Showing posts with label औद्योगीकरण. Show all posts
Showing posts with label औद्योगीकरण. Show all posts

June 25, 2012

पर्यावरणाची अनेक अंगे

 पर्यावरणाची अनेक अंगे

रेमीची स्व-प्रतिमा 
पर्यावरण केवळ निसर्ग हवामान व जलवायूतापमान यांच्यापुरते मयादित नसते. हा चक्क अपसमज आहे. कारण विज्ञान केवळ वस्तुस्थितीचे एकेक अंग घेऊन विश्लेषण करते.

वास्तू  


पर्यावरण सुरू होते अन्न, निवारा व वस्त्र या तीन गरजांपासून; त्यात परिसर पण आला. मग आपण निसर्गनिवासात असूं कि नागरीनिवासात असूं. याला "वास्तू" हा देशी शब्द आहे. याचा अर्थ विस्तृत आहे. त्यात झोपडी, प्रासाद, मंदिर, उपवने, पाणोठा - तलाव, रस्ते, नगर इत्यादिंचा साकल्याने समावेश  होतो. घर किंवा वास्तू मूलतः नैसर्गिक पर्यावरणात आपले उष्णता, हींव, वारा, पाऊस इत्यादिपासून संरक्षणासाठी राहाणीयोग्य बदल करते. अर्थातच निवारा या गरजेबरोबरच अन्न आणि वस्त्र ही पण आली.

औद्योगिक क्रांतिने नगरनिवासांची अनेक कप्प्यांत - रहिवास, काम, प्रवास, पर्यटण, खेळ, शिक्षण, मनोरंजन इ. विभागणी केली.

औद्योगिक क्षेत्राचे अधिष्टान विज्ञान असल्याने त्याच्या सर्वच कारभारात कार्याँची कार्यशाळांत विभागणी केली जाते. अर्थातच त्यात सकल (holistic) दृष्टीचा अभाव असतो. त्यामुळे घर ही पण रांधायचे, जेवायची, झोपायची, पोरांची पैदास करायची (न करायची) कार्यशाळा बनते. व माणसे आकडेवारीत मोडतात. 

शिक्षण द्यायची / घ्यायची कार्यशाळा, कामाची कायशाळा (कारखाना हपीस इ.), तसेच रोग्याची कार्यशाळा, दवाखाना, खेळायची कार्यशाळा पटांगण, वगैरे वगैरे. सर्व काही रीतसर एकेका रकान्यात बसवलेले! याच्या / याचा अनेक अर्थाँपैकी एक असाः आपल्याकडे जशा अनेक जाती उपजाती आहेत तशाच औद्योगिक समाजाने पण निर्माण केल्या - उद्योगपती कारखानदार अंमलदार राष्ट्रपती प्रधानमंत्री  मंत्री नोकरशाही प्रव्यवसायिक कामगार-किसान-जवान वगैरे - त्यांचे नाव वर्ग! अर्थ तोच.

याचा परिणामः इंडियन समाज "जाती आणि वर्ग" यांच्या उभ्या व आडव्या विभागणीच्या विषारी जाळ्यात अडकला.

अनिर्बंध औद्योगिक विकास


अनिर्बंध औद्योगिक विकासामुळे नैसर्गिक पर्यावरणाची अमाप हानी तर झालीच पण पर्यावरणाच्या, सामाजिक पर्यावरण, आर्थिक पर्यावरण, राजकीय पर्यावरण, शहरी पर्यावरण, या अंगांची पण बेसुमार हानी झाली. ही सर्व अंगे एकमेकाशी निगडित व परस्परावलंबी असतात. त्यासाठी बहुसंख्य भारतीय समाजाची आजही तयारी नाही. विदेशात काही वेगळे होत नाही. 

वैज्ञानिकानी आणिक एक विभाजन केलेले आहे. ते म्हणजे पर्यावरण, पारिस्थितिकी व ऊर्जा वेगळे केले. हे तीनही निसर्गतः एकमेकाशी संलग्न व परस्परावलंबी असतात.

पर्यावरण - परिस्थितीकी - उर्जा ही निसर्गाची त्रिमूर्ती

 

पर्यावरण - परिस्थितीकी - उर्जा ही त्रिमूर्ती (trinity) सृष्टीतील सर्व जीवन व्यवहार एकाच क्षणी चालवते, त्यात सचिवलायासारखे खातेवाटप केलेले नसते, जेथे एक खात्याचे काम  दुसऱ्या खात्याला माहित नसते. एवढेच नाही तर ज्या एकंदर जीवमात्रासाठी सृष्टी हे काम करते त्या सर्वाना पर्यावरणाचे उपजत ज्ञान असते. जन्मत: आईच्या गर्भातून बाहेर आलेले मूल का रडते? कारण त्याच्या पर्यावरणात आमुलाग्र बदल होतो.
मग  वैज्ञानिकांनी या त्रिमूर्तीला कापून वेगळे का केले?
कारण ते सत्तेचे मिंधे आहेत. ही भेदनिती सत्ताधीशांच्या (औद्योगिक समाज) हितसंबंधातून आलेली आहे.
या समाजाचा उदय झाल्यापासून, दोन महायुद्धे तर झालीच, सर्व जगभर गेली दोनशे वर्षे सतत युद्धे चालू आहेत.
 

जागतिक गाव (global village) हे गोंडस नाव दिशाभूल करणारे आहे. सारा पृथ्वीतळ यांनी युध्दभूमी केलेली आहे: उर्जेसाठी युद्धे; व्यापारासाठी युद्धे; धर्मासाठी युद्धे; जमिनीसाठी युद्धे...  भूगर्भातील साधनसामग्री काढण्यासाठी यांनी निर्मनुष्य ध्रुव प्रदेश पण सोडले नाही; कीटकांचा नाश करायचे युध्द तर आपण रोज टीवीवर बघतो. या साऱ्या उप्द्व्यापाचे लक्ष्य एकच: सत्तेचे केंद्रीकरण.

या मुठभर (आजच्या जमान्यातील) कौरवांनी आपल्या स्व-अभिषिक्त एकाधिकार (monopoly) सत्तेसाठी सर्व जगभरच्या जळ-जमीन-जीव-हवा यांना वेठीस धरलेले आहे. आपल्या संगणकाच्या बटन-संचावरील प्रत्येक टिचकी कुणाच्या गंगाजळीत किती पैसे जमा करते याचा आपल्याला थांगपत्ता नसतो. (पहा: आंतरजाळें एक अत्यंत महागडे माध्यम
) परिणामत: अशिक्षित आणि शिक्षित - सुशिक्षित - प्रशिक्षित यामधील गर्ता वाढत जाणार. हा सामाजिक पर्यावरणाचा एक नमुना. 

आणखी एक समारंभ: ५ जून हा जागतिक पर्यावरण दिवस म्हणून जाहिर केलेला आहे. हा दर वर्षी साजरा केला जातो असे म्हणतात. जोवर माणसे - जनावरे - वानसे यांना न्याय मिळत नाही तोवर समारंभ कसले? हे तर जाहिर पाखंड!   
  अस्तु | 

~ ~ ~ ~ ~ 
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

April 08, 2012

विलायतेत वेळूची वट वाढते

विलायतेत वेळूची वट वाढते
प्रमुख शब्द :   विलायत - पश्चिमी देश. वाढते - उंचावते, वाढते:  उदाहरण - आमच्या संस्कृतीत जेवण वाढल्याने कमी होत नाही, ते वाढते; आणि जेवल्यावर अथिती 'Thank you' म्हणत नाही, तर आशिर्वाद देतो. 'तुका देव बरें करूं' बोलायची प्रथा बाटग्या कोंकणी किरिस्तावांतपण आहे.

बीबीसी न्यूजवर जेव्हा 'Booming bamboo: The next super-material?' ही बातमी वाचली तेव्हा मी हरखून गेलो. म्हटले आज सूर्य कुठे उगवला!
पण मी जेव्हा त्या बातमीची छापिल प्रत काढून वाचली तेव्हा मला रडावे की हसावे कळेना. माझा विलायते संबंधीचा उरलासुरला भ्रमनिरास मात्र झाला.
आज लोकशाही असो की हुकुमशाही, दोन्ही दृश्य-अदृश्य भांडवलशाही सत्तेच्या मिंध्या! यांना 'अरबी-वसंता'सारखा झटका कधीतरी लागल्यावाचून या सत्ता वळणावर येणार नाहीत.

बांबूला आतापर्यंत "गरीबांचे लाकूड" - "Poor persons' timber" म्हटले जात होते. त्याचे या सत्ता व नफा यांची चटक लागलेल्या भांडवलवाद्यांनी एका रात्रीत बारसे केले : 'विसाव्या शतकाचे लाकूड' - "timber of the 21st Century".
साखरेत घोळलेल्या या नावाआड लपलेला भांडवलशाहीचा 'नवा वसाहतवाद' संपूर्ण लेखाच्या शब्दा-शब्दांत उघड दिसतो. एकविसावे शतक म्हणजे का जादूची कांडी आहे?

बीबीसीच्या बातमी पत्राची भाषा पहा. बांबूच्या उत्पादनाचे त्यांचे माप 'डॉलर' हे चलन आहे, नाही मण, नाही टन आणि नाही 'जमीन' की उत्पादक जनतेची 'जान'! हा 'डॉलर' कधी घसरेल याचा नेम नाही, आणि उत्पादक जनता उपासमारीला बळी जाईल! असे हे पाखंड!
आजच्या जाहिरातबाजीच्या युगात एक असत्य खूप वेळा पुन्हापुन्हा सांगितले की सत्य म्हणून खपवता येते, ही गोबेल्सची नीती सदाकाळ चालत नाही हेपण तेवढेच खरे. मात्र दलितांच्या ध्यानांत ते चटकन येते.

