March 29, 2012

रेमीची "विद्रोही कविता": एक व्यत्यासकथा

कविता सुटका करते माझी अनेक जंजाळातून, जेव्हा जेव्हा अशक्य होते तर्कसंगत गद्य लिहिणे एकाद्या घटनेवर, जी होते पीडायायक समस्ताना अन स्वत:ला. जेव्हा अशक्य होते मुद्देसूद लिहिणे, ५०० अक्षरात, ५०० शब्दात, ५०० वाक्यात, ५०० पृष्टांत लिहिले तरीही विपर्यास अटळ असतो. (अशाच एका प्रसंगी लिहिली होती कविता "Who is the giver? Who is the receiver? ": जेव्हा त्या घटनेचे परीक्षण लिहिणे अशक्य झाले होते.)

अशावेळी कविता येते धावून मदतीला, "लिही" म्हणते, "खुंटीवर टांगून व्याकरण आणि सौंदार्यशास्त्राचे नियम". "लिही" म्हणते, "पंधरा किंवा पाचच शब्दात, आनंदाची लकेर किंवा वेदनेची किंकाळी, किंवा भावपूर्ण श्रध्दांजली... भावनेचा उद्रेक..."

होळीच्या उत्सवात भिल्ल कुटुंबांबरोबर जत्रेच्या गावी / जागी जाताना बायामुलींनी गायलेली गाणी आठवतात. "सांदी खुटी ओ ऽ ऽ हेंडो मेला ऽ ऽ ऽ ऽ य ऽ से..." ("चांदी खुंटली - कमी पडली - ओ, चला मेळ्याला..."). गाण्याच्या तालावर डोंगर खडकातून पण चालणे चालणे रहात नाही, त्याला नाचाची लय येते आणि मैलांचे अंतर कधी कसे संपते कळत नाही.

"ग्यानोबाबा तुकाराम माऊली" बोलांवर वारकरी स्थल - काळाच्या परिमितींच्या पार जातात.

"जो! जो ना बा पाणी!" ("बघ! बघ ना आई पाणी!") एसटी बसमधली एक तरुणी उत्स्फूर्त शब्दात आईला सांगते. ती लग्नाच्या व्हराडाबरोबर आहे. काठेवाडहून ते व्हाराड बडोद्याला जात होते. बस खेडा जिल्ह्यात आली. ठिकठिकाणी पाण्याची डबकी साठली होती. हे लोक तीन वर्षे अवर्षणाच्या झळा सोशित आले होते. तिच्या वडिल मंडळीने अशी अनेक अवर्षणे अनुभवली असतील. त्या यौवनेच्या पाचच शब्दात त्या सर्वांची आर्तता आणि आनंद एकाच वेळी व्यक्त होत होता.

"होळये माय तुजां रोंबाट गे
चिचेचां पान तुजां आंबाट गे"
कोकणात होळीच्या उत्सवात लहानपणी ऐकलेले हे गाणे. होळी-आईला जेवणात चिंचेचे पान पण पुरेसे होते.
तीच गोष्ट खेडोपाडीं बायकांच्या जात्यावरच्या श्रमापरिहार करणारया ओव्यांची.

अशा एक-दोन ओळींच्या अभिव्यक्तित -- मग ती अभिजात कविता, गीत नसेल, त्यात कल्पनाविलास नसेल, त्याना साहित्य विशारदांची मान्यता नसेल, पण वास्तव जीववनाचे काव्य ओतप्रोत भरलेले असते.

तृतीय जगत आणि चतुर्थ जगत इंडियातील (Third World and Fourth World India) सहा लाखांहून अधिक खेड्यात लोक गीतांचे तसेच इतर साहित्याचे केवढे भांडार भरलेले असेल याची कल्पनापण करत येणार नाही। दूरदर्शनवर आणखी शंभर वाहिन्यापण त्यांचे प्रतिनिधित्व करायला पुरे पडणार नाहीत.

कुठेही उधळपट्टी नाही. अपव्यय नाही: नाही शब्दांचा, नाही जीवनावश्यक साधनसामग्रीचा. इंडियातील कोट्यावधी शेतकरी, खेडूत, आदिवासी जनतेला उधळपट्टी परवडणारी नाही.

त्यांचे हे धोरण "प्रथम जगत इंडियाच्या" (First World India) अगदी उलट आहे, मग तो ताजमहल असो की चंद्रयान असो, बॉलीवूड असो की टेलीवूड! पण हे "प्रथम जगत इंडियन लोकांच्या मट्ठ मेंदूत जाईल तेव्हा ना? माझा हा ब्लॉगपण याला अपवाद नसेल!

त्या अद्वितीय लोक गीतांचे काही कण लहानपणीच माझ्या कानावर पडले हे माझे सुदैवच. त्या दिवट्यांचा प्रकाश पण या अरण्यातील अंधारलेल्या रात्रीं पुरेसा होतो, हरवलेल्या शब्दांचा, अर्थांचा, सूरांचा, मुद्रांचा, नादांचा शोध घ्यायला -- वाट दाखवायला -- दिशा दाखवायला.

माझे देशी मानस जाणते, "जीवनासाठी कला" आहे, "कलेसाठी कला" नाही. माझे जे काही विलायती सांघिक पध्दतीने शिक्षण झाले ते काही फारसे परिणामकारक ठरले नाही. मी जरी अंशत: नागरी समाजाचा (civilized society) भाग असलो तरी त्यानेही काही फरक पडत नाही.

माझा एक साधा सरळ समज किंवा विश्वास किंवा श्रध्दा आहे:
"जीवन सर्वश्रेठ आहे; कला - विज्ञान, धर्म - तत्वज्ञान इत्यादी पेक्षा श्रेठ आहे, ही सारी केवळ साधने आहेत. जीवन या सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे, श्रेष्ठतम आहे."

रेमीची मराठी बोली प्रस्थापित संकल्पनेतून अंशत: तरी मुक्त झालीय. तरी तिचे लोकगीतापर्यंत -- लोकसाहित्यापर्यंत पोहोचणे बाक़ी आहे. ही झाली प्रवृत्ती, महत्वाकांक्षा नव्हे.
~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

No comments:

Post a Comment