March 20, 2012

यक्षप्रश्न – कालचा अन् आजचा

जाल ऑक्टोपस रेमीचे (स्वप्रतिमा)
यक्षप्रश्न – कालचा अन् आजचा
लेखक : रेमी डिसोजा 
 चव्वलाच्या नादात पाणपोया
वाहून गेल्या,
हे रस्ते, हे रस्ते
आयुष्याचे छेद उभे आडवे. 


पाणी टंचाई व त्यामुळे होणारे रोग; शुद्ध पाण्याची टंचाई व त्यामुळे होणारे रोग; पूर व त्यामुळे झालेली दैना; कारखान्यांतील अवशिष्ठ पाण्यामुळे भूगर्भातील पाण्याचे प्रदूषण व त्याने होणारी रोगराई; अवर्षण आणि दुष्काळ; अशी अवस्था हजारों खेड्यांत आणि महानगरांत आजही नियोजनाच्या आधुनिक जमान्यात आहे. आणि आम्ही आमचा अहंकार, ढुंगणावरचे गळू गोंजारावे तसे, गोंजारीत प्रगतीच्या वल्गना उठल्याबसल्या करीत असतो. आणि संधी मिळताच आमच्या महान गतकाळाचे गोडवे गाणे हा तर आमचा आवडीचा छंद.

शिवाय पाण्याच्या वाटपावरून राज्यांमध्ये, राष्ट्रांमध्ये तंटेबखेडे होतात. उदाहरणार्थ, महाराष्ट्र-कर्नाटक, कर्नाटक-तामिलनाडू, भारत-बांगलादेश, भारत-पाकिस्तान इत्यादी आपणांस माहित आहेतच. अशी अनेक उदाहरणे जगभर असतील. पाण्याच्या बंद बाटलीचा धंदा आता सुरू झालाय.

'यक्षप्रश्न' : हा शब्द सामान्य व्यवहारांतला, पण मी याचा संदर्भ विसरलो होतो: फक्त पाणी आठवत होते. या शब्दाचा उगम आहे जातकात. "देवधम्म जातक" या जातकात 'यक्षप्रश्न' येतो (दुर्गा भागवत, सिद्धार्थ जातक खंड - १, पृ. २८-३२).

एका धनवान भिक्षूला संग्रहाची हवस होती. प्रव्रज्या (दीक्षा) घेतल्यावरही त्याची हवस गेली नाही.
तो नंतरच्या जन्मी तो यक्ष झाला. त्याने कुबेराकडून वनातलं तळं मागून घेतलं. ते देताना कुबेर त्याला म्हणाला होता की, "देवधर्म म्हणजे काय हे ज्यांना समजतं, त्याना सोडून बाकीचे जे या तळ्यात उतरतील त्यानाच तुला खाता येईल. जे तळ्यात उतरत नाहीत, त्यांना खाता कामा नयेस."

या जातककथेत... बोधिसत्वाने पाणी आणायला आपला भाऊ सूर्यकुमाराला या यक्षाच्या तळ्यावर पाठवले... यक्षाने त्याला खाण्यासाठी बंदी केला. तेव्हा बोधिसत्व भावाला शोधायला तळ्यावर गेला. त्यालाही यक्षाने तोच प्रश्न केला.

...बोधिसत्व यक्षास म्हणाला "देवधर्म म्हणजे काय ते ऐक आता. लज्जा आणि पापभिरुता या गुणांना, त्याचपमाणं कुशलधर्मानं युक्त सत्पुरुष व संत असतात, त्यांनाच देवधर्म म्हणतात..." इत्यादि. यक्षाला आपल्या पापी जीवनाविषयी उपरती झाली. त्याने ते तळे सोडले व बोधिसत्वाचा रक्षक झाला.यक्षाने विनंती केल्यावरुन बोधिसत्वाने त्याला सद्धर्माविषयी ही गाथा सांगितली :
"पापभिरू तसे नम्र सुखधर्म जयां कळे ।
नाव त्यां संतपुरुषां देवधर्मी असे मिळे ॥"
(सिद्धार्थ जातक खंड-१, पृष्ठ ३२)

जातके म्हणजे अतीत कथा. यांत इ.स. पूर्वीचा लोक-इतिहास येतो, आणि जातकांनी केलेले लोकशिक्षणाचे कार्य. तत्कालीन सत्तेने बौद्ध धर्माचे भारतातून जवळजवळ उच्चाटन केले. त्याबरोबरच जातकेपण नजरेआड झाली. अर्थातच हे राजसत्ता आणि धर्मसत्ता यांचे सत्तेचे राजकारण होते. एकोणिसाव्या-विसाव्या शतकात जातकांचे संशोधन व इंग्रजीत भाषांतरे केली गेली. पाली-इंग्रजी शब्दकोश तयार केले. मात्र मराठी शब्दकोशात पालीचा उल्लेख फारसा पाहायला मिळत नाही.

औद्योगिक 'यंत्र-मंत्र-तंत्रा' ची प्रगती म्हणजे मानवाची प्रगती असे समीकरण आता रूढ झालेय. ज्यावेळी औद्योगिक मानव दुष्कर्म करतात तेव्हा त्यांच्या दुष्परिणामांना ते सर्व मानव जातीस कारणीभूत ठरवतात. जाताकांत उल्लेख केलेले स्वर्ग आणि नरक याच सत्तापिपासू लोकांनी आता पृथ्वीवर निर्माण केलेले आहेत; सत्तेचा स्वर्ग त्यांच्यासाठी, नरक मात्र इतरांसाठी. याचे नाव "सुधारणा".

 —  रेमीजीयस डिसोजा
ऋणनिर्देश : दुर्गा भागवत, सिद्धार्थ जातक खंड - १. 
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.

2 comments:

  1. Hi remi, just came across your blog. and i'm not ready to stop reading. Liked it!! Between, i want to read books by Durga Bhagwat. Where can get to see all her books, research papers.Please let me know. Thanks!!

    ReplyDelete
  2. @ yogik, Thanks and welcome here. I feel more responsible while writing now, happily. Since you are placed in Pune, hunt some bookshops to find Durga Bhagwat. The best source is Asiatic Society Library, Mumbai, where you could find all her English-Marathi books; the place was her second home almost.

    I am still learning from Durga Bhagwat. There are a couple of links on my blog- Archetypes India (in side column).
    I just visited your blog... I shall visit at ease.
    -Remi

    ReplyDelete