Showing posts with label समीक्षा. Show all posts
Showing posts with label समीक्षा. Show all posts

November 23, 2012

सर्जनाची वाटचाल : समीक्षा सर्जनाची


सृष्टीयोग 

 सर्जनाची मूळ प्रेरणा


सर्जन आणि सर्जनशीलता या क्रिया आपण स्थूलपणे कलांच्या अभिव्यक्तींना वापरतो. परंतु सर्जनाची मूळ प्रेरणा केवळ जीवनाचे संधारण करणे एवढेच. जीवाच्या धारणेपासून ते बाळाला अंगावर पाजणे आणि यापुढे आयुष्यभर येणाऱ्या असंख्य क्रिया सर्जानाचाच भाग आहे. यांत्रिकी जीवनामुळे आपल्याला याचे भान राहत नाही एवढेच!
१. भिल्लांची पावरी 
भिल्ल स्वतःच आपली पावरी तयार करतात. खरे तर याचा इतिहास हजारो वर्षें मागे जातो.

२. प्रागैतहासिक अस्थी-बांसरी (30,000 वर्षें सद्यपूर्व)

ही पक्ष्याच्या अस्थीपासून केलेली बांसरी २००९ साली पुराशास्त्रज्ञांना गवसली. हिला पाच छिद्रे आहेत. विशेष म्हणजे भिल्लांच्या बांबूच्या बांसरीलापण पाच छिद्रे असतात. 


विधायक टीका

ज्याला विधायक टीका/समिक्षा म्हणता येईल ती मी आनंद कुमारस्वामी यांच्यापासून शिकलो. (टीप १.) अनेक प्रकारे ते उपयोगी आले. मुख्यत: मी व्यक्तिनिष्ठ प्रतिक्रिया सोडली आणि वस्तुनिष्ठ प्रतिसादाकडे वळलो, कोणतीही घटना असो.

पर्यावरणाचा अभ्यास, जो निवारा किंवा वास्तूचे मूळ उद्दिष्ट — वारा, ऊन, पाऊस, थंडी यांच्यापासून संरक्षण करणे — आहे. त्याने मी व्यक्तिगत व सामाजिक क्षेत्राच्याही पलिकडे जाऊ शकलो.

पारिस्थितिकी समजण्यास माझ्या लाडक्या तुकारामाचा महत्वाचा वाटा आहे : "वृक्ष वल्ली आम्हा सोयरी वनचरे" या पाच शब्दांच्या मंत्रात. हा मंत्र समजण्यास भातशेती-शाकशेती, स्वयंपाक, मातीची घरबांधणी, सूतकताई-विणाई या क्षेत्रांत माझे शारीरिक परिश्रम आणि लोकसहभाग Community Participation उपयोगास आले. हे माझ्या घडणीच्या काळात झाले. त्यावेळी मी माझ्या गावी प्राथमिक शाळेत होतो.

वास्तूविद्या शिकताना माझ्या ध्यानात आले, इमारतीत असलेल्या अनेक खोल्या आणि घटक त्यांच्या नियोजनात कसे परस्परावलंबी असतात. एक खोली किंवा घटक जरी हलवला, बदलला किंवा काढून टाकला तरी सबंध रचना बिघडते. त्यामुळे संपूर्ण संरचनेवर पुनश्च काम करावे लागते. हे समाजरचनेसारखे असते. वस्तुतः एक घर बांधले तरी ते नैसर्गिक पर्यावरण, पारिस्थितिकी व ऊर्जा यांच्या संतुलनावर अनिष्ट परिणाम करते.

तुकारामाचा पाच शब्दांचा मंत्र उलगडा करतो पर्यावरण, पारिस्थितिकी आणि ऊर्जा एकमेकाशी कसे संलग्न आहेत. आपण जर साध्यासुध्या दिसणारया कामावर, जशी शेती, सैपाक किंवा निवारा यावर, ध्यान केले तर निसर्गात पर्यावरणाचे हे तीन घटक कसे परस्परावलंबी व अधिव्यापी असतात हे समजायला मदत होते.

ही वाट जेवढी अपरिहार्य, अटळ आणि कष्टाची तेवढीच आनंदादायी आहे. शॉर्टकट नाहीत. पुस्तकं नाहीत. केवळ क्षेत्र अभ्यास उपयोगी.

भारताच्या स्वातंत्र्यानंतर आनंद कुमारस्वामी १९४७ सालीं परदेशी निवर्तले. (त्यांची भारताच्या भूमीवर देह ठेवायची इच्छा होती.) इथून पुढे, स्वातंत्र्यानंतर ब्रिटिश सत्तेने भारतात आणलेल्या 'बदला'चा वेग वाढला.

हा 'बदल' जवळजवळ जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत होत होता. त्याने सर्वात अधिक हानी केली ती बहुसंख्याकांची, अर्थात भारताच्या शेतीप्रधान समाजाची, खेडूत कृषीवलांची. त्यांचे संधारण प्रथम प्राधान्य देऊन करणे अत्यंत गरजेचे होते, ब्रिटिशांनी हा देश सोडताच. पण तसे झाले नाही; अजूनही होत नाहीय.

या बदलाचे मूलभूत कारण गेल्या शतकापासून पाश्चिमात्य विज्ञान आणि तंत्राचा भारतात झालेला विकास हे असावे. हा बदल सर्व जगभर होतोय. तथापि पाश्चिमात्य देश या 'बदला'बरोबर, म्हणजेच औद्योगिक क्रांतीच्या उदयापासून, वाढले. तर भारतात तो लादला होता.

गेल्या ६५ वर्षात आपण वाढलो असे म्हणता येणार नाही. आम्ही वयस्क मात्र झालो आणि आमचे संस्कार व परंपरा यांनुसार आपण वयाचा आदर करतो, माणूस असो की पाषाण !

खरे पहाता हा बदल (ज्याला आपण 'विकास' म्हणतो तो अपप्रयोग आहे) आपल्या मूलभुत गरजांना — अन्न, निवारा, वस्त्र, आणि सर्व जीवमात्राच्या निसर्गदत्त स्वायत्त कार्यांना — श्रम, विश्राम, आरोग्य, अध्ययन आणि प्रजनन — विघातक झालेला आहे. केवळ मानव जगच नव्हेत तर जगभरच्या जळ, जमीन आणि हवा यातील जीवमात्र याला बळी गेलेले आहेत.

जेव्हा या मूलभूत गरजांची आणि निसर्गदत्त स्वायत्त कार्यांची हानी होतेय तेव्हा सामाजिक, राजकीय, धार्मिक वगैरे वगैरे संस्था, किंवा स्वर्ग आणि नरक-पाताळ यांचा काय पाड ?

सर्जनाला समीक्षेची गरज 


उदाहरणार्थ, आम्ही आता वर्षभर – २४/७/५२ – दूरचित्रवाणीवरील अनेक वाहिन्यावर काय पहातो? त्या आम्हास दाखवतात, गुळचट प्रेम, पांचट शृंगार आणि विच्छिन्न कुटुंब संस्थेतील भपकेबाज लग्नांच्या कहाण्या, गुन्हेगारी आणि हिंसाचार यांचा बेसुमार नाविन्यपूर्ण मसाला घातलेल्या. जणू आमची करमणूक करायला दुसरे काहीच साधन राहिलेले नाही, की नाही विचार करण्याजोगे.

मुंबईत, उदाहरणार्थ, दरवर्षी सुमारे २००-३०० चित्रपट बनवले जातात. पण त्यांनी खर्च केलेल्या साधनसंपदेचे मूल्य काय? त्यांची पर्यावरण-परिस्थितीकी-ऊर्जा (प-पा-ऊ) मूल्य काय? अक्रीय करमणूकीशिवाय कोणत्या सामाजिक साध्यासाठी? ही एक सार्वजनिक घटना आहे!

जेव्हा भारताच्या लक्षावधी रयतेपुढे जीवन-मरणाचा संघर्ष उभा आहे, अन्न, पाणी, निवारा, आरोग्य, शिक्षण इत्यादी अब्जावधी प्रश्न उभे आहेत त्यांची उत्तरे कोण देणार? सरकार? पार्लमेंट? बॉलीवूड-टेलीवूड? मितव्यय? शेयर बाजार?
केवळ रयतच वरील प्रश्नांचे उत्तर देऊ शकेल. कोणत्याही नियोजनाचे, प्रकल्पाचे किंवा विकासाचे "साध्यही रयत; साधनही रयत".
विधायक टीका / समीक्षा कोणत्याही घटनेत किंवा क्रियेत, केवळ साहित्यिक कृतीच नव्हे, गाळलेले संदर्भ आणि आशय उपस्थित करते आणि सर्वाच्या हितासाठी समर्पक सूचना देते.

कलेचे उद्दिष्ट

कोकणात लोकसहभागाने भातशेती । फोटो : पूजा राणी 
शेती ही प्राचीन आणि सर्वात उच्चतम कला, जेथे पंचमहाभूतांशी संपर्क येतो, जेथे भुईचा कॅनवास वापरला जातो, जेथे कलेच्या मूळ प्रेरणेला स्थान असते, पण हिला उच्चभ्रू समाज मान्यता देत नाही.


उत्स्फूर्त आत्माविष्कारातून कलेची निर्मिती आत्माभिव्यक्तीत अवतरते. ती कोणत्याही वयात व काळात होते. कलेची व्याख्या नाही. सुसंस्कृत समाजाने कलेसाठी अनेक दालने, सदरे, शैली, पंथ, घराणी इत्यादी निर्माण केली असतील, पण ते सर्व वरकरणी आहेत.

आत्माभिव्यक्तीत कुणी उत्स्फूर्तपणे नाचेल, गाणे गाईल, मातीत वा भिंतीवर चित्र रेखाटेल, मातीचे खेळणे बनवील किंवा कहाणी सांगेल...

सुसंस्कृत किंवा नागरी समाजाला फार आवडते करायला विभाजन, श्रेणी, जातवारी, वर्गवारी आणि अधिश्रेणी. याने तो आवश्यकतेपासून दूर मात्र होतो. म्हणून आपण या सर्व वेडगळापणाकडे दुर्लक्ष करू.

कला – आत्माभिव्यक्ती – घडते ती वास्तवाच्या अनुभवातून आणि भावनांतून. हे वास्तव म्हणजे निसर्ग, नैसर्गिक घटना, इतर जीव – व्यक्ती, वानसे, प्राणी... आणि त्या संबंधांतून आलेली भावानुभूती.

कला ही भावनांतून निर्माण झालेल्या ऊर्जेला सर्जनशील कृतीत वाट करून देते, जी प्रगतिरोध Entropy रोखते. नाहीतर त्याचे पर्यावसान मानसिक किंवा शारीरीक रोगात होणे शक्य असते. हेपण एकप्रकारे प्रजनन म्हणता येईल. कला ही कोणत्याही वर्गाची वा व्यवसायिकांची मक्तेदारी नाही.

विज्ञानाचे उद्दिष्ट


जशी कलेची व्याख्या नाही तशीच 'जीवना'चीपण नाही, विज्ञानाने पण ती केलेली नाही. जीवन आणि कला यांचे अर्थ शब्दकोशांत असतात. तरीपण 'जीवन' काय आहे हे आम्हाला उपजतच समजते (जीवाच्या मरणामुळे ज्याचे अक्रीय वस्तूत परिवर्तन होते).

'ईश्वर' ही कल्पना निसर्गाच्या आत्यंतिक घटनांमुळे आली असावी (प्रागैतिहासिक आदिवासी काळात); त्याने  निसर्गाची अपार शक्ती चित्रात आणि विधींत व्यक्त करण्यात आली असावी.

हल्लीच वैज्ञानिकांना एक शोध लागला ज्याला त्यांनी 'ईश्वर' कण असे नाव दिलेय. ते पूर्ण 'सत्य' नव्हे; निसर्गाचे गूढ मात्र आणखीच अगम्य होतंय.

नागरी संस्कृतीत विज्ञानाची पद्धती विश्लेषण करण्याची असते, तर कला संश्लेषण करते. एके काळी कला आणि विज्ञान व तांत्रिकी यांचे असे खातेवाटप अस्तित्वात नव्हते, जेव्हा अग्नी, तरफ, तीरकमठा, मातीची भांडी, जंगली वानसांचे व प्राण्यांचे गृहसंवर्धन इत्यादि शोध मानवाने लावले. आता आम्ही ज्याला कला, विज्ञान, तंत्रज्ञान या नावांनी ओळखतो ते पूर्वी वेगवेगळे नव्हते आणि ते सर्व लोकांच्या हितासाठी होते.

एके काळी कला विज्ञान आणि तांत्रिकी विभक्त नव्हते. आता विज्ञान आणि तांत्रिकी यांच्या सीमारेषा अंधूक झालेल्या आहेत. त्याचे कारण दोन्ही शाखांच्या मितव्ययात economy भांडवलदारांचे गुंतलेले हितसंबंध होत.

समीक्षा सर्जनाची

सर्जनशील सकलजन । रेमीजीयस डिसोजा । मुंबई 
मूळ इंग्रजीचे स्वैर भाषांतर 

कला, विज्ञान, तांत्रिकी, इतर ज्ञानशाखा, तसेच संस्था यांचे  उद्दिष्ट सर्व लोकांचे हित साधणे हे तर आहेच, शिवाय 'इतर' मानवसमूह, जीव आणि त्यांचा निसर्गनिवास जतन करणेपण आलेच. निसर्गाने केलेली निर्मिती आणि विनाश विनाहेतू नसतात. फक्त आम्हास त्यांचे आकलन होत नाही एवढेच.

विधायक समीक्षा केवळ कला, साहित्य आणि त्यांच्या शाखा एवढ्यापुरतीच मर्यादित नाही. ती इतर ज्ञानशाखा, खाजगी आणि सार्वजनिक संस्था-संघटना यांनाही लागू होते. त्यानी केवळ न्यायसंस्थेचेच कायदे नव्हेत, तर नैसर्गिक न्यायपण हिशेबात घ्यायला हवा. न्याय हा कायद्यापेक्षा श्रेष्ठ आहे.

सृजनशीलता हा शब्द आता "मूलमंत्र" buzzword झाला आहे. तो आता कोणत्याही संदर्भात (उदा. युद्धसाहित्य) वापरला जातो, मग त्याचे दुष्परिणाम काही का असेनात. विशेषत: जेजे बाजार आणि चंगळवादाच्या सदरांत येते त्यात्या वस्तूला, कल्पनेला सर्जनशील हे लेबल सर्रास लावले जाते. जे कुणी त्यांचे पाठीराखे असतील ते वातानुकूल अद्यावत बोर्डरूममध्ये बसलेले असतात. नफ्यावतिरिक्त दुसर्‌या कशाचेही सोयरसुतक त्यांना नसते.

परंतु तथाकथित सर्जनशील वस्तूची वा घटनेची गुणवत्ता क्वचितच पारखली जाते; ती पर्यावरण पारिस्थितिकी आणि ऊर्जा यांच्या मूल्याच्या कसावर, विधायक की विध्वंसक आहे का हे ठरवावे लागेल. आजच्या झपाट्याने बदलणारया परिस्थितीत निष्क्रिय राहणे किंवा डोळेझाक करणे अयोग्यच नव्हे घातक ठरेल. स्वायत्त तिबेट आठवावे !

सर्जन विधायक आहे की विघातक हे पाहाणे निर्णायक आहे. याचा निकष तथाकथित तज्ञांच्या दालनात राहून न करता सृष्टीच्या साकल्याच्या मार्गाने लावायला हवा, जेथे नागर संस्कृतीप्रमाणे खातेवाटप नाही. असे निर्णय व्यक्तिगत आणि समष्टीच्या स्तरावर वेळोवेळी घेतले गेले पाहिजेत. तरच सरकार कार्यक्षम आणि तत्पर राहील.

टीप १. मी लिहिलेल्या समीक्षेत पहा - परिच्छेद- Indian Architectural Terms, Essays in early Indian architecture (Book Review)
२. प्रतिमा २.प्रागैतहासिक अस्थी-बांसरी (30,000 वर्षें सद्यपूर्व), ऋणनिर्देश : New York Times, अधिक वाचा, Flutes Offer Clues to Stone-Age Music

~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.

August 15, 2012

अर्वाचीन महाभारत-कुरूक्षेत्र भारतभर

दोन गाणी : प्रस्तूतकालीन महाभारताची समीक्षा


लोक-उर्जा संधारण 
 आर्थिक-तांत्रिक-ओद्योगिक विकासाच्या नशेत लोकाविकासाचे कुणाला भान?


मला'खो' देते 'हर्षदा' आणि मी समीक्षा करायला निवडतो पुस्तकाऐवजी एक विषय, ज्याला म्हणता येईल : "प्रस्तुतकालीन महाभारत-कुरूक्षेत्र"! हे पुस्तक वास्तव रुपात आपल्यासमोर आहे. त्याचे स्वरूप "मायावी वास्तवता", Virtual Realty, नाही. ही टीका मी पुढील दोन गाण्यात आटोपतो.

पहिल्या गाण्यात आहे सत्तेशी केलेला संवाद जो विफल होतो, आणि त्याचे स्वरूप केवळ 'स्वगत' उरते. दुसऱ्या गाण्यात पहिल्या गाण्यातील वैफल्याचे निदान केलेले आहे.


प्रगती = पंचम जगत भारताचा उदय
ही मुले मुंबईची काय आठवण घेऊन मोठी होतील ?

 

अलिखित अर्वाचीन महाभारत- कुरुक्षेत्राची समीक्षा 

गाणे १. स्वगत सत्तेशी (नाट्यछटा) :  त्तेशी संवाद अशक्यप्राय


मी सत्त्याशी लुडबुड करू इच्छित नाही
वाटल्यास ते आपसूकच प्रगट होईल.
पण जेव्हा आम्ही विविक्षित तथ्य बोलतो
ज्यात मी गुंतलो आहे ते जाणणे माझा हक्क नाही का?
संवादात प्रतिसादाने बरोबरीचा हक्क नाही का?
किंवा कोणत्याही नात्याने — सर्व वाटांवर सर्वदा?
एक तथ्य उरतेच, जेव्हा मी विचारणा करतो
तेव्हा तू संवाद तोडतेस किंवा उत्तर टाळतेस.
कारण काहीही असो.

याला संवाद का म्हणावे? कि
याचा अर्थ माझ्याच खर्चाने माझी टवाळी?
तू माझ्या परिश्रमांची पैशाने किंमत देऊ शकतेस पण मोल नाही
(जर का तू कधी परिश्रमाचे मोल समजलीस तर
पुरवठ्याच्या बाजारी?).

मी नाही विकावू कि नाही भाड्याचा माल.
पसंत करीन मी तुला सोडचिठ्ठी देणे
देण्याहून औषधांची चिठ्ठी रोगांवर
ज्या जन्माला घालतात केवळ प्रतिक्रिया, प्रति-प्रतिक्रिया.
नाईलाज आहे! अशा लुडबुडींना येथे नाही वाव
केवळ एकच जन्म हा!
(नाट्यछटा हा प्रकार दिवाकर यांनी मराठीत आणला. नाटक-सिनेमात स्वगते येतात.)

 

गाणे २. माझे गाणे जन्मले... 


माझे गाणे जन्मले भूईत आणि जळांत,
पोसले वानसांनी, लोकानी अन प्रेमाने,
सत्तेच्या हवसेने वेड्या नागरी समाजांत,
अंध कोपाने जगणेच उध्वस्त करणार्‌या.—
गांडूळे, हिंस्र जनावरे बरी त्याहूनी !  


विश्राम अमूल्य विनामोल
श्रम - विश्राम - आरोग्य - अध्ययन - प्रजनन ही सृष्टीने समस्त जीवमात्राला दिलेली पाच स्वायत्त मूलभूत कार्यें. यात हस्तक्षेपाचा कोणत्याही मानवी सत्तेला अधिकार नाही (पहा : टीप 1).

  सत्तेचे अनेक अवतार

सत्तेच्या अनेक रूपांत लोकाशी सरकारपण गृहीत आहे. पण सत्ता कुठल्याही स्तरावर असू शकते, कुटुंबापासून समष्ठीपर्यंत. त्यांत शाळा-शिक्षक आणि विद्यार्थी, अगणित सार्वजनिक संस्था, कॉपोरेशन, पोलीस, आमदार-खासदार, नोकरशहा, इत्यादी सर्व आले. कुटुंब नवरा आणि बायको, सासू-सासरा आणि सून, पालक आणि मुले यांच्या संबंधांतही सत्ता अवतार घेते.

