October 01, 2012

सृष्टीत आम्ही सातत्याने

 सृष्टी स्तवन



भारताला संपन्न जैवविविधतेची देणगी सृष्टीकडून मिळाली आहे. त्यातूनही भारतीयांनी नारळाच्या झाडाला 'कल्पवृक्ष' असे संबोधले. नारळाला 'श्रीफळ' म्हटले. सृष्टी सर्व जीव मात्राला जगण्याचे साधन देते, आणि मानवाला संस्कृती देते. संगीत, काव्य, नाट्य, साहित्य, चित्र, वास्तू, महाकाव्ये ही केवळ संस्कृतीची अभिव्यक्ती आहेत. संस्कृती केवळ मानवात वसते.

सृष्टीत आम्ही सातत्याने


सृष्टी मानवप्राण्याला तिची लाडकी जीवजाती म्हणून ओळखत नाही, की नाही नागरी समाजाच्या कुंपणाना व त्यांच्या सामाजिक अधिश्रेणींना.



वानसे सुसंस्कृत समाजाची कुंपणे व अधिश्रेणी ओळखत नाहीत 
नागरी समाजांना कुंपणे - भिंती बांधायचे, वर्गवारी करायचे फारच वेड आहे. ते एवढ्यावरच थांबत नाही. त्या भिंतीवर नक्षीकाम करायचे, त्याच्यावर अलंकार चढवायचे, त्यांची स्मारके घडवायची, आणि टाळ्या वाजवायच्या हे पण पर्यायाने आलेच. उदाहरण: चीनची भिंत: ते तर सरंजामदारशाहीचे प्रतिक आहे.

तसेच वानसे आणि अन्य प्राणीजातीपण त्यांची सामाजिक बंधने व अधिश्रेणी ओळखत नाहीत.
पाळीव पशुपक्षीपण सायंकाळी निवार्‌याला घरी परतून येतात. त्यांना तेवढ्यापुरतीच कुंपणाची म्हणजेच मालकीची ओळख असते. सामाजिक अधिश्रेणी सोपान ते ओळखत नाहीत.
लहानपणी आईच्या दुधाव्यतिरिक्त इतर अन्न आपणास सुरू केले की जीवाणूंच्या झुंडी आपल्या उदरात कायम घर करून राहायला सुरवात करतात. त्यांच्या अनेक जातींची संकुले उदरात असतात!

आशा करूया, 'हिरवाई' बगिचे, झाडी, शेते, उरली सुरली जंगले, आणि नद्या-सरोवर-सागर यांच्यापल्याड; वर्डस्वर्थ याच्या कविता, टर्नरची चित्रे, यांच्यापल्याड; आणि फोटो सिनेमा विडयो - ही कितिही अद्यावत असली तरी - त्यापल्याड जावून आपण कधीतरी सृष्टीचा अनुभव घेऊ ! कारण ही सर्व माध्यमे मनोरंजक व दृष्टीसुख देणारी असली तरी ते सृष्टीला पर्याय नव्हेत.

वरील दाखले आपणांस निसर्गाच्या मनोहर / भयावह अनुभवांची आठवण करायला मदत करतील.
जीवशास्त्र आणि पुरातत्त्वशास्त्र, त्यांनी केलेली प्रगती आम्हाला निसर्गाची अधिकाधिक माहिती देते, शिवाय निसर्गातील आपले स्थान काय हेपण समजायला मदत करतात.
कदाचित चक्रीवादळे, मेघस्फोट, ज्वालामुखी, धरणीकंप, हिमवादळे, सुनामी... इत्यादि आणि आता वायुमान बदल (ही काही कल्पित कथा नव्हे) या रौद्रभयानक रूपांत निसर्गाचे सामर्थ्य आपणास दिसते. 

सृष्टीचे प्राथमिक निरिक्षण 


सृष्टीशी मौलिक संबंध प्राथमिक आणि वैयक्तिक स्तरावर प्रस्थापित करणे हे सर्वात उत्तम. स्वतःच्या शरीर व मनाचे निरिक्षण करणे; त्यासाठी नाही मुहूर्त, नाही मंत्र-तंत्र विधी, ना शुभाशुभ स्थानाचे, विषेश बैठकीचे अथवा वेशभूषेचे नियम. केवळ निरिक्षण, लक्षपूर्वक व करुणापूर्वक. कारण शरीर आणि मन आम्हाला या जगात टिकून राहाण्याची मिळालेली साधने आहेत व आम्ही त्यांचे विश्वस्त आहोत, मालक नव्हे. यात कोणतेही गूढ नाही; जशी बाहेरची हिरवाई तसेच आम्हीही सष्टीचेच केवळ भाग आहोत.

सृष्टीच्या निरिक्षणाचे दुसरे साधन  


उष्ण कटिबंधात वानसे  कोठेही उगवतात


आम्ही भारतीय पंच महाभूते पृथ्वी, आप, तेज, वायू आणि पैस परंपरेने मानतो.
स्वतःनंतर सष्टीच्या निरिक्षणाचा दुसरा उत्तम पर्याय असा : वानसांबरोबर संबंध जोडणे व त्यांचे निरिक्षण करणे. त्याहूनही चांगले प्रत्यक्ष कृती: सैपाकघरातून काही बीजे घेऊन मातीत पेरणे. त्यासाठी टीनाची प्लस्टीकची अथवा मातीची लहान कुंडी चालेल. मातीची कुंडी बरी कारण माती श्वासोश्वास करते. अशी पेरणी प्रत्येक ऋतूत केलेली बरी. आणि रुजलेल्या रोपांच्या वाढीस सूर्यप्रकाश व पाणी देऊन मदत करणे. मार्गदर्शक पुस्तके शक्यतो टाळावी. काही चूका झाल्या तरी हरकत नाही.
प्रत्येक बीज रुजेलच असं नाही. त्यांना येणारे कोंब पहावे, सूर्यप्रकाश व पाणी घालावे. हे सर्व करीत असताना रोपांबरोबर आपणही पंच महाभूतांच्या संपर्कात येतो, पर्यायाने सृष्टीच्या संपर्कात जाणीवपूर्वक येतो.

निसर्गाच्या प्रयोगशाळेत कृषीक्रांती

दहा हजार वर्षांपूर्वी अर्धनग्न मानवांनी रानटी वानसे आणि पशूपक्षांचे गृहसंवर्धन केले. आणि बिकट नैसर्गिक वातावरणात कृषीक्रांतीची सुरवात झाली. आणि ती सर्व जगभर पसरली (विना बौद्धिक मालकी हक्क).
त्या काळी नागरी संस्कृती किंवा सुसंस्कृत समाज किंवा civilization अस्तित्वात आले नव्हते. कृषिक्रांतीनंतर पाच हजार वर्षांनी सुसंस्कृत समाज Civilization म्हणजेच Urban Revolution, 'नागरी क्राती'चा उदय झाला.
औद्येगिक क्रांती Industrial Civilization काही शतकांपूर्वीच विलायतेत उदयास आणि पाहता पाहता सर्व जगभर पसरली. पण ती कधीच 'वैश्विक' universal झाली नाही. आपण उच्चभ्रू वर्ग मात्र येथे पोहोचलो. आपले अध्ययन सांघिक शिक्षण पद्धतिच्या जुळवणी पंक्तीवर Assembly Line झाले.
अजूनही वेळ नाही का आली सृष्टीशी संयोग करायची?

टीप : वरील मजकूर लिहित असताना एका इंग्रजी ब्लॉग वरील लेख Humans and Nature: Can the Gulf Be Bridged?  वाचनात आला. याचा मथळा वाचताच विलायती समाज आणि त्यांचे अनुकरण करणारे इतर समाज निसर्गापासून कसे दुरावलेले आहेत हे.ध्यानात येते. या लेखावरील माझी टिप्पणी प्रतिक्रिया अवश्य वाचावी.

~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.

August 15, 2012

अर्वाचीन महाभारत-कुरूक्षेत्र भारतभर

दोन गाणी : प्रस्तूतकालीन महाभारताची समीक्षा


लोक-उर्जा संधारण 
 आर्थिक-तांत्रिक-ओद्योगिक विकासाच्या नशेत लोकाविकासाचे कुणाला भान?


मला'खो' देते 'हर्षदा' आणि मी समीक्षा करायला निवडतो पुस्तकाऐवजी एक विषय, ज्याला म्हणता येईल : "प्रस्तुतकालीन महाभारत-कुरूक्षेत्र"! हे पुस्तक वास्तव रुपात आपल्यासमोर आहे. त्याचे स्वरूप "मायावी वास्तवता", Virtual Realty, नाही. ही टीका मी पुढील दोन गाण्यात आटोपतो.

पहिल्या गाण्यात आहे सत्तेशी केलेला संवाद जो विफल होतो, आणि त्याचे स्वरूप केवळ 'स्वगत' उरते. दुसऱ्या गाण्यात पहिल्या गाण्यातील वैफल्याचे निदान केलेले आहे.


प्रगती = पंचम जगत भारताचा उदय
ही मुले मुंबईची काय आठवण घेऊन मोठी होतील ?

 

अलिखित अर्वाचीन महाभारत- कुरुक्षेत्राची समीक्षा 

गाणे १. स्वगत सत्तेशी (नाट्यछटा) :  त्तेशी संवाद अशक्यप्राय


मी सत्त्याशी लुडबुड करू इच्छित नाही
वाटल्यास ते आपसूकच प्रगट होईल.
पण जेव्हा आम्ही विविक्षित तथ्य बोलतो
ज्यात मी गुंतलो आहे ते जाणणे माझा हक्क नाही का?
संवादात प्रतिसादाने बरोबरीचा हक्क नाही का?
किंवा कोणत्याही नात्याने — सर्व वाटांवर सर्वदा?
एक तथ्य उरतेच, जेव्हा मी विचारणा करतो
तेव्हा तू संवाद तोडतेस किंवा उत्तर टाळतेस.
कारण काहीही असो.

याला संवाद का म्हणावे? कि
याचा अर्थ माझ्याच खर्चाने माझी टवाळी?
तू माझ्या परिश्रमांची पैशाने किंमत देऊ शकतेस पण मोल नाही
(जर का तू कधी परिश्रमाचे मोल समजलीस तर
पुरवठ्याच्या बाजारी?).

मी नाही विकावू कि नाही भाड्याचा माल.
पसंत करीन मी तुला सोडचिठ्ठी देणे
देण्याहून औषधांची चिठ्ठी रोगांवर
ज्या जन्माला घालतात केवळ प्रतिक्रिया, प्रति-प्रतिक्रिया.
नाईलाज आहे! अशा लुडबुडींना येथे नाही वाव
केवळ एकच जन्म हा!
(नाट्यछटा हा प्रकार दिवाकर यांनी मराठीत आणला. नाटक-सिनेमात स्वगते येतात.)

 

गाणे २. माझे गाणे जन्मले... 


माझे गाणे जन्मले भूईत आणि जळांत,
पोसले वानसांनी, लोकानी अन प्रेमाने,
सत्तेच्या हवसेने वेड्या नागरी समाजांत,
अंध कोपाने जगणेच उध्वस्त करणार्‌या.—
गांडूळे, हिंस्र जनावरे बरी त्याहूनी !  


विश्राम अमूल्य विनामोल
श्रम - विश्राम - आरोग्य - अध्ययन - प्रजनन ही सृष्टीने समस्त जीवमात्राला दिलेली पाच स्वायत्त मूलभूत कार्यें. यात हस्तक्षेपाचा कोणत्याही मानवी सत्तेला अधिकार नाही (पहा : टीप 1).

  सत्तेचे अनेक अवतार

सत्तेच्या अनेक रूपांत लोकाशी सरकारपण गृहीत आहे. पण सत्ता कुठल्याही स्तरावर असू शकते, कुटुंबापासून समष्ठीपर्यंत. त्यांत शाळा-शिक्षक आणि विद्यार्थी, अगणित सार्वजनिक संस्था, कॉपोरेशन, पोलीस, आमदार-खासदार, नोकरशहा, इत्यादी सर्व आले. कुटुंब नवरा आणि बायको, सासू-सासरा आणि सून, पालक आणि मुले यांच्या संबंधांतही सत्ता अवतार घेते.

अर्थात यात सत्ता आणि रयत, किंवा सत्तेसाठी संबंधितांचा संघर्ष आलाच. नागरी समाजात हा संघर्ष अपरिहार्य आहे. खरं तर सत्तेचे केंद्रीकरण हे त्याचे व्यवच्छेदक लक्षण आहे. नागरी समाजाच्या इतिहासात हे अव्याहत चालत आले आहे.

आणि या सत्तेने सत्तेसाठी केलेल्या संघर्षांत कितीक बलाढ्य नागरी संस्कृती नामषेश झाल्या, पण त्यांची रयत नव्हे. मात्र टिकून राहिल्या आदिवासी जमाती, ज्या आहेत सान प्रजासत्ताके, अनादी काळापासून... आजही!!


स्वावलंबनाला वेळूचा आधार
 यंत्रोद्योग = बहुसंख्य ग्रामीण जनतेच्या हस्तोद्योगांवर गाढवाचा नांगर आला. बांबू प्राचीन काळापासून भारतीय ग्रामीण जीवनाशी जोडलेला आहे, मग बांबू भारतात दुर्लक्षित का व कसा राहिला?

या गाण्यांना काव्य म्हणता येईल का माहीत नाही ! ही आहेत रेमीच्या बोलीत राकट गावठी प्रेमगीते. येथे नाही अभिजात शैली, नाहीत अलंकार-उपमा, नाही शब्दांची वा कल्पनांची आतिषबाजी. शेतकर्‌याच्या पिंडाला अशी चंगळ परवडणारी नाही, मग ते पाणी असो की शब्द असोत.

एक प्रश्न उरतो. या रचनांना समिक्षा, टीका अथवा दुसर्‌या कोणत्या सदरात ठेवता येईल का? कोणत्याही सृजनशील अभिव्यक्तीत वैयक्तिक व सामाजिक यांच्या पलिकडे जाण्याकडे माझा कल आहे. त्यामुळे यातील 'मी' नेहमीच गौण राहातो. दोन्ही गाण्यांचा विषय प्रेम आहे, पण हल्लीच्या रूढ (लैंगिक) अर्थाने नव्हे.  

प्रस्तुतकालीन महाभारत (कुरूक्षेत्र) आज काव्यात कोण लिहिणार, आणि वाचणार कोण? ते तर प्रत्येक व्यक्ती रोजच अनुभवते! मात्र त्याचे ऑपरेशन (कि डिसेक्शन, कि पोस्टमोर्टेम?) सुटसुटीत व्हायला काय हरकत! आजच्या परिस्थितीवर लेखातून, पुस्तकातून केलेल्या असंख्य टीका वेगवेगळ्या दालनात राहून केल्या जातात. कितिही प्रयत्न केले त्या अपुर्‌या राहातात. किंबहुना त्या जेवढ्या लठ्ठ तेवढ्या आकलनास कठीण.


अन्नपाण्यासाठी रयत दाही दिशा - जगण्यावर कर अनारोग्याचा
 चव्वलाच्या नादात पाणपोया वाहून गेल्या - हे रस्ते हे रस्ते


साधे उदाहरण : एकाद्या घटनेची, वस्तूची व्याख्या तिचे पूर्ण वर्णन करू शकत नाही. व्याख्यांच्या जागी समर्पक उदाहरणे सोईची होतात असं मला वाटतं! ... पाण्याची शास्त्रीय व्याख्या H2O असली तरी ते त्याहून अधिक असते. तुका म्हणे 'प्रयत्नें वाळूचे कण रगडीता तेलही गळे'. अर्वाचिन युगांत रूसी शास्त्रज्ञांनी भूगर्भातील खडकांना दाब देऊन पाणी काढले. दगडाच्या खाणीत मिळालेल्या स्फटीकाच्या पोकळीत पाणी असते. ऐकावे ते नवल!

अर्वाचीन युगाची व्याख्या मला माहित नाही. पण चार्ली चाप्लीनचा मूक चित्रपट Modern Times शब्दही न वापरता त्याची व्याख्या समर्पकपणे चित्रित करतो. ते पाहून आणि वारंवार आठवून मी मात्र अभिजात शैलीच्या शब्दजंजाळातून मोकळा होत गेलो.

अर्वाचीन महाभारत-कुरुक्षेत्र!  एवढा क्लिष्ट, अनेकांगी आणि विस्तृत विषय! या देशाची घटनाच लिहायला किती विद्वानांना किती वर्षें लागली? आजच्या सुधारलेल्या प्रगत समाजात कुठून मिळणार डिक्टेशन देणारा व्यास आणि लिहून घेणारा गणपती! प्राचीन काळातील कुरुक्षेत्र एकाच रणांगणावर होते. आज ते सर्व भारत व्यापून राहिले आहे. सामाजिक संधारण आर्थिक फॉर्म्युला लावून कसे होणार?

प्रेमावाचून दुसरा कोणताही पर्याय किंवा साधन किंवा अहिंसक शस्त्र हे ऑपरेशन करायला मला सापडले नाही!


आमचा पत्ता : मुक्काम - मुंबई, पोस्ट - इंडिया
आज सीमांत प्रदेश. उद्याचं ?माहित नाही

सरता पालव

इंडियन आयडल ६ च्या मंचावर पं. जसराज


टीवीच्या पडद्यावर सारा वेळ माझे ध्यान – कान आणि नजर – होते पंडितजींवर. कधीकाळी लोककलांतून अभिजात कलांचा – शिल्प, संगीत, नृत्य आदि– उगम आणि विकास झाला. अर्वाचीन काळातही पं. कुमार गंधर्वांनी ते केले. आजही लोकबोलीतला कबीर–तुकाराम अभिजात संगीताच्या गळ्यातला ताईत (रत्नहार नव्हे, तो राजे लोकांसाठी, तुकोबासाठी नव्हे.) आहे.

आता अभिजात संगीतातून बॉलीवुडच्या इंडिपॉप संगीताचा उगम झाला. त्याचा उदो करण्यासाठीच तर हा मंच आहे. आता त्यांच्या चालींवर श्रद्धाळू भजनं गातात. आता करूण-शांत-शृंगार रसांची जागा राजरोस बीभत्स रसाने घेतली आहे; हवा, जळ, जमीन, जीव ही प्रदुषित होताहेत.
या प्रदूषणाच्या जाणीवेवाचून कविता-कथा-कादंबरीची कशी सुटका होईल? मानवाने निर्माण केलेल्या सर्व प्रश्नांस उत्तरे आहे.कालचा व्यास नागरी समाजाच्या केंद्रित सत्तेचा कवी होता.

आजचे देशव्यापी "महाभारत आणि त्यात सतत चालले कुरुक्षेत्र" जेव्हा शंभर कोटी कवी लिहितील तेव्हा नागरी समाजाचे सत्तेचे केंद्रीकरण समाप्त होईल.

परिशिष्ट

आद्य महाभारतातील तीन प्रसंग


एकलव्य – दुर्गा भागवत याला 'मोहरीतील ठिणगी' (व्यासपर्व) म्हणतात;
लाक्षागृहातील कांड – संन्यस्थ कुंती गांधारी व धृतराष्ट्र ... रानाला लागलेल्या नैसर्गिक वणव्यात जळून मरतात, कुरुक्षेत्रानंतर...महाश्वेतादेवी (समीक्षा).
खांडव वनाचा विनाश – राजधानी इंद्रप्रस्थ बांधण्यासाठी लावलेल्या वणव्यात वानसे, पशूपक्षी व नाग जमात भक्ष्यस्थानी पडतात. त्याचे पर्यवसान पांडवांच्या वंश-विच्छेदांत होतो – तक्षक जीवाणू (वायरस) होऊन परिक्षिताचा वध करतो.

आदिवासी जीवन 

भिल्लांची आगळी होळी

आदिवासींची संस्कृती किती प्राचीन असेल याची कल्पना नाही. पण आज ते काही प्राचीन वातावरणात राहात नाहित.प्रस्तुत कालीन नैसर्गिक आणि सामाजिक-राजकीय-आर्थिक-इ. पर्यावरणात, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ते कसे टिकतात - sustain - याचं कारण ते निसर्गाशी संवाद साधून जगतात एवढं खरं!
ते  खरे सृष्टीयोगी !
भिल्ल शोडषांचे उत्स्फूर्त नृत्य -१
त्यांना विश्राम विनामूल्य मिळतो. करमणुकीसाठी त्यांना सिनेमा, टीवी अशा कुबड्यांची गरज किंवा हवास नसते.
त्यांचा  होळीचा सण पाच दिवस चालतो.
बाजूच्या व खालील  फोटोत दीवासौ या सणाला या भिल्ल षोडशा उत्स्फूर्त नाच करताना. यावेळी मक्याचे पिक तयार झालेले आहे.



भिल्ल शोडषांचे उत्स्फूर्त नृत्य - २

वरील चित्रांतील आनंदी भिल्ल व इतर आदिवासींचे नागरी समाजाने गेल्या पाच हजार वर्षांत केलेल्या नुकसानाची परतफेड आजचे लोकशाही सरकार कधीतरी करू शकेल का?


आता मी 'खो' देतो 'सविता' (अब्द शब्द) आणि 'अत्यानंद' यांना. दोघंही मातबर ज्येष्ठ लेखक. शिवाय सावितादी प्रवासी आणि फोटोग्राफर आहेत. तर अत्यानंद (प्रमोद देव) हे शास्त्रीय संगीताचे व्यासंगी गायक आहेत; त्यानी माझी एक, वरीलप्रमाणे कोणत्याही सदरात न बसणारी, कविता - 'अशी कविता एक कोडे' - गाईली होती हे आवर्जून सांगावेसे वाटते.

टीप : . श्रम - विश्राम - आरोग्य - अध्ययन - प्रजनन ही माझी मूळ लेखमाला अपुरी राहिली आहे. पण तिचे इंग्रजी भाषांतर Archetypes India माझ्या ब्लॉगवर प्रसिद्ध केलेय. त्याचा tag Work-Leisure-Health-Learning-Propagation.  ही माझी पुनर्शोधन (संशोधन नव्हे) मालिका आहे. त्याची स्फूर्ती, शिक्षण आणि दिशा मला माझे आदिवासी आप्तेष्ठ आणि आई-आजी यांच्याकडून  मिळाली.
२. नुकताच New Scientist या साप्ताहिकात प्रसिद्ध झालेला लेख Climate change: The great civilisation destroyer? अवश्य वाचावा. त्यासाठी नाव-नोंदणी Sign-in करावी लागेल. हा लेख मर्यादित काळासाठी उपलब्ध आहे. त्याची वर्ड-कॉपी हवी असल्यास इ-मेलने माझ्याशी संपर्क करावा.  

स्वातंत्र्यदिनानिमित्त | १५ ऑगस्ट २०१२ | मुंबई
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.

July 30, 2012

चेहरा सावली हरवलेली आधुनिक संस्कृती

चेहरा सावली हरवलेली आधुनिक संस्कृती  (विद्रोही कविता)
रेमीजीयस डिसोजा
उलगुलान : भयानक विद्रोह (महाश्वेता देवी, अरण्येर अधिकार)
कुणी कुणाशी विद्रोह केला?

बाजारू खेळण्यातल्या माकड़ासारखी
चावीच्या आधारे टाळ्या पिटीत बसली.

पुरातन काळी सांगतात होते राजे दुष्ट दयाळू
अत्याचारी व्यभिचारी प्रियदर्शी परमकृपाळू
तरी म्हणे होते अभिषिक्त अंश ईश्वरी .

कोणी म्हणतात प्रत्येकात - माझ्यातही -
वृक्ष वेली कीटक जनावरात - माती धोंड्यातही -
आहे तो अंश ईश्वरी; माहीत नाही.

पण असलेच तर ते होते रक्ता कुडीची
मन आत्म्याने घडवलेली माणूस नावाची
एक वास्तू चक्रावलेली जन्म-मृत्युच्या भोवरयात.

काळाच्या ओघात घेऊन काडीचे आधार
ईश्वरी अंशाचे राजे आधुनिकतेच्या लाटेत
गेले. आले त्यांच्या जागी राजकर्ते मुजोर

जनता जनार्दनाचे स्वाभिषिक्त अंश होऊन
आभुषणे अलंकार लोकमताचे लेवून
त्यांची स्मारकेपण अजस्त्र सहस्त्र पावन.

राजे गेले. राजकर्ते आले. आले गेले - आले गेले -
लोकमताच्या हिंदोळ्यावर सदैव विराजलेले,
काळाच्या उदरात बघता बघता लुप्त झाले,

हरवले जग जवळ आणायच्या खटाटोपात
डोंगराएवढ्या इतिहासाच्या पोथ्यापुराणात
हरवले हरघडी उंचावत जाणारया अहंकारात.

त्यांच्या अहंकाराचे बोडके पर्वत डोंगर
बसले पंडितांच्या बोडक्यावर उरावर
जेथे हिरवळ सुध्दा उगवत नाही.

आधुनिकतेच्या वावटळीत गेले ईश्वरी अंशाचे अवतार
गेले जनाताजनार्दानाच्या रेतातून उठलेले भार,
झाडे वेली डोंगर मातीपण धुपून गेले पार.

माणुसकीची संवेदना नसलेल्या संगणकाचे हत्यार
घेऊन आल्या तालेवार विश्वव्यापी संघटना अपार,
संपत्तीचे उध्दारक अनावर, सुधारणेचे ठेकेदार,

उभ्या ठाकल्या बटनांचे संच अद्दृश्य हाती घेऊन
गोजीरवाण्या नावांनी बारसे करून सजून
नगरात उजाड गावात बोडक्या डोंगरात रेताडात

तंत्राच्या झगमगातात विज्ञान मंत्राच्या आकडेमोडीत
चेहरा सावली हरवून माणसे निघाली मोडीत,
इश्वरी अंशाची दिवाळखोरी कवटाळून झोपली संस्कृती

अतिआधुनिक समाजांच्या कर्तुतात
विज्ञानधर्माची अफू खाऊन मदमस्त
संस्कृतीने घडवली माणसाची प्रतिकृती;

घातला त्यात माणसाचा अंशत: मेंदू,
वादग्रस्त देवाच्या पावलावर पाऊल टाकीत
घाईगर्दीने आली संस्कृति अतिआधुनिक

आणि कळीकाळाचे भान विसरून
बाजारू खेळण्यातल्या माकड़ासारखी
चावीच्या आधारे टाळ्या पिटीत बसली.

* * *
मुंबई
१७-४-१९९५
NOTE: Image- Clapping toy monkey, Source Internet.
~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

एका पाळीव प्राण्याची गोष्ट (एक आत्मकथा)

एका पाळीव प्राण्याची गोष्ट (एक आत्मकथा)


तीस दिवसांचे ७२० तास तो पाळीव प्राण्याचे जीवन जगतोय. भिंतीवर टांगलेल्या दिनदार्शिकेची पाने बदलत असतात, व दिनदर्शिका पण. तरीही याचे आयुष्य असेच चाललेय.

कधी तो गळ्यात पट्टा बांधलेला कुत्रा असतो, तर कधी चुलीच्या उबेस बसलेलं मांजर...
कधी तो होतो बळीचा बकरा; कधी तो असतो ओझे वाहणारा टोणगा; तर कधी गोठ्यात बांधलेली दुभती गाय.

कधी तो असतो गळ्यात दोरी बांधलेला माकड -- त्याच दोरीच्या इशारयावर कोलांट्या उड्या मारणारा... तेच त्याचे काम.
कधी तो असतो पिंजरयातला पोपट; ऐकत असतो मुक्ताफळे:
"पोपटा, पोपटा, खा ना