नमुना (sample) सर्वेक्षण करून काम भागवतात झाले. ते किती विश्वासार्ह असेल याची शंकाच आहे! गेल्या दशकात किती किसान कुपोषण, कर्ज, रोग, आत्महत्या इ. कारणानी देशभर मृत्युमुखी याचा विश्वाहार्य आकडा कुणीच सांगत नाही - ना सरकार, ना पत्रकार, ना चळवळ्या (activist) व्यक्ती वा संघटणा. (अर्थात सरकार म्हणजे सत्तेवर असलेले व विरोधी पक्ष, प्रशासन, न्यायसंस्था आणि इतर शासकीय संघटना.)
११

Domestication of rice in Asia. Source: Internet
नकाशा : १  

कृषीक्रांती सुमारे दहा हजार वर्षांपूर्वी तैग्रीस - युफ्रेटीस या नद्यांच्या परिसरात तसेच चीन व आसामात सुरू झाली व सर्व जगभर पसरली. तेव्हा देश नव्हते. त्यावेळी नगरे व नागरी समाज नव्हते. यास्तव राज्ये - साम्राज्ये नव्हती. ते सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी अस्तित्वात आले. ही तथाकथित सुसंस्कृत समजल्या गेलेल्या नागरी समाजाची व संस्कृतिची (civilized society and culture) सुरवात. ती मुख्यतः श्रमाची विभागणी व सत्तेचे केंद्रीकरण यांवर आधारलेली होती अन आजही आहे. आज तर तो तीव्रतेने आत्मकेंद्री, सनातनी (orthodox), आतंकवादी / अतिरेकी (terrorist / extremist) व असहिष्णू झालाय एवढाच फरक. समाज जेवढा प्रगत तेवढा अधिक सत्तापिपासू, अधिक धनलोभी. त्यांची दानशूरता केवळ आयकरात माफी / सूट मिळावी, किंवा त्यांना वा त्यांच्या मालाला प्रसिद्धी मिळावी यास्तव असते.

संबंधित लेख :
  1. Farming and the Politics of Education in India: Challenges of 21st Century
  2. Emergence of The Fifth World India (सचित्र)

सरता पालव 
१२. 
अर्वाचीन युगात 'गरज आणि हवस' (needs and wants) याचा याचे साधे आलेख उद्धृत करतो.

World Population and human advances ©Taiganideds, 1978
आलेख :  १ 

World energy consumption. ©Taiganideds, 1978
आलेख : २  

यात ई. स. १००० पासून विसाव्या शतकापर्यंतची जगाची लोकसंख्या व भौतिक प्रगती दाखवलेली आहे.

टीपा :
१.  श्री. अण्णा हजारे, महाराष्ट्र, व राजेंद्र सिंह, राजस्थान हे त्यांच्या पर्यावरण आणि जलसंधारण या कामांसाठी सर्वश्रूत आहेत. इतरही संस्था आणि व्यक्ती आहेत.
२ . श्री. दाभोळकर यांनी द्राक्षाच्या लागवडीत केलेले संशोधन आणि त्याचा लाभ शेकडो शेतकर्‌याना प्रात्यक्षिके करून दिला. विशेषतः लहान जमिनीत अधिक पीक कसे काढावे हे त्यानी शिकवले. त्यानी लिहीलेल्या 'विपुलाच सृष्टी', 'केल्याने होत आहे रे', आणि 'आपल्या हाता जगन्नाथ' या पुस्तकानी मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे.
३. "बळीराजा : व्यापारी शेतीचे मासिक" श्री. प्र. बा. भोसले, पुणे, यांनी  अत्यंत बिकट परिस्थितीत चालवले आणि नावारूपास आणले. अर्थातच त्याचे वर्गणीदार व मुख्य आधारस्तंभ शेतकरीवर्ग आहे.
४. कृषी क्रांती: जंगलांतील वानसे आणि पशु यांना माणसाळवणे व गृहसंवर्धन करणे (domestication). हा सद्ध्या गाजावाजा होत असलेल्या "biotechnology"ची सुरवात आहे. दुधाचे दही करणे हा पण बायोटेक्नोलोजीचाच प्रकार आहे.
५. वरील नकाशा आणि आलेख यांवर रेमीजीयस डिसोजा याचे मालकी हक्क नाहीत. हे फक्त शैक्षणिक उपयोगासाठी आहेत.
~ ~ ~ ~ ~ 
© Remigius de Souza. All rights reserved.|
Page copy protected against web site content infringement by Copyscape

2 comments:

  1. विचार करायला लावणारा लेख आहे तुमचा. लिहिते नंतर अधिक सविस्तर ..

    ReplyDelete
  2. @aativas, आभारी. आपले आणि इतरांचे "शेरे / ताशेरे" केव्हाही अपेक्षित आहेत. प्रतिसादानी बरेच काही नविन समोर येते.

    ReplyDelete