December 21, 2012

व्यक्तीच्या घडणीचे वय : जसे वळण तशी घडण

"मुलाचे पाय पाळण्यात दिसतात." ही म्हण अर्धवट आहे. यात नशिबावर भिस्त ठेवल्याचा वास येतो. पालक, शिक्षक, समाज यांच्यावर मुलाच्या विकासाची काहीच का जबाबदारी नाही? पूर्वापार चालत आले ते सर्व चांगले आहे असं म्हणणे केवळ संस्कारांचा अभिनिवेश आहे एवढंच!

व्यक्तीच्या घडणीचे वय । रेमीजीयस डिसोजा, मुंबई । २००३ 

रोप झाडाच्या कुंडीत 
उष्ण कटीबंधात प्रकाश आणि ओल जगायला पुरेशी होते.

वानसेपण आपल्या वाढीसाठी प्रकाशाच्या शोधात वळण घेतात. झाडांच्या दाटीतून हरेक जण आपापली वाट शोधत जातात, कधी सरळ उंच वर वर वाढत जातात, तर कधी वाकून, प्रकाशाच्या दिशेने. काहीही भांडण तंटे वाद नाहीत. (असल्यास आपल्याला कुठे समजते त्यांची बोली?

मुंबईच्या फुटपाथवर वानसे -१

जेथे नैसर्गिक घनदाट वने असतात, विशेषत: पर्वतराईत, असे दृश्य हमखास पाहायला मिळते. तसेच उपवनातही दिसते. शहरांतही रस्त्यालगत पाणी घालून वाढवलेली उपरी झाडे सर्रास वेडीवाकडी जात असतात.

नगरपालिकेला कोणत्या झाडांना त्यांच्या योग्य वाढीला अनुकूल "जागा आणि अवकाश" लागतात हे माहित नसावे. अरे, माणसाच्या वाढीला योग्य जागा व अवकाश" लागतात हे ज्यांना माहित नाही त्यांना वानसांचे काय सोयरसुतक? 

मुंबईच्या फुटपाथवर वानसे -२
वानसाना  पण जगण्याची इच्छा असते.

मुंबईच्या फुटपाथवर वानसे -३
मुंबईच्या फुटपाथवर विस्थापितांच्या दोन पिढ्या जन्माला आल्या, वाढल्या आणि कोठे पोहोचल्या कोणाला माहित? नपुंसकाना कसे कळणार?

महावृक्षाच्या सावलीत दुसरी झाडे वाढत नाहीत, असा एक प्रवाद आहे. पण तो फक्त कृत्रिम लागवडीला लागू असतो. खरं तर तो महाव्यक्तिंना - माणसांना - उद्देशून आहे, वृक्षाना नव्हेच. नैसर्गिक वनात महावृक्षाच्या आधाराने असंख्यप्राणी-वनस्पती राहात असतात.
एक महावृक्ष तोडा आणि पाहा काय होते. जीवांचे जीवन उध्वस्त तर होतेच. त्याशिवाय पर्यावरणाचे संतुलन बिघडते, भूईतील पाण्याचे साठे संपतात, जमिनीची धूप होते, वाळवंट पसरते, दुष्काळाची लागणी येते... 
पण अहंमन्य लोभी सत्ताधिशांना काय? ना खंत ना खेद! गरीब रयतेची उपासमार झाली तर ती काही मसालेदार बातमी नव्हे !

सृष्टीने संपूर्ण जीवमात्राच्या - त्यांच्या 'शरीर व मनाच्या' - पोषणाची व संरक्षणाची तरतूद त्यांच्या आलेखनात करून ठेवलेली असते. तिचा कारभार अप्पलपोट्या, सुसंस्कृत, सत्ताभिलाशी समाजासारखा थोडाच आहे! मग ते जीव जीवाणू असोत की मानवप्राणी असोत. तिथे मानवजातीच्या देवांचीपण ढवळाढवळ चालत नाही.
सृष्टी म्हणजे कथा-काव्यात गृहीत धरलेली रोमँटिक हिरवाई नव्हे. ती जशी सारी ब्रम्हांडे व्यापून आहे तशीच ती आपल्या आतही आहे. तिला, पर्यायाने आम्हालाही, आमचा शारीरिक व मानसिक विकास करायला सुयोग्य "जागा आणि अवकाश" हवे असते.
येथे 'जागे'चा अर्थ क्षेत्र, म्हणजे सरकारी नियमावलीतील चौरस फूट/मीटर क्षेत्रफळ नव्हे. आणि 'अवकाश' म्हणजे संत ज्ञानेश्वर सांगतात ते "पैस", भूमितितील त्रिमिती नव्हे. 
 

वळण - घडण याची दोन कमालीची उदाहरणे


पहिले उदाहरण आहे समष्टीचे आणि दुसरे आहे व्यक्तिचे. ही हल्लीचीच उदाहरणे सुसंस्कृत समाजाची दोन टोके आहेत.

पहिले उदाहरण : वियेतनाम देशात एक आख्खी पिढी युद्धभूमीवर जन्माला आली आणि खांद्यावर बंदूक घेवून वाढली आणि लढली. त्या युद्धात अमेरिकेला हार खावी लागली.

दुसरे उदाहरण : महाराज सयाजीराव गायकवाड, बडोद्याचे संस्थानिक. सयाजीरावांचे ब्रिटिश सत्तेशी संबंध कसे होते हे सर्वश्रूत आहे. त्यांचे चौफेर लोककार्य त्यांच्या भौतिक वैमवापेक्षा अधिक नजरेत भरते.
कोण होते सयाजीराव? एका सामान्य कुटुंबातून राजघराण्यात दत्तक घेतलेला मुलगा. वैभवशाली व्यक्तिला वळण नसेल तर केवळ वैभव असून काय कामाचे? सयाजीराव सर्वाथाने राजर्षी होते.

या दोन टोकात निदान एक कोटी उदाहरणे ताडून पहाणे फारच उद्बोधक ठरेल. पण अशा वेळी पुढारलेले समाज / तज्ञ नमुन्याचे सर्वेक्षण करण्यावर भागवतात. त्यांच्या बोलीत 'व्यक्ती तितक्या प्रकृति' ही म्हण नसावी. एरवी, टीवी, कंप्युटर, सेल फोन वापरणारे लोक आता एक कोटीवर पोहोचले अशा जाहिराती मात्र वेळोवेळी ऐकण्यात मात्र येतात.

तिसरे उदाहरण आहे. पण त्याचा फक्त उल्लेख येथे अनिवार्य आहे एवढ्यासाठी करतो. ते आहेत आदिवासी. भारतातल्या आणि जगभरच्या आदिम जमाती, व त्यांच्या संस्कृती ज्यांचा उगम प्रागैतिहासिक काळात आहे. बहुसंख्य लोकांना हे फारसे परिचित नाहीत.
— रेमीजीयस डिसोजा, मुंबई
~ ~ ~ ~~
© Remigius de Souza. All rights reserved.

November 23, 2012

सर्जनाची वाटचाल : समीक्षा सर्जनाची


सृष्टीयोग 

 सर्जनाची मूळ प्रेरणा


सर्जन आणि सर्जनशीलता या क्रिया आपण स्थूलपणे कलांच्या अभिव्यक्तींना वापरतो. परंतु सर्जनाची मूळ प्रेरणा केवळ जीवनाचे संधारण करणे एवढेच. जीवाच्या धारणेपासून ते बाळाला अंगावर पाजणे आणि यापुढे आयुष्यभर येणाऱ्या असंख्य क्रिया सर्जानाचाच भाग आहे. यांत्रिकी जीवनामुळे आपल्याला याचे भान राहत नाही एवढेच!
१. भिल्लांची पावरी 
भिल्ल स्वतःच आपली पावरी तयार करतात. खरे तर याचा इतिहास हजारो वर्षें मागे जातो.

२. प्रागैतहासिक अस्थी-बांसरी (30,000 वर्षें सद्यपूर्व)

ही पक्ष्याच्या अस्थीपासून केलेली बांसरी २००९ साली पुराशास्त्रज्ञांना गवसली. हिला पाच छिद्रे आहेत. विशेष म्हणजे भिल्लांच्या बांबूच्या बांसरीलापण पाच छिद्रे असतात. 


विधायक टीका

ज्याला विधायक टीका/समिक्षा म्हणता येईल ती मी आनंद कुमारस्वामी यांच्यापासून शिकलो. (टीप १.) अनेक प्रकारे ते उपयोगी आले. मुख्यत: मी व्यक्तिनिष्ठ प्रतिक्रिया सोडली आणि वस्तुनिष्ठ प्रतिसादाकडे वळलो, कोणतीही घटना असो.

पर्यावरणाचा अभ्यास, जो निवारा किंवा वास्तूचे मूळ उद्दिष्ट — वारा, ऊन, पाऊस, थंडी यांच्यापासून संरक्षण करणे — आहे. त्याने मी व्यक्तिगत व सामाजिक क्षेत्राच्याही पलिकडे जाऊ शकलो.

पारिस्थितिकी समजण्यास माझ्या लाडक्या तुकारामाचा महत्वाचा वाटा आहे : "वृक्ष वल्ली आम्हा सोयरी वनचरे" या पाच शब्दांच्या मंत्रात. हा मंत्र समजण्यास भातशेती-शाकशेती, स्वयंपाक, मातीची घरबांधणी, सूतकताई-विणाई या क्षेत्रांत माझे शारीरिक परिश्रम आणि लोकसहभाग Community Participation उपयोगास आले. हे माझ्या घडणीच्या काळात झाले. त्यावेळी मी माझ्या गावी प्राथमिक शाळेत होतो.

वास्तूविद्या शिकताना माझ्या ध्यानात आले, इमारतीत असलेल्या अनेक खोल्या आणि घटक त्यांच्या नियोजनात कसे परस्परावलंबी असतात. एक खोली किंवा घटक जरी हलवला, बदलला किंवा काढून टाकला तरी सबंध रचना बिघडते. त्यामुळे संपूर्ण संरचनेवर पुनश्च काम करावे लागते. हे समाजरचनेसारखे असते. वस्तुतः एक घर बांधले तरी ते नैसर्गिक पर्यावरण, पारिस्थितिकी व ऊर्जा यांच्या संतुलनावर अनिष्ट परिणाम करते.

तुकारामाचा पाच शब्दांचा मंत्र उलगडा करतो पर्यावरण, पारिस्थितिकी आणि ऊर्जा एकमेकाशी कसे संलग्न आहेत. आपण जर साध्यासुध्या दिसणारया कामावर, जशी शेती, सैपाक किंवा निवारा यावर, ध्यान केले तर निसर्गात पर्यावरणाचे हे तीन घटक कसे परस्परावलंबी व अधिव्यापी असतात हे समजायला मदत होते.

ही वाट जेवढी अपरिहार्य, अटळ आणि कष्टाची तेवढीच आनंदादायी आहे. शॉर्टकट नाहीत. पुस्तकं नाहीत. केवळ क्षेत्र अभ्यास उपयोगी.

भारताच्या स्वातंत्र्यानंतर आनंद कुमारस्वामी १९४७ सालीं परदेशी निवर्तले. (त्यांची भारताच्या भूमीवर देह ठेवायची इच्छा होती.) इथून पुढे, स्वातंत्र्यानंतर ब्रिटिश सत्तेने भारतात आणलेल्या 'बदला'चा वेग वाढला.

हा 'बदल' जवळजवळ जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत होत होता. त्याने सर्वात अधिक हानी केली ती बहुसंख्याकांची, अर्थात भारताच्या शेतीप्रधान समाजाची, खेडूत कृषीवलांची. त्यांचे संधारण प्रथम प्राधान्य देऊन करणे अत्यंत गरजेचे होते, ब्रिटिशांनी हा देश सोडताच. पण तसे झाले नाही; अजूनही होत नाहीय.

या बदलाचे मूलभूत कारण गेल्या शतकापासून पाश्चिमात्य विज्ञान आणि तंत्राचा भारतात झालेला विकास हे असावे. हा बदल सर्व जगभर होतोय. तथापि पाश्चिमात्य देश या 'बदला'बरोबर, म्हणजेच औद्योगिक क्रांतीच्या उदयापासून, वाढले. तर भारतात तो लादला होता.

गेल्या ६५ वर्षात आपण वाढलो असे म्हणता येणार नाही. आम्ही वयस्क मात्र झालो आणि आमचे संस्कार व परंपरा यांनुसार आपण वयाचा आदर करतो, माणूस असो की पाषाण !

खरे पहाता हा बदल (ज्याला आपण 'विकास' म्हणतो तो अपप्रयोग आहे) आपल्या मूलभुत गरजांना — अन्न, निवारा, वस्त्र, आणि सर्व जीवमात्राच्या निसर्गदत्त स्वायत्त कार्यांना — श्रम, विश्राम, आरोग्य, अध्ययन आणि प्रजनन — विघातक झालेला आहे. केवळ मानव जगच नव्हेत तर जगभरच्या जळ, जमीन आणि हवा यातील जीवमात्र याला बळी गेलेले आहेत.

जेव्हा या मूलभूत गरजांची आणि निसर्गदत्त स्वायत्त कार्यांची हानी होतेय तेव्हा सामाजिक, राजकीय, धार्मिक वगैरे वगैरे संस्था, किंवा स्वर्ग आणि नरक-पाताळ यांचा काय पाड ?

सर्जनाला समीक्षेची गरज 


उदाहरणार्थ, आम्ही आता वर्षभर – २४/७/५२ – दूरचित्रवाणीवरील अनेक वाहिन्यावर काय पहातो? त्या आम्हास दाखवतात, गुळचट प्रेम, पांचट शृंगार आणि विच्छिन्न कुटुंब संस्थेतील भपकेबाज लग्नांच्या कहाण्या, गुन्हेगारी आणि हिंसाचार यांचा बेसुमार नाविन्यपूर्ण मसाला घातलेल्या. जणू आमची करमणूक करायला दुसरे काहीच साधन राहिलेले नाही, की नाही विचार करण्याजोगे.

मुंबईत, उदाहरणार्थ, दरवर्षी सुमारे २००-३०० चित्रपट बनवले जातात. पण त्यांनी खर्च केलेल्या साधनसंपदेचे मूल्य काय? त्यांची पर्यावरण-परिस्थितीकी-ऊर्जा (प-पा-ऊ) मूल्य काय? अक्रीय करमणूकीशिवाय कोणत्या सामाजिक साध्यासाठी? ही एक सार्वजनिक घटना आहे!

जेव्हा भारताच्या लक्षावधी रयतेपुढे जीवन-मरणाचा संघर्ष उभा आहे, अन्न, पाणी, निवारा, आरोग्य, शिक्षण इत्यादी अब्जावधी प्रश्न उभे आहेत त्यांची उत्तरे कोण देणार? सरकार? पार्लमेंट? बॉलीवूड-टेलीवूड? मितव्यय? शेयर बाजार?
केवळ रयतच वरील प्रश्नांचे उत्तर देऊ शकेल. कोणत्याही नियोजनाचे, प्रकल्पाचे किंवा विकासाचे "साध्यही रयत; साधनही रयत".
विधायक टीका / समीक्षा कोणत्याही घटनेत किंवा क्रियेत, केवळ साहित्यिक कृतीच नव्हे, गाळलेले संदर्भ आणि आशय उपस्थित करते आणि सर्वाच्या हितासाठी समर्पक सूचना देते.

कलेचे उद्दिष्ट

कोकणात लोकसहभागाने भातशेती । फोटो : पूजा राणी 
शेती ही प्राचीन आणि सर्वात उच्चतम कला, जेथे पंचमहाभूतांशी संपर्क येतो, जेथे भुईचा कॅनवास वापरला जातो, जेथे कलेच्या मूळ प्रेरणेला स्थान असते, पण हिला उच्चभ्रू समाज मान्यता देत नाही.


उत्स्फूर्त आत्माविष्कारातून कलेची निर्मिती आत्माभिव्यक्तीत अवतरते. ती कोणत्याही वयात व काळात होते. कलेची व्याख्या नाही. सुसंस्कृत समाजाने कलेसाठी अनेक दालने, सदरे, शैली, पंथ, घराणी इत्यादी निर्माण केली असतील, पण ते सर्व वरकरणी आहेत.

आत्माभिव्यक्तीत कुणी उत्स्फूर्तपणे नाचेल, गाणे गाईल, मातीत वा भिंतीवर चित्र रेखाटेल, मातीचे खेळणे बनवील किंवा कहाणी सांगेल...

सुसंस्कृत किंवा नागरी समाजाला फार आवडते करायला विभाजन, श्रेणी, जातवारी, वर्गवारी आणि अधिश्रेणी. याने तो आवश्यकतेपासून दूर मात्र होतो. म्हणून आपण या सर्व वेडगळापणाकडे दुर्लक्ष करू.

कला – आत्माभिव्यक्ती – घडते ती वास्तवाच्या अनुभवातून आणि भावनांतून. हे वास्तव म्हणजे निसर्ग, नैसर्गिक घटना, इतर जीव – व्यक्ती, वानसे, प्राणी... आणि त्या संबंधांतून आलेली भावानुभूती.

कला ही भावनांतून निर्माण झालेल्या ऊर्जेला सर्जनशील कृतीत वाट करून देते, जी प्रगतिरोध Entropy रोखते. नाहीतर त्याचे पर्यावसान मानसिक किंवा शारीरीक रोगात होणे शक्य असते. हेपण एकप्रकारे प्रजनन म्हणता येईल. कला ही कोणत्याही वर्गाची वा व्यवसायिकांची मक्तेदारी नाही.

विज्ञानाचे उद्दिष्ट


जशी कलेची व्याख्या नाही तशीच 'जीवना'चीपण नाही, विज्ञानाने पण ती केलेली नाही. जीवन आणि कला यांचे अर्थ शब्दकोशांत असतात. तरीपण 'जीवन' काय आहे हे आम्हाला उपजतच समजते (जीवाच्या मरणामुळे ज्याचे अक्रीय वस्तूत परिवर्तन होते).

