December 21, 2012

व्यक्तीच्या घडणीचे वय : जसे वळण तशी घडण

"मुलाचे पाय पाळण्यात दिसतात." ही म्हण अर्धवट आहे. यात नशिबावर भिस्त ठेवल्याचा वास येतो. पालक, शिक्षक, समाज यांच्यावर मुलाच्या विकासाची काहीच का जबाबदारी नाही? पूर्वापार चालत आले ते सर्व चांगले आहे असं म्हणणे केवळ संस्कारांचा अभिनिवेश आहे एवढंच!

व्यक्तीच्या घडणीचे वय । रेमीजीयस डिसोजा, मुंबई । २००३ 

रोप झाडाच्या कुंडीत 
उष्ण कटीबंधात प्रकाश आणि ओल जगायला पुरेशी होते.

वानसेपण आपल्या वाढीसाठी प्रकाशाच्या शोधात वळण घेतात. झाडांच्या दाटीतून हरेक जण आपापली वाट शोधत जातात, कधी सरळ उंच वर वर वाढत जातात, तर कधी वाकून, प्रकाशाच्या दिशेने. काहीही भांडण तंटे वाद नाहीत. (असल्यास आपल्याला कुठे समजते त्यांची बोली?

मुंबईच्या फुटपाथवर वानसे -१

जेथे नैसर्गिक घनदाट वने असतात, विशेषत: पर्वतराईत, असे दृश्य हमखास पाहायला मिळते. तसेच उपवनातही दिसते. शहरांतही रस्त्यालगत पाणी घालून वाढवलेली उपरी झाडे सर्रास वेडीवाकडी जात असतात.

नगरपालिकेला कोणत्या झाडांना त्यांच्या योग्य वाढीला अनुकूल "जागा आणि अवकाश" लागतात हे माहित नसावे. अरे, माणसाच्या वाढीला योग्य जागा व अवकाश" लागतात हे ज्यांना माहित नाही त्यांना वानसांचे काय सोयरसुतक? 

मुंबईच्या फुटपाथवर वानसे -२
वानसाना  पण जगण्याची इच्छा असते.

मुंबईच्या फुटपाथवर वानसे -३
मुंबईच्या फुटपाथवर विस्थापितांच्या दोन पिढ्या जन्माला आल्या, वाढल्या आणि कोठे पोहोचल्या कोणाला माहित? नपुंसकाना कसे कळणार?

महावृक्षाच्या सावलीत दुसरी झाडे वाढत नाहीत, असा एक प्रवाद आहे. पण तो फक्त कृत्रिम लागवडीला लागू असतो. खरं तर तो महाव्यक्तिंना - माणसांना - उद्देशून आहे, वृक्षाना नव्हेच. नैसर्गिक वनात महावृक्षाच्या आधाराने असंख्यप्राणी-वनस्पती राहात असतात.
एक महावृक्ष तोडा आणि पाहा काय होते. जीवांचे जीवन उध्वस्त तर होतेच. त्याशिवाय पर्यावरणाचे संतुलन बिघडते, भूईतील पाण्याचे साठे संपतात, जमिनीची धूप होते, वाळवंट पसरते, दुष्काळाची लागणी येते... 
पण अहंमन्य लोभी सत्ताधिशांना काय? ना खंत ना खेद! गरीब रयतेची उपासमार झाली तर ती काही मसालेदार बातमी नव्हे !

सृष्टीने संपूर्ण जीवमात्राच्या - त्यांच्या 'शरीर व मनाच्या' - पोषणाची व संरक्षणाची तरतूद त्यांच्या आलेखनात करून ठेवलेली असते. तिचा कारभार अप्पलपोट्या, सुसंस्कृत, सत्ताभिलाशी समाजासारखा थोडाच आहे! मग ते जीव जीवाणू असोत की मानवप्राणी असोत. तिथे मानवजातीच्या देवांचीपण ढवळाढवळ चालत नाही.
सृष्टी म्हणजे कथा-काव्यात गृहीत धरलेली रोमँटिक हिरवाई नव्हे. ती जशी सारी ब्रम्हांडे व्यापून आहे तशीच ती आपल्या आतही आहे. तिला, पर्यायाने आम्हालाही, आमचा शारीरिक व मानसिक विकास करायला सुयोग्य "जागा आणि अवकाश" हवे असते.
येथे 'जागे'चा अर्थ क्षेत्र, म्हणजे सरकारी नियमावलीतील चौरस फूट/मीटर क्षेत्रफळ नव्हे. आणि 'अवकाश' म्हणजे संत ज्ञानेश्वर सांगतात ते "पैस", भूमितितील त्रिमिती नव्हे. 
 

वळण - घडण याची दोन कमालीची उदाहरणे


पहिले उदाहरण आहे समष्टीचे आणि दुसरे आहे व्यक्तिचे. ही हल्लीचीच उदाहरणे सुसंस्कृत समाजाची दोन टोके आहेत.

पहिले उदाहरण : वियेतनाम देशात एक आख्खी पिढी युद्धभूमीवर जन्माला आली आणि खांद्यावर बंदूक घेवून वाढली आणि लढली. त्या युद्धात अमेरिकेला हार खावी लागली.

दुसरे उदाहरण : महाराज सयाजीराव गायकवाड, बडोद्याचे संस्थानिक. सयाजीरावांचे ब्रिटिश सत्तेशी संबंध कसे होते हे सर्वश्रूत आहे. त्यांचे चौफेर लोककार्य त्यांच्या भौतिक वैमवापेक्षा अधिक नजरेत भरते.
कोण होते सयाजीराव? एका सामान्य कुटुंबातून राजघराण्यात दत्तक घेतलेला मुलगा. वैभवशाली व्यक्तिला वळण नसेल तर केवळ वैभव असून काय कामाचे? सयाजीराव सर्वाथाने राजर्षी होते.

या दोन टोकात निदान एक कोटी उदाहरणे ताडून पहाणे फारच उद्बोधक ठरेल. पण अशा वेळी पुढारलेले समाज / तज्ञ नमुन्याचे सर्वेक्षण करण्यावर भागवतात. त्यांच्या बोलीत 'व्यक्ती तितक्या प्रकृति' ही म्हण नसावी. एरवी, टीवी, कंप्युटर, सेल फोन वापरणारे लोक आता एक कोटीवर पोहोचले अशा जाहिराती मात्र वेळोवेळी ऐकण्यात मात्र येतात.

तिसरे उदाहरण आहे. पण त्याचा फक्त उल्लेख येथे अनिवार्य आहे एवढ्यासाठी करतो. ते आहेत आदिवासी. भारतातल्या आणि जगभरच्या आदिम जमाती, व त्यांच्या संस्कृती ज्यांचा उगम प्रागैतिहासिक काळात आहे. बहुसंख्य लोकांना हे फारसे परिचित नाहीत.
— रेमीजीयस डिसोजा, मुंबई
~ ~ ~ ~~
© Remigius de Souza. All rights reserved.