Showing posts with label बळीराजा. Show all posts
Showing posts with label बळीराजा. Show all posts

June 15, 2011

तांबूस मायणी काम हवे कुणा

तांबूस मायणी काम हवे कुणा? : एक व्यत्यासकथा  (metafiction)
भातशेती
मुंबईत पावसाला सुरवात झालीय. गांवाच्या - कोंकणच्या आठवणीने काळजात उमाळे येतात. आता पेरणीला सुरवात झाली असणार! शेतात काम करायला घरांत - गांवांत माणसे उणी पडणार! जो उठला तो शहरात जातो. पूर्वी हातात चलन नसायचे, पण कधी कमतरता भासली नव्हती. आता चालनावाचून पाऊल पुढे पडत नाही... असे कैक विचार मनात खळबळ उठवतात.

तांबूस (brown) मायणी (collar) काम म्हणजे शेती - कृषीकला. इलेक्ट्रोनी-माहिती-तंत्र (ET-IT) युगांत अशा कामाला कोण बरें तयार होईल? सर्वांना सफेत मायणीचें किंवा निळ्या मायणीचें काम हवें असतें, नगद पैसे देणारें काम हवें असतें. कुणाला पोटापाण्यासाठीं काम नको. बापजाद्यांनी कमाई करून ठेवलेली आहे नं! मातीचिखलांत, ऊन-हींव-पावसांत शेतीकाम कोणाला करायाचे आहे? सुधारलेल्या प्रगत जमान्यात माती अस्पृश्य झालेली आहे आणि शेतकरी नगण्य झालेले आहेत.

शेतकाम म्हणजे कृषीकला, कला व विज्ञान यांचें संयुग; जैवतंत्राचे (biotechnology) उगमस्थान; पंचमहातत्वांशीं सतत संपर्क.

"उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ट नोकरी"
कोणता होता तो जमाना जेव्हां "उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ट नोकरी" ही म्हण आमच्या कानावर नेहमी यायची? त्यावेळीं आमचा देश स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावार होता. काय स्वप्नें पाहिलीं असतील आमच्या कष्टाळू कृषीवलानीं?

आज वेगळाच प्रकार नजरेस येतोय. शेतकरी कर्जबाजारी होतोय, आत्महत्येचा मार्ग पत्करतोय, सुयोग्य शिक्षणाला वंचित राहिलाय, त्याची जमीन औद्योगिक विकासासाठी सरकार कायद्याने हिरावून घेत आहे, त्याचा संसार कुटुंब विस्थापित होत आहे. अशा लाखों विस्थापितांचे लोंढे शहरांकडे लोटलेले आहेत. नगरानगरांत महानगरांत रस्तोरस्ती हे नजरेस पडतात आणि झोपडपट्टयांतून (सरकारी परिभाषेंत त्यांना "गलिच्छ वस्ती" हें नांव आहे). त्यांच्या या वस्त्या बेकायदेशीर समजल्या जातात.


मुंबईत विस्थापित - १
 
मुंबईत विस्थापित  - २
मुंबई शहराचे पद-चिन्ह जेथे जेथे उमटले तेथून विस्थापित झालेले खेडूत 
उदरनिर्वाहाच्या शोधात येथे दाखल झाले. आता त्यांच्या आयुष्यावर नव्हे तर 
  जीवावरच या शहराने पर्यायाने लोकशाही सरकारने "कर" लावलेला आहे.
(Taxing the Life of the displaced)

आणि अडत्यांना, दलालांना आता सुगीचे दिवस आलेले आहेत. आता नोकरदारांना पण हुद्यानुसार वरची कमाई होते असे ऐकिवात आहे.

"पांगिरा" करमुक्त चित्रपट
"पांगिरा" या नांवाचा चित्रपट हल्लींच पाहिला. करमणूक करापासून मुक्त आहे म्हणून पाहिला. विश्वास पाटिल यांच्या "झाडाझाडोरा" कादंबरीवर हा चित्रपट आधारलेला असावा असें वाटले. पण पुस्तकाच्या नांवाचा उल्लेख चित्रपटात दिसला नाही. या कादंबरीला अनेक पारितोषकें दिलींत. आजच्या ग्रामिण परिस्थितीवर चित्रपट व कादंबरी, दोनही चांगले माहितीपट आहेत. मला वाटते हा चित्रपट ज्या प्रसंगाने संपवला आहे पोलिसानी शेतकर्‌यांवर केलेला गोळीबार तेथून सुरू करायला हवा होता. तसं न केल्यामुळे पटकथेची सर्जनशील निर्मितीची संधी हुकली असं मला वाटतं. मला प्रांजळपणे वाटते की कलावंताने तत्कालीन समस्यांना उत्तरे द्यायला हवीत. सरकार मात्र दानशूर आहे. तें चित्रपटाला करमुक्ती - बक्षिसे - पदके देते. पण विस्थापितांच्या जीवावर घाण पाणी वापरायचा कर लावायला मागेपुढे पहात नाही. हे इंडियाच्या आर्थिक राजधानीचे खरे स्वरूप!

या निमित्ताने मला शरच्चंद्र चटर्जींची "सव्यसाची" – पथेर दाबी – ही कादंबरी आठवते.
या कादंबरीचा शरच्चंद्र चतर्जी यांनी केलेला शेवट साधा, स्वाभाविक व विधायक सर्जनशीलतेचा नमुना आहे. कथेचा विषय आहे, भारतांत सशस्त्र स्वातंत्र्यसंग्राम. या संबंधांत पुढील परिच्छेद पुढें उद्धृत करतों.

लोकशिक्षण व साक्षरता
"... इथून पुढे खेड्याची सेवा हे माझं एकमेव व्रत. असा एक काळ होता, की या आपल्या कृषिप्रधान भारतदेशाचा खेडेगाव हाच प्राण होता. खेडेगावच त्यांचं अस्थि-मज्जा-रक्त होतं. आज ते खेडेगाव विध्वंसाच्या मार्गाला लागलं आहे. पांढरपेशे लोक खेडेगाव सोडून शहरात येतात, शहरातूनच खेडेगावावर सत्ता गाजवतात आणि तिथूनच त्यांची पिळवणूक करतात. खेडेगावाशी त्यांचा लागाबांधा असेल तर तो हाच. दुसरा कसलाच नाही. न का ठेवीनात? पण आजवर ज्या शेतकर्‌यानं त्यांना पोटाला अन्न आणि पांघारला वस्त्र दिलं, तोच शेतकरी आज अन्नाला मोताद झाला आहे. निरक्षर आहे, निरुपाय होऊन मरणाच्या पंथाला लागलाय! यापुढं मी आता त्यांच्या कल्याणासाठीच स्वतःला वाहून घेणार. भारतीनंसुद्धा या कामी मला जीव तोडून मदत करायचं कबूल केलंय. आता आम्ही गावोगाव शाळा उघडूं. जरूर पडली तर त्यांच्या घराघरातून फिरून मुलाबाळांना शिक्षण द्यायचं काम हिनं पत्करलंय. माझा संन्यास देशासाठी आहे — स्वत:साठी नव्हे डॉक्टर." (पृ. ३९९-४००)
दर वर्षी देशांत विज्ञान-शाखांत लाखो पदवीधर तयार होतात. त्यांत वनस्पतीशास्त्रज्ञ पण असतात. त्यातले बहुतेक कारकुनी करण्यात बाकीचे आयुष्य खर्च करत असावेत? त्यांनी चुकूनही टिनाच्या डब्यात माती भरून मिरची, मोहरी, हळद आलं इ. रुजत घातली असतील का शंकाच आहे. त्यांचे शिक्षण प्रयोगशाळेतच राहते.
* * *
टीप:
१. "सव्यसाची" – बंगाली नांव: पथेर दाबी – या कादंबरीला ब्रिटीश सरकारने बंदी घातली होती, ती स्वातंत्र्यानंतर उठवण्यात आली. मामा वरेरकरांनी इचे मराठी भाषांतर केले. शरच्चंद्र देशांतील प्रत्यक्ष वस्तुस्थिती पूर्णत: जाणून होते. यात कुठही अतिरंजीत भाग नाही. कुठंही भडकपणा नाही.
२. वाचकांनी आपल्या अनुक्रिया - प्रतिक्रिया जरूर नोंदवाव्या.
~ ~ ~ ~ ~ 
© Remigius de Souza. All rights reserved.| Page copy protected against web site content infringement by Copyscape

May 02, 2011

नेता ऽ गिरी ऽऽ

सृष्टीयोग
विज्ञान युंगात सृष्टीची अनेक अंगे माहित झाली
पण त्याबरोबरच तथाकथित पुरोगामी समाजाची निसर्गापासून फारकत पण होत गेलीय.
आणि माणसांची माणसांपासून.
इंग्रजीत एक वाक्प्रचार आहे, 'किंग ईज डेड, लॉंग लीव द किंग' - राजा मेला, राजा अमर रहो! राजेशाही गेली. लोकशाही आली. आणि राजे लोकांची जागा पुढारी लोकांनी घेतली.

   हे झाले विशेषतः नव्याने आलेल्या लोकशाहींत. तसं पाहिल्यास जगातील प्रस्थापित लोकशाही देशपण याला अपवाद नाहीत. वासरांत लंगडी गाय शहाणी म्हणतात ना! नवे पुढारी तयार करण्यासाठी किती संस्थांचा, विद्यापिठांचा केवढा आटापिटा चाललाय काही विचारूं नका.

   रानडे - गोखले - गांधी - विनोबा यांची गुरूशिष्य परंपरा अनुभवाच्या पाठशाळेत, क्षेत्रिय अभ्यासांत (field study) कधीकाळी तयार झाली होती.

   आता पाठ्यक्रम तयार झालेत. पुस्तकी अभ्यासक्रम, वर्गाच्या चार भिंतीआड, अधूनमधून नमुन्याचे सर्वेक्षण, आणि तशाच धर्तीच्या देशीविदेशी पदव्या घेऊन आलेली प्राध्यापक मंडळी शिकवायला; अशी असते या पाठ्यक्रमाची रूपरेखा.

   अरे हो! आणि हमखास मदतीला आंतरजालाचे (Internet) प्रतिविश्व आहेच. त्यातली किती माहिती कधी कालबाह्य होईल हे कोणालाच, खुद्द लेखक / संपादक मंडळीलापण माहित नसते.

   मात्र प्राकृतिक जैवविविधतेत स्थानिक जळ, जीवन व जीव ही अनन्यसाधारण असतात; पर्यायाने त्यांच्या प्रभावाने स्थानिक लोकसंस्कृतिपण.

   ही वस्तुस्थिती किती पुढारी किंवा नेते ध्यानात घेत असतील याची शंकाच आहे. कारण ते शालेय शिक्षणाच्या एकसंवर्ध मशागतीत तयार झालेले असतात. आणि सृष्टीला मानवीय अधिश्रेणींची तमा नसते.

   सृष्टी कधी तथाकथित प्रगत नागरतेने निर्माण केलेली 'तृतिय पारिस्थितिकी' (Third Ecology) ओळखत नाही. तिच्यापुढे नेते महात्मे सारे नगण्य !

   आतापर्यंत सृष्टीची समज येण्याइतपत विज्ञान प्रगत झालेले आहे. खरं पाहता नि:पक्ष, विनापूर्वग्रह दृष्टीने कुणासही ही वस्तुस्थिती दिसेल. त्यासाठी विज्ञानादि शास्त्रांच्या मान्यतेचीपण गरज नाही.

   पण पांच हजार वर्षांच्या नागरी संस्कृतिच्या विचारधारेच्या संवयीने हे आमच्या गळी उतरणे सहजी शक्य नाही.

   शरद्चंद्र चटर्जींच्या (१८७६ - १९३८) स्पष्ट, रोकड्या शब्दांत सांगायचे तर :
'ही सारी बडबड - ही दर्शनशास्त्र वेदांताची बोली - हे नुसते शब्द - या शब्दांच्या जोरावर जग चालत नाही' (भैरवी - 'देना पावना', आ. १९६२ पृ. २१६).
   सृष्टीच्या लेखी समाज, धर्मसंस्था, राज्यसंस्था, अर्थसंस्था, राष्ट्रवाद, देशभक्ती, नेते-पुढारी, इत्यादी, किंबहुना निसर्गावर 'मानवी सत्ता' या शब्दांना काही अर्थ असू शकतो का?

टीप:१.  भैरवी (मराठी शीर्षक) - 'देना पावना' (कर्ज आणि तहशील) या कादंबरीत (१९२३) शरदबाबूनी शंभर वर्षांपूर्वीची देशातील खेडी, खेड्यांची व तेथील उच्चभ्रू व ग्रामिण-दलित समाजाची अवस्था वर्णन केलेली आहे. या कादंबरीचे भा. वि. वरेरकर यांनी १९४२ साली मराठी भाषांतर केले.
२.    आजच्या परिस्थितीचे आम्हीच साक्षी! फक्त आपल्या डोळ्यांवरचे वाद - विवाद - प्रतिवाद - युक्तिवाद - अपवाद... इ. चष्मे काढून बाजूला ठेवायचे व साकल्याने बघावे! एवढेंच!
३.   सृष्टीयोग हा काही कंपू नव्हे. प्रत्येकाचा सृष्टीयोग वैयक्तिक - स्वतंत्र मार्ग आहे.
 
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.| Page copy protected against web site content infringement by Copyscape

January 23, 2011

बळीराजा पाताळात एकविसाव्या शतकात

वामन-बळीराजा ही पौराणिक कथा आर्य-अनार्य यांच्या वंशभेदाच्या वैमनस्याचा नमुना! वंश-भेद, जाती-भेद, वर्ण-भेद, वर्ग-भेद, लिंग-भेद यांतील संघर्ष चालूच आहेत. त्यांच्या भरीला आता 'प्रथम जगत इंडिया' - 'तृतिय जगत व चतुर्थ जगत इंडिया' यांतील प्रथम-दुय्यम नागरिकत्वांच्या अलिखित संघर्षातून बळीराजाला अमानुष 'पंचम जगत इंडिया'त ढकलायचे कट आता रस्त्यावर आलेत.

 १.
जातीने सारस्वत, कर्माने नवशूद्र (प्रव्यवसायिक आर्किटेक्ट), पण रेमीचा पिंड आहे शेतकरी, धर्माने बाटगा किरिस्ताव, श्रध्दास्थान : सृष्टी (Mother Nature). तो जन्मला, पोसला, वाढला भातशेतीच्या कुणग्यावर कोंकणात. तो शिकला शाळा - कॉलेजच्या चार भिंतीबाहेरच अधिक : देशाच्या मुक्त शाळेत. त्याचा हा गोषवारा!
२. 
बियाणे पेरले की झाली शेती असं नाही; त्या अगोदर व नंतर अनेक कामे असतात. जमिनीची मशागत, बियाण्याचा साठा व निगा, पाचोळा - शेण इत्यादी सेंद्रीय खते, पाण्याचा योग्य पुरवठा जो मुख्यतः पावसाने होतो तसाच ओढे नदी नाले पण करतात, निंदणी, कापणी, झोडणी, भात - बियाणे - गवत - तांदूळ यांचा वर्षभर टिकेल असा साठा करून ठेवणे, कुरमुरे - पोहे - उकडे तांदुळ इ. प्रक्रिया ... अशी अनेक कामे वर्षभर एका पेरणीपासून पुढच्या पेरणीपर्यंत चालू असतात. हे कमीअधिक फरकाने इतर अन्नधान्ये व शाकभाज्यांच्या शेतीला लागू पडते. एवढेच नव्हे तर "आंबोळी, घावन, सांदण, शेवया, पिठले, उप्पीट..." अशा कैक खाद्य प्रकारांचे शोध किसनाच्या झोपडीत लागले. यांचा इतिहास कोणी लिहिला नाही. आणि यांचे संशोधक कोण हेही कोणाला माहित नाही.   
३ 
यास्तव शेतकरी साकल्याने [holistic] बघतो, विचार करतो. त्याला सरकारी नोकरशहा वा प्रव्यवसायिक वा शास्त्रज्ञ यांच्यासारखे चाकोरीत राहून, चालून, पाहून, विचार करून चालणार नाही; अशाने तो टिकूच [sustain] शकणार नाही.

शेतकरी नेहमीच सर्वांच्या नजरेआड राहिला. सारेच शिष्ट प्रतिष्ठीत उच्चभ्रू बोलतात 'भारत शेतीप्रधान देश आहे'. केवळ वायफळ वल्गना! शेतकरी नेमके काय काम करतो, त्या कामात किती मानव ऊर्जा, प्राणी ऊर्जा, सौर ऊर्जा, वायू ऊर्जा, जैव ऊर्जा, आणि जीवज ईंधन (fossil fuel) किंवा खनिज ऊर्जा, किती प्रमाणात वापरली जाते; त्याच्या कामात वर्षभर किती लोकांचा सहभाग असतो; यांची आकडेवारी कोणी कधी काढलेली ऐकिवात नाही. मात्र कारखान्यात तयार होणार्‌या मालाची व श्रमाची किती काटेकोर जंत्री तयार केली जाते बरे! कारण कारखाने - मालक व कामगार - यांच्या संघटना आहेत. कोंकणीत म्हण आहे, "नजरेआड मसाणपाड".

संकरित बिजां नसती नातवंडें 

आमच्या सरकारला गेल्या साठ (+) वर्षांपासून औद्योगिक क्रांती लोकांच्या गळ्यात मारायचा ध्यास लागलेला आहे, जणू काही जादूची छडी हाती लागली होती. त्यातच 'संकरित' बियाण्याची आयात करण्यात आली. 'घी देखी पर बड़गा नही देखा' अशी अवस्था झाली. (यामागचा खरा उद्देश भांडवलदारांचे हितसंबंध हाच असतो हे आतापर्यंत लोकांना समजून आलेले आहे.) 

संकरीत बियाण्याबरोबर रासायनिक खते, ट्रैक्टर, यांत्रिक नांगरणी - पेरणी - कापणी, धरणे-कालवे, धान्याना लागणारे रोग, जंतूनाशके, तृणनाशके, अधिक पाण्याची गरज, इ. आली. आणि कणखर देशी बियाणी नाहीशी झाली. जमिनीचा कस, मगदूर गेला. जमिन आणि जळ, दोनही, विषारी होत गेली.
७  
प्रयोगशाळेत तयार केलेली बियाणी, त्याबरोबर अधिक कसदार रासायनिक खते, आता शेतकर्‌याला बाजारातून विकती घ्यायला लागली. आणि किसानांची स्वायत्तता संपुष्टात आली. ते कर्जबाजारी झाले. शिक्षण व साधने नसल्यामुळे त्याना ही गृहोद्योग वा ग्रामोद्योगाद्वारे तयार करणे शक्यच नव्हते. आतातर जीनीय संकरित - GM - बियाणी आणायला सुरवात झालीय. यातून शेतकरी जगले वाचले तरी येत्या पन्नास ते शंभर वर्षात त्याना पूर्वीची स्वायत्तता पुन्हा प्राप्त होणे अशक्य आहे. काही किसानानी संकरित पिकातून बियाणे घेऊन दुसरे पीक घेण्याचा प्रयत्न केला, ते जेमतेम आले. तिसरे आले नाही. आता जा बाजारी!

सत्तेचे केंद्रीकरण 
८. 
अल्पसंख्य उच्चभ्रू नागरिकांचे 'प्रथम जगत इंडिया' सरकार औद्योगिकरणाच्या नशेने टूण झालेले आहे. कशाला, कोणाला प्राथमिकता द्यायची याचे तारतम्य त्याला राहिलेले नाही. नाहीतरी 'सरकार' शब्दच मुळी नपुंसक. हा राजदुर्विलास नाही तर दुसरे काय? जी संकरीत बीजांची दशा ती आधुनिक सरकारची! याना नाही इतिहास माहित, ना वर्तमानाची ओळख!

'सत्तेचे केंद्रीकरण' सर्वच नागरी समाजांचे (civilized societies) व्यवच्छेदक लक्षण आहे. पूर्वी राजसत्ता धर्मसंस्थेला भागीदार करीत असे, आता ती यंत्रौद्योगांना हाती धरते एवढाच फरक. 'बाजार' (market) हे केवळ त्यांचे साधन - आयुध आहे, सोय नव्हे, सामान्य जनांची तर कदापी नाही. ते झाले 'बाजारा'च्या स्वाधीन अन्‌ बिनचेहर्‌याच्या सत्तेचे गुलाम.
१०
भांडवलदारशाही धार्जिण्या सरकारने अभिनिवेशात येऊन मुक्त बाजार खुला केला. पण दारिद्य्राने पिडलेल्या ९० कोटी ग्रामीण जनतेवर काय परिणाम होईल याचा हिशेब केला नाही. परिणामतः विषमतेची गर्ता वाढत गेलेली आहे. सहा लक्ष खेड्यांचे सर्वेक्षण करायला सरकारकडे यंत्रणा आहे कुठे? नमुना (sample) सर्वेक्षण करून काम भागवतात झाले. ते किती विश्वासार्ह असेल याची शंकाच आहे! गेल्या दशकात किती किसान कुपोषण, कर्ज, रोग, आत्महत्या इ. कारणानी देशभर मृत्युमुखी याचा विश्वाहार्य आकडा कुणीच सांगत नाही - ना सरकार, ना पत्रकार, ना चळवळ्या (activist) व्यक्ती वा संघटणा. (अर्थात सरकार म्हणजे सत्तेवर असलेले व विरोधी पक्ष, प्रशासन, न्यायसंस्था आणि इतर शासकीय संघटना.)
११

Domestication of rice in Asia. Source: Internet
नकाशा : १  

कृषीक्रांती सुमारे दहा हजार वर्षांपूर्वी तैग्रीस - युफ्रेटीस या नद्यांच्या परिसरात तसेच चीन व आसामात सुरू झाली व सर्व जगभर पसरली. तेव्हा देश नव्हते. त्यावेळी नगरे व नागरी समाज नव्हते. यास्तव राज्ये - साम्राज्ये नव्हती. ते सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी अस्तित्वात आले. ही तथाकथित सुसंस्कृत समजल्या गेलेल्या नागरी समाजाची व संस्कृतिची (civilized society and culture) सुरवात. ती मुख्यतः श्रमाची विभागणी व सत्तेचे केंद्रीकरण यांवर आधारलेली होती अन आजही आहे. आज तर तो तीव्रतेने आत्मकेंद्री, सनातनी (orthodox), आतंकवादी / अतिरेकी (terrorist / extremist) व असहिष्णू झालाय एवढाच फरक. समाज जेवढा प्रगत तेवढा अधिक सत्तापिपासू, अधिक धनलोभी. त्यांची दानशूरता केवळ आयकरात माफी / सूट मिळावी, किंवा त्यांना वा त्यांच्या मालाला प्रसिद्धी मिळावी यास्तव असते.

संबंधित लेख :
  1. Farming and the Politics of Education in India: Challenges of 21st Century
  2. Emergence of The Fifth World India (सचित्र)

सरता पालव 
१२. 
अर्वाचीन युगात 'गरज आणि हवस' (needs and wants) याचा याचे साधे आलेख उद्धृत करतो.

World Population and human advances ©Taiganideds, 1978
आलेख :  १ 

World energy consumption. ©Taiganideds, 1978
आलेख : २  

यात ई. स. १००० पासून विसाव्या शतकापर्यंतची जगाची लोकसंख्या व भौतिक प्रगती दाखवलेली आहे.

टीपा :
१.  श्री. अण्णा हजारे, महाराष्ट्र, व राजेंद्र सिंह, राजस्थान हे त्यांच्या पर्यावरण आणि जलसंधारण या कामांसाठी सर्वश्रूत आहेत. इतरही संस्था आणि व्यक्ती आहेत.
२ . श्री. दाभोळकर यांनी द्राक्षाच्या लागवडीत केलेले संशोधन आणि त्याचा लाभ शेकडो शेतकर्‌याना प्रात्यक्षिके करून दिला. विशेषतः लहान जमिनीत अधिक पीक कसे काढावे हे त्यानी शिकवले. त्यानी लिहीलेल्या 'विपुलाच सृष्टी', 'केल्याने होत आहे रे', आणि 'आपल्या हाता जगन्नाथ' या पुस्तकानी मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे.
३. "बळीराजा : व्यापारी शेतीचे मासिक" श्री. प्र. बा. भोसले, पुणे, यांनी  अत्यंत बिकट परिस्थितीत चालवले आणि नावारूपास आणले. अर्थातच त्याचे वर्गणीदार व मुख्य आधारस्तंभ शेतकरीवर्ग आहे.
४. कृषी क्रांती: जंगलांतील वानसे आणि पशु यांना माणसाळवणे व गृहसंवर्धन करणे (domestication). हा सद्ध्या गाजावाजा होत असलेल्या "biotechnology"ची सुरवात आहे. दुधाचे दही करणे हा पण बायोटेक्नोलोजीचाच प्रकार आहे.
५. वरील नकाशा आणि आलेख यांवर रेमीजीयस डिसोजा याचे मालकी हक्क नाहीत. हे फक्त शैक्षणिक उपयोगासाठी आहेत.
~ ~ ~ ~ ~ 
© Remigius de Souza. All rights reserved.|
Page copy protected against web site content infringement by Copyscape

January 18, 2011

मकरसंक्रांतीच्या सर्वाना शुभेच्छा

'एक तीळ सात जणात वाटून खावा'  
ही म्हण मराठी अस्मितेला सामाजिक बांधिलकीची अनाहूतपणे जाणीव देते. किती हृद्य परंपरा! विषेशतः संक्रमण काळी हे फारच जाणवते.
Winter in Mumbai : मुंबईत शिशिर ऋतू
भौगोलिक काळात पृथ्वीचा आंस बदलला काय अन् ऋतुंचा चमत्कार झाला. जैवविविधतेत फरक झाला. हवामान बदलले. उत्तरायण आले : सूर्य (!) दक्षिण गोलार्धातून उत्तरेकडे जाऊ / जाताना दिसू लागला.

इंडियात सहा ऋतू आहेत. तर चीनमध्ये २४ ऋतू ओळखले जातात; तेथे दर पंधरवड्याला ऋतू बदलतो: हा संवेदनशील निरिक्षणाचा निष्कर्ष. ध्रुवीय प्रदेशांत सहा महिने दिवस (की संध्या?) - सहा महिने रात्र! सृष्टीचा असा हा सतत चालणारा चलत्‌चित्रपट! नित्य नवा! सृजनशीलांचे - व्यक्ति व समष्टीचे - कधीही न आटणारे हे स्फूर्तीचे संपन्न भांडार (No copyright attached here or price-tag)!

संक्रातिच्या दिवशी वसंत ऋतु नवा उल्हास घेऊन येणार याची आशा पालवते.
असे वसंत आपल्या आयुष्यात पण आले तर किती मजा येईल! पण त्यासाठी मानवाला वानस व्हावे लागेल आपल्या बुद्धिमत्तेचा अहंकार सोडून. पण ते कसे शक्य आहे?

खरं तर 'प्रथम जगतात' सर्व ब्लॉगवाल्यांचा हा अंतरिक्षाला जोडणारा दिवस खास असायला हवा.
नकळत, या तीळ वाटायच्या देशी परंपरेची आठवण देणारा हा दिवस त्यानी साजरा केला नाही तरी, ज्ञानविज्ञानाची भांडारे खुली करून, हे संक्रमणाचा दिवस रोजच साजरा करतात नाही का! आणि इंटरनेटवर इतरही अनेक : Wikipedia, Firefox, Open Office, WikiLeaks इ. त्यातलेच नाहीत का? हे सारेच लोकशाहीचा खडतर मार्ग सुकर करायला हातभार नाही का लावित?
जेवढी भौतिक प्रगति अधिक तेवढी लोकशाहीची वाट ज्यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत ते अधिक बिकट करणार यात शंकाच नाही.

एका जगात अनेक 'जगते'

'प्रथम जगत इंडिया' शिवाय अर्वाचीन युगात इतर जगते पण आहेत.
'तृतीय जगत इंडिया' कृषिवलांचे, जे तीळ तसेच अन्नधान्यादी लागवड करतात; 'चतुर्थ जगत इंडिया' निसर्गनिवासी आदिवासींचे; आणि 'पंचम जगत इंडिया' विस्थापित, बेघर, बेकार व स्थलांतरण झालेल्यांचे.
'पंचम जगते' सर्व जगभर आहेत. मुंबईत यांची वसती सुमारे ६० ते ७० लाख आहे. यांचीपण शीरगणती आता होणार असे ऐकिवात आहे! 

शेतकरी आयुष्यभर पशू - पक्षी - वानसे यांची आयुष्यभर पालन पोषण जोपासना करतो. शहरी लोकांचे आयुष्य यांत्रिकी झाले तर नवल काय! मग शेतकर्‌याचे काय? त्याचा संपर्क सतत पंचमहाभूतांशी येतो.  
एका बिजातून वाढलेले वानस अगणित फळे / फुले / दाणे देते; केवळ मानवाला नाही तर प्राणी-पक्षी-कीटक या सर्वाना. असा 'सत्संग' ज्याला लाभला तो 'मानव' सहजपणे 'वानस' होऊ असू शकतो, कारण ती शेतकऱ्याचा "स्वधर्म" किंवा "सहज प्रवृत्ती" (vocation) असते. शहरी समाजातील व्यक्तींची "सहज प्रवृत्ती" शहर घडवीत असते. त्यांनी जमिनीपासून निसर्गापासून फारकत किंवा काडीमोड घेतलेला असतो. जमीन व निसर्ग या व्यापारी व दृष्टीसुखाच्या उपभोग्य वस्तू आहेत एवढेच त्यांना माहित असते. (ज्याने त्याने आपापले चित्त तपासून पाहावे.)   

Spring-time in Mumbai : वसंत ऋतू मुंबईत
वानसांप्रमाणे शेतकरी पण दानशूर असतो. गांवढ्यातल्या चंद्रमौळीत आलेल्या पाहुण्याचे स्वागत तो गूळपाणी देऊन होते. अन तो सर्वाना अन्न पुरवतो. बळीराजाची पौराणिक कथा सर्वश्रूत आहे. शेतकर्‌याला यास्तव 'बळीराजा' म्हणतात. शेतकऱ्याला अर्वाचीन युगाच्या एकविसाव्या शतकात 'प्रथम जगत इंडिया'ने येनकेन प्रकारेण या बळीराजाला पुन्हा एकदा पाताळात गाडण्याचा चंग बांधलेला आहे का?  


 विस्थापित मुंबईत २०११ 
हे विस्थापित देशाच्या ग्रामीण विभागातून पोटापाण्याचा उद्योग शोधायला मुंबईत तसेच इतर शहरांत पसरलेले आहेत. या मुंबई नगरीत पांढऱ्या पायाच्या गोऱ्या फिरांग्यांचे मात्र हार्दिक स्वागत होते. पण यांना बेकादेशीर आगंतुक समजतात. यांना गुळपाणी कुठले, पाणी, सर्व जीवसृष्टीची 'प्राथमिक' गरज, पण कुणी देत नाही. यांची अवस्था "आई वाढीना, बाप भिक मागू देईना" अशी झालेली आहे. पण "आई" आहे कुठे? 
टिप: प्रतिमा: रेमीजीयस डिसोजा 
रेमीजीयस डिसोजा
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.|
Page copy protected against web site content infringement by Copyscape

August 15, 2009

मेघमल्हार -५

मेघमल्हार -५


पांढरा ढग पांघरे
आकर्षक रंग --
कोरडा


(पांढरे ढग हे राजकारणी लोकांसाराखे असतात.)
------

सुशिक्षित उच्चभ्रू वर्गाला वाटते शेतकरी फक्त चार महीने काम करतात आणि उरले वर्षभर आळसात घालवतात. अमर्त्य सेन सारखे तज्ञ पण याला अपवाद नाहित. मग सरकार अंमलदार लोकांचे काय सांगणार?

निसर्ग आणि नैसर्गिक आपत्तिंपेक्षा सरकार आणि अंमलदार, बाजार आणि औद्योगिक समाज हे त्यांच्या सुधारणा व प्रगतीच्या प्राथामिकतेच्या उलट धोरणामुळे शेतकरी समाजाच्या यातनाना खरे कारणीभूत आहेत.

(मूळ इंग्रजीचे भाषांतर: पहा दुवा )


~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

August 12, 2009

मेघमल्हार-४

शेतकरयाच्या यातना आणि उल्हास


पावसाच्या येती सरी
पुनर्युवीत करिती ज्योती
वनराईच्या सदोदीत
झरे पाझरती खोलवरी
तृप्त होती बाळे तान्ही
धरतरीच्या अंगावरी

(मूळ इंग्रजी कवितेचे भाषांतर| पहा दुवा)

पारंपारिक मृदा शिल्पी वर्षानुवर्षे गणपती - दुर्गा यांच्या मूर्ती तयार करतात. त्याना माहित असते त्यांचे विसर्जन होणार. तरीही ते भाविकपणे न कंटाळता आपले काम करतात. शेतकरी पण अशाच श्रद्देने आपले काम करतो. यास्तव त्याच्या श्रमास "कारागिरी" "कलेचा" (vocation) दर्जा प्राप्त होतो. त्याच्या या कर्मात "ध्यान" असते म्हणून ते "आध्यात्मिक" पण असते.

टीप: शेतकरयांपासून बरेच काही शिकण्यारखे आहे. उदा: माझे इंग्रजी पोस्ट पहा, "Watering rhe farms: Learning from the people".


क्रमश:

~~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

August 10, 2009

मेघमल्हार -३: शेताकरयाच्या यातना आणि उल्हास


बी बियाण्यांची पेरी
हुकलेल्या सरी
थेंब थेंब ठिबके झरी
कृष्ण पक्षीं चंद्रकोर
आशा अधांतरी
सरकणारया मेघांवर

(मूळ इंग्रजीचे भाषांतर : लेखन - १९९९-२०००)

शेतकरी केवळ कलावंतच असतात असे नाही, तर नियोजनकार पण असतात. पण नगर नियोजनकारासाराखे नव्हेत, जे बुलडोझर लावून जमीन व तलाव सपाट करतात व जमीनीचे तुकडे पाडतात, शहरें वसवण्यासाठी. शेताकरयाचे नियोजन उंच-सखल जमिनीचा उपयोग पाण्याच्या व जमिनीच्या व्यवस्थनापनासाठी व संधारणासाठी वापरले जाते.

शेतकरी व्यवस्थापन तज्ञ पण असतात। ते जमीन, पाणी, बियाणे, तणे, चारा-वैरण, खते, अवजारे, साठवणी, नेआण, आणि इतर संलग्न अन्न-धान्ये व जनावरांचे पालन इत्यादींचे व्यवस्थापन करतात.
आणि तेवढेच अगत्याचे, ते सतत शेतीच्या दरेक क्षेत्रात संधारण, दुरुस्ती, पारख, सुधारणा, आणि धोरण आखणी करीत असतात. हे सर्व त्याना उपलब्ध साधन सामग्रीतून ते करतात.
शेतकरी कदाचित निरक्षर असले तरी "अशिक्षित" नसतात, जसे काही उच्चभ्रू मंडळीचा समज असतो.

~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

August 05, 2009

मेघमल्हार- २

येरे येरे पावसा! शेताकरयाच्या यातना आणि उल्हास
काळा मेघ ओथंबलेला
करी उपड्या सरी --
पुनरूत्थान

(लेखन: १९९९-२००० | मूळ इंग्रजी कवितेचे भाषांतर | पहा दुवा )

शेतकरयांची कला वास्तवाच्या क्षेत्रात घडते. चित्रकला, छ्यायाचित्रण, शब्द इत्यादि प्रमाणे ती "मायावी वास्तव" निर्माण करीत नसते. शेतकरी लहान किंवा मोठ्या जमिनीच्या कैनवास वर निसर्गाचे रंग - पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश - घेऊन चित्र रंगवातो; तेहि जाणीवपूर्वक, त्यामुळे त्याला ध्यानाची जोड़ असते. तो कधीही वाचाळपणा करीत नसतो.
शेतकरी त्याच्या शेताच्या कानाकोपरयाशी पूर्ण परिचीत असतो, तसेच सर्व वनस्पतींच्या आरोग्याशी पण.
क्रमश:

~~~~~~

© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

August 03, 2009

मेघमल्हार -१

येरे येरे पावसा! शेताकरयाच्या यातना आणि उल्हास

ढग भारावलेला
काळाभोर जडावलेला
भरकटे पुढे ---
अव्हेरलेली भुई

(मूळ इंग्रजीचे "Rain! Rain! Come again-1" चे भाषांतर)
-----
शेतकरी कलावंत असतात यावर फारच थोड्या लोकांचा विश्वास बसेल. सर्व प्रकारच्या रोजगार, व्यवसाय आणि कारागिरी (occupations, professions and vocations) यात शेतकरयांची कला अत्यंत धोक्याची असते याची अनेकाना माहिती पण नसेल.
क्रमश:

~~~~~~


© Remigius de Souza. All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape