May 23, 2011

वानसे जीवनदायी

हायकू

Photo: Spring 2011©  Soojung Cho, Artist, Photographer
 वानसे मूक भाषी
भरुनी काढिती
अनेकपरी माझ्या क्षती.
 
 मूळ  इंग्रजी कवितेचे (Rain, Rain, Come again-6) भाषांतर
वानसे हर प्रकारे — अन्न, निवारा, वस्त्र, आरोग्य, औषधी, रंजन, शिक्षण, कागद, रंग, सुगंध, संतती किंवा संततिनियमन ... व पर्यावरण — आयुष्याच्या हरेक क्षेत्रात सतत जीवनदायी होत असतात. पण रोजच्या धावपळीच्या धबडग्यात वनसाचा क्षणभर पण विचार शिवत नाही. मग आठवडा-महिना-वर्षातून एकदा बाडबिस्तरा बांधून दृष्टीसुख घ्यायला पिकनिकला निघायचे. बॉलीवूडच्या नट-नटी बघायला जेव्हढा वेळ खर्च होतो त्याच्या शतांश-सहस्रांश पण वानसाना आपण देत नसतो.
~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.| Page copy protected against web site content infringement by Copyscape

May 17, 2011

|| पंकज ||









पंक-कूपात
बिज अवतरले —
साधन – साध्य
एकवटले.


रेमीजीयस डिसोजा | मुंबई | बुद्ध पौर्णिमा १७-०५-२०११  
(मूळ इंग्रजीचे भाषांतर).
टीप:  कमळ सरस्वतीचे, बुद्धाचे आसन. भारतीय चित्रकलेत वास्तव पाणी दाखवत नाहीत, तर पाण्याचे प्रतिक म्हणून कमळ, शंख, मेघ, घट वापरतात.

~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.| Page copy protected against web site content infringement by Copyscape

May 09, 2011

झुंडीत हरवले व्यक्तिस्व

संतोष कुमारमुंबईत एका फुलांच्या दुकानात काम करणारा शिक्षित नोकर,
फावल्या वेळात  कलाकुसर करतोहा त्याचा स्वायत्त अधिकार आहे.

झुंडीत हरवले व्यक्तिस्व

संवयींचे आम्ही गुलाम 
चालतो, बोलतो, बघतो

दुनिया सारी सवयीने;
अन्‌ रोजची धावाधाव –

फुरसत नाही थांबाया;
पुजा, अर्चा, खाणे, पिणे,

नशा, झिंगणेही संवयीने;
सत्ता, सट्टाबाजार, ग्यान,

जातपात, वंश, गतकाळ...
मग राही कशाचे भान?

व्यक्तिस्व सदा हरवलेले
स्वातंत्र्यही बाळपणीचे

चालता झुंडीच्या आधारे
अजाणता हातींचे गेलेले

झुंडीत सांडले सगेसोयरे
कसे जोडावे सुटले दुवे?
* * *

पूर्वपिठीका
व्यक्ति आणि समष्टी व नागरी आवास यांत मानवी मापनश्रेणी (human scale) पुनः प्रस्थापित होणे, विशेषतः आजच्या यंत्रयुगात व नागरी पर्यावरणात अनिवार्य झालेले आहे. यांत्रिकी राहणीने व मायावी वास्तवतेच्या प्रभावाने व्यक्तिचे व समष्टीचे जीवन ढवळून निघालेय, अस्तव्यस्त झालेय. त्यात वेग व घाई वाढलीय. ज्ञान व माहिती यांचा संग्रह वाढला पण त्यांचा रवंथ करायला वेळ नाही. परिणामतः समाजाच्या सर्व स्तरांवर सर्जनशीलतेची गुणवत्ता आता किती राहिलीय याचीपण शंकाच आहे. विधायक सर्जनशीलता सर्वांतच असते. ही एकल्या-दुकल्याची मक्तेदारी नाही. अनेकात ती सुप्त असते. तिला जागी करणे ही खरे पाहता समष्टिची जबाबदारी, इतर कोणत्याही संस्थांची नव्हे! पण लक्षात कोण घेणार?
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.| Page copy protected against web site content infringement by Copyscape

May 02, 2011

नेता ऽ गिरी ऽऽ

सृष्टीयोग
विज्ञान युंगात सृष्टीची अनेक अंगे माहित झाली
पण त्याबरोबरच तथाकथित पुरोगामी समाजाची निसर्गापासून फारकत पण होत गेलीय.
आणि माणसांची माणसांपासून.
इंग्रजीत एक वाक्प्रचार आहे, 'किंग ईज डेड, लॉंग लीव द किंग' - राजा मेला, राजा अमर रहो! राजेशाही गेली. लोकशाही आली. आणि राजे लोकांची जागा पुढारी लोकांनी घेतली.

   हे झाले विशेषतः नव्याने आलेल्या लोकशाहींत. तसं पाहिल्यास जगातील प्रस्थापित लोकशाही देशपण याला अपवाद नाहीत. वासरांत लंगडी गाय शहाणी म्हणतात ना! नवे पुढारी तयार करण्यासाठी किती संस्थांचा, विद्यापिठांचा केवढा आटापिटा चाललाय काही विचारूं नका.

   रानडे - गोखले - गांधी - विनोबा यांची गुरूशिष्य परंपरा अनुभवाच्या पाठशाळेत, क्षेत्रिय अभ्यासांत (field study) कधीकाळी तयार झाली होती.

   आता पाठ्यक्रम तयार झालेत. पुस्तकी अभ्यासक्रम, वर्गाच्या चार भिंतीआड, अधूनमधून नमुन्याचे सर्वेक्षण, आणि तशाच धर्तीच्या देशीविदेशी पदव्या घेऊन आलेली प्राध्यापक मंडळी शिकवायला; अशी असते या पाठ्यक्रमाची रूपरेखा.

   अरे हो! आणि हमखास मदतीला आंतरजालाचे (Internet) प्रतिविश्व आहेच. त्यातली किती माहिती कधी कालबाह्य होईल हे कोणालाच, खुद्द लेखक / संपादक मंडळीलापण माहित नसते.

   मात्र प्राकृतिक जैवविविधतेत स्थानिक जळ, जीवन व जीव ही अनन्यसाधारण असतात; पर्यायाने त्यांच्या प्रभावाने स्थानिक लोकसंस्कृतिपण.

   ही वस्तुस्थिती किती पुढारी किंवा नेते ध्यानात घेत असतील याची शंकाच आहे. कारण ते शालेय शिक्षणाच्या एकसंवर्ध मशागतीत तयार झालेले असतात. आणि सृष्टीला मानवीय अधिश्रेणींची तमा नसते.

   सृष्टी कधी तथाकथित प्रगत नागरतेने निर्माण केलेली 'तृतिय पारिस्थितिकी' (Third Ecology) ओळखत नाही. तिच्यापुढे नेते महात्मे सारे नगण्य !

   आतापर्यंत सृष्टीची समज येण्याइतपत विज्ञान प्रगत झालेले आहे. खरं पाहता नि:पक्ष, विनापूर्वग्रह दृष्टीने कुणासही ही वस्तुस्थिती दिसेल. त्यासाठी विज्ञानादि शास्त्रांच्या मान्यतेचीपण गरज नाही.

   पण पांच हजार वर्षांच्या नागरी संस्कृतिच्या विचारधारेच्या संवयीने हे आमच्या गळी उतरणे सहजी शक्य नाही.

   शरद्चंद्र चटर्जींच्या (१८७६ - १९३८) स्पष्ट, रोकड्या शब्दांत सांगायचे तर :
'ही सारी बडबड - ही दर्शनशास्त्र वेदांताची बोली - हे नुसते शब्द - या शब्दांच्या जोरावर जग चालत नाही' (भैरवी - 'देना पावना', आ. १९६२ पृ. २१६).
   सृष्टीच्या लेखी समाज, धर्मसंस्था, राज्यसंस्था, अर्थसंस्था, राष्ट्रवाद, देशभक्ती, नेते-पुढारी, इत्यादी, किंबहुना निसर्गावर 'मानवी सत्ता' या शब्दांना काही अर्थ असू शकतो का?

टीप:१.  भैरवी (मराठी शीर्षक) - 'देना पावना' (कर्ज आणि तहशील) या कादंबरीत (१९२३) शरदबाबूनी शंभर वर्षांपूर्वीची देशातील खेडी, खेड्यांची व तेथील उच्चभ्रू व ग्रामिण-दलित समाजाची अवस्था वर्णन केलेली आहे. या कादंबरीचे भा. वि. वरेरकर यांनी १९४२ साली मराठी भाषांतर केले.
२.    आजच्या परिस्थितीचे आम्हीच साक्षी! फक्त आपल्या डोळ्यांवरचे वाद - विवाद - प्रतिवाद - युक्तिवाद - अपवाद... इ. चष्मे काढून बाजूला ठेवायचे व साकल्याने बघावे! एवढेंच!
३.   सृष्टीयोग हा काही कंपू नव्हे. प्रत्येकाचा सृष्टीयोग वैयक्तिक - स्वतंत्र मार्ग आहे.
 
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.| Page copy protected against web site content infringement by Copyscape