May 15, 2012

विसाव्या शतकात मूर्तीभंजन

विसाव्या शतकात मूर्तीभंजन : व्यत्यासकथा

अवतरण : ' भग्नमूर्ती ' (मुक्तछंद) 

"निसर्गस्वभाव, निसर्ग शक्ति,
निसर्गांत जें जें आहे तें सारें मानवांतहि
आणिक अधिक त्याहून आहे
निसर्गाची जी अंतिम सीमा
मनुजकार्याचा आरंभ तेथे
तेथून विकास मानवतेचा
तेथून पुढे जाण्यासाठीच धडपड त्याची
तेंच उद्दिष्ट साधायासाठी
त्याची कला शास्त्रें विद्या तत्त्वज्ञान
धर्म आचार विचार आणि
नीतिनियम."

वरील अवतरणात कविता आहे कि काव्य आहे ? कदाचित कांही लोकांना ही कविता आहे, चांगली आहे, उत्तम आहे असंही वाटलं असेल. किंवा नाविन्यपूर्ण वाटेल! पण तिच्या अर्थाकडे पाहता ती आत्मकेंद्रीत, आत्मसुखी, प्रौढी मात्र वाटते.

कवीची निसर्गाची कल्पना काय आहे? बगिच्यात लावलेली झाडे आणि हिरवळ ? कि निसर्ग म्हणजे मुंबईची मलबार हिल ? कि केवळ भोग्य वस्तू ?

मूर्तीभंजन 

बालकवी, म. ज्यातिबा फुले, फार-पूर्वी-चार्वाक आणि बुद्ध -महावीर यांच्यानंतर कवीची निसर्गाची कल्पना फारच अपरिपक्व / तोकडी, तसेची फिरंगी सत्तेने प्रभावित झालेली दिसते.

बालकवींचे निसर्ग – सृष्टी – तर आराध्य आणि स्फूर्तीदेवता होती. म. फुले यांनी ईश्वर ही संकल्पना बाजूला सारली आणि त्याच्या जागी "निर्मिक" नाव देऊन सृष्टीला बसवले. अर्थातच सनातन्यांचा तीळपापड झाला असणार? त्यांच्याही पूर्वी चार्वाकाने सृष्टीला जीवनाची अधिधात्री मानले.

आणि बुद्धाने ईश्वर, देव, देवता, पूजा, यज्ञ, प्राण्यांचे बळी इ. प्रथा नाकारल्या. सिद्धार्थ जातकांत दशसहस्त्र ब्रम्हांडांचा उल्लेख अनेकदा येतो. आणि सर्व उपासकांचा ध्यानविषय सृष्टी किंवा तिची अंगे होती.

सृष्टीशी सुसंवाद 

कवीची निसर्गासंबंधीची कल्पना बालसदृश किंवा बालिशपण नाहिय. प्रागैतिहासिक काळातील मानवाने, जेव्हा सुसंस्कृत समाज अस्तित्वात नव्हते, कधीही या कवीप्रमाणे विचार केला नसता. त्या मानवांचा निसर्गाशी सुसंवाद जुळलेला होता यात शंकाच नाही. याचा अर्थ तेव्हा कला आणि विज्ञान अस्तित्वात नव्हते असा नाही. आतासारखे ते एकमेकापासून वेगळे नव्हते.

आजही तथाकथित अश्मयुगात राहणारे मानव भूतलावर आहेत. अथवा भविष्यात नागरी संस्कृतिंचा विनाश झाल्यानंतरचे मानव असा विचार करण्याचे धारिष्ट्यपण करणार नाहीत.

शाळेबाहेर शिक्षण

प्राथमिक शाळेत शिकताना मला भातशेती-शाकशेती, सूत कताई-विणाई, मातीची घरबांधणी – अन्न, वस्त्र, निवारा – या मूलभूत गरजा भागवण्याचे शिक्षणपण गावले.

तसेच परिसरातील बारा बलुतेदार आणि अठरापगड जाती यांना जवळून बघायची संधीपण मिळाली (घेतली). त्यावेळी मी 'मानववंशशास्त्र' हा शब्द ऐकलापण नव्हता.

इथूनच माझा लोकजीवन बघायचा छंद सुरू झाला. आणि छंदात कविता रचायचा छंदपण ! कालांतराने माझ्या कवितेतील छंद, वृत्त, जाति, अलंकार आयुष्याच्या पायवाटेवर कधी हरवले समजलेच नाही. लोकजीवनाच्या दर्शनाने सर्व आयुष्य घुसळून काढले. सर्व गृहीत मूल्यांची उलथापालथ झाली, आयुष्यात एक विद्रोह सुरू झाला.

निरपेक्ष आयुष्य जगण्याचा छंद आला. जगणेच काव्य झाले, छंद झाले, मुक्त-छंद झाले. मीच कवी आणि माझा मीच रसिक !

एक जाणीव आकारत गेली : 

'जीवन हे सर्वश्रेष्ठ आहे; सर्व स्थल-कालांत नागरी संस्कृतींनी निर्मिलेल्या सर्व कला, विज्ञाने, धर्म, तत्वज्ञाने व्यापारउदीम, अर्थसंस्था, राज्यसंस्था इत्यादिहून सर्वतोपरी उच्चतम आहे'.
भ्रमनिरासाच्या प्रक्रियेतून जाताना एक रचना, "अशी कविता - एक कोडे" आकारली. तिला अत्त्यानंद उर्फ प्रमोद देव यांनी चाल दिली अन गायली. त्यावर काही नमुनेदार प्रतिक्रिया आल्या. या वाचनीय आहेत. पण कोडे मात्र अनुत्तरित राहिले.

चवाठ्यावरच्या चर्चेत कधी कधी मूलभूत मुद्दा बाजूला होतो. आणि शब्दच्छल राहातो.
— रेमीजीयस डिसोजा
टीप :
1. सुरवातीला दिलेले अवतरण काव्यशास्त्राच्या एका पुस्तकात मिळाले. लेखकाने कवीचे नाव दिलेले नाही. अशाच इतर अवतरणांचे संदर्भ / नावे दिलेली नाहीत. मुक्तछंदात लिहिलेले हे मराठीतले पहिले दीर्घकाव्य आहे असा उल्लेख मात्र आहे.
2. हल्लीच दा विंची "महान कलावंत कि महान वैज्ञानिक ?" Is Leonardo da Vinci a great artist or a great scientist? असा वाद विलायतेत झाला. या चर्चेत मी माझ्या कुवतीप्रमाणे सहभाग दिला. माझा प्रतिसाद या लेखावर आहे.

~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.

No comments:

Post a Comment