'ईश्वर' ही कल्पना निसर्गाच्या आत्यंतिक घटनांमुळे आली असावी (प्रागैतिहासिक आदिवासी काळात); त्याने  निसर्गाची अपार शक्ती चित्रात आणि विधींत व्यक्त करण्यात आली असावी.

हल्लीच वैज्ञानिकांना एक शोध लागला ज्याला त्यांनी 'ईश्वर' कण असे नाव दिलेय. ते पूर्ण 'सत्य' नव्हे; निसर्गाचे गूढ मात्र आणखीच अगम्य होतंय.

नागरी संस्कृतीत विज्ञानाची पद्धती विश्लेषण करण्याची असते, तर कला संश्लेषण करते. एके काळी कला आणि विज्ञान व तांत्रिकी यांचे असे खातेवाटप अस्तित्वात नव्हते, जेव्हा अग्नी, तरफ, तीरकमठा, मातीची भांडी, जंगली वानसांचे व प्राण्यांचे गृहसंवर्धन इत्यादि शोध मानवाने लावले. आता आम्ही ज्याला कला, विज्ञान, तंत्रज्ञान या नावांनी ओळखतो ते पूर्वी वेगवेगळे नव्हते आणि ते सर्व लोकांच्या हितासाठी होते.

एके काळी कला विज्ञान आणि तांत्रिकी विभक्त नव्हते. आता विज्ञान आणि तांत्रिकी यांच्या सीमारेषा अंधूक झालेल्या आहेत. त्याचे कारण दोन्ही शाखांच्या मितव्ययात economy भांडवलदारांचे गुंतलेले हितसंबंध होत.

समीक्षा सर्जनाची

सर्जनशील सकलजन । रेमीजीयस डिसोजा । मुंबई 
मूळ इंग्रजीचे स्वैर भाषांतर 

कला, विज्ञान, तांत्रिकी, इतर ज्ञानशाखा, तसेच संस्था यांचे  उद्दिष्ट सर्व लोकांचे हित साधणे हे तर आहेच, शिवाय 'इतर' मानवसमूह, जीव आणि त्यांचा निसर्गनिवास जतन करणेपण आलेच. निसर्गाने केलेली निर्मिती आणि विनाश विनाहेतू नसतात. फक्त आम्हास त्यांचे आकलन होत नाही एवढेच.

विधायक समीक्षा केवळ कला, साहित्य आणि त्यांच्या शाखा एवढ्यापुरतीच मर्यादित नाही. ती इतर ज्ञानशाखा, खाजगी आणि सार्वजनिक संस्था-संघटना यांनाही लागू होते. त्यानी केवळ न्यायसंस्थेचेच कायदे नव्हेत, तर नैसर्गिक न्यायपण हिशेबात घ्यायला हवा. न्याय हा कायद्यापेक्षा श्रेष्ठ आहे.

सृजनशीलता हा शब्द आता "मूलमंत्र" buzzword झाला आहे. तो आता कोणत्याही संदर्भात (उदा. युद्धसाहित्य) वापरला जातो, मग त्याचे दुष्परिणाम काही का असेनात. विशेषत: जेजे बाजार आणि चंगळवादाच्या सदरांत येते त्यात्या वस्तूला, कल्पनेला सर्जनशील हे लेबल सर्रास लावले जाते. जे कुणी त्यांचे पाठीराखे असतील ते वातानुकूल अद्यावत बोर्डरूममध्ये बसलेले असतात. नफ्यावतिरिक्त दुसर्‌या कशाचेही सोयरसुतक त्यांना नसते.

परंतु तथाकथित सर्जनशील वस्तूची वा घटनेची गुणवत्ता क्वचितच पारखली जाते; ती पर्यावरण पारिस्थितिकी आणि ऊर्जा यांच्या मूल्याच्या कसावर, विधायक की विध्वंसक आहे का हे ठरवावे लागेल. आजच्या झपाट्याने बदलणारया परिस्थितीत निष्क्रिय राहणे किंवा डोळेझाक करणे अयोग्यच नव्हे घातक ठरेल. स्वायत्त तिबेट आठवावे !

सर्जन विधायक आहे की विघातक हे पाहाणे निर्णायक आहे. याचा निकष तथाकथित तज्ञांच्या दालनात राहून न करता सृष्टीच्या साकल्याच्या मार्गाने लावायला हवा, जेथे नागर संस्कृतीप्रमाणे खातेवाटप नाही. असे निर्णय व्यक्तिगत आणि समष्टीच्या स्तरावर वेळोवेळी घेतले गेले पाहिजेत. तरच सरकार कार्यक्षम आणि तत्पर राहील.

टीप १. मी लिहिलेल्या समीक्षेत पहा - परिच्छेद- Indian Architectural Terms, Essays in early Indian architecture (Book Review)
२. प्रतिमा २.प्रागैतहासिक अस्थी-बांसरी (30,000 वर्षें सद्यपूर्व), ऋणनिर्देश : New York Times, अधिक वाचा, Flutes Offer Clues to Stone-Age Music

~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.

October 01, 2012

सृष्टीत आम्ही सातत्याने

 सृष्टी स्तवन



भारताला संपन्न जैवविविधतेची देणगी सृष्टीकडून मिळाली आहे. त्यातूनही भारतीयांनी नारळाच्या झाडाला 'कल्पवृक्ष' असे संबोधले. नारळाला 'श्रीफळ' म्हटले. सृष्टी सर्व जीव मात्राला जगण्याचे साधन देते, आणि मानवाला संस्कृती देते. संगीत, काव्य, नाट्य, साहित्य, चित्र, वास्तू, महाकाव्ये ही केवळ संस्कृतीची अभिव्यक्ती आहेत. संस्कृती केवळ मानवात वसते.

सृष्टीत आम्ही सातत्याने


सृष्टी मानवप्राण्याला तिची लाडकी जीवजाती म्हणून ओळखत नाही, की नाही नागरी समाजाच्या कुंपणाना व त्यांच्या सामाजिक अधिश्रेणींना.



वानसे सुसंस्कृत समाजाची कुंपणे व अधिश्रेणी ओळखत नाहीत 
नागरी समाजांना कुंपणे - भिंती बांधायचे, वर्गवारी करायचे फारच वेड आहे. ते एवढ्यावरच थांबत नाही. त्या भिंतीवर नक्षीकाम करायचे, त्याच्यावर अलंकार चढवायचे, त्यांची स्मारके घडवायची, आणि टाळ्या वाजवायच्या हे पण पर्यायाने आलेच. उदाहरण: चीनची भिंत: ते तर सरंजामदारशाहीचे प्रतिक आहे.

तसेच वानसे आणि अन्य प्राणीजातीपण त्यांची सामाजिक बंधने व अधिश्रेणी ओळखत नाहीत.
पाळीव पशुपक्षीपण सायंकाळी निवार्‌याला घरी परतून येतात. त्यांना तेवढ्यापुरतीच कुंपणाची म्हणजेच मालकीची ओळख असते. सामाजिक अधिश्रेणी सोपान ते ओळखत नाहीत.
लहानपणी आईच्या दुधाव्यतिरिक्त इतर अन्न आपणास सुरू केले की जीवाणूंच्या झुंडी आपल्या उदरात कायम घर करून राहायला सुरवात करतात. त्यांच्या अनेक जातींची संकुले उदरात असतात!

आशा करूया, 'हिरवाई' बगिचे, झाडी, शेते, उरली सुरली जंगले, आणि नद्या-सरोवर-सागर यांच्यापल्याड; वर्डस्वर्थ याच्या कविता, टर्नरची चित्रे, यांच्यापल्याड; आणि फोटो सिनेमा विडयो - ही कितिही अद्यावत असली तरी - त्यापल्याड जावून आपण कधीतरी सृष्टीचा अनुभव घेऊ ! कारण ही सर्व माध्यमे मनोरंजक व दृष्टीसुख देणारी असली तरी ते सृष्टीला पर्याय नव्हेत.

वरील दाखले आपणांस निसर्गाच्या मनोहर / भयावह अनुभवांची आठवण करायला मदत करतील.
जीवशास्त्र आणि पुरातत्त्वशास्त्र, त्यांनी केलेली प्रगती आम्हाला निसर्गाची अधिकाधिक माहिती देते, शिवाय निसर्गातील आपले स्थान काय हेपण समजायला मदत करतात.
कदाचित चक्रीवादळे, मेघस्फोट, ज्वालामुखी, धरणीकंप, हिमवादळे, सुनामी... इत्यादि आणि आता वायुमान बदल (ही काही कल्पित कथा नव्हे) या रौद्रभयानक रूपांत निसर्गाचे सामर्थ्य आपणास दिसते. 

सृष्टीचे प्राथमिक निरिक्षण 


सृष्टीशी मौलिक संबंध प्राथमिक आणि वैयक्तिक स्तरावर प्रस्थापित करणे हे सर्वात उत्तम. स्वतःच्या शरीर व मनाचे निरिक्षण करणे; त्यासाठी नाही मुहूर्त, नाही मंत्र-तंत्र विधी, ना शुभाशुभ स्थानाचे, विषेश बैठकीचे अथवा वेशभूषेचे नियम. केवळ निरिक्षण, लक्षपूर्वक व करुणापूर्वक. कारण शरीर आणि मन आम्हाला या जगात टिकून राहाण्याची मिळालेली साधने आहेत व आम्ही त्यांचे विश्वस्त आहोत, मालक नव्हे. यात कोणतेही गूढ नाही; जशी बाहेरची हिरवाई तसेच आम्हीही सष्टीचेच केवळ भाग आहोत.

सृष्टीच्या निरिक्षणाचे दुसरे साधन  


उष्ण कटिबंधात वानसे  कोठेही उगवतात


आम्ही भारतीय पंच महाभूते पृथ्वी, आप, तेज, वायू आणि पैस परंपरेने मानतो.
स्वतःनंतर सष्टीच्या निरिक्षणाचा दुसरा उत्तम पर्याय असा : वानसांबरोबर संबंध जोडणे व त्यांचे निरिक्षण करणे. त्याहूनही चांगले प्रत्यक्ष कृती: सैपाकघरातून काही बीजे घेऊन मातीत पेरणे. त्यासाठी टीनाची प्लस्टीकची अथवा मातीची लहान कुंडी चालेल. मातीची कुंडी बरी कारण माती श्वासोश्वास करते. अशी पेरणी प्रत्येक ऋतूत केलेली बरी. आणि रुजलेल्या रोपांच्या वाढीस सूर्यप्रकाश व पाणी देऊन मदत करणे. मार्गदर्शक पुस्तके शक्यतो टाळावी. काही चूका झाल्या तरी हरकत नाही.
प्रत्येक बीज रुजेलच असं नाही. त्यांना येणारे कोंब पहावे, सूर्यप्रकाश व पाणी घालावे. हे सर्व करीत असताना रोपांबरोबर आपणही पंच महाभूतांच्या संपर्कात येतो, पर्यायाने सृष्टीच्या संपर्कात जाणीवपूर्वक येतो.

निसर्गाच्या प्रयोगशाळेत कृषीक्रांती

दहा हजार वर्षांपूर्वी अर्धनग्न मानवांनी रानटी वानसे आणि पशूपक्षांचे गृहसंवर्धन केले. आणि बिकट नैसर्गिक वातावरणात कृषीक्रांतीची सुरवात झाली. आणि ती सर्व जगभर पसरली (विना बौद्धिक मालकी हक्क).
त्या काळी नागरी संस्कृती किंवा सुसंस्कृत समाज किंवा civilization अस्तित्वात आले नव्हते. कृषिक्रांतीनंतर पाच हजार वर्षांनी सुसंस्कृत समाज Civilization म्हणजेच Urban Revolution, 'नागरी क्राती'चा उदय झाला.
औद्येगिक क्रांती Industrial Civilization काही शतकांपूर्वीच विलायतेत उदयास आणि पाहता पाहता सर्व जगभर पसरली. पण ती कधीच 'वैश्विक' universal झाली नाही. आपण उच्चभ्रू वर्ग मात्र येथे पोहोचलो. आपले अध्ययन सांघिक शिक्षण पद्धतिच्या जुळवणी पंक्तीवर Assembly Line झाले.
अजूनही वेळ नाही का आली सृष्टीशी संयोग करायची?

टीप : वरील मजकूर लिहित असताना एका इंग्रजी ब्लॉग वरील लेख Humans and Nature: Can the Gulf Be Bridged?  वाचनात आला. याचा मथळा वाचताच विलायती समाज आणि त्यांचे अनुकरण करणारे इतर समाज निसर्गापासून कसे दुरावलेले आहेत हे.ध्यानात येते. या लेखावरील माझी टिप्पणी प्रतिक्रिया अवश्य वाचावी.

~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.

August 15, 2012

अर्वाचीन महाभारत-कुरूक्षेत्र भारतभर

दोन गाणी : प्रस्तूतकालीन महाभारताची समीक्षा


लोक-उर्जा संधारण 
 आर्थिक-तांत्रिक-ओद्योगिक विकासाच्या नशेत लोकाविकासाचे कुणाला भान?


मला'खो' देते 'हर्षदा' आणि मी समीक्षा करायला निवडतो पुस्तकाऐवजी एक विषय, ज्याला म्हणता येईल : "प्रस्तुतकालीन महाभारत-कुरूक्षेत्र"! हे पुस्तक वास्तव रुपात आपल्यासमोर आहे. त्याचे स्वरूप "मायावी वास्तवता", Virtual Realty, नाही. ही टीका मी पुढील दोन गाण्यात आटोपतो.

पहिल्या गाण्यात आहे सत्तेशी केलेला संवाद जो विफल होतो, आणि त्याचे स्वरूप केवळ 'स्वगत' उरते. दुसऱ्या गाण्यात पहिल्या गाण्यातील वैफल्याचे निदान केलेले आहे.


प्रगती = पंचम जगत भारताचा उदय
ही मुले मुंबईची काय आठवण घेऊन मोठी होतील ?

 

अलिखित अर्वाचीन महाभारत- कुरुक्षेत्राची समीक्षा 

गाणे १. स्वगत सत्तेशी (नाट्यछटा) :  त्तेशी संवाद अशक्यप्राय


मी सत्त्याशी लुडबुड करू इच्छित नाही
वाटल्यास ते आपसूकच प्रगट होईल.
पण जेव्हा आम्ही विविक्षित तथ्य बोलतो
ज्यात मी गुंतलो आहे ते जाणणे माझा हक्क नाही का?
संवादात प्रतिसादाने बरोबरीचा हक्क नाही का?
किंवा कोणत्याही नात्याने — सर्व वाटांवर सर्वदा?
एक तथ्य उरतेच, जेव्हा मी विचारणा करतो
तेव्हा तू संवाद तोडतेस किंवा उत्तर टाळतेस.
कारण काहीही असो.

याला संवाद का म्हणावे? कि
याचा अर्थ माझ्याच खर्चाने माझी टवाळी?
तू माझ्या परिश्रमांची पैशाने किंमत देऊ शकतेस पण मोल नाही
(जर का तू कधी परिश्रमाचे मोल समजलीस तर
पुरवठ्याच्या बाजारी?).

मी नाही विकावू कि नाही भाड्याचा माल.
पसंत करीन मी तुला सोडचिठ्ठी देणे
देण्याहून औषधांची चिठ्ठी रोगांवर
ज्या जन्माला घालतात केवळ प्रतिक्रिया, प्रति-प्रतिक्रिया.
नाईलाज आहे! अशा लुडबुडींना येथे नाही वाव
केवळ एकच जन्म हा!
(नाट्यछटा हा प्रकार दिवाकर यांनी मराठीत आणला. नाटक-सिनेमात स्वगते येतात.)

 

गाणे २. माझे गाणे जन्मले... 


माझे गाणे जन्मले भूईत आणि जळांत,
पोसले वानसांनी, लोकानी अन प्रेमाने,
सत्तेच्या हवसेने वेड्या नागरी समाजांत,
अंध कोपाने जगणेच उध्वस्त करणार्‌या.—
गांडूळे, हिंस्र जनावरे बरी त्याहूनी !  


विश्राम अमूल्य विनामोल
श्रम - विश्राम - आरोग्य - अध्ययन - प्रजनन ही सृष्टीने समस्त जीवमात्राला दिलेली पाच स्वायत्त मूलभूत कार्यें. यात हस्तक्षेपाचा कोणत्याही मानवी सत्तेला अधिकार नाही (पहा : टीप 1).

  सत्तेचे अनेक अवतार

सत्तेच्या अनेक रूपांत लोकाशी सरकारपण गृहीत आहे. पण सत्ता कुठल्याही स्तरावर असू शकते, कुटुंबापासून समष्ठीपर्यंत. त्यांत शाळा-शिक्षक आणि विद्यार्थी, अगणित सार्वजनिक संस्था, कॉपोरेशन, पोलीस, आमदार-खासदार, नोकरशहा, इत्यादी सर्व आले. कुटुंब नवरा आणि बायको, सासू-सासरा आणि सून, पालक आणि मुले यांच्या संबंधांतही सत्ता अवतार घेते.

अर्थात यात सत्ता आणि रयत, किंवा सत्तेसाठी संबंधितांचा संघर्ष आलाच. नागरी समाजात हा संघर्ष अपरिहार्य आहे. खरं तर सत्तेचे केंद्रीकरण हे त्याचे व्यवच्छेदक लक्षण आहे. नागरी समाजाच्या इतिहासात हे अव्याहत चालत आले आहे.

आणि या सत्तेने सत्तेसाठी केलेल्या संघर्षांत कितीक बलाढ्य नागरी संस्कृती नामषेश झाल्या, पण त्यांची रयत नव्हे. मात्र टिकून राहिल्या आदिवासी जमाती, ज्या आहेत सान प्रजासत्ताके, अनादी काळापासून... आजही!!


स्वावलंबनाला वेळूचा आधार
 यंत्रोद्योग = बहुसंख्य ग्रामीण जनतेच्या हस्तोद्योगांवर गाढवाचा नांगर आला. बांबू प्राचीन काळापासून भारतीय ग्रामीण जीवनाशी जोडलेला आहे, मग बांबू भारतात दुर्लक्षित का व कसा राहिला?

या गाण्यांना काव्य म्हणता येईल का माहीत नाही ! ही आहेत रेमीच्या बोलीत राकट गावठी प्रेमगीते. येथे नाही अभिजात शैली, नाहीत अलंकार-उपमा, नाही शब्दांची वा कल्पनांची आतिषबाजी. शेतकर्‌याच्या पिंडाला अशी चंगळ परवडणारी नाही, मग ते पाणी असो की शब्द असोत.

एक प्रश्न उरतो. या रचनांना समिक्षा, टीका अथवा दुसर्‌या कोणत्या सदरात ठेवता येईल का? कोणत्याही सृजनशील अभिव्यक्तीत वैयक्तिक व सामाजिक यांच्या पलिकडे जाण्याकडे माझा कल आहे. त्यामुळे यातील 'मी' नेहमीच गौण राहातो. दोन्ही गाण्यांचा विषय प्रेम आहे, पण हल्लीच्या रूढ (लैंगिक) अर्थाने नव्हे.  

प्रस्तुतकालीन महाभारत (कुरूक्षेत्र) आज काव्यात कोण लिहिणार, आणि वाचणार कोण? ते तर प्रत्येक व्यक्ती रोजच अनुभवते! मात्र त्याचे ऑपरेशन (कि डिसेक्शन, कि पोस्टमोर्टेम?) सुटसुटीत व्हायला काय हरकत! आजच्या परिस्थितीवर लेखातून, पुस्तकातून केलेल्या असंख्य टीका वेगवेगळ्या दालनात राहून केल्या जातात. कितिही प्रयत्न केले त्या अपुर्‌या राहातात. किंबहुना त्या जेवढ्या लठ्ठ तेवढ्या आकलनास कठीण.


अन्नपाण्यासाठी रयत दाही दिशा - जगण्यावर कर अनारोग्याचा
 चव्वलाच्या नादात पाणपोया वाहून गेल्या - हे रस्ते हे रस्ते


साधे उदाहरण : एकाद्या घटनेची, वस्तूची व्याख्या तिचे पूर्ण वर्णन करू शकत नाही. व्याख्यांच्या जागी समर्पक उदाहरणे सोईची होतात असं मला वाटतं! ... पाण्याची शास्त्रीय व्याख्या H2O असली तरी ते त्याहून अधिक असते. तुका म्हणे 'प्रयत्नें वाळूचे कण रगडीता तेलही गळे'. अर्वाचिन युगांत रूसी शास्त्रज्ञांनी भूगर्भातील खडकांना दाब देऊन पाणी काढले. दगडाच्या खाणीत मिळालेल्या स्फटीकाच्या पोकळीत पाणी असते. ऐकावे ते नवल!

अर्वाचीन युगाची व्याख्या मला माहित नाही. पण चार्ली चाप्लीनचा मूक चित्रपट Modern Times शब्दही न वापरता त्याची व्याख्या समर्पकपणे चित्रित करतो. ते पाहून आणि वारंवार आठवून मी मात्र अभिजात शैलीच्या शब्दजंजाळातून मोकळा होत गेलो.

अर्वाचीन महाभारत-कुरुक्षेत्र!  एवढा क्लिष्ट, अनेकांगी आणि विस्तृत विषय! या देशाची घटनाच लिहायला किती विद्वानांना किती वर्षें लागली? आजच्या सुधारलेल्या प्रगत समाजात कुठून मिळणार डिक्टेशन देणारा व्यास आणि लिहून घेणारा गणपती! प्राचीन काळातील कुरुक्षेत्र एकाच रणांगणावर होते. आज ते सर्व भारत व्यापून राहिले आहे. सामाजिक संधारण आर्थिक फॉर्म्युला लावून कसे होणार?

प्रेमावाचून दुसरा कोणताही पर्याय किंवा साधन किंवा अहिंसक शस्त्र हे ऑपरेशन करायला मला सापडले नाही!


आमचा पत्ता : मुक्काम - मुंबई, पोस्ट - इंडिया
आज सीमांत प्रदेश. उद्याचं ?माहित नाही

सरता पालव

इंडियन आयडल ६ च्या मंचावर पं. जसराज


टीवीच्या पडद्यावर सारा वेळ माझे ध्यान – कान आणि नजर – होते पंडितजींवर. कधीकाळी लोककलांतून अभिजात कलांचा – शिल्प, संगीत, नृत्य आदि– उगम आणि विकास झाला. अर्वाचीन काळातही पं. कुमार गंधर्वांनी ते केले. आजही लोकबोलीतला कबीर–तुकाराम अभिजात संगीताच्या गळ्यातला ताईत (रत्नहार नव्हे, तो राजे लोकांसाठी, तुकोबासाठी नव्हे.) आहे.

आता अभिजात संगीतातून बॉलीवुडच्या इंडिपॉप संगीताचा उगम झाला. त्याचा उदो करण्यासाठीच तर हा मंच आहे. आता त्यांच्या चालींवर श्रद्धाळू भजनं गातात. आता करूण-शांत-शृंगार रसांची जागा राजरोस बीभत्स रसाने घेतली आहे; हवा, जळ, जमीन, जीव ही प्रदुषित होताहेत.
या प्रदूषणाच्या जाणीवेवाचून कविता-कथा-कादंबरीची कशी सुटका होईल? मानवाने निर्माण केलेल्या सर्व प्रश्नांस उत्तरे आहे.कालचा व्यास नागरी समाजाच्या केंद्रित सत्तेचा कवी होता.

आजचे देशव्यापी "महाभारत आणि त्यात सतत चालले कुरुक्षेत्र" जेव्हा शंभर कोटी कवी लिहितील तेव्हा नागरी समाजाचे सत्तेचे केंद्रीकरण समाप्त होईल.

परिशिष्ट

आद्य महाभारतातील तीन प्रसंग


एकलव्य – दुर्गा भागवत याला 'मोहरीतील ठिणगी' (व्यासपर्व) म्हणतात;
लाक्षागृहातील कांड – संन्यस्थ कुंती गांधारी व धृतराष्ट्र ... रानाला लागलेल्या नैसर्गिक वणव्यात जळून मरतात, कुरुक्षेत्रानंतर...महाश्वेतादेवी (समीक्षा).
खांडव वनाचा विनाश – राजधानी इंद्रप्रस्थ बांधण्यासाठी लावलेल्या वणव्यात वानसे, पशूपक्षी व नाग जमात भक्ष्यस्थानी पडतात. त्याचे पर्यवसान पांडवांच्या वंश-विच्छेदांत होतो – तक्षक जीवाणू (वायरस) होऊन परिक्षिताचा वध करतो.

आदिवासी जीवन 

भिल्लांची आगळी होळी

आदिवासींची संस्कृती किती प्राचीन असेल याची कल्पना नाही. पण आज ते काही प्राचीन वातावरणात राहात नाहित.प्रस्तुत कालीन नैसर्गिक आणि सामाजिक-राजकीय-आर्थिक-इ. पर्यावरणात, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ते कसे टिकतात - sustain - याचं कारण ते निसर्गाशी संवाद साधून जगतात एवढं खरं!
ते  खरे सृष्टीयोगी !
भिल्ल शोडषांचे उत्स्फूर्त नृत्य -१
त्यांना विश्राम विनामूल्य मिळतो. करमणुकीसाठी त्यांना सिनेमा, टीवी अशा कुबड्यांची गरज किंवा हवास नसते.
त्यांचा  होळीचा सण पाच दिवस चालतो.
बाजूच्या व खालील  फोटोत दीवासौ या सणाला या भिल्ल षोडशा उत्स्फूर्त नाच करताना. यावेळी मक्याचे पिक तयार झालेले आहे.



भिल्ल शोडषांचे उत्स्फूर्त नृत्य - २

वरील चित्रांतील आनंदी भिल्ल व इतर आदिवासींचे नागरी समाजाने गेल्या पाच हजार वर्षांत केलेल्या नुकसानाची परतफेड आजचे लोकशाही सरकार कधीतरी करू शकेल का?


आता मी 'खो' देतो 'सविता' (अब्द शब्द) आणि 'अत्यानंद' यांना. दोघंही मातबर ज्येष्ठ लेखक. शिवाय सावितादी प्रवासी आणि फोटोग्राफर आहेत. तर अत्यानंद (प्रमोद देव) हे शास्त्रीय संगीताचे व्यासंगी गायक आहेत; त्यानी माझी एक, वरीलप्रमाणे कोणत्याही सदरात न बसणारी, कविता - 'अशी कविता एक कोडे' - गाईली होती हे आवर्जून सांगावेसे वाटते.

टीप : . श्रम - विश्राम - आरोग्य - अध्ययन - प्रजनन ही माझी मूळ लेखमाला अपुरी राहिली आहे. पण तिचे इंग्रजी भाषांतर Archetypes India माझ्या ब्लॉगवर प्रसिद्ध केलेय. त्याचा tag Work-Leisure-Health-Learning-Propagation.  ही माझी पुनर्शोधन (संशोधन नव्हे) मालिका आहे. त्याची स्फूर्ती, शिक्षण आणि दिशा मला माझे आदिवासी आप्तेष्ठ आणि आई-आजी यांच्याकडून  मिळाली.
२. नुकताच New Scientist या साप्ताहिकात प्रसिद्ध झालेला लेख Climate change: The great civilisation destroyer? अवश्य वाचावा. त्यासाठी नाव-नोंदणी Sign-in करावी लागेल. हा लेख मर्यादित काळासाठी उपलब्ध आहे. त्याची वर्ड-कॉपी हवी असल्यास इ-मेलने माझ्याशी संपर्क करावा.  

स्वातंत्र्यदिनानिमित्त | १५ ऑगस्ट २०१२ | मुंबई
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.

July 30, 2012

चेहरा सावली हरवलेली आधुनिक संस्कृती

चेहरा सावली हरवलेली आधुनिक संस्कृती  (विद्रोही कविता)
रेमीजीयस डिसोजा
उलगुलान : भयानक विद्रोह (महाश्वेता देवी, अरण्येर अधिकार)
कुणी कुणाशी विद्रोह केला?

बाजारू खेळण्यातल्या माकड़ासारखी
चावीच्या आधारे टाळ्या पिटीत बसली.

पुरातन काळी सांगतात होते राजे दुष्ट दयाळू
अत्याचारी व्यभिचारी प्रियदर्शी परमकृपाळू
तरी म्हणे होते अभिषिक्त अंश ईश्वरी .

कोणी म्हणतात प्रत्येकात - माझ्यातही -
वृक्ष वेली कीटक जनावरात - माती धोंड्यातही -
आहे तो अंश ईश्वरी; माहीत नाही.

पण असलेच तर ते होते रक्ता कुडीची
मन आत्म्याने घडवलेली माणूस नावाची
एक वास्तू चक्रावलेली जन्म-मृत्युच्या भोवरयात.

काळाच्या ओघात घेऊन काडीचे आधार
ईश्वरी अंशाचे राजे आधुनिकतेच्या लाटेत
गेले. आले त्यांच्या जागी राजकर्ते मुजोर

जनता जनार्दनाचे स्वाभिषिक्त अंश होऊन
आभुषणे अलंकार लोकमताचे लेवून
त्यांची स्मारकेपण अजस्त्र सहस्त्र पावन.

राजे गेले. राजकर्ते आले. आले गेले - आले गेले -
लोकमताच्या हिंदोळ्यावर सदैव विराजलेले,
काळाच्या उदरात बघता बघता लुप्त झाले,

हरवले जग जवळ आणायच्या खटाटोपात
डोंगराएवढ्या इतिहासाच्या पोथ्यापुराणात
हरवले हरघडी उंचावत जाणारया अहंकारात.

त्यांच्या अहंकाराचे बोडके पर्वत डोंगर
बसले पंडितांच्या बोडक्यावर उरावर
जेथे हिरवळ सुध्दा उगवत नाही.

आधुनिकतेच्या वावटळीत गेले ईश्वरी अंशाचे अवतार
गेले जनाताजनार्दानाच्या रेतातून उठलेले भार,
झाडे वेली डोंगर मातीपण धुपून गेले पार.

माणुसकीची संवेदना नसलेल्या संगणकाचे हत्यार
घेऊन आल्या तालेवार विश्वव्यापी संघटना अपार,
संपत्तीचे उध्दारक अनावर, सुधारणेचे ठेकेदार,

उभ्या ठाकल्या बटनांचे संच अद्दृश्य हाती घेऊन
गोजीरवाण्या नावांनी बारसे करून सजून
नगरात उजाड गावात बोडक्या डोंगरात रेताडात

तंत्राच्या झगमगातात विज्ञान मंत्राच्या आकडेमोडीत
चेहरा सावली हरवून माणसे निघाली मोडीत,
इश्वरी अंशाची दिवाळखोरी कवटाळून झोपली संस्कृती

अतिआधुनिक समाजांच्या कर्तुतात
विज्ञानधर्माची अफू खाऊन मदमस्त
संस्कृतीने घडवली माणसाची प्रतिकृती;

घातला त्यात माणसाचा अंशत: मेंदू,
वादग्रस्त देवाच्या पावलावर पाऊल टाकीत
घाईगर्दीने आली संस्कृति अतिआधुनिक

आणि कळीकाळाचे भान विसरून
बाजारू खेळण्यातल्या माकड़ासारखी
चावीच्या आधारे टाळ्या पिटीत बसली.

* * *
मुंबई
१७-४-१९९५
NOTE: Image- Clapping toy monkey, Source Internet.
~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

एका पाळीव प्राण्याची गोष्ट (एक आत्मकथा)

एका पाळीव प्राण्याची गोष्ट (एक आत्मकथा)


तीस दिवसांचे ७२० तास तो पाळीव प्राण्याचे जीवन जगतोय. भिंतीवर टांगलेल्या दिनदार्शिकेची पाने बदलत असतात, व दिनदर्शिका पण. तरीही याचे आयुष्य असेच चाललेय.

कधी तो गळ्यात पट्टा बांधलेला कुत्रा असतो, तर कधी चुलीच्या उबेस बसलेलं मांजर...
कधी तो होतो बळीचा बकरा; कधी तो असतो ओझे वाहणारा टोणगा; तर कधी गोठ्यात बांधलेली दुभती गाय.

कधी तो असतो गळ्यात दोरी बांधलेला माकड -- त्याच दोरीच्या इशारयावर कोलांट्या उड्या मारणारा... तेच त्याचे काम.
कधी तो असतो पिंजरयातला पोपट; ऐकत असतो मुक्ताफळे:
"पोपटा, पोपटा, खा ना जरा पेरूची फोड,
आणि बोल माझ्याशी गोड गोड."

कधी तो असतो घाण्याला बांधलेला बैलोबा, फिरत असतो वर्तुळात, पण त्याच्या जूं वाहाणारयां खांद्यावरच्या जखमेवर कोणी कधी तेलाची घडी घालत नाही.

कधी तो असतो राजेशाही बगीला बांधलेला, डोळ्याना झडपा लावलेला उमदा घोडा -- माहीत नसते त्याला तो कुठे कशासाठी सतत धावत असतो.

शेवटी, आजच्या आधुनिक सुधारलेल्या सुसंस्कृत समाजात परावलंबी आयुष्य काढायचे असले तर अशा या सर्व भूमिका नकोत का निभावायला? इथे परस्परावलंबी समष्टीला कुठे थारा?


रेमीजीयस डिसोजा । मुंबई

~~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

July 23, 2012

आज मध्यान्ही हसलो माझ्या मढ्यावर

आज मध्यान्ही हसलो माझ्या मढ्यावर
माहित झाले यात माझ्या सुखाची ग्यारंटी आहे.
टळली नव्हती दुपार तरी
डामरी रस्ते  आपलेसे वाटले —
रामबोलोच्या नादात.
काळ्या दुपारी काजवे कवडसे
हरवणाऱ्या शुध्दीचे  
पराकाष्टा करतात वाट उजवायची  
— रेमीजीयस डिसोजा   

~ ~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape

June 25, 2012

पर्यावरणाची अनेक अंगे

 पर्यावरणाची अनेक अंगे

रेमीची स्व-प्रतिमा 
पर्यावरण केवळ निसर्ग हवामान व जलवायूतापमान यांच्यापुरते मयादित नसते. हा चक्क अपसमज आहे. कारण विज्ञान केवळ वस्तुस्थितीचे एकेक अंग घेऊन विश्लेषण करते.

वास्तू  


पर्यावरण सुरू होते अन्न, निवारा व वस्त्र या तीन गरजांपासून; त्यात परिसर पण आला. मग आपण निसर्गनिवासात असूं कि नागरीनिवासात असूं. याला "वास्तू" हा देशी शब्द आहे. याचा अर्थ विस्तृत आहे. त्यात झोपडी, प्रासाद, मंदिर, उपवने, पाणोठा - तलाव, रस्ते, नगर इत्यादिंचा साकल्याने समावेश  होतो. घर किंवा वास्तू मूलतः नैसर्गिक पर्यावरणात आपले उष्णता, हींव, वारा, पाऊस इत्यादिपासून संरक्षणासाठी राहाणीयोग्य बदल करते. अर्थातच निवारा या गरजेबरोबरच अन्न आणि वस्त्र ही पण आली.

औद्योगिक क्रांतिने नगरनिवासांची अनेक कप्प्यांत - रहिवास, काम, प्रवास, पर्यटण, खेळ, शिक्षण, मनोरंजन इ. विभागणी केली.

औद्योगिक क्षेत्राचे अधिष्टान विज्ञान असल्याने त्याच्या सर्वच कारभारात कार्याँची कार्यशाळांत विभागणी केली जाते. अर्थातच त्यात सकल (holistic) दृष्टीचा अभाव असतो. त्यामुळे घर ही पण रांधायचे, जेवायची, झोपायची, पोरांची पैदास करायची (न करायची) कार्यशाळा बनते. व माणसे आकडेवारीत मोडतात. 

शिक्षण द्यायची / घ्यायची कार्यशाळा, कामाची कायशाळा (कारखाना हपीस इ.), तसेच रोग्याची कार्यशाळा, दवाखाना, खेळायची कार्यशाळा पटांगण, वगैरे वगैरे. सर्व काही रीतसर एकेका रकान्यात बसवलेले! याच्या / याचा अनेक अर्थाँपैकी एक असाः आपल्याकडे जशा अनेक जाती उपजाती आहेत तशाच औद्योगिक समाजाने पण निर्माण केल्या - उद्योगपती कारखानदार अंमलदार राष्ट्रपती प्रधानमंत्री  मंत्री नोकरशाही प्रव्यवसायिक कामगार-किसान-जवान वगैरे - त्यांचे नाव वर्ग! अर्थ तोच.

याचा परिणामः इंडियन समाज "जाती आणि वर्ग" यांच्या उभ्या व आडव्या विभागणीच्या विषारी जाळ्यात अडकला.

अनिर्बंध औद्योगिक विकास


अनिर्बंध औद्योगिक विकासामुळे नैसर्गिक पर्यावरणाची अमाप हानी तर झालीच पण पर्यावरणाच्या, सामाजिक पर्यावरण, आर्थिक पर्यावरण, राजकीय पर्यावरण, शहरी पर्यावरण, या अंगांची पण बेसुमार हानी झाली. ही सर्व अंगे एकमेकाशी निगडित व परस्परावलंबी असतात. त्यासाठी बहुसंख्य भारतीय समाजाची आजही तयारी नाही. विदेशात काही वेगळे होत नाही. 

वैज्ञानिकानी आणिक एक विभाजन केलेले आहे. ते म्हणजे पर्यावरण, पारिस्थितिकी व ऊर्जा वेगळे केले. हे तीनही निसर्गतः एकमेकाशी संलग्न व परस्परावलंबी असतात.

पर्यावरण - परिस्थितीकी - उर्जा ही निसर्गाची त्रिमूर्ती

 

पर्यावरण - परिस्थितीकी - उर्जा ही त्रिमूर्ती (trinity) सृष्टीतील सर्व जीवन व्यवहार एकाच क्षणी चालवते, त्यात सचिवलायासारखे खातेवाटप केलेले नसते, जेथे एक खात्याचे काम  दुसऱ्या खात्याला माहित नसते. एवढेच नाही तर ज्या एकंदर जीवमात्रासाठी सृष्टी हे काम करते त्या सर्वाना पर्यावरणाचे उपजत ज्ञान असते. जन्मत: आईच्या गर्भातून बाहेर आलेले मूल का रडते? कारण त्याच्या पर्यावरणात आमुलाग्र बदल होतो.
मग  वैज्ञानिकांनी या त्रिमूर्तीला कापून वेगळे का केले?
कारण ते सत्तेचे मिंधे आहेत. ही भेदनिती सत्ताधीशांच्या (औद्योगिक समाज) हितसंबंधातून आलेली आहे.
या समाजाचा उदय झाल्यापासून, दोन महायुद्धे तर झालीच, सर्व जगभर गेली दोनशे वर्षे सतत युद्धे चालू आहेत.
 

जागतिक गाव (global village) हे गोंडस नाव दिशाभूल करणारे आहे. सारा पृथ्वीतळ यांनी युध्दभूमी केलेली आहे: उर्जेसाठी युद्धे; व्यापारासाठी युद्धे; धर्मासाठी युद्धे; जमिनीसाठी युद्धे...  भूगर्भातील साधनसामग्री काढण्यासाठी यांनी निर्मनुष्य ध्रुव प्रदेश पण सोडले नाही; कीटकांचा नाश करायचे युध्द तर आपण रोज टीवीवर बघतो. या साऱ्या उप्द्व्यापाचे लक्ष्य एकच: सत्तेचे केंद्रीकरण.

या मुठभर (आजच्या जमान्यातील) कौरवांनी आपल्या स्व-अभिषिक्त एकाधिकार (monopoly) सत्तेसाठी सर्व जगभरच्या जळ-जमीन-जीव-हवा यांना वेठीस धरलेले आहे. आपल्या संगणकाच्या बटन-संचावरील प्रत्येक टिचकी कुणाच्या गंगाजळीत किती पैसे जमा करते याचा आपल्याला थांगपत्ता नसतो. (पहा: आंतरजाळें एक अत्यंत महागडे माध्यम
) परिणामत: अशिक्षित आणि शिक्षित - सुशिक्षित - प्रशिक्षित यामधील गर्ता वाढत जाणार. हा सामाजिक पर्यावरणाचा एक नमुना. 

आणखी एक समारंभ: ५ जून हा जागतिक पर्यावरण दिवस म्हणून जाहिर केलेला आहे. हा दर वर्षी साजरा केला जातो असे म्हणतात. जोवर माणसे - जनावरे - वानसे यांना न्याय मिळत नाही तोवर समारंभ कसले? हे तर जाहिर पाखंड!   
  अस्तु | 

~ ~ ~ ~ ~ 
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

May 27, 2012

गावकुसाबाहेरील माणसं : समकालीन लोककथा

गावकुसाबाहेरील माणसं, लेखक : रामचंद्र नलावडे 

पुस्तकं आपसूकच माझ्याकडे येतात माझ्या गरजेला. 'गावकुसाबाहेरील माणसं', कथासंग्रह, त्यांपैकी एक. पुस्तक व लेखक दोनही नावे मला नवीन. गवंडी, वडार, बेलदार, पाथरवट लोक मात्र मला नवीन नाहीत; फार जुनी ओळख.
    वास्तुविद म्हणून वडारांशी अधूनमधून संपर्क यायचा. खंडाळा-लोणावळ्याच्या परिसरात दगडांच्या खाणीवर कधीतरी घंटोगणती बघत वेळ घालवला होता. तेथील दगडफोड्यांनी दिलेले स्फटिक अजूनही माझ्याकडे आहेत.  
    लोणावळा आता थंड हवेचं ठिकाण राहिलं नाहीय. आता तिथं कॉंक्रिटचं जंगल झालंय. भर उनात दगडफोड्यांच्या काळ्या पीळदार शरिरांवर निथळणार्‌या घामाच्या धारा त्यांना थंडावा देता देता वाफ व्हायच्या.
    ऐकून माहित आहे की तुरुंगात सक्तमजूरीला दगडफोड / खडीफोड ही एक सजा आहे ! पण इथल्या दगडफोड्यांनी दयाभावाने त्यांच्या हुन्नरीचे अनेक बारकावे मला समजावून सांगितले. कारण एकच : मी माझ्या व्यक्तिमत्वाची ओळख शून्य करून नम्रपणे तेथे गेलो होतो. 
    समोर सरळ उंच जाणार्‌या काळ्याशार कड्याखाली कमालीच्या आत्मविश्वासाने हे गडी काम करित होते. पाषाण आणि माणूस यांच्यांत दुजाभाव राहिला नव्हता. दगड लोणी झाला होता.
लहानपणी कोंकणात मी असाच कुंभारमाटीकडच्या जांभ्या दगडाच्या खाणीवर जात असे.

वडार जमातीचे जीवनदर्शन 

रामचंद्र नलावडे यांच्या कथांनी मला वडार जमातीचे जवळून, अगदी आतून 'दर्शन' दिले. या कथांना अनेक परिमिती आहेत. सामाजिक सत्याच्या अनेक स्तरांचे निखळ दर्शन इथे होते.
    विसाव्या-एकविसाव्या शतकात हजारो वर्षांचा भारतीय समाजाचा इतिहास येथे अवशिष्ठ रुपाने साक्षात उभा आहे. समकालिन इतिहासाची ही बखर आहे असे मला प्रांजळपणे वाटते.
    साहित्यिक मूल्यांना फार वरच्या थरावर नेणार्‌या या कहाण्या आहेत. गतकाळाच्या प्रचंड इतिहासात या जाति-जमातिचा उल्लेख कुठे आहे का मला माहित नाही.

वडार जमातीचे गोत्र ?

भिल्ल जमात आजही तीरकमान वापरताना आंगठ्याचा उपयोग करत नाहीत : एकलव्याचे हे जीवंत स्मारक!
    सह्याद्री पर्वतात राहाणारे कातकरी सांगतात क ते हनुमान-सुग्रीव यांचे वंशज आहेत : काही वर्षांपूर्वीपर्यंत रायगडचे कातकरी मुंबईच्या करियाणांना वनौषधी पुरवत. हे पुरातन वनस्पतीशास्त्रज्ञ !
    मुंबई फूटपाथवर राहाणारे मातंग आपल्या बकाल झोपड्यांशेजारी आपला पूर्वज वाल्मिकीच्या झोपडीवजा मंदिराची स्थापना करतात.
    कुंभार स्वत:ला प्रजापती म्हणतात, तर सुतार स्वत:ला विश्वकर्मा म्हणतात.
   व्यासाच्या गोत्राचे कैक लोक चाळी-इमल्यांत वसलेले आहेत.
   दोन हजार वर्षांपूर्वी जंगलाने झाकलेला डोंगर पाहून कोणत्या जागी लेणे कोरता येणे शक्य आहे हे केवळ भूशास्त्रज्ञच सांगू शकला असता, सम्राट नव्हे. आणि खडकाचे अंतर्बाह्य ज्ञान वडारावाचून दुसऱ्या कोणाला असणार?

लोककथा - लोकभाषा - लोककला 

यातील काही कथा पूर्णतः लोकभाषेत आहेत. या सर्वच कथांना लोकभाषेचे व लोक-इतिहासाचे मूळ आधार – Primary Source – आहेत असं म्हणता येईल. खरं म्हणजे यांना लोक-कथा, लोक-साहित्य म्हणता येईल.
    निवारा ही मानवाची मूलभूत गरज समजली जाते. तसेच ती संस्कृतीची अभिव्यक्तीपण आहे, नृत्य-संगीत-चित्र-साहित्य यांप्रमाणे! तसेच पुराशास्त्राच्या संशोधनाचा एक मूल आधारपण आहे.
    प्राचीन काळापासून संस्कृतिच्या या अभिवक्तिला आकार देण्यात वडारांचा – मग ते कोणत्याही नावाने ओळखले जात असोत – महत्त्वाचा वाटा आहे.
    खडकात पाया खोदण्यापासून ते कळसापर्यंत वास्तूशिल्पात बेलदारांचा सहभाग असतो. पण समाजात – विषेशतः उच्चभ्रू, पांढरपेशा वर्गात – त्यांना पायाच्या दगडाइतकेपण मोल नाही. असा हा आमचा समाज !
   कांही वर्षांपूर्वी वेरूळ मंदिराबाहेर पुराशास्त्राच्या संशोधकांना एका प्राचीन वस्तीचे अवशेष सापडले. ही तेथे काम करणाऱ्या कारागिरांची वस्ती होती.

वडार आणि वास्तुशिल्प 

काही काळ मी वास्तुविद्यालयात अभ्यागत अध्यापक व प्रबंध मार्गदर्शक होतो. त्यावेळी इतिहासाच्या संदर्भात बोलण्याचे प्रसंग येत. त्यातील एक इथे उद्धृत करतो : मुंबईच्या परिसरात व पश्चिम घाटात अनेक जगप्रसिद्ध लेणी आहेत.
    एका प्रसंगी मी एक (वाह्यात) प्रश्न शेवटच्या (पाचव्या) वर्षाच्या विद्यार्थ्यांना विचारला होता. "कार्ल्याच्या चैत्याची मोजमापे तुमच्याकडे आहेत. त्यावरून आजच्या मजुरीच्या भावाने केवळ तेथील दगड खोदण्याच्या कामाची काय किंमत होते काढा. त्यात शिल्पांचे कोरीव काम जमेत घ्यायचे नाही."
    त्यापूर्वी व नंतरही हा प्रश्न कोणीही विचारला नसेल. त्याचे उत्तर माझ्या विद्यार्थ्यांपैकी कुणी दिले नाही. खरं तर वास्तुविद्येचे शिक्षण आणि व्यवसाय आज लोकाभिमुख नाहीत. ते कलाभिमुख किंवा व्यवसायाभिमुख आहेत. आर्थिक भ्रष्टाचाराचे अनेक किस्से प्रस्तुत पुस्तकात आहेत. पण 'बौद्धिक भ्रष्टाचार' किंवा 'जाणिवेचे भ्रष्टीकरण' त्याच्या किती पटीने मोठा/लहान आहे हे कोण बुद्धिजीवी सांगू शकतील?
    अजिंठा, वेरूळ, कार्ला, भाजा, कान्हेरी, घारापुरी इत्यादि लेणी कोरणारे वडारांचे पूर्वज तर नव्हते ना? हा प्रश्न अनेक वर्षांपासून माझ्या मनात अधूनमधून डोकावतो. मुंबईच्या रस्त्यांवरून भटकताना खडीचे ढीग तसेच दगडी बांधकामे नजरेस पडतात. विचार येतो : हे शहर उभारायला किती जंगलावरून (डोंगरावरून) गाढवाचा नांगर फिरवला असेल?
ललित साहित्यात अशा प्रश्नांची उत्तरे मिळणे कठिणच. बरेचसे साहित्य प्रश्न नमूद करतात आणि जेथे कथा-कादंबरी-चित्रपट सुरू करायला हवेत तेथे संपवतात. नाही म्हणायला शरतचंद्र चटर्जी हे मला माहित असलेले एक लेखक अपवाद आहेत. उदाहरण : 'भैरवी' (भाषांतरित नाव) ही तत्कालिन सामाजिक प्रश्नांची उत्तरे देणारी कादंबरी.

सरकारी उपाययोजना 

या कहाण्या वास्तव घटना आहेत. त्या कल्पनेहूनही विदारक आहेत. दारिद्य्र, अनारोग्य, निवारा आणि साक्षरता व शिक्षण यांचा अभाव, व्यसन यांतून निर्माण झालेले प्रश्न यांत चित्रित केले आहेत. त्या सर्वांना उत्तर एकच : सरकारी उपाययोजना.
     पण या सरकारी उपाययोजनांत जनतेचा स्वाभिमान, स्वावलंबन, पारंपरिक हुन्नरीला मान्यता व तिचा समावेश आणि विकास यांना शिक्षणात व सरकारी प्रकल्पांत कुठेही जागा नाही. सर्वाँत भयानक आहे तो प्रचलित शिक्षणातून निर्माण होणारा दुरात्मभाव, जो सार्वत्रिक आहे. आणि त्याची तुलना केवळ कर्करोगाशीच करता येईल. रामचंद्र नलावडे यांची सामाजिक बांधिलकी या कथांत स्पष्ठ होते.
    हे पुस्तक आवडले असा Facebook-छाप आंगठा मी दाखवणार नाही, नाही छापणार 'इमेल'वरची smiley.
    वाचकाना एकच सुचना करू इच्छितो. ज्यांनी हे पुस्तक उधार, विकत किंवा वाचनालयातून घेऊन वाचले असेल त्यांनी निदान एक चवरखा अभिप्राय लिहून लेखकाला अगत्याने पाठवावा. तेवढीच आपली साक्षरता कामास येईल. पुस्तकावर लेखकाचा पत्ता आहे.

पुस्तकासंबंधी 

या कथांत कुठेही भावनातिरेक - melodrama - नाही. शब्दांचा कुठेही अपव्यय नाही. या कथांनी मराठीच्या शब्दकोशात मोलाची भर घातलेली आहे : शब्द, म्हणी आणि वाक्प्रचार(जसा : "परमेसराच्या काठीला आवाज नसतो").
     पण या कथा लोकांपर्यंत पोहोचणार कशा, आणि मुख्यतः वडार समाजापर्यंत ज्यांच्या या कथा आहेत? किती शिक्षित वडारांपर्यँत या पोचल्या असतील हे लेखकाला व प्रकाशकांनापण माहित नसेल ?
    त्या जनसामान्यांपर्यंत कशा जातिल ? कापडाची बांधणी, पुठ्ठ्याची बांधणी, कागदी बांधणी अशा प्रकाशनाच्या प्रती असतात. त्यामुळे किंमत कमीजास्त होते, पण मूल्य कमी होत नाही. एका परदेशी कंपनीने भारतीय जीवनमान लक्षात घेऊन रुपयात वेगळ्या किमती पुस्तकांवर छापल्या होत्या. असाच आणखी एक प्रकार आहे, जो मराठीत वापरात नाही, पण हिंदीत रूढ आहे. ते वृत्तपत्राचा कागद वापरतात. कोणत्याही रेल्वे स्टेशनवर ही पुस्तके बघायला मिळतात, स्वस्त असतात. भारतीय समाजात / जनतेत जीवनमानाचे किती स्तर आहेत ते सरकारला पण माहित नसेल.
     मी तर सुचवीन की भारताच्या राज्यघटनेची अशी आवृत्ति सर्व प्रादेशिक भाषांत काढावी. आणि एकेक प्रत देशभरच्या प्रत्येक प्राथमिक शाळेत विनामुल्य पोहोचती करावी. प्रत्येक घटनादुरुस्तीला संपूर्ण नवी आवृत्ति. पाच वर्षांत १२० कोटी लोकांपर्यंत घटना घरोघरी! 

सरता पालव 

लोकशाही सरकार म्हणजे केवळ सुयोग्य सोई (बहुसंख्य जनतेला, अल्पसंख्य भांडवलदारांना नव्हे) उपलब्ध करून देणारे साधन आहे; नाही स्वामी (सरंजामी मायबाप किंवा संत). सत्तेसाठी लाच किंवा लालुच देऊन निवडून येणारे भ्रष्टाचारी आमदार-खासदार हे स्वामी कसचे? असे नेते मायबाप जनतेला कुठेनेणार? शासन म्हणजे अनुशासन, दन्मठेपेची शिक्षा नव्हे. शासन म्हणजे न्याय होय, कायदा नव्हे.

टीप : शीर्षक : गावकुसाबाहेरील माणसं | लेखक : रामचंद्र नलावडे, पत्ता : मु. पो. वेरळ, त. खेड, जि. रत्नागिरी, पिन ४१५६२१. मोबा. ९६२३९७०६१६ | प्रकाशक : प्रतीक प्रकाशन | डिसेंबर २०११ | पृष्ठसंख्या १५+११३| मूल्य : रु. १२५/-.। © रामचंद्र नलावडे । 
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.