अर्थात यात सत्ता आणि रयत, किंवा सत्तेसाठी संबंधितांचा संघर्ष आलाच. नागरी समाजात हा संघर्ष अपरिहार्य आहे. खरं तर सत्तेचे केंद्रीकरण हे त्याचे व्यवच्छेदक लक्षण आहे. नागरी समाजाच्या इतिहासात हे अव्याहत चालत आले आहे.

आणि या सत्तेने सत्तेसाठी केलेल्या संघर्षांत कितीक बलाढ्य नागरी संस्कृती नामषेश झाल्या, पण त्यांची रयत नव्हे. मात्र टिकून राहिल्या आदिवासी जमाती, ज्या आहेत सान प्रजासत्ताके, अनादी काळापासून... आजही!!


स्वावलंबनाला वेळूचा आधार
 यंत्रोद्योग = बहुसंख्य ग्रामीण जनतेच्या हस्तोद्योगांवर गाढवाचा नांगर आला. बांबू प्राचीन काळापासून भारतीय ग्रामीण जीवनाशी जोडलेला आहे, मग बांबू भारतात दुर्लक्षित का व कसा राहिला?

या गाण्यांना काव्य म्हणता येईल का माहीत नाही ! ही आहेत रेमीच्या बोलीत राकट गावठी प्रेमगीते. येथे नाही अभिजात शैली, नाहीत अलंकार-उपमा, नाही शब्दांची वा कल्पनांची आतिषबाजी. शेतकर्‌याच्या पिंडाला अशी चंगळ परवडणारी नाही, मग ते पाणी असो की शब्द असोत.

एक प्रश्न उरतो. या रचनांना समिक्षा, टीका अथवा दुसर्‌या कोणत्या सदरात ठेवता येईल का? कोणत्याही सृजनशील अभिव्यक्तीत वैयक्तिक व सामाजिक यांच्या पलिकडे जाण्याकडे माझा कल आहे. त्यामुळे यातील 'मी' नेहमीच गौण राहातो. दोन्ही गाण्यांचा विषय प्रेम आहे, पण हल्लीच्या रूढ (लैंगिक) अर्थाने नव्हे.  

प्रस्तुतकालीन महाभारत (कुरूक्षेत्र) आज काव्यात कोण लिहिणार, आणि वाचणार कोण? ते तर प्रत्येक व्यक्ती रोजच अनुभवते! मात्र त्याचे ऑपरेशन (कि डिसेक्शन, कि पोस्टमोर्टेम?) सुटसुटीत व्हायला काय हरकत! आजच्या परिस्थितीवर लेखातून, पुस्तकातून केलेल्या असंख्य टीका वेगवेगळ्या दालनात राहून केल्या जातात. कितिही प्रयत्न केले त्या अपुर्‌या राहातात. किंबहुना त्या जेवढ्या लठ्ठ तेवढ्या आकलनास कठीण.


अन्नपाण्यासाठी रयत दाही दिशा - जगण्यावर कर अनारोग्याचा
 चव्वलाच्या नादात पाणपोया वाहून गेल्या - हे रस्ते हे रस्ते


साधे उदाहरण : एकाद्या घटनेची, वस्तूची व्याख्या तिचे पूर्ण वर्णन करू शकत नाही. व्याख्यांच्या जागी समर्पक उदाहरणे सोईची होतात असं मला वाटतं! ... पाण्याची शास्त्रीय व्याख्या H2O असली तरी ते त्याहून अधिक असते. तुका म्हणे 'प्रयत्नें वाळूचे कण रगडीता तेलही गळे'. अर्वाचिन युगांत रूसी शास्त्रज्ञांनी भूगर्भातील खडकांना दाब देऊन पाणी काढले. दगडाच्या खाणीत मिळालेल्या स्फटीकाच्या पोकळीत पाणी असते. ऐकावे ते नवल!

अर्वाचीन युगाची व्याख्या मला माहित नाही. पण चार्ली चाप्लीनचा मूक चित्रपट Modern Times शब्दही न वापरता त्याची व्याख्या समर्पकपणे चित्रित करतो. ते पाहून आणि वारंवार आठवून मी मात्र अभिजात शैलीच्या शब्दजंजाळातून मोकळा होत गेलो.

अर्वाचीन महाभारत-कुरुक्षेत्र!  एवढा क्लिष्ट, अनेकांगी आणि विस्तृत विषय! या देशाची घटनाच लिहायला किती विद्वानांना किती वर्षें लागली? आजच्या सुधारलेल्या प्रगत समाजात कुठून मिळणार डिक्टेशन देणारा व्यास आणि लिहून घेणारा गणपती! प्राचीन काळातील कुरुक्षेत्र एकाच रणांगणावर होते. आज ते सर्व भारत व्यापून राहिले आहे. सामाजिक संधारण आर्थिक फॉर्म्युला लावून कसे होणार?

प्रेमावाचून दुसरा कोणताही पर्याय किंवा साधन किंवा अहिंसक शस्त्र हे ऑपरेशन करायला मला सापडले नाही!


आमचा पत्ता : मुक्काम - मुंबई, पोस्ट - इंडिया
आज सीमांत प्रदेश. उद्याचं ?माहित नाही

सरता पालव

इंडियन आयडल ६ च्या मंचावर पं. जसराज


टीवीच्या पडद्यावर सारा वेळ माझे ध्यान – कान आणि नजर – होते पंडितजींवर. कधीकाळी लोककलांतून अभिजात कलांचा – शिल्प, संगीत, नृत्य आदि– उगम आणि विकास झाला. अर्वाचीन काळातही पं. कुमार गंधर्वांनी ते केले. आजही लोकबोलीतला कबीर–तुकाराम अभिजात संगीताच्या गळ्यातला ताईत (रत्नहार नव्हे, तो राजे लोकांसाठी, तुकोबासाठी नव्हे.) आहे.

आता अभिजात संगीतातून बॉलीवुडच्या इंडिपॉप संगीताचा उगम झाला. त्याचा उदो करण्यासाठीच तर हा मंच आहे. आता त्यांच्या चालींवर श्रद्धाळू भजनं गातात. आता करूण-शांत-शृंगार रसांची जागा राजरोस बीभत्स रसाने घेतली आहे; हवा, जळ, जमीन, जीव ही प्रदुषित होताहेत.
या प्रदूषणाच्या जाणीवेवाचून कविता-कथा-कादंबरीची कशी सुटका होईल? मानवाने निर्माण केलेल्या सर्व प्रश्नांस उत्तरे आहे.कालचा व्यास नागरी समाजाच्या केंद्रित सत्तेचा कवी होता.

आजचे देशव्यापी "महाभारत आणि त्यात सतत चालले कुरुक्षेत्र" जेव्हा शंभर कोटी कवी लिहितील तेव्हा नागरी समाजाचे सत्तेचे केंद्रीकरण समाप्त होईल.

परिशिष्ट

आद्य महाभारतातील तीन प्रसंग


एकलव्य – दुर्गा भागवत याला 'मोहरीतील ठिणगी' (व्यासपर्व) म्हणतात;
लाक्षागृहातील कांड – संन्यस्थ कुंती गांधारी व धृतराष्ट्र ... रानाला लागलेल्या नैसर्गिक वणव्यात जळून मरतात, कुरुक्षेत्रानंतर...महाश्वेतादेवी (समीक्षा).
खांडव वनाचा विनाश – राजधानी इंद्रप्रस्थ बांधण्यासाठी लावलेल्या वणव्यात वानसे, पशूपक्षी व नाग जमात भक्ष्यस्थानी पडतात. त्याचे पर्यवसान पांडवांच्या वंश-विच्छेदांत होतो – तक्षक जीवाणू (वायरस) होऊन परिक्षिताचा वध करतो.

आदिवासी जीवन 

भिल्लांची आगळी होळी

आदिवासींची संस्कृती किती प्राचीन असेल याची कल्पना नाही. पण आज ते काही प्राचीन वातावरणात राहात नाहित.प्रस्तुत कालीन नैसर्गिक आणि सामाजिक-राजकीय-आर्थिक-इ. पर्यावरणात, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ते कसे टिकतात - sustain - याचं कारण ते निसर्गाशी संवाद साधून जगतात एवढं खरं!
ते  खरे सृष्टीयोगी !
भिल्ल शोडषांचे उत्स्फूर्त नृत्य -१
त्यांना विश्राम विनामूल्य मिळतो. करमणुकीसाठी त्यांना सिनेमा, टीवी अशा कुबड्यांची गरज किंवा हवास नसते.
त्यांचा  होळीचा सण पाच दिवस चालतो.
बाजूच्या व खालील  फोटोत दीवासौ या सणाला या भिल्ल षोडशा उत्स्फूर्त नाच करताना. यावेळी मक्याचे पिक तयार झालेले आहे.



भिल्ल शोडषांचे उत्स्फूर्त नृत्य - २

वरील चित्रांतील आनंदी भिल्ल व इतर आदिवासींचे नागरी समाजाने गेल्या पाच हजार वर्षांत केलेल्या नुकसानाची परतफेड आजचे लोकशाही सरकार कधीतरी करू शकेल का?


आता मी 'खो' देतो 'सविता' (अब्द शब्द) आणि 'अत्यानंद' यांना. दोघंही मातबर ज्येष्ठ लेखक. शिवाय सावितादी प्रवासी आणि फोटोग्राफर आहेत. तर अत्यानंद (प्रमोद देव) हे शास्त्रीय संगीताचे व्यासंगी गायक आहेत; त्यानी माझी एक, वरीलप्रमाणे कोणत्याही सदरात न बसणारी, कविता - 'अशी कविता एक कोडे' - गाईली होती हे आवर्जून सांगावेसे वाटते.

टीप : . श्रम - विश्राम - आरोग्य - अध्ययन - प्रजनन ही माझी मूळ लेखमाला अपुरी राहिली आहे. पण तिचे इंग्रजी भाषांतर Archetypes India माझ्या ब्लॉगवर प्रसिद्ध केलेय. त्याचा tag Work-Leisure-Health-Learning-Propagation.  ही माझी पुनर्शोधन (संशोधन नव्हे) मालिका आहे. त्याची स्फूर्ती, शिक्षण आणि दिशा मला माझे आदिवासी आप्तेष्ठ आणि आई-आजी यांच्याकडून  मिळाली.
२. नुकताच New Scientist या साप्ताहिकात प्रसिद्ध झालेला लेख Climate change: The great civilisation destroyer? अवश्य वाचावा. त्यासाठी नाव-नोंदणी Sign-in करावी लागेल. हा लेख मर्यादित काळासाठी उपलब्ध आहे. त्याची वर्ड-कॉपी हवी असल्यास इ-मेलने माझ्याशी संपर्क करावा.  

स्वातंत्र्यदिनानिमित्त | १५ ऑगस्ट २०१२ | मुंबई
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.

May 27, 2012

गावकुसाबाहेरील माणसं : समकालीन लोककथा

गावकुसाबाहेरील माणसं, लेखक : रामचंद्र नलावडे 

पुस्तकं आपसूकच माझ्याकडे येतात माझ्या गरजेला. 'गावकुसाबाहेरील माणसं', कथासंग्रह, त्यांपैकी एक. पुस्तक व लेखक दोनही नावे मला नवीन. गवंडी, वडार, बेलदार, पाथरवट लोक मात्र मला नवीन नाहीत; फार जुनी ओळख.
    वास्तुविद म्हणून वडारांशी अधूनमधून संपर्क यायचा. खंडाळा-लोणावळ्याच्या परिसरात दगडांच्या खाणीवर कधीतरी घंटोगणती बघत वेळ घालवला होता. तेथील दगडफोड्यांनी दिलेले स्फटिक अजूनही माझ्याकडे आहेत.  
    लोणावळा आता थंड हवेचं ठिकाण राहिलं नाहीय. आता तिथं कॉंक्रिटचं जंगल झालंय. भर उनात दगडफोड्यांच्या काळ्या पीळदार शरिरांवर निथळणार्‌या घामाच्या धारा त्यांना थंडावा देता देता वाफ व्हायच्या.
    ऐकून माहित आहे की तुरुंगात सक्तमजूरीला दगडफोड / खडीफोड ही एक सजा आहे ! पण इथल्या दगडफोड्यांनी दयाभावाने त्यांच्या हुन्नरीचे अनेक बारकावे मला समजावून सांगितले. कारण एकच : मी माझ्या व्यक्तिमत्वाची ओळख शून्य करून नम्रपणे तेथे गेलो होतो. 
    समोर सरळ उंच जाणार्‌या काळ्याशार कड्याखाली कमालीच्या आत्मविश्वासाने हे गडी काम करित होते. पाषाण आणि माणूस यांच्यांत दुजाभाव राहिला नव्हता. दगड लोणी झाला होता.
लहानपणी कोंकणात मी असाच कुंभारमाटीकडच्या जांभ्या दगडाच्या खाणीवर जात असे.

वडार जमातीचे जीवनदर्शन 

रामचंद्र नलावडे यांच्या कथांनी मला वडार जमातीचे जवळून, अगदी आतून 'दर्शन' दिले. या कथांना अनेक परिमिती आहेत. सामाजिक सत्याच्या अनेक स्तरांचे निखळ दर्शन इथे होते.
    विसाव्या-एकविसाव्या शतकात हजारो वर्षांचा भारतीय समाजाचा इतिहास येथे अवशिष्ठ रुपाने साक्षात उभा आहे. समकालिन इतिहासाची ही बखर आहे असे मला प्रांजळपणे वाटते.
    साहित्यिक मूल्यांना फार वरच्या थरावर नेणार्‌या या कहाण्या आहेत. गतकाळाच्या प्रचंड इतिहासात या जाति-जमातिचा उल्लेख कुठे आहे का मला माहित नाही.

वडार जमातीचे गोत्र ?

भिल्ल जमात आजही तीरकमान वापरताना आंगठ्याचा उपयोग करत नाहीत : एकलव्याचे हे जीवंत स्मारक!
    सह्याद्री पर्वतात राहाणारे कातकरी सांगतात क ते हनुमान-सुग्रीव यांचे वंशज आहेत : काही वर्षांपूर्वीपर्यंत रायगडचे कातकरी मुंबईच्या करियाणांना वनौषधी पुरवत. हे पुरातन वनस्पतीशास्त्रज्ञ !
    मुंबई फूटपाथवर राहाणारे मातंग आपल्या बकाल झोपड्यांशेजारी आपला पूर्वज वाल्मिकीच्या झोपडीवजा मंदिराची स्थापना करतात.
    कुंभार स्वत:ला प्रजापती म्हणतात, तर सुतार स्वत:ला विश्वकर्मा म्हणतात.
   व्यासाच्या गोत्राचे कैक लोक चाळी-इमल्यांत वसलेले आहेत.
   दोन हजार वर्षांपूर्वी जंगलाने झाकलेला डोंगर पाहून कोणत्या जागी लेणे कोरता येणे शक्य आहे हे केवळ भूशास्त्रज्ञच सांगू शकला असता, सम्राट नव्हे. आणि खडकाचे अंतर्बाह्य ज्ञान वडारावाचून दुसऱ्या कोणाला असणार?

लोककथा - लोकभाषा - लोककला 

यातील काही कथा पूर्णतः लोकभाषेत आहेत. या सर्वच कथांना लोकभाषेचे व लोक-इतिहासाचे मूळ आधार – Primary Source – आहेत असं म्हणता येईल. खरं म्हणजे यांना लोक-कथा, लोक-साहित्य म्हणता येईल.
    निवारा ही मानवाची मूलभूत गरज समजली जाते. तसेच ती संस्कृतीची अभिव्यक्तीपण आहे, नृत्य-संगीत-चित्र-साहित्य यांप्रमाणे! तसेच पुराशास्त्राच्या संशोधनाचा एक मूल आधारपण आहे.
    प्राचीन काळापासून संस्कृतिच्या या अभिवक्तिला आकार देण्यात वडारांचा – मग ते कोणत्याही नावाने ओळखले जात असोत – महत्त्वाचा वाटा आहे.
    खडकात पाया खोदण्यापासून ते कळसापर्यंत वास्तूशिल्पात बेलदारांचा सहभाग असतो. पण समाजात – विषेशतः उच्चभ्रू, पांढरपेशा वर्गात – त्यांना पायाच्या दगडाइतकेपण मोल नाही. असा हा आमचा समाज !
   कांही वर्षांपूर्वी वेरूळ मंदिराबाहेर पुराशास्त्राच्या संशोधकांना एका प्राचीन वस्तीचे अवशेष सापडले. ही तेथे काम करणाऱ्या कारागिरांची वस्ती होती.

वडार आणि वास्तुशिल्प 

काही काळ मी वास्तुविद्यालयात अभ्यागत अध्यापक व प्रबंध मार्गदर्शक होतो. त्यावेळी इतिहासाच्या संदर्भात बोलण्याचे प्रसंग येत. त्यातील एक इथे उद्धृत करतो : मुंबईच्या परिसरात व पश्चिम घाटात अनेक जगप्रसिद्ध लेणी आहेत.
    एका प्रसंगी मी एक (वाह्यात) प्रश्न शेवटच्या (पाचव्या) वर्षाच्या विद्यार्थ्यांना विचारला होता. "कार्ल्याच्या चैत्याची मोजमापे तुमच्याकडे आहेत. त्यावरून आजच्या मजुरीच्या भावाने केवळ तेथील दगड खोदण्याच्या कामाची काय किंमत होते काढा. त्यात शिल्पांचे कोरीव काम जमेत घ्यायचे नाही."
    त्यापूर्वी व नंतरही हा प्रश्न कोणीही विचारला नसेल. त्याचे उत्तर माझ्या विद्यार्थ्यांपैकी कुणी दिले नाही. खरं तर वास्तुविद्येचे शिक्षण आणि व्यवसाय आज लोकाभिमुख नाहीत. ते कलाभिमुख किंवा व्यवसायाभिमुख आहेत. आर्थिक भ्रष्टाचाराचे अनेक किस्से प्रस्तुत पुस्तकात आहेत. पण 'बौद्धिक भ्रष्टाचार' किंवा 'जाणिवेचे भ्रष्टीकरण' त्याच्या किती पटीने मोठा/लहान आहे हे कोण बुद्धिजीवी सांगू शकतील?
    अजिंठा, वेरूळ, कार्ला, भाजा, कान्हेरी, घारापुरी इत्यादि लेणी कोरणारे वडारांचे पूर्वज तर नव्हते ना? हा प्रश्न अनेक वर्षांपासून माझ्या मनात अधूनमधून डोकावतो. मुंबईच्या रस्त्यांवरून भटकताना खडीचे ढीग तसेच दगडी बांधकामे नजरेस पडतात. विचार येतो : हे शहर उभारायला किती जंगलावरून (डोंगरावरून) गाढवाचा नांगर फिरवला असेल?
ललित साहित्यात अशा प्रश्नांची उत्तरे मिळणे कठिणच. बरेचसे साहित्य प्रश्न नमूद करतात आणि जेथे कथा-कादंबरी-चित्रपट सुरू करायला हवेत तेथे संपवतात. नाही म्हणायला शरतचंद्र चटर्जी हे मला माहित असलेले एक लेखक अपवाद आहेत. उदाहरण : 'भैरवी' (भाषांतरित नाव) ही तत्कालिन सामाजिक प्रश्नांची उत्तरे देणारी कादंबरी.

सरकारी उपाययोजना 

या कहाण्या वास्तव घटना आहेत. त्या कल्पनेहूनही विदारक आहेत. दारिद्य्र, अनारोग्य, निवारा आणि साक्षरता व शिक्षण यांचा अभाव, व्यसन यांतून निर्माण झालेले प्रश्न यांत चित्रित केले आहेत. त्या सर्वांना उत्तर एकच : सरकारी उपाययोजना.
     पण या सरकारी उपाययोजनांत जनतेचा स्वाभिमान, स्वावलंबन, पारंपरिक हुन्नरीला मान्यता व तिचा समावेश आणि विकास यांना शिक्षणात व सरकारी प्रकल्पांत कुठेही जागा नाही. सर्वाँत भयानक आहे तो प्रचलित शिक्षणातून निर्माण होणारा दुरात्मभाव, जो सार्वत्रिक आहे. आणि त्याची तुलना केवळ कर्करोगाशीच करता येईल. रामचंद्र नलावडे यांची सामाजिक बांधिलकी या कथांत स्पष्ठ होते.
    हे पुस्तक आवडले असा Facebook-छाप आंगठा मी दाखवणार नाही, नाही छापणार 'इमेल'वरची smiley.
    वाचकाना एकच सुचना करू इच्छितो. ज्यांनी हे पुस्तक उधार, विकत किंवा वाचनालयातून घेऊन वाचले असेल त्यांनी निदान एक चवरखा अभिप्राय लिहून लेखकाला अगत्याने पाठवावा. तेवढीच आपली साक्षरता कामास येईल. पुस्तकावर लेखकाचा पत्ता आहे.

पुस्तकासंबंधी 

या कथांत कुठेही भावनातिरेक - melodrama - नाही. शब्दांचा कुठेही अपव्यय नाही. या कथांनी मराठीच्या शब्दकोशात मोलाची भर घातलेली आहे : शब्द, म्हणी आणि वाक्प्रचार(जसा : "परमेसराच्या काठीला आवाज नसतो").
     पण या कथा लोकांपर्यंत पोहोचणार कशा, आणि मुख्यतः वडार समाजापर्यंत ज्यांच्या या कथा आहेत? किती शिक्षित वडारांपर्यँत या पोचल्या असतील हे लेखकाला व प्रकाशकांनापण माहित नसेल ?
    त्या जनसामान्यांपर्यंत कशा जातिल ? कापडाची बांधणी, पुठ्ठ्याची बांधणी, कागदी बांधणी अशा प्रकाशनाच्या प्रती असतात. त्यामुळे किंमत कमीजास्त होते, पण मूल्य कमी होत नाही. एका परदेशी कंपनीने भारतीय जीवनमान लक्षात घेऊन रुपयात वेगळ्या किमती पुस्तकांवर छापल्या होत्या. असाच आणखी एक प्रकार आहे, जो मराठीत वापरात नाही, पण हिंदीत रूढ आहे. ते वृत्तपत्राचा कागद वापरतात. कोणत्याही रेल्वे स्टेशनवर ही पुस्तके बघायला मिळतात, स्वस्त असतात. भारतीय समाजात / जनतेत जीवनमानाचे किती स्तर आहेत ते सरकारला पण माहित नसेल.
     मी तर सुचवीन की भारताच्या राज्यघटनेची अशी आवृत्ति सर्व प्रादेशिक भाषांत काढावी. आणि एकेक प्रत देशभरच्या प्रत्येक प्राथमिक शाळेत विनामुल्य पोहोचती करावी. प्रत्येक घटनादुरुस्तीला संपूर्ण नवी आवृत्ति. पाच वर्षांत १२० कोटी लोकांपर्यंत घटना घरोघरी! 

सरता पालव 

लोकशाही सरकार म्हणजे केवळ सुयोग्य सोई (बहुसंख्य जनतेला, अल्पसंख्य भांडवलदारांना नव्हे) उपलब्ध करून देणारे साधन आहे; नाही स्वामी (सरंजामी मायबाप किंवा संत). सत्तेसाठी लाच किंवा लालुच देऊन निवडून येणारे भ्रष्टाचारी आमदार-खासदार हे स्वामी कसचे? असे नेते मायबाप जनतेला कुठेनेणार? शासन म्हणजे अनुशासन, दन्मठेपेची शिक्षा नव्हे. शासन म्हणजे न्याय होय, कायदा नव्हे.

टीप : शीर्षक : गावकुसाबाहेरील माणसं | लेखक : रामचंद्र नलावडे, पत्ता : मु. पो. वेरळ, त. खेड, जि. रत्नागिरी, पिन ४१५६२१. मोबा. ९६२३९७०६१६ | प्रकाशक : प्रतीक प्रकाशन | डिसेंबर २०११ | पृष्ठसंख्या १५+११३| मूल्य : रु. १२५/-.। © रामचंद्र नलावडे । 
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.

May 15, 2012

विसाव्या शतकात मूर्तीभंजन

विसाव्या शतकात मूर्तीभंजन : व्यत्यासकथा

अवतरण : ' भग्नमूर्ती ' (मुक्तछंद) 

"निसर्गस्वभाव, निसर्ग शक्ति,
निसर्गांत जें जें आहे तें सारें मानवांतहि
आणिक अधिक त्याहून आहे
निसर्गाची जी अंतिम सीमा
मनुजकार्याचा आरंभ तेथे
तेथून विकास मानवतेचा
तेथून पुढे जाण्यासाठीच धडपड त्याची
तेंच उद्दिष्ट साधायासाठी
त्याची कला शास्त्रें विद्या तत्त्वज्ञान
धर्म आचार विचार आणि
नीतिनियम."

वरील अवतरणात कविता आहे कि काव्य आहे ? कदाचित कांही लोकांना ही कविता आहे, चांगली आहे, उत्तम आहे असंही वाटलं असेल. किंवा नाविन्यपूर्ण वाटेल! पण तिच्या अर्थाकडे पाहता ती आत्मकेंद्रीत, आत्मसुखी, प्रौढी मात्र वाटते.

कवीची निसर्गाची कल्पना काय आहे? बगिच्यात लावलेली झाडे आणि हिरवळ ? कि निसर्ग म्हणजे मुंबईची मलबार हिल ? कि केवळ भोग्य वस्तू ?

मूर्तीभंजन 

बालकवी, म. ज्यातिबा फुले, फार-पूर्वी-चार्वाक आणि बुद्ध -महावीर यांच्यानंतर कवीची निसर्गाची कल्पना फारच अपरिपक्व / तोकडी, तसेची फिरंगी सत्तेने प्रभावित झालेली दिसते.

बालकवींचे निसर्ग – सृष्टी – तर आराध्य आणि स्फूर्तीदेवता होती. म. फुले यांनी ईश्वर ही संकल्पना बाजूला सारली आणि त्याच्या जागी "निर्मिक" नाव देऊन सृष्टीला बसवले. अर्थातच सनातन्यांचा तीळपापड झाला असणार? त्यांच्याही पूर्वी चार्वाकाने सृष्टीला जीवनाची अधिधात्री मानले.

आणि बुद्धाने ईश्वर, देव, देवता, पूजा, यज्ञ, प्राण्यांचे बळी इ. प्रथा नाकारल्या. सिद्धार्थ जातकांत दशसहस्त्र ब्रम्हांडांचा उल्लेख अनेकदा येतो. आणि सर्व उपासकांचा ध्यानविषय सृष्टी किंवा तिची अंगे होती.

सृष्टीशी सुसंवाद 

कवीची निसर्गासंबंधीची कल्पना बालसदृश किंवा बालिशपण नाहिय. प्रागैतिहासिक काळातील मानवाने, जेव्हा सुसंस्कृत समाज अस्तित्वात नव्हते, कधीही या कवीप्रमाणे विचार केला नसता. त्या मानवांचा निसर्गाशी सुसंवाद जुळलेला होता यात शंकाच नाही. याचा अर्थ तेव्हा कला आणि विज्ञान अस्तित्वात नव्हते असा नाही. आतासारखे ते एकमेकापासून वेगळे नव्हते.

आजही तथाकथित अश्मयुगात राहणारे मानव भूतलावर आहेत. अथवा भविष्यात नागरी संस्कृतिंचा विनाश झाल्यानंतरचे मानव असा विचार करण्याचे धारिष्ट्यपण करणार नाहीत.

शाळेबाहेर शिक्षण

प्राथमिक शाळेत शिकताना मला भातशेती-शाकशेती, सूत कताई-विणाई, मातीची घरबांधणी – अन्न, वस्त्र, निवारा – या मूलभूत गरजा भागवण्याचे शिक्षणपण गावले.

तसेच परिसरातील बारा बलुतेदार आणि अठरापगड जाती यांना जवळून बघायची संधीपण मिळाली (घेतली). त्यावेळी मी 'मानववंशशास्त्र' हा शब्द ऐकलापण नव्हता.

इथूनच माझा लोकजीवन बघायचा छंद सुरू झाला. आणि छंदात कविता रचायचा छंदपण ! कालांतराने माझ्या कवितेतील छंद, वृत्त, जाति, अलंकार आयुष्याच्या पायवाटेवर कधी हरवले समजलेच नाही. लोकजीवनाच्या दर्शनाने सर्व आयुष्य घुसळून काढले. सर्व गृहीत मूल्यांची उलथापालथ झाली, आयुष्यात एक विद्रोह सुरू झाला.

निरपेक्ष आयुष्य जगण्याचा छंद आला. जगणेच काव्य झाले, छंद झाले, मुक्त-छंद झाले. मीच कवी आणि माझा मीच रसिक !

एक जाणीव आकारत गेली : 

'जीवन हे सर्वश्रेष्ठ आहे; सर्व स्थल-कालांत नागरी संस्कृतींनी निर्मिलेल्या सर्व कला, विज्ञाने, धर्म, तत्वज्ञाने व्यापारउदीम, अर्थसंस्था, राज्यसंस्था इत्यादिहून सर्वतोपरी उच्चतम आहे'.
भ्रमनिरासाच्या प्रक्रियेतून जाताना एक रचना, "अशी कविता - एक कोडे" आकारली. तिला अत्त्यानंद उर्फ प्रमोद देव यांनी चाल दिली अन गायली. त्यावर काही नमुनेदार प्रतिक्रिया आल्या. या वाचनीय आहेत. पण कोडे मात्र अनुत्तरित राहिले.

चवाठ्यावरच्या चर्चेत कधी कधी मूलभूत मुद्दा बाजूला होतो. आणि शब्दच्छल राहातो.
— रेमीजीयस डिसोजा
टीप :
1. सुरवातीला दिलेले अवतरण काव्यशास्त्राच्या एका पुस्तकात मिळाले. लेखकाने कवीचे नाव दिलेले नाही. अशाच इतर अवतरणांचे संदर्भ / नावे दिलेली नाहीत. मुक्तछंदात लिहिलेले हे मराठीतले पहिले दीर्घकाव्य आहे असा उल्लेख मात्र आहे.
2. हल्लीच दा विंची "महान कलावंत कि महान वैज्ञानिक ?" Is Leonardo da Vinci a great artist or a great scientist? असा वाद विलायतेत झाला. या चर्चेत मी माझ्या कुवतीप्रमाणे सहभाग दिला. माझा प्रतिसाद या लेखावर आहे.

~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.

October 22, 2011

एक कालातीत कवी : बालकवी - त्र्यं. बा. ठोमरे

एक कालातीत कवी : बालकवी
बालकवींची सृष्टी
(बालकवी - त्र्यंबक बापूजी ठोमरे, जन्म- १३ ऑगस्ट १८९०, मृत्यू- ५ मे १९१८)

शंभरीनंतरी बालकवींच्या कविता आजही नुकत्याच उमलणार्‌या कळीसारख्या ताज्या आहेत.

आज नागरी समाजाच्या जीवनशैलीत, भाषेत, अभिरुचीत फरक झाला आहे. पण आजही या कवितांच्या नाविन्यावर कांहिंही परिणाम झालेला मलातरी जाणवला नाही.

'समग्र बालकवी' [टीप १] हें पुस्तक वाचनालयातून आणले. तेथे समजले, एका संस्थेने हें ब्रेल लिपीत लिहिण्यासाठी नेलें होतें. ऐकून फार आनंद झाला.

पुस्तक घेतल्यावर प्रथम पहिल्या पानापासून शेवटपर्यंत चाळले, कुठे काय आहे पाहिले. ओळखीच्या दोन कविता भेटल्या.

'ती फुलराणी' मी शाळेंत असताना वाचली होती. पहिले चार चरण मात्र कायमचे ध्यानांत राहिले होते. तेंच 'आनंदी आनंद गडे' या कवितेचे. चार ओळी का असेनात पण कायम आठवणींत कोरल्या गेल्या, अन त्या वेळोवेळी आठवतात पण. यांनी बालमनावर केलेले संस्कार पण कधीं पुसले जात नसावेत.

गेल्या शंभर वर्षात अनेक समर्थ साहित्यिकांनी, समिक्षकांनी, अभ्यासकांनी त्यांच्यावर व कवितांवर विविध लेखन केलें, टीका लिहिल्या, संपादन केले, प्रबंध लिहिले. अगदी काल परवांपर्यंत.

॥ बालकवींची सृष्टी ॥
 अवतरण १
_______________________________________________
॥ सृष्टि ॥
चाल : अरुण
सृष्टि मला हांसविते। स्वर्गसौख्य दाखविते
शांतीने पालविते। आनंदें डोलविते
मन माझें टाकि गडे नित्य गुंगुंनी ॥१
(अपूर्ण कविता पृ. २१७) 
_________________________________________________

"सृष्टी" हा शब्द कवितांत बत्तीस वेळां येतो. कांही नजरेतून सुटले असतील. ते वेगवेगळी रुपे घेऊन आलेत. त्यांत एक आहे "अंत:सृष्टी". तसेच निसर्ग, जग, विश्व इ. शब्द या संदर्भाने येतात. त्यांच्या कविता सृष्टीने - निसर्गाने, प्रकृतिने - अंतर्बाह्य समृद्ध केलेल्या आहेत हें सर्वांना माहित आहे. पण त्यांची सृष्टी प्रातिनिधिक नाही, सांप्रदायिक नाही हे विशेष आहे.

ती सृष्टी वास्तव आहे, इंद्रियगम्य आहे. सूर्य चंद्र तारे... ब्रम्हांडापासून जळ जमीन जीव... गवतापर्यंत सर्व जैव-अजैव निसर्ग तिच्यांत सामावतो. एवढेंच नाही तर तिचें आंतरिक अस्तित्वपण संवेदना, भावना, प्रज्ञा, विचार... यांनी प्रतीत झालेले जाणवते.

"सृष्टी" शब्दाचे कांही निवडक उल्लेख

सृष्टीचे मंजुळ ताल
... ... ...
         ही सृष्टीचीं
         निगूढतेचीं
         तत्त्वें साचीं
सांग उकलुनी आह्मांतें
गा गा गा विहगा गीतें ॥२॥ (८३),

| मनोवेधका सृष्टीसतीच्या अगा चिमुकल्या बाळा (६८) | हें तान्हें । सृष्टीचें गोजिरवाणें! (९१) | सृष्टि बालिका (२१८) | सृष्टीदेवीच्या सगुणा बाळा (११९) | सृष्टि तुझी ही --- हेंच तुझें घर --- विहार (१५०) | सृष्टिसतीने साज घेतला (१८८) | दिव्यरूपिणी सृष्टी (१९२) | ती आशा मग सृष्टीबंधनीं पुन्हां जीवास घे गोंवुनी (२०७) | हालवीत कचभार सृष्टीचें उत्थापन बोले (२१९) | हे रवी शशी तारका तसे ग्रहगोल. / ही सृष्टिसुंदरी मजला गाया शिकवी, / हीं चराचराचीं निगूढ गीतें कांहीं. (२३५) | हर्षविल अंतःसृष्टी मला (२४९) | विविधा सृष्टी (२५९) |कविता शीर्षक, 'सृष्टीच्या गायकास' पृ. 83. । "कवीच झाला सृष्टि, सारी सृष्टि झाली कवी" (प्रस्तावना, संदर्भाचा उल्लेख नाही, पृ. बत्तीस) ।

साकल्याने [टीप २] पाहिल्यास, त्यांच्या सर्व कवितासंभारांत जाणवते की मानवाला सृष्टीपासून वेगळे अस्तित्व नाही, तसेंच ती भोग्य वस्तूपण नाही. दिव्य, देवता, दिव्यत्व इत्यादि उल्लेख पाश्चिमात्य Divinity या धार्मिक कल्पनेपेक्षा आत्मिकतेवर -- religiousness -- आधारलेले आहेत; जशी त्यांची पहाट स्थल-विशिष्ट नाही तर वैश्विक आहे.

॥ बालकवी : एक कालातीत कवी॥

त्यांच्या अनेक कवितांत वेगवेगळ्या नव्या अपारंपरिक देवतांचे उल्लेख येतात, त्यांत मानव नव्हे, 'श्रीमानवता'देवी सुद्धा येते. आणि त्या अभावितपणे सृष्टींत उगम पावतात. यामुळे त्यांची सृष्टि-देवता व आत्मिक-ता नास्तिकाला किंवा अज्ञेयवाद्याला पण नाकारता येणार नाहीत. 
आज जडवाद व चंगळवाद यांच्या वावटळी संप्रेषण-माध्यमांतून फोफावत आहेत. या आधुनिकतेने लोकांचे आयुष्य चाकोरीबद्ध तर केले आहेच व त्यांची त्रेधा पण उडवलेली आहे. याची सुरवात ब्रिटीश राजवटीत झाली.
 
बालकवींच्या कवितेत कधीकधी निराशेचे जे सांवट दिसते त्याचे कारणही यांत असावे असे मला वाटते. पण त्यांचा सहजधर्म व सर्जनशीलता या स्थितिला पुरून उरणारी होती. बालकवींची कविता या आधुनिकतेच्या फार पुढे गेलेली आहे.
 
वडाचें बीज मोहरीपेक्षाही लहान असते. आणि ते कोठेही रुजते, खडकावरपण. पण त्यांत या महावृक्षाचे संपूण आलेखन (DNA) लिहिलेले असते हें  कदापि विसरून चालणार नाही. बालकवी - त्र्यंबक बापूजी ठोमरे यांनी आधुनिकतेची नाडी बरोबर ओळखली होती.
अशा वेळी अनेक लोकांस त्यांची कविता नैतिक आधार देऊ शकेल. आणि ही अत्यंत निकडीची गरज आहे असं मला प्रांजळपणे वाटते.
अवतरण २
________________________________________
 श्रीमानवता ॥
चाल : सूर्यकांत (समुदितमदना)
ग्रंथारंभीं नमन देवते श्रीमानवते तुला ।
दिव्यदेवता विविधरूपिणी तूंच एक निस्तुला ॥
(
पृ. २०९)
_____________________________________

॥ चिरयौवना सृष्टी ॥

 ॥ जेथे जातो ती माझी सांगाती ॥ ( रेमी डिसोजा)

मला अभिप्रेत असलेली सृष्टी: ती सतत सर्जनशील निर्मितीत रममाण असते. ती जीवाणू ते वानसें-मानव यांना समान लेखते. ती मानव समाजांतील भेद - उच्च - नीच, त्यांची शास्त्रें - नीतिनियम, त्यांचे ईश्वर - अवतार - महात्मे, कशालाच वोळखत नाही. एकदा संपूर्ण जीवलोकाला पोषण, संवर्धन, संरक्षण इ. साधने दिल्यावर तिचे पुढील काम - शौचाचे परिवर्तन (recycle) - चालू राहते. जेव्हा साध्य आणि साधन यांच्यांत दुजाभाव असतो तेव्हा अराजक (chaos) निर्माण होते. सृष्टीयोग म्हणजे साध्य आणि साधन, दोनही एकच - सृष्टी - असते.

आयुष्याच्या दिशा
बालकवींच्या अल्प-आयुष्यांत त्यांची भटकंती; मराठी, संस्कृत व इंग्रजी साहित्याचा अभ्यास; व भौतिक परिस्थितीशी केलेला सामना साकल्याने पाहता जाणीव होते की हा असामान्य कवी काळाच्या फार पुढे गेला होता, नव्हे काळाला पुरून उरलेला आहे.

टीप  १ :  "समग्र बालकवी" । लेखक : त्र्यंबक बापूजी ठोमरे । संपादक : नंदा आपटे । प्रस्तावना, संपादित आवृत्त्या, संदर्भसूची : एस. एस. नाडकर्णी । पॉप्युलर प्रकाशन मुंबई । प्रथम आवृत्ती, २००५ । किंमत रु. ४००/- । बालकवींच्या एकत्रित कविता आता उपलब्ध नाहीत. या पुस्तकाने ती एक फारच मोठी उणीव भरून काढलेली आहे. सर्व अवतरणें व संदर्भ या पुस्तकांतून घेतलेले आहेत. या पुस्तकाचे कॉपीराइट प्रकाशकाच्या स्वाधिन आहेत.
टीप २ : Holistic: In nature a whole is larger than the sum of all its parts. साकल्य : निसर्गाची पूर्ण कृति तिच्या सर्व भागांच्या बेरजेपेक्षा अधिक असते.उदाहरण: पाण्याची वैज्ञानिक व्याख्या जरी "H2O" असली तरी पाणी त्याहूनही अधिक असते. बालकवींच्या कविता वेगवेगळ्या करून साहित्य शास्त्राच्या व सौंदर्य शास्त्राच्या चौकटीतून पाहिल्या की बरेंच कांही हातातून निसटून जाते.

© Remigius de Souza. All rights reserved.|

August 15, 2011

कुरूक्षेत्रानंतर..., महाश्वेतादेवी (समीक्षा)

मुखपृष्ठ: चंद्रमोहन कुलकर्णी
'कुरूक्षेत्रानंतर...', महाश्वेतादेवी । अनुवाद : वर्षा काळे । प्रकाशक : मेहता पब्लिशींग हाऊस, पुणे । २०१० । किं. साठ रुपये ।

अनुवाद: वर्षा काळे यांनी इंग्रजी भाषांतर चपखलपणे मराठीत बसवलेय. कांही नवीन पण समजायला सोपे शब्द आजच्या परिस्थितीनुसार येतात हे स्वागतार्ह आहे. जसे: राजवृत्त (राजा?) लोकावृत्त (प्रजा?) हे तत्कालीन परिस्थितीला योग्यच आहेत; जो बळी तो राजा. जे दुर्बल ते प्रजा! असे अनेक शब्द संवाद - गाणी - वर्णने यांत येतात. आणि विशेष म्हणजे राजवृत्तातील व लोकवृत्तातील सारी माणसे एकच बोली बोलतात. 'लोकांच्या' तोंडीं गांवठी भाषा घातलेली नाही.
अवतरण -१ अनुवादिकेचे मनोगत, 'कुरूक्षेत्रानंतर...', महाश्वेतादेवी
अनुवादिकेचे मनोगत : ही प्रस्तावना प्रसंगानुरूप लांबी-रुंदी-खोलीसह आहे. हे महाश्वेतादेवींचे मराठीत पहिलेच पुस्तक असावे! वर्षा काळे यांनी लेखिकेचा, आपला व दोघांचा संबंध याचे पुरेसे वर्णन केलेले आहे. नाहीतर हे पुस्तक अपुरे राहिले असते.

महाश्वेतादेवी यांचे 'कुरुक्षेत्रानंतर...' हा अनुवाद अंजुम सन्याल यांनी केलेल्या 'After Kurukshetra' या इंग्रजी भाषांतरावरून केलेला आहे. त्यांचे साहित्य, भाषांतरीत का असेना, मी पहिल्यांदाच वाचत होतो.
त्यांच्याविषयी - त्यांचे साहित्य, सामाजिक कार्य व त्याना मिळालेले पुरस्कार यासंबंधात - वर्तमानपत्रांत येणार्‌या बातम्या वाचत होतो. पण मुद्दाम शोधून कथा-कादंबर्‌या वाचणे मला जमत नाही. व सहज हाती आलेले साहित्य दर्जेदार असले तर मी वाचायचे टाळीत नाही.

प्रस्तुत समीक्षा एक मुक्तचिंतन
 महाश्वेतादेवींना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांचे फलीत काय झाले वा होतेय किंवा होणार हे माहित नाही, पण कोणीही कल्पना करू शकेल.

'कुरूक्षेत्रानंतर...' यांत तीन कथा आहेत. महाभारत-युद्धाने केलेल्या संहारानंतर राजवृत्तातील व लोकवृत्तातील स्त्रियांच्या अवस्थेवर या कथा आहेत. त्या उत्तरा, कुंती आणि सौवाली यांच्या भोवती गोवलेल्या आहेत.

या कथा राजवृत्त, उच्चभ्रू (elite) समाज व लोकवृत्त, शूद्र / आदिवासी (peasant /aborigine) जमाती यांच्या स्त्रियांना जोडतात, आणि दोन समाजांतील सांस्कृतिक (cultural) द्विभाजन (dichotomy) दाखवतात.
आज  हे चित्र अधिकाधिक स्पष्ट होत असलेले तर दिसतेच आहे आणि विकोपास जातेय हेपण दिसते.

पहिली कथा: 'पंचकन्या': उत्तरा ऐन तारुण्यात विधवा झालीय, अवाक, विमनस्क आहे. तिला रिझवायला भग्न रणांगणावरून पांच तरुणी तिच्या सख्या होतील या अटीवर आणल्या जातात; त्या दासी म्हणून यायला तयार नसतात. त्या उत्तरेच्या वयाच्या होत्या. त्यापण या युद्धात विधवा झाल्या होत्या, आपल्या पतींची कलेवरं शोधायला कुरुजंगलातील त्यांच्या गावातून आल्या होत्या.

अवतरण-२  'पंचकन्या', 'कुरूक्षेत्रानंतर...', महाश्वेतादेवी
अवतरण-३  'पंचकन्या, 'कुरूक्षेत्रानंतर...', महाश्वेतादेवी
राजवाड्यातील सर्व विधवा ज्या व्रतस्त आहेत आणि आदिवासी विधवा ज्यांना भविष्य आहे. अशी ही कथानकाची अत्यंत युक्त व परिणामकारक मांडणी आहे.

दुसरी कथा: 'कुंती आणि निषादीन' (निषाद आदिवासी स्त्री). वारणावत नगरातील लाक्षागृहात आपल्या पांच मुलांसह एक निषादीन आदिवासी स्त्री, कुंती व पांडवांच्याऐवजी जळून मेली होती. ही कथा सर्वांना माहित आहे. पण तिचे विश्लेषण येथे येते जे नजरेआड राहिले होते.
कुंती वानप्रस्थाश्रमात धृतराष्ट्र व गांधारी यांच्यासह अरण्यात राहात होती. त्या निषादिनीची ज्येष्ठ सून तिला शोधून काढते. ती कुंतीला तिच्या कपट कारस्थानाची आठवण करून देते व जाब विचारते. पण ती निरुत्तर होते.

तिसरी कथा : 'सौवाली' ही वैश्य स्त्री धृतराष्ट्राची दासी होती. त्यांचा अनौरस मुलगा सौवाल्य जो युयुत्सू नावाने ओळखला जातो. युद्धात तो पांडवांना जावून मिळाला होता.

अवतरण-४  'सौवाली', 'कुरूक्षेत्रानंतर...', महाश्वेतादेवी
'सौवाली' या कथेत कुंती, गांधारी व धृतराष्ट्र रानातल्या वणव्यात जळून मेले. व युयुत्सूने बापाचे तर्पण केले. (लेखिकेचे संदर्भ- 'महाभारत सरनौबत', लेखक - राजशेखर बसू। सौवाली: संदर्भ- 'पौराणिक अभिधान', लेखक- सुधीनचंद्र सरकार)

या कमीअधिक लांबीच्या तीनही पौराणिक कथेत लेखिकेने तत्कालिन सामाजिक, सांस्कृतिक व नैसर्गिक वातावरण निर्माण केलेले आहे. शब्दांचा मितव्यय डोळ्यांत भरणारा आहे.

महाभारत वाचताना तत्कालीन वातावरण आपल्या ध्यानात- नजरेसमोर क्वचितच येते. तत्कलीन लोकसंख्या किती असेल हा विचारपण आपल्या मनास कधी शिवत नाही. किंबहुना आपले लक्ष गोष्ठीत गुंतलेले असते.

लेखिकेला हे कसे साध्य झाले याचे कारण ती नागरसमाजाचा एक भाग आहे, व तिचा आदिवासी जमाती व लोकसमुहांचा व्यासंगपूर्ण अभ्यास. आदिवासी प्रागैतहासिक काळात आजही रहात आहेत असं म्हणता येणार नाही.

आदिवासी संस्कृती जतन करायचा वैश्विक वारसा
पण त्यांची सांस्कृतिक मूल्ये व जमातीचा एकसंध आकारबंध मात्र अबाधित आहेत, जी त्याना निसर्गमातेशी जोडून ठेवतात. पांच हजार वर्षे सर्व जगभर नागरसमाजांनी केलेल्या उच्छेदांतूनही ते टिकून आहेत त्याचे हेच कारण. गेल्या पांचशे वर्षांत मात्र वसाहतवाद्यांनी अनेकांचे शिरकाण केले.

या कथांत आदिवासींची निसर्गाशी संवाद साधून राहाण्याची धारणा व जीवनरीती (जीवनशैली नव्हे) ही त्यांच्या घर-परिसराची प्रसंगोचित वर्णने, संभाषणे, गाणी,  प्रसंगयोजना यांतून लेखिकेने सूचकपणे दाखवली आहेत.

त्याचबरोबर युद्धाच्या भीषणतेचे सम्यग दर्शनपण येथे आहे! खरं पाहाता पहिले व दुसरे जागतिक महायुद्धें, गेल्या शतकात जगभर झालेली अनेक युद्धें, कलिंगचे युद्ध, पानिपतचे युद्ध आणि या पौराणिक यद्धांत काहीच लाक्षणिक फरक नाही.

फक्त एकदा वेगळे घटित घडले : सम्राट अशोकाची उपरती व मन:पालट. अन् त्याचा इ. स. दोनशे वर्षांपूर्वीचा अहिंसक वसाहतवाद! अनन्यसाधारण!

महाभारत एक कालातीत ((timeless) कृती! त्याची आतापर्यंत अनेक रूपांत, माध्यमांत - दशावतारापासून कार्टूनपर्यंत - कोट्यवधी पारायणे जगभर झाली असतील.

या तीन कथा मात्र त्यांतील एका दुर्लक्षित भागावर नजर टाकतात. हा आहे आदिवासी संस्कृती आणि नागरी समाज यांतील द्वैत (dichotomy) व त्यांतून निर्माण होणारा संघर्ष.

तसं पाहिल्यास एकलव्य, नागवंशी आदिमजमातीच्या निसर्गनिवासाचा, खांडव वनाचा, विनाश आणि त्याचे पर्यावसान म्हणून पांडवांचा झालेला कुळक्षय या ठळक कथा अनेकांस माहित आहेत. पण तत्कालिन नैसर्गिक व सामाजिक पारिस्थितिकीवर होणार्‌या परिणामांचा विचार कोणी केला असल्यास माहित नाही.

मानववंश व पुरातत्व या शास्त्रांचा उदय गेल्या दोन शतकांतला. आपल्या देशातील बहुतत्वी समाजाला 'मानववंशशास्त्र' या विषयाचा अभ्यास शिक्षणाच्या सर्वच शाखांत अत्यंत निकडीचे आहे. विषेशतः इतिहास विषयात याचा सर्व शैक्षणिक स्तरांवर समावेश केला पाहिजे. सरकारी अंमलदार-दरकदार-सांसद-आमदार-खासदार यांस विशेष धड़े देण्याची व्यवस्था करायला हवी!

आजच्या सुशिक्षितांसाठी आधुनिक शिक्षणाची गरज 
पर्यावरणाच्या शास्त्रोक्त विचाराला चालना मिळाली ती गेल्या पन्नास वर्षांत. पण प्राणी व वानसें मात्र पर्यावरणासंबंधांत अज्ञान नसतात; नवजात बालकपण संवेदनशील असते. कृषीवलांचा तर पर्यावरण, पारिस्थितिकी व ऊर्जा यांच्याशी रात्रंदिवस संबंध येतो, भले ते उच्चभ्रू वर्गासरखे वाचाळ नसतील!

आमच्या सरकारने तर आता इयत्ता पहिलीपासूनच पर्यावरण हा विषय शिकवायला सुरवात केलीय. खरं पाहता पंतप्रधान-मुख्यमंत्र्यापासून ते पटेवाल्यापर्यंत सर्वांसाठी या विषयाच्या खास सक्तीच्या शिकवण्या द्यायला हव्या. मग प्रगतिची कोणत्या क्षेत्रात अधिक गरज आहे ते सरकारला थोडेफार कळेल.

महाभारतातील एक अवतरण वाचलेले आठवते. पांडव अज्ञातवासात होते. ते वनात रहात असताना तेथल्या ऋषीँनी त्यांना सांगितले, "त्या वनांत त्यानी एकाच जागी तीन दिवसांहून अधिक काळ वसती करू नये. नाहीतर वनाचे जळ-जमीन-वानसे-वनचर नैसर्गिक संतुलन बिघडते."
हे अवतरण अर्थातच सर्व युगांतील व प्रदेशांतील सरकारांना उद्धेशून आहे. पण व्यवहारात याचा उपयोग फ़क्त अवतरणापुरता मर्यादित राहतो.

दुर्गा भागवत, लेखक व मानववंशशास्त्रज्ञ, यांनी अदिवासींचा अभ्यास व संशोधन त्यांच्या परिसरांत जाऊन केले होते, व बरंच साहित्य पण इंग्रजी व मराठीत लिहिलं. त्यानी आदिवासींच्या लोककथापण मराठीत आणल्या. दुर्गा भागवतांनी 'व्यासपर्व' या पुस्तकात लिहिलेली एकलव्याची व्यक्तिरेखा (मोहरीतली ठिणगी) आठवणीत कायम लेणं कोरून राहिलेली आहे.

महाश्वेतादेवींच्या या तीन कथा ('कुरूक्षेत्रानंतर...') आपले स्थान ध्रुव तार्‌यासारखे कायम करतात. कारण साधेच आहे : उत्तर/ दक्षिण/ पूर्व/ पश्चिम, कोठेही गेलो तरी ही अवस्था अनेक अवतारानी सतत नजरेस येते. मानवतेची नागरी संस्कृतिच्या शापातून कधी सुटका होईल माहित नाही?

टीप: आदिवासी घर व परिसर (पहाः Tribal Housing and Habitat -1) या विषयाचा, आणि त्या अनुषंगाने येणारी इतर अंगांचा (पहा:TRIBAL SKILLS - आदिवासी हुन्नर), अभ्यास मी काही वर्षें केला. त्यातून बरंच काही शिकायला मिळाले. त्याची नोंदणी नंतर केली. या पुस्तक-परिक्षणाची पाळेमुळे माझ्या या स्वतंत्र अभ्यासात आहेत आणि त्याचे श्रेय सर्व आदिवासी जमातींना जाते.

रेमीजीयस डिसोजा
१५ ऑगस्ट २०११ 
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.| Page copy protected against web site content infringement by Copyscape

April 25, 2011

टिपणीचे प्रकार अनेक: मौन आणि इतर

जीवनाच्या दिशा व मार्ग

टिपणीचे प्रकार अनेक: १ मौन, २. अनुक्रिया, प्रतिक्रिया. प्रतिसाद, टिका, समीक्षा, पुरवणी, प्रशस्तीपत्र, शेरे-ताशेरे, शेले-शालजोडीतले इ.

१. मौन, हे श्रेणीने व संख्येने सर्वांत प्रथम क्रमांकाला आहे. पण मौन नेहमीच शहाणपणाचे असते असे नाही. कारणे काहीही असोत, पण त्यात आपले हितसंबंध गुंतलेले असतात नक्कीच! मौनपण बोलके असते, ऐकता आले पाहिजे. उदा. इंडियाच्या सरकारला बहुसंख्य असलेल्या दुय्यम दर्जाच्या नागरिकांचे मौन ऐकू यात नाही. यास्तव सर्वच लहान-मोठ्या राजकीय पक्षांना सत्तेसाठी गटबाजी करायला लागते.

२. अनुक्रिया, प्रतिक्रिया. प्रतिसाद, टिका, समीक्षा, पुरवणी, प्रशस्तीपत्र, शेरे-ताशेरे, शेले-शालजोडीतले इ. कोणतीही घटना आपण पाहतो, ऐकतो, वाचतो किंवा तिची चव घेतो तेव्हा मन निर्विकार, सुन्न असतेच असे नाही. नवरसांपैकी कोणतातरी रस उद्भवत असेल की?

घटना वैयक्तिक किवा सार्वजनिक क्षेत्रात असेल. आजचे जीवन एवढे जटील झालेले आहे की क्षुल्लक वाटणारी घटना दूरगामी परिणाम करू शकते. एक म्हण आहे, 'फुलपाखरू वादळ आणते'.

आज जो लाचखोरी, हेराफेरी, काळाबाजार, दडपशाही, भ्रष्टाचार इ. यांचा अचानक डोंब उसळलेला दिसतो त्याची सुरवात पण अशीच झालेली असेल. एकाद्या मौन प्रतिक्रियेने? किंवा निरुपद्रवी वाटणार्‌या घटनेने? आणि आज त्याचे चटके सर्वानाच लागत आहेत.

टिपणीचे स्वरूप मौन असो की शाब्दिक, ही पण घटना असते अन्‌ काहीतरी सांगून जाते. टिपणीमुळे घटनेच्या विषयाला कधी जोड मिळते, कधी नवी बाजू समोर येते. चूका नजरेस येतात. आणि व्यक्ती समष्टीला जोडल्या जातात.

एकाद्या घटनेचा विषय जर लोकहिताचा असेल तर खर्‌याखुर्‌या लोकशाहीत दखल घेतली जाते.

याचे एक उत्तम उदाहरण: अमेरिकेत एक फोटोग्राफर नियमितपणे तेथील अनेक कारखान्यात काम करणार्‌या बाल मजूरांचे फोटो वृत्तपत्रात प्रसिद्ध करीत असे. त्याचा परिणाम 'बालमजूरी विरोधी कायदा' करण्यात झाला. त्याने काढलेले फोटो पण तत्कालीन समाजावर केलेली निर्भीड टिपणी होती. अशी अनेक उदाहरणे असतील.

घटना: समोर दिसणारी/घडणारी वस्तुस्थिती ही एक घटना, व दुसरी – शब्दचित्र, रेखाचित्र, रंगचित्र, शिल्पचित्र, छायाचित्र, किंवा चलत्‌चित्र इ. अशा स्वरूपाची – कला या सदरातील असेल.

खरं पाहता ही सर्व चित्रे तत्कालीन समाजावर केलेली टिपणी असते, पण ती निस्पृह असतेच असे नाही. आजची वस्तुस्थिती ही भूतकाळ आणि वर्तमान यांचा संमिश्र परिणाम असतो.
दोनही घटना – वस्तुस्थिती वा चित्रे  –  पाहताना एक लक्षात आले. माझ्या आवडी-नावडी, पसंती-नापसंती, पूर्वग्रह, अत्याग्रही मते, संस्कार इ. सर्व मी केवल सत्य समजून माझे निर्णय घेतो. अनाहूतपणे मी एका चाकोरीत चालतोय. त्यापलिकडे असलेली वास्तविकता टाळतो. रोजचा पेपर वाचतानाही असेच! फक्त आवडीचे सदर पहायचे. बाकीचे दरवाजे बंद!

अधिक युक्त उदाहरण म्हणजेः मी स्वतःला दिवसात अनेकदा आरशात पाहतो, पण आंतला मी बघायचा आरसा माझ्यापाशी नाही अन्‌ मला हे कधी जाणवत पण नाही! पण आरशात दिसणारा मी उलटा दिसतो, मी मागे सरलो हा पण दूर जातो!
हे निरिक्षण माझे नव्हे, सुमारे दीडशे वर्षांपूर्वी एका बालिकेने Alice in Wonderland या पुस्तकाच्या लेखकाला, लुईस कॅरोल याला हे निरीक्षण सांगितले होते. (त्यावरून त्याला Through the Looking-Glass हे पुस्तक लिहायची स्फूर्ती मिळाली.) लहान मुले कधी चाकोरीत बंदिस्त नसतात, तीं सृष्टीच्या नियमाने चालतात. पण वडिल माणसे, पालक. शाळा, संप्रेषणाची आधुनिक साधने इ. त्यांची सहजता, निरागसता, उत्स्फुर्तता शिक्षणाच्या नावाने हिरावून घेतात.
अखेर मला गुरू भेटला. आनंद कुमारस्वामींनी मला विधायक, सर्जनशील टीका शिकवली. माझ्या मगदुराप्रमाणे मी शिकलो.

आपल्या सात संवेदना व संवेदन-सक्षमता (माझी इंग्रजी लेखमाला) क्रियाशील असतील तर कोणतेही घटीत साकल्याने समजणे शक्य असते.

― रेमीजीयस डिसोजा, मुंबई
प्रतिमा: "जीवनाच्या दिशा व मार्ग"; ही पण आपल्या जीवन-शैलीवर (life-style?) टिपणी आहे असं समजावं.
~ ~ ~ ~ ~ 
© Remigius de Souza. All rights reserved.| Page copy protected against web site content infringement by Copyscape