January 21, 2013

चार माकडांची कहाणी : लेखक, गांधी + गांधी

Image: Source Google Images

चार माकडांची कहाणी : लेखक, गांधी + गांधी

आटपाट राज्य होते. तेथे गांधीबाबाने तीन माकडे सांगितली : कानांवर हात, डोळ्यांवर हात नि तोंडावर हात ! 

इंदिराबाईने एक माकड सांगितले : जननेंद्रियावर हात (असा लोकप्रवाद आहे). संततीनियमन ! त्याच्या परिणामांचा लेखाजोखा कुणी केव्हा केला? माहित नाही.

भारताची लोकशाही सरकारे याचे तंतोतंत पालन करतात. त्यांना रयतेच्या व्यथा दिसत नाहीत, ऐकू येत नाहीत, की त्यावर बोलतपण नाहीत.

चौथ्या धोरणात कोट्यवधी रयत विस्थापित होत आहे. (अर्थात त्यायोगे कुपोषण, उपासमार, रोगराई, आत्महत्या ! अनायासे निर्मूलन आलेच की !)

ही साठा प्रश्नांची लोककहाणी पाचा उत्तरी कुफळ संपूर्ण!


जीवन हे सर्वश्रेष्ठ आहे, सर्व स्थल-कालांत नागरी संस्कृतींनी निर्मिलेल्या सर्व कला, विज्ञाने, धर्म, तत्वज्ञाने, राज्यसंस्था इत्यादिहून सर्वतोपरी उच्चतम आहे. — इति रेमी डिसोजा
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.

December 21, 2012

व्यक्तीच्या घडणीचे वय : जसे वळण तशी घडण

"मुलाचे पाय पाळण्यात दिसतात." ही म्हण अर्धवट आहे. यात नशिबावर भिस्त ठेवल्याचा वास येतो. पालक, शिक्षक, समाज यांच्यावर मुलाच्या विकासाची काहीच का जबाबदारी नाही? पूर्वापार चालत आले ते सर्व चांगले आहे असं म्हणणे केवळ संस्कारांचा अभिनिवेश आहे एवढंच!

व्यक्तीच्या घडणीचे वय । रेमीजीयस डिसोजा, मुंबई । २००३ 

रोप झाडाच्या कुंडीत 
उष्ण कटीबंधात प्रकाश आणि ओल जगायला पुरेशी होते.

वानसेपण आपल्या वाढीसाठी प्रकाशाच्या शोधात वळण घेतात. झाडांच्या दाटीतून हरेक जण आपापली वाट शोधत जातात, कधी सरळ उंच वर वर वाढत जातात, तर कधी वाकून, प्रकाशाच्या दिशेने. काहीही भांडण तंटे वाद नाहीत. (असल्यास आपल्याला कुठे समजते त्यांची बोली?

मुंबईच्या फुटपाथवर वानसे -१

जेथे नैसर्गिक घनदाट वने असतात, विशेषत: पर्वतराईत, असे दृश्य हमखास पाहायला मिळते. तसेच उपवनातही दिसते. शहरांतही रस्त्यालगत पाणी घालून वाढवलेली उपरी झाडे सर्रास वेडीवाकडी जात असतात.

नगरपालिकेला कोणत्या झाडांना त्यांच्या योग्य वाढीला अनुकूल "जागा आणि अवकाश" लागतात हे माहित नसावे. अरे, माणसाच्या वाढीला योग्य जागा व अवकाश" लागतात हे ज्यांना माहित नाही त्यांना वानसांचे काय सोयरसुतक? 

मुंबईच्या फुटपाथवर वानसे -२
वानसाना  पण जगण्याची इच्छा असते.

मुंबईच्या फुटपाथवर वानसे -३
मुंबईच्या फुटपाथवर विस्थापितांच्या दोन पिढ्या जन्माला आल्या, वाढल्या आणि कोठे पोहोचल्या कोणाला माहित? नपुंसकाना कसे कळणार?

महावृक्षाच्या सावलीत दुसरी झाडे वाढत नाहीत, असा एक प्रवाद आहे. पण तो फक्त कृत्रिम लागवडीला लागू असतो. खरं तर तो महाव्यक्तिंना - माणसांना - उद्देशून आहे, वृक्षाना नव्हेच. नैसर्गिक वनात महावृक्षाच्या आधाराने असंख्यप्राणी-वनस्पती राहात असतात.
एक महावृक्ष तोडा आणि पाहा काय होते. जीवांचे जीवन उध्वस्त तर होतेच. त्याशिवाय पर्यावरणाचे संतुलन बिघडते, भूईतील पाण्याचे साठे संपतात, जमिनीची धूप होते, वाळवंट पसरते, दुष्काळाची लागणी येते... 
पण अहंमन्य लोभी सत्ताधिशांना काय? ना खंत ना खेद! गरीब रयतेची उपासमार झाली तर ती काही मसालेदार बातमी नव्हे !

सृष्टीने संपूर्ण जीवमात्राच्या - त्यांच्या 'शरीर व मनाच्या' - पोषणाची व संरक्षणाची तरतूद त्यांच्या आलेखनात करून ठेवलेली असते. तिचा कारभार अप्पलपोट्या, सुसंस्कृत, सत्ताभिलाशी समाजासारखा थोडाच आहे! मग ते जीव जीवाणू असोत की मानवप्राणी असोत. तिथे मानवजातीच्या देवांचीपण ढवळाढवळ चालत नाही.
सृष्टी म्हणजे कथा-काव्यात गृहीत धरलेली रोमँटिक हिरवाई नव्हे. ती जशी सारी ब्रम्हांडे व्यापून आहे तशीच ती आपल्या आतही आहे. तिला, पर्यायाने आम्हालाही, आमचा शारीरिक व मानसिक विकास करायला सुयोग्य "जागा आणि अवकाश" हवे असते.
येथे 'जागे'चा अर्थ क्षेत्र, म्हणजे सरकारी नियमावलीतील चौरस फूट/मीटर क्षेत्रफळ नव्हे. आणि 'अवकाश' म्हणजे संत ज्ञानेश्वर सांगतात ते "पैस", भूमितितील त्रिमिती नव्हे. 
 

वळण - घडण याची दोन कमालीची उदाहरणे


पहिले उदाहरण आहे समष्टीचे आणि दुसरे आहे व्यक्तिचे. ही हल्लीचीच उदाहरणे सुसंस्कृत समाजाची दोन टोके आहेत.

पहिले उदाहरण : वियेतनाम देशात एक आख्खी पिढी युद्धभूमीवर जन्माला आली आणि खांद्यावर बंदूक घेवून वाढली आणि लढली. त्या युद्धात अमेरिकेला हार खावी लागली.

दुसरे उदाहरण : महाराज सयाजीराव गायकवाड, बडोद्याचे संस्थानिक. सयाजीरावांचे ब्रिटिश सत्तेशी संबंध कसे होते हे सर्वश्रूत आहे. त्यांचे चौफेर लोककार्य त्यांच्या भौतिक वैमवापेक्षा अधिक नजरेत भरते.
कोण होते सयाजीराव? एका सामान्य कुटुंबातून राजघराण्यात दत्तक घेतलेला मुलगा. वैभवशाली व्यक्तिला वळण नसेल तर केवळ वैभव असून काय कामाचे? सयाजीराव सर्वाथाने राजर्षी होते.

या दोन टोकात निदान एक कोटी उदाहरणे ताडून पहाणे फारच उद्बोधक ठरेल. पण अशा वेळी पुढारलेले समाज / तज्ञ नमुन्याचे सर्वेक्षण करण्यावर भागवतात. त्यांच्या बोलीत 'व्यक्ती तितक्या प्रकृति' ही म्हण नसावी. एरवी, टीवी, कंप्युटर, सेल फोन वापरणारे लोक आता एक कोटीवर पोहोचले अशा जाहिराती मात्र वेळोवेळी ऐकण्यात मात्र येतात.

तिसरे उदाहरण आहे. पण त्याचा फक्त उल्लेख येथे अनिवार्य आहे एवढ्यासाठी करतो. ते आहेत आदिवासी. भारतातल्या आणि जगभरच्या आदिम जमाती, व त्यांच्या संस्कृती ज्यांचा उगम प्रागैतिहासिक काळात आहे. बहुसंख्य लोकांना हे फारसे परिचित नाहीत.
— रेमीजीयस डिसोजा, मुंबई
~ ~ ~ ~~
© Remigius de Souza. All rights reserved.

November 23, 2012

सर्जनाची वाटचाल : समीक्षा सर्जनाची


सृष्टीयोग 

 सर्जनाची मूळ प्रेरणा


सर्जन आणि सर्जनशीलता या क्रिया आपण स्थूलपणे कलांच्या अभिव्यक्तींना वापरतो. परंतु सर्जनाची मूळ प्रेरणा केवळ जीवनाचे संधारण करणे एवढेच. जीवाच्या धारणेपासून ते बाळाला अंगावर पाजणे आणि यापुढे आयुष्यभर येणाऱ्या असंख्य क्रिया सर्जानाचाच भाग आहे. यांत्रिकी जीवनामुळे आपल्याला याचे भान राहत नाही एवढेच!
१. भिल्लांची पावरी 
भिल्ल स्वतःच आपली पावरी तयार करतात. खरे तर याचा इतिहास हजारो वर्षें मागे जातो.

२. प्रागैतहासिक अस्थी-बांसरी (30,000 वर्षें सद्यपूर्व)

ही पक्ष्याच्या अस्थीपासून केलेली बांसरी २००९ साली पुराशास्त्रज्ञांना गवसली. हिला पाच छिद्रे आहेत. विशेष म्हणजे भिल्लांच्या बांबूच्या बांसरीलापण पाच छिद्रे असतात. 


विधायक टीका

ज्याला विधायक टीका/समिक्षा म्हणता येईल ती मी आनंद कुमारस्वामी यांच्यापासून शिकलो. (टीप १.) अनेक प्रकारे ते उपयोगी आले. मुख्यत: मी व्यक्तिनिष्ठ प्रतिक्रिया सोडली आणि वस्तुनिष्ठ प्रतिसादाकडे वळलो, कोणतीही घटना असो.

पर्यावरणाचा अभ्यास, जो निवारा किंवा वास्तूचे मूळ उद्दिष्ट — वारा, ऊन, पाऊस, थंडी यांच्यापासून संरक्षण करणे — आहे. त्याने मी व्यक्तिगत व सामाजिक क्षेत्राच्याही पलिकडे जाऊ शकलो.

पारिस्थितिकी समजण्यास माझ्या लाडक्या तुकारामाचा महत्वाचा वाटा आहे : "वृक्ष वल्ली आम्हा सोयरी वनचरे" या पाच शब्दांच्या मंत्रात. हा मंत्र समजण्यास भातशेती-शाकशेती, स्वयंपाक, मातीची घरबांधणी, सूतकताई-विणाई या क्षेत्रांत माझे शारीरिक परिश्रम आणि लोकसहभाग Community Participation उपयोगास आले. हे माझ्या घडणीच्या काळात झाले. त्यावेळी मी माझ्या गावी प्राथमिक शाळेत होतो.

वास्तूविद्या शिकताना माझ्या ध्यानात आले, इमारतीत असलेल्या अनेक खोल्या आणि घटक त्यांच्या नियोजनात कसे परस्परावलंबी असतात. एक खोली किंवा घटक जरी हलवला, बदलला किंवा काढून टाकला तरी सबंध रचना बिघडते. त्यामुळे संपूर्ण संरचनेवर पुनश्च काम करावे लागते. हे समाजरचनेसारखे असते. वस्तुतः एक घर बांधले तरी ते नैसर्गिक पर्यावरण, पारिस्थितिकी व ऊर्जा यांच्या संतुलनावर अनिष्ट परिणाम करते.

तुकारामाचा पाच शब्दांचा मंत्र उलगडा करतो पर्यावरण, पारिस्थितिकी आणि ऊर्जा एकमेकाशी कसे संलग्न आहेत. आपण जर साध्यासुध्या दिसणारया कामावर, जशी शेती, सैपाक किंवा निवारा यावर, ध्यान केले तर निसर्गात पर्यावरणाचे हे तीन घटक कसे परस्परावलंबी व अधिव्यापी असतात हे समजायला मदत होते.

ही वाट जेवढी अपरिहार्य, अटळ आणि कष्टाची तेवढीच आनंदादायी आहे. शॉर्टकट नाहीत. पुस्तकं नाहीत. केवळ क्षेत्र अभ्यास उपयोगी.

भारताच्या स्वातंत्र्यानंतर आनंद कुमारस्वामी १९४७ सालीं परदेशी निवर्तले. (त्यांची भारताच्या भूमीवर देह ठेवायची इच्छा होती.) इथून पुढे, स्वातंत्र्यानंतर ब्रिटिश सत्तेने भारतात आणलेल्या 'बदला'चा वेग वाढला.

हा 'बदल' जवळजवळ जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत होत होता. त्याने सर्वात अधिक हानी केली ती बहुसंख्याकांची, अर्थात भारताच्या शेतीप्रधान समाजाची, खेडूत कृषीवलांची. त्यांचे संधारण प्रथम प्राधान्य देऊन करणे अत्यंत गरजेचे होते, ब्रिटिशांनी हा देश सोडताच. पण तसे झाले नाही; अजूनही होत नाहीय.

या बदलाचे मूलभूत कारण गेल्या शतकापासून पाश्चिमात्य विज्ञान आणि तंत्राचा भारतात झालेला विकास हे असावे. हा बदल सर्व जगभर होतोय. तथापि पाश्चिमात्य देश या 'बदला'बरोबर, म्हणजेच औद्योगिक क्रांतीच्या उदयापासून, वाढले. तर भारतात तो लादला होता.

गेल्या ६५ वर्षात आपण वाढलो असे म्हणता येणार नाही. आम्ही वयस्क मात्र झालो आणि आमचे संस्कार व परंपरा यांनुसार आपण वयाचा आदर करतो, माणूस असो की पाषाण !

खरे पहाता हा बदल (ज्याला आपण 'विकास' म्हणतो तो अपप्रयोग आहे) आपल्या मूलभुत गरजांना — अन्न, निवारा, वस्त्र, आणि सर्व जीवमात्राच्या निसर्गदत्त स्वायत्त कार्यांना — श्रम, विश्राम, आरोग्य, अध्ययन आणि प्रजनन — विघातक झालेला आहे. केवळ मानव जगच नव्हेत तर जगभरच्या जळ, जमीन आणि हवा यातील जीवमात्र याला बळी गेलेले आहेत.

जेव्हा या मूलभूत गरजांची आणि निसर्गदत्त स्वायत्त कार्यांची हानी होतेय तेव्हा सामाजिक, राजकीय, धार्मिक वगैरे वगैरे संस्था, किंवा स्वर्ग आणि नरक-पाताळ यांचा काय पाड ?

सर्जनाला समीक्षेची गरज 


उदाहरणार्थ, आम्ही आता वर्षभर – २४/७/५२ – दूरचित्रवाणीवरील अनेक वाहिन्यावर काय पहातो? त्या आम्हास दाखवतात, गुळचट प्रेम, पांचट शृंगार आणि विच्छिन्न कुटुंब संस्थेतील भपकेबाज लग्नांच्या कहाण्या, गुन्हेगारी आणि हिंसाचार यांचा बेसुमार नाविन्यपूर्ण मसाला घातलेल्या. जणू आमची करमणूक करायला दुसरे काहीच साधन राहिलेले नाही, की नाही विचार करण्याजोगे.

मुंबईत, उदाहरणार्थ, दरवर्षी सुमारे २००-३०० चित्रपट बनवले जातात. पण त्यांनी खर्च केलेल्या साधनसंपदेचे मूल्य काय? त्यांची पर्यावरण-परिस्थितीकी-ऊर्जा (प-पा-ऊ) मूल्य काय? अक्रीय करमणूकीशिवाय कोणत्या सामाजिक साध्यासाठी? ही एक सार्वजनिक घटना आहे!

जेव्हा भारताच्या लक्षावधी रयतेपुढे जीवन-मरणाचा संघर्ष उभा आहे, अन्न, पाणी, निवारा, आरोग्य, शिक्षण इत्यादी अब्जावधी प्रश्न उभे आहेत त्यांची उत्तरे कोण देणार? सरकार? पार्लमेंट? बॉलीवूड-टेलीवूड? मितव्यय? शेयर बाजार?
केवळ रयतच वरील प्रश्नांचे उत्तर देऊ शकेल. कोणत्याही नियोजनाचे, प्रकल्पाचे किंवा विकासाचे "साध्यही रयत; साधनही रयत".
विधायक टीका / समीक्षा कोणत्याही घटनेत किंवा क्रियेत, केवळ साहित्यिक कृतीच नव्हे, गाळलेले संदर्भ आणि आशय उपस्थित करते आणि सर्वाच्या हितासाठी समर्पक सूचना देते.

कलेचे उद्दिष्ट

कोकणात लोकसहभागाने भातशेती । फोटो : पूजा राणी 
शेती ही प्राचीन आणि सर्वात उच्चतम कला, जेथे पंचमहाभूतांशी संपर्क येतो, जेथे भुईचा कॅनवास वापरला जातो, जेथे कलेच्या मूळ प्रेरणेला स्थान असते, पण हिला उच्चभ्रू समाज मान्यता देत नाही.


उत्स्फूर्त आत्माविष्कारातून कलेची निर्मिती आत्माभिव्यक्तीत अवतरते. ती कोणत्याही वयात व काळात होते. कलेची व्याख्या नाही. सुसंस्कृत समाजाने कलेसाठी अनेक दालने, सदरे, शैली, पंथ, घराणी इत्यादी निर्माण केली असतील, पण ते सर्व वरकरणी आहेत.

आत्माभिव्यक्तीत कुणी उत्स्फूर्तपणे नाचेल, गाणे गाईल, मातीत वा भिंतीवर चित्र रेखाटेल, मातीचे खेळणे बनवील किंवा कहाणी सांगेल...

सुसंस्कृत किंवा नागरी समाजाला फार आवडते करायला विभाजन, श्रेणी, जातवारी, वर्गवारी आणि अधिश्रेणी. याने तो आवश्यकतेपासून दूर मात्र होतो. म्हणून आपण या सर्व वेडगळापणाकडे दुर्लक्ष करू.

कला – आत्माभिव्यक्ती – घडते ती वास्तवाच्या अनुभवातून आणि भावनांतून. हे वास्तव म्हणजे निसर्ग, नैसर्गिक घटना, इतर जीव – व्यक्ती, वानसे, प्राणी... आणि त्या संबंधांतून आलेली भावानुभूती.

कला ही भावनांतून निर्माण झालेल्या ऊर्जेला सर्जनशील कृतीत वाट करून देते, जी प्रगतिरोध Entropy रोखते. नाहीतर त्याचे पर्यावसान मानसिक किंवा शारीरीक रोगात होणे शक्य असते. हेपण एकप्रकारे प्रजनन म्हणता येईल. कला ही कोणत्याही वर्गाची वा व्यवसायिकांची मक्तेदारी नाही.

विज्ञानाचे उद्दिष्ट


जशी कलेची व्याख्या नाही तशीच 'जीवना'चीपण नाही, विज्ञानाने पण ती केलेली नाही. जीवन आणि कला यांचे अर्थ शब्दकोशांत असतात. तरीपण 'जीवन' काय आहे हे आम्हाला उपजतच समजते (जीवाच्या मरणामुळे ज्याचे अक्रीय वस्तूत परिवर्तन होते).

'ईश्वर' ही कल्पना निसर्गाच्या आत्यंतिक घटनांमुळे आली असावी (प्रागैतिहासिक आदिवासी काळात); त्याने  निसर्गाची अपार शक्ती चित्रात आणि विधींत व्यक्त करण्यात आली असावी.

हल्लीच वैज्ञानिकांना एक शोध लागला ज्याला त्यांनी 'ईश्वर' कण असे नाव दिलेय. ते पूर्ण 'सत्य' नव्हे; निसर्गाचे गूढ मात्र आणखीच अगम्य होतंय.

नागरी संस्कृतीत विज्ञानाची पद्धती विश्लेषण करण्याची असते, तर कला संश्लेषण करते. एके काळी कला आणि विज्ञान व तांत्रिकी यांचे असे खातेवाटप अस्तित्वात नव्हते, जेव्हा अग्नी, तरफ, तीरकमठा, मातीची भांडी, जंगली वानसांचे व प्राण्यांचे गृहसंवर्धन इत्यादि शोध मानवाने लावले. आता आम्ही ज्याला कला, विज्ञान, तंत्रज्ञान या नावांनी ओळखतो ते पूर्वी वेगवेगळे नव्हते आणि ते सर्व लोकांच्या हितासाठी होते.

एके काळी कला विज्ञान आणि तांत्रिकी विभक्त नव्हते. आता विज्ञान आणि तांत्रिकी यांच्या सीमारेषा अंधूक झालेल्या आहेत. त्याचे कारण दोन्ही शाखांच्या मितव्ययात economy भांडवलदारांचे गुंतलेले हितसंबंध होत.

समीक्षा सर्जनाची

सर्जनशील सकलजन । रेमीजीयस डिसोजा । मुंबई 
मूळ इंग्रजीचे स्वैर भाषांतर 

कला, विज्ञान, तांत्रिकी, इतर ज्ञानशाखा, तसेच संस्था यांचे  उद्दिष्ट सर्व लोकांचे हित साधणे हे तर आहेच, शिवाय 'इतर' मानवसमूह, जीव आणि त्यांचा निसर्गनिवास जतन करणेपण आलेच. निसर्गाने केलेली निर्मिती आणि विनाश विनाहेतू नसतात. फक्त आम्हास त्यांचे आकलन होत नाही एवढेच.

विधायक समीक्षा केवळ कला, साहित्य आणि त्यांच्या शाखा एवढ्यापुरतीच मर्यादित नाही. ती इतर ज्ञानशाखा, खाजगी आणि सार्वजनिक संस्था-संघटना यांनाही लागू होते. त्यानी केवळ न्यायसंस्थेचेच कायदे नव्हेत, तर नैसर्गिक न्यायपण हिशेबात घ्यायला हवा. न्याय हा कायद्यापेक्षा श्रेष्ठ आहे.

सृजनशीलता हा शब्द आता "मूलमंत्र" buzzword झाला आहे. तो आता कोणत्याही संदर्भात (उदा. युद्धसाहित्य) वापरला जातो, मग त्याचे दुष्परिणाम काही का असेनात. विशेषत: जेजे बाजार आणि चंगळवादाच्या सदरांत येते त्यात्या वस्तूला, कल्पनेला सर्जनशील हे लेबल सर्रास लावले जाते. जे कुणी त्यांचे पाठीराखे असतील ते वातानुकूल अद्यावत बोर्डरूममध्ये बसलेले असतात. नफ्यावतिरिक्त दुसर्‌या कशाचेही सोयरसुतक त्यांना नसते.

परंतु तथाकथित सर्जनशील वस्तूची वा घटनेची गुणवत्ता क्वचितच पारखली जाते; ती पर्यावरण पारिस्थितिकी आणि ऊर्जा यांच्या मूल्याच्या कसावर, विधायक की विध्वंसक आहे का हे ठरवावे लागेल. आजच्या झपाट्याने बदलणारया परिस्थितीत निष्क्रिय राहणे किंवा डोळेझाक करणे अयोग्यच नव्हे घातक ठरेल. स्वायत्त तिबेट आठवावे !

सर्जन विधायक आहे की विघातक हे पाहाणे निर्णायक आहे. याचा निकष तथाकथित तज्ञांच्या दालनात राहून न करता सृष्टीच्या साकल्याच्या मार्गाने लावायला हवा, जेथे नागर संस्कृतीप्रमाणे खातेवाटप नाही. असे निर्णय व्यक्तिगत आणि समष्टीच्या स्तरावर वेळोवेळी घेतले गेले पाहिजेत. तरच सरकार कार्यक्षम आणि तत्पर राहील.

टीप १. मी लिहिलेल्या समीक्षेत पहा - परिच्छेद- Indian Architectural Terms, Essays in early Indian architecture (Book Review)
२. प्रतिमा २.प्रागैतहासिक अस्थी-बांसरी (30,000 वर्षें सद्यपूर्व), ऋणनिर्देश : New York Times, अधिक वाचा, Flutes Offer Clues to Stone-Age Music

~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.

October 01, 2012

सृष्टीत आम्ही सातत्याने

 सृष्टी स्तवन



भारताला संपन्न जैवविविधतेची देणगी सृष्टीकडून मिळाली आहे. त्यातूनही भारतीयांनी नारळाच्या झाडाला 'कल्पवृक्ष' असे संबोधले. नारळाला 'श्रीफळ' म्हटले. सृष्टी सर्व जीव मात्राला जगण्याचे साधन देते, आणि मानवाला संस्कृती देते. संगीत, काव्य, नाट्य, साहित्य, चित्र, वास्तू, महाकाव्ये ही केवळ संस्कृतीची अभिव्यक्ती आहेत. संस्कृती केवळ मानवात वसते.

सृष्टीत आम्ही सातत्याने


सृष्टी मानवप्राण्याला तिची लाडकी जीवजाती म्हणून ओळखत नाही, की नाही नागरी समाजाच्या कुंपणाना व त्यांच्या सामाजिक अधिश्रेणींना.



वानसे सुसंस्कृत समाजाची कुंपणे व अधिश्रेणी ओळखत नाहीत 
नागरी समाजांना कुंपणे - भिंती बांधायचे, वर्गवारी करायचे फारच वेड आहे. ते एवढ्यावरच थांबत नाही. त्या भिंतीवर नक्षीकाम करायचे, त्याच्यावर अलंकार चढवायचे, त्यांची स्मारके घडवायची, आणि टाळ्या वाजवायच्या हे पण पर्यायाने आलेच. उदाहरण: चीनची भिंत: ते तर सरंजामदारशाहीचे प्रतिक आहे.

तसेच वानसे आणि अन्य प्राणीजातीपण त्यांची सामाजिक बंधने व अधिश्रेणी ओळखत नाहीत.
पाळीव पशुपक्षीपण सायंकाळी निवार्‌याला घरी परतून येतात. त्यांना तेवढ्यापुरतीच कुंपणाची म्हणजेच मालकीची ओळख असते. सामाजिक अधिश्रेणी सोपान ते ओळखत नाहीत.
लहानपणी आईच्या दुधाव्यतिरिक्त इतर अन्न आपणास सुरू केले की जीवाणूंच्या झुंडी आपल्या उदरात कायम घर करून राहायला सुरवात करतात. त्यांच्या अनेक जातींची संकुले उदरात असतात!

आशा करूया, 'हिरवाई' बगिचे, झाडी, शेते, उरली सुरली जंगले, आणि नद्या-सरोवर-सागर यांच्यापल्याड; वर्डस्वर्थ याच्या कविता, टर्नरची चित्रे, यांच्यापल्याड; आणि फोटो सिनेमा विडयो - ही कितिही अद्यावत असली तरी - त्यापल्याड जावून आपण कधीतरी सृष्टीचा अनुभव घेऊ ! कारण ही सर्व माध्यमे मनोरंजक व दृष्टीसुख देणारी असली तरी ते सृष्टीला पर्याय नव्हेत.

वरील दाखले आपणांस निसर्गाच्या मनोहर / भयावह अनुभवांची आठवण करायला मदत करतील.
जीवशास्त्र आणि पुरातत्त्वशास्त्र, त्यांनी केलेली प्रगती आम्हाला निसर्गाची अधिकाधिक माहिती देते, शिवाय निसर्गातील आपले स्थान काय हेपण समजायला मदत करतात.
कदाचित चक्रीवादळे, मेघस्फोट, ज्वालामुखी, धरणीकंप, हिमवादळे, सुनामी... इत्यादि आणि आता वायुमान बदल (ही काही कल्पित कथा नव्हे) या रौद्रभयानक रूपांत निसर्गाचे सामर्थ्य आपणास दिसते. 

सृष्टीचे प्राथमिक निरिक्षण 


सृष्टीशी मौलिक संबंध प्राथमिक आणि वैयक्तिक स्तरावर प्रस्थापित करणे हे सर्वात उत्तम. स्वतःच्या शरीर व मनाचे निरिक्षण करणे; त्यासाठी नाही मुहूर्त, नाही मंत्र-तंत्र विधी, ना शुभाशुभ स्थानाचे, विषेश बैठकीचे अथवा वेशभूषेचे नियम. केवळ निरिक्षण, लक्षपूर्वक व करुणापूर्वक. कारण शरीर आणि मन आम्हाला या जगात टिकून राहाण्याची मिळालेली साधने आहेत व आम्ही त्यांचे विश्वस्त आहोत, मालक नव्हे. यात कोणतेही गूढ नाही; जशी बाहेरची हिरवाई तसेच आम्हीही सष्टीचेच केवळ भाग आहोत.

सृष्टीच्या निरिक्षणाचे दुसरे साधन  


उष्ण कटिबंधात वानसे  कोठेही उगवतात


आम्ही भारतीय पंच महाभूते पृथ्वी, आप, तेज, वायू आणि पैस परंपरेने मानतो.
स्वतःनंतर सष्टीच्या निरिक्षणाचा दुसरा उत्तम पर्याय असा : वानसांबरोबर संबंध जोडणे व त्यांचे निरिक्षण करणे. त्याहूनही चांगले प्रत्यक्ष कृती: सैपाकघरातून काही बीजे घेऊन मातीत पेरणे. त्यासाठी टीनाची प्लस्टीकची अथवा मातीची लहान कुंडी चालेल. मातीची कुंडी बरी कारण माती श्वासोश्वास करते. अशी पेरणी प्रत्येक ऋतूत केलेली बरी. आणि रुजलेल्या रोपांच्या वाढीस सूर्यप्रकाश व पाणी देऊन मदत करणे. मार्गदर्शक पुस्तके शक्यतो टाळावी. काही चूका झाल्या तरी हरकत नाही.
प्रत्येक बीज रुजेलच असं नाही. त्यांना येणारे कोंब पहावे, सूर्यप्रकाश व पाणी घालावे. हे सर्व करीत असताना रोपांबरोबर आपणही पंच महाभूतांच्या संपर्कात येतो, पर्यायाने सृष्टीच्या संपर्कात जाणीवपूर्वक येतो.

निसर्गाच्या प्रयोगशाळेत कृषीक्रांती

दहा हजार वर्षांपूर्वी अर्धनग्न मानवांनी रानटी वानसे आणि पशूपक्षांचे गृहसंवर्धन केले. आणि बिकट नैसर्गिक वातावरणात कृषीक्रांतीची सुरवात झाली. आणि ती सर्व जगभर पसरली (विना बौद्धिक मालकी हक्क).
त्या काळी नागरी संस्कृती किंवा सुसंस्कृत समाज किंवा civilization अस्तित्वात आले नव्हते. कृषिक्रांतीनंतर पाच हजार वर्षांनी सुसंस्कृत समाज Civilization म्हणजेच Urban Revolution, 'नागरी क्राती'चा उदय झाला.
औद्येगिक क्रांती Industrial Civilization काही शतकांपूर्वीच विलायतेत उदयास आणि पाहता पाहता सर्व जगभर पसरली. पण ती कधीच 'वैश्विक' universal झाली नाही. आपण उच्चभ्रू वर्ग मात्र येथे पोहोचलो. आपले अध्ययन सांघिक शिक्षण पद्धतिच्या जुळवणी पंक्तीवर Assembly Line झाले.
अजूनही वेळ नाही का आली सृष्टीशी संयोग करायची?

टीप : वरील मजकूर लिहित असताना एका इंग्रजी ब्लॉग वरील लेख Humans and Nature: Can the Gulf Be Bridged?  वाचनात आला. याचा मथळा वाचताच विलायती समाज आणि त्यांचे अनुकरण करणारे इतर समाज निसर्गापासून कसे दुरावलेले आहेत हे.ध्यानात येते. या लेखावरील माझी टिप्पणी प्रतिक्रिया अवश्य वाचावी.

~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.

August 15, 2012

अर्वाचीन महाभारत-कुरूक्षेत्र भारतभर

दोन गाणी : प्रस्तूतकालीन महाभारताची समीक्षा


लोक-उर्जा संधारण 
 आर्थिक-तांत्रिक-ओद्योगिक विकासाच्या नशेत लोकाविकासाचे कुणाला भान?


मला'खो' देते 'हर्षदा' आणि मी समीक्षा करायला निवडतो पुस्तकाऐवजी एक विषय, ज्याला म्हणता येईल : "प्रस्तुतकालीन महाभारत-कुरूक्षेत्र"! हे पुस्तक वास्तव रुपात आपल्यासमोर आहे. त्याचे स्वरूप "मायावी वास्तवता", Virtual Realty, नाही. ही टीका मी पुढील दोन गाण्यात आटोपतो.

पहिल्या गाण्यात आहे सत्तेशी केलेला संवाद जो विफल होतो, आणि त्याचे स्वरूप केवळ 'स्वगत' उरते. दुसऱ्या गाण्यात पहिल्या गाण्यातील वैफल्याचे निदान केलेले आहे.


प्रगती = पंचम जगत भारताचा उदय
ही मुले मुंबईची काय आठवण घेऊन मोठी होतील ?

 

अलिखित अर्वाचीन महाभारत- कुरुक्षेत्राची समीक्षा 

गाणे १. स्वगत सत्तेशी (नाट्यछटा) :  त्तेशी संवाद अशक्यप्राय


मी सत्त्याशी लुडबुड करू इच्छित नाही
वाटल्यास ते आपसूकच प्रगट होईल.
पण जेव्हा आम्ही विविक्षित तथ्य बोलतो
ज्यात मी गुंतलो आहे ते जाणणे माझा हक्क नाही का?
संवादात प्रतिसादाने बरोबरीचा हक्क नाही का?
किंवा कोणत्याही नात्याने — सर्व वाटांवर सर्वदा?
एक तथ्य उरतेच, जेव्हा मी विचारणा करतो
तेव्हा तू संवाद तोडतेस किंवा उत्तर टाळतेस.
कारण काहीही असो.

याला संवाद का म्हणावे? कि
याचा अर्थ माझ्याच खर्चाने माझी टवाळी?
तू माझ्या परिश्रमांची पैशाने किंमत देऊ शकतेस पण मोल नाही
(जर का तू कधी परिश्रमाचे मोल समजलीस तर
पुरवठ्याच्या बाजारी?).

मी नाही विकावू कि नाही भाड्याचा माल.
पसंत करीन मी तुला सोडचिठ्ठी देणे
देण्याहून औषधांची चिठ्ठी रोगांवर
ज्या जन्माला घालतात केवळ प्रतिक्रिया, प्रति-प्रतिक्रिया.
नाईलाज आहे! अशा लुडबुडींना येथे नाही वाव
केवळ एकच जन्म हा!
(नाट्यछटा हा प्रकार दिवाकर यांनी मराठीत आणला. नाटक-सिनेमात स्वगते येतात.)

 

गाणे २. माझे गाणे जन्मले... 


माझे गाणे जन्मले भूईत आणि जळांत,
पोसले वानसांनी, लोकानी अन प्रेमाने,
सत्तेच्या हवसेने वेड्या नागरी समाजांत,
अंध कोपाने जगणेच उध्वस्त करणार्‌या.—
गांडूळे, हिंस्र जनावरे बरी त्याहूनी !  


विश्राम अमूल्य विनामोल
श्रम - विश्राम - आरोग्य - अध्ययन - प्रजनन ही सृष्टीने समस्त जीवमात्राला दिलेली पाच स्वायत्त मूलभूत कार्यें. यात हस्तक्षेपाचा कोणत्याही मानवी सत्तेला अधिकार नाही (पहा : टीप 1).

  सत्तेचे अनेक अवतार

सत्तेच्या अनेक रूपांत लोकाशी सरकारपण गृहीत आहे. पण सत्ता कुठल्याही स्तरावर असू शकते, कुटुंबापासून समष्ठीपर्यंत. त्यांत शाळा-शिक्षक आणि विद्यार्थी, अगणित सार्वजनिक संस्था, कॉपोरेशन, पोलीस, आमदार-खासदार, नोकरशहा, इत्यादी सर्व आले. कुटुंब नवरा आणि बायको, सासू-सासरा आणि सून, पालक आणि मुले यांच्या संबंधांतही सत्ता अवतार घेते.

अर्थात यात सत्ता आणि रयत, किंवा सत्तेसाठी संबंधितांचा संघर्ष आलाच. नागरी समाजात हा संघर्ष अपरिहार्य आहे. खरं तर सत्तेचे केंद्रीकरण हे त्याचे व्यवच्छेदक लक्षण आहे. नागरी समाजाच्या इतिहासात हे अव्याहत चालत आले आहे.

आणि या सत्तेने सत्तेसाठी केलेल्या संघर्षांत कितीक बलाढ्य नागरी संस्कृती नामषेश झाल्या, पण त्यांची रयत नव्हे. मात्र टिकून राहिल्या आदिवासी जमाती, ज्या आहेत सान प्रजासत्ताके, अनादी काळापासून... आजही!!


स्वावलंबनाला वेळूचा आधार
 यंत्रोद्योग = बहुसंख्य ग्रामीण जनतेच्या हस्तोद्योगांवर गाढवाचा नांगर आला. बांबू प्राचीन काळापासून भारतीय ग्रामीण जीवनाशी जोडलेला आहे, मग बांबू भारतात दुर्लक्षित का व कसा राहिला?

या गाण्यांना काव्य म्हणता येईल का माहीत नाही ! ही आहेत रेमीच्या बोलीत राकट गावठी प्रेमगीते. येथे नाही अभिजात शैली, नाहीत अलंकार-उपमा, नाही शब्दांची वा कल्पनांची आतिषबाजी. शेतकर्‌याच्या पिंडाला अशी चंगळ परवडणारी नाही, मग ते पाणी असो की शब्द असोत.

एक प्रश्न उरतो. या रचनांना समिक्षा, टीका अथवा दुसर्‌या कोणत्या सदरात ठेवता येईल का? कोणत्याही सृजनशील अभिव्यक्तीत वैयक्तिक व सामाजिक यांच्या पलिकडे जाण्याकडे माझा कल आहे. त्यामुळे यातील 'मी' नेहमीच गौण राहातो. दोन्ही गाण्यांचा विषय प्रेम आहे, पण हल्लीच्या रूढ (लैंगिक) अर्थाने नव्हे.  

प्रस्तुतकालीन महाभारत (कुरूक्षेत्र) आज काव्यात कोण लिहिणार, आणि वाचणार कोण? ते तर प्रत्येक व्यक्ती रोजच अनुभवते! मात्र त्याचे ऑपरेशन (कि डिसेक्शन, कि पोस्टमोर्टेम?) सुटसुटीत व्हायला काय हरकत! आजच्या परिस्थितीवर लेखातून, पुस्तकातून केलेल्या असंख्य टीका वेगवेगळ्या दालनात राहून केल्या जातात. कितिही प्रयत्न केले त्या अपुर्‌या राहातात. किंबहुना त्या जेवढ्या लठ्ठ तेवढ्या आकलनास कठीण.


अन्नपाण्यासाठी रयत दाही दिशा - जगण्यावर कर अनारोग्याचा
 चव्वलाच्या नादात पाणपोया वाहून गेल्या - हे रस्ते हे रस्ते


साधे उदाहरण : एकाद्या घटनेची, वस्तूची व्याख्या तिचे पूर्ण वर्णन करू शकत नाही. व्याख्यांच्या जागी समर्पक उदाहरणे सोईची होतात असं मला वाटतं! ... पाण्याची शास्त्रीय व्याख्या H2O असली तरी ते त्याहून अधिक असते. तुका म्हणे 'प्रयत्नें वाळूचे कण रगडीता तेलही गळे'. अर्वाचिन युगांत रूसी शास्त्रज्ञांनी भूगर्भातील खडकांना दाब देऊन पाणी काढले. दगडाच्या खाणीत मिळालेल्या स्फटीकाच्या पोकळीत पाणी असते. ऐकावे ते नवल!

अर्वाचीन युगाची व्याख्या मला माहित नाही. पण चार्ली चाप्लीनचा मूक चित्रपट Modern Times शब्दही न वापरता त्याची व्याख्या समर्पकपणे चित्रित करतो. ते पाहून आणि वारंवार आठवून मी मात्र अभिजात शैलीच्या शब्दजंजाळातून मोकळा होत गेलो.

अर्वाचीन महाभारत-कुरुक्षेत्र!  एवढा क्लिष्ट, अनेकांगी आणि विस्तृत विषय! या देशाची घटनाच लिहायला किती विद्वानांना किती वर्षें लागली? आजच्या सुधारलेल्या प्रगत समाजात कुठून मिळणार डिक्टेशन देणारा व्यास आणि लिहून घेणारा गणपती! प्राचीन काळातील कुरुक्षेत्र एकाच रणांगणावर होते. आज ते सर्व भारत व्यापून राहिले आहे. सामाजिक संधारण आर्थिक फॉर्म्युला लावून कसे होणार?

प्रेमावाचून दुसरा कोणताही पर्याय किंवा साधन किंवा अहिंसक शस्त्र हे ऑपरेशन करायला मला सापडले नाही!


आमचा पत्ता : मुक्काम - मुंबई, पोस्ट - इंडिया
आज सीमांत प्रदेश. उद्याचं ?माहित नाही

सरता पालव

इंडियन आयडल ६ च्या मंचावर पं. जसराज


टीवीच्या पडद्यावर सारा वेळ माझे ध्यान – कान आणि नजर – होते पंडितजींवर. कधीकाळी लोककलांतून अभिजात कलांचा – शिल्प, संगीत, नृत्य आदि– उगम आणि विकास झाला. अर्वाचीन काळातही पं. कुमार गंधर्वांनी ते केले. आजही लोकबोलीतला कबीर–तुकाराम अभिजात संगीताच्या गळ्यातला ताईत (रत्नहार नव्हे, तो राजे लोकांसाठी, तुकोबासाठी नव्हे.) आहे.

आता अभिजात संगीतातून बॉलीवुडच्या इंडिपॉप संगीताचा उगम झाला. त्याचा उदो करण्यासाठीच तर हा मंच आहे. आता त्यांच्या चालींवर श्रद्धाळू भजनं गातात. आता करूण-शांत-शृंगार रसांची जागा राजरोस बीभत्स रसाने घेतली आहे; हवा, जळ, जमीन, जीव ही प्रदुषित होताहेत.
या प्रदूषणाच्या जाणीवेवाचून कविता-कथा-कादंबरीची कशी सुटका होईल? मानवाने निर्माण केलेल्या सर्व प्रश्नांस उत्तरे आहे.कालचा व्यास नागरी समाजाच्या केंद्रित सत्तेचा कवी होता.

आजचे देशव्यापी "महाभारत आणि त्यात सतत चालले कुरुक्षेत्र" जेव्हा शंभर कोटी कवी लिहितील तेव्हा नागरी समाजाचे सत्तेचे केंद्रीकरण समाप्त होईल.

परिशिष्ट

आद्य महाभारतातील तीन प्रसंग


एकलव्य – दुर्गा भागवत याला 'मोहरीतील ठिणगी' (व्यासपर्व) म्हणतात;
लाक्षागृहातील कांड – संन्यस्थ कुंती गांधारी व धृतराष्ट्र ... रानाला लागलेल्या नैसर्गिक वणव्यात जळून मरतात, कुरुक्षेत्रानंतर...महाश्वेतादेवी (समीक्षा).
खांडव वनाचा विनाश – राजधानी इंद्रप्रस्थ बांधण्यासाठी लावलेल्या वणव्यात वानसे, पशूपक्षी व नाग जमात भक्ष्यस्थानी पडतात. त्याचे पर्यवसान पांडवांच्या वंश-विच्छेदांत होतो – तक्षक जीवाणू (वायरस) होऊन परिक्षिताचा वध करतो.

आदिवासी जीवन 

भिल्लांची आगळी होळी

आदिवासींची संस्कृती किती प्राचीन असेल याची कल्पना नाही. पण आज ते काही प्राचीन वातावरणात राहात नाहित.प्रस्तुत कालीन नैसर्गिक आणि सामाजिक-राजकीय-आर्थिक-इ. पर्यावरणात, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ते कसे टिकतात - sustain - याचं कारण ते निसर्गाशी संवाद साधून जगतात एवढं खरं!
ते  खरे सृष्टीयोगी !
भिल्ल शोडषांचे उत्स्फूर्त नृत्य -१
त्यांना विश्राम विनामूल्य मिळतो. करमणुकीसाठी त्यांना सिनेमा, टीवी अशा कुबड्यांची गरज किंवा हवास नसते.
त्यांचा  होळीचा सण पाच दिवस चालतो.
बाजूच्या व खालील  फोटोत दीवासौ या सणाला या भिल्ल षोडशा उत्स्फूर्त नाच करताना. यावेळी मक्याचे पिक तयार झालेले आहे.



भिल्ल शोडषांचे उत्स्फूर्त नृत्य - २

वरील चित्रांतील आनंदी भिल्ल व इतर आदिवासींचे नागरी समाजाने गेल्या पाच हजार वर्षांत केलेल्या नुकसानाची परतफेड आजचे लोकशाही सरकार कधीतरी करू शकेल का?


आता मी 'खो' देतो 'सविता' (अब्द शब्द) आणि 'अत्यानंद' यांना. दोघंही मातबर ज्येष्ठ लेखक. शिवाय सावितादी प्रवासी आणि फोटोग्राफर आहेत. तर अत्यानंद (प्रमोद देव) हे शास्त्रीय संगीताचे व्यासंगी गायक आहेत; त्यानी माझी एक, वरीलप्रमाणे कोणत्याही सदरात न बसणारी, कविता - 'अशी कविता एक कोडे' - गाईली होती हे आवर्जून सांगावेसे वाटते.

टीप : . श्रम - विश्राम - आरोग्य - अध्ययन - प्रजनन ही माझी मूळ लेखमाला अपुरी राहिली आहे. पण तिचे इंग्रजी भाषांतर Archetypes India माझ्या ब्लॉगवर प्रसिद्ध केलेय. त्याचा tag Work-Leisure-Health-Learning-Propagation.  ही माझी पुनर्शोधन (संशोधन नव्हे) मालिका आहे. त्याची स्फूर्ती, शिक्षण आणि दिशा मला माझे आदिवासी आप्तेष्ठ आणि आई-आजी यांच्याकडून  मिळाली.
२. नुकताच New Scientist या साप्ताहिकात प्रसिद्ध झालेला लेख Climate change: The great civilisation destroyer? अवश्य वाचावा. त्यासाठी नाव-नोंदणी Sign-in करावी लागेल. हा लेख मर्यादित काळासाठी उपलब्ध आहे. त्याची वर्ड-कॉपी हवी असल्यास इ-मेलने माझ्याशी संपर्क करावा.  

स्वातंत्र्यदिनानिमित्त | १५ ऑगस्ट २०१२ | मुंबई
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.