आपल्याच लोकशाही देशाचे उदाहरण घेऊ. नेहरूंची कारकीर्द ते आजपर्यंत किती महाभागांना पुढील विचार शिवला असेल : देशातील सहा लक्ष खेड्यांतील, तेव्हा ४० कोटी, आता १०० कोटी, खेडूत 'केव्हा व कसे व कधी' आपापल्या परिसरांत रस्ते, पूल, शाळा, कॉलेजं, दवाखाने, बँका, कारखाने इत्यादि सोयी स्वतः बांधतील, चालवतील व सांभाळू शकतील? की त्यांनी त्यांच्या दैवानुसार युगानुयुगे तत्कालीन मायबाप सरकारांचे कायम आश्रित होऊन राहायचे?

बांबूची आणि ग्रामीण व आदिवासी जनतेची सोबत हजारो वर्षांची पुरातन आहे. बीबीसीच्या या लेखात जर नवीन काही असेल तर बांबूचे बहुल उत्पादनासाठी भांडवल करायचा सुतोवाच. बस्स! एवढंच! बहुल उत्पादन mass production म्हणजे सत्तेचे केंद्रीकरण हे पर्यायाने आलेच की!
हवा, पाणी, पशू, पक्षी, रक्त... एवढेच काय, इतर मानवसमूहांचे दारिद्य्रपण, कोणत्याही वस्तूचे स्वार्थासाठी भांडवल करण्यात यांचा हातखंडा प्रख्यात आहे.

मितव्ययाच्या साधनाने अपव्यय करण्यात विलायत विख्यात आहे. अशी कितीक उत्पादने असतील ज्यांचे आयुष्य भाताच्या रोपाएवढेपण नसते. तेवढ्यात एकेका नमुन्याची (model) नवी सुधारलेली आवृत्ति बाजारांत येते. जुनी उत्पादने जातात मोडीत.

भाताचे रोप पन्नास दाणे तर देतेच, पण त्या वानसाचा अंशही वाया जात नाही, त्याचे जैव खत होते. आणि जेवणानंतर खरकटं उकिड्यावर किडेमुंग्या, पशूपक्षी यांच्यासाठी रवाना होते. असे हे आमचे देशी मानक (Standard). आमचे सरकार मात्र जागतिक मानकांच्या (Global Standards) सदा मागे लागलेले असते. या संदर्भात सृष्टीच्या सर्व कृतींच्या आलेखनाची मनोज्ञ व्याख्या एका पाश्चात्य शास्त्रज्ञाने केलेली आहे ती उद्धृत करतो.
 THE ATTRIBUTE TO DESIGN IN NATURE
 “In whole organisms, randomness structure is uncommon. Everything seems finely tuned by brutal rigours of natural selection. There are no spare limbs to be found and hardly any dispensable organs. This forced economy of organism design has always limited the use of bodily form as evolutionary timepiece" (Martin Jones, The Molecular Hunt, Penguin 2002).

"पैशाकडे पैसा जातो" एक म्हण आहे. हे कसं घडतं? भांडवलशाही समोर एकच उद्धिष्ठ असते : पैसा हेच 'साधन' आणि पैसा हेच 'साध्य'. जेव्हा साध्य व साधन एक होतात तेव्हा कार्य सिध्दीस जाते. लोकशाही सरकारचे 'साधन' आणि 'साध्य' जर जनता असेल तरच खरोखरीचा विकास व प्रगती साध्य होतील.

वेळू व वेळूचे बेट किंवा वेळूवन सुदृढ जमातीचे वानसांतील एक सुलक्षणी प्रतीक आहे. सर्व जीवमात्राशी याचा सलोखा आहे. गवताच्या जातींत भात, गहू इत्यादि अनेक रानटी जातींचे पुरातन काळात मानवाने गृहसंवर्धन केले. पण याचे मात्र करावे लागले नाही.
वेळू हे संतकोटीत बसणारे कालातीत eternal वानस आहे.

अत्याधुनिक उन्मत्त मानवी समाजांनी, आणि त्यांच्या देशोदेशींच्या देशी चमच्यांनी, सृष्टीपासून शिकावे तेवढे कमीच आहे.
Bamboo- Image BBC © 2012  
बांबूला हिरवं सोनं म्हटलंय : सिद्धार्थ जातकांत त्याला वैडूर्याची (cat's-eye) उपमा दिलीय.
— रेमीजीयस डिसोजा
रविवार ०८-०४-२०१२ (आज येशूच्या पुनरुत्थानाचा दिवस - कोंकणीत "इत्रूज" (Easter) म्हणतात. वेळूचे पण पुनरुत्थान होत असते. सृष्टीमातेस माझे सहस्र प्रणाम!)
--
Remigius de Souza
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.

December 27, 2011

मनोगत : औद्योगीकरण की पश्चिमीकरण

मनोगत: पश्चिमेचा समाज तीनशे वर्षे औद्योगिकरणाबरोबर वाढला. सहाजिकच त्याचा परिणाम त्यांची संस्कृती व भाषा यांवरही झाला. इंडीयात आम्ही फक्त उसनवारी करून घोकंपट्टी केली. मग मायबाप सरकारने समित्या नेमून परिभाषा कोश तयार करविले. पण प्रथम -- वाचणार कोण, आणि दुसरे, वापरणार कोण? ... इथे चार बुके शिकायचे वांधे!


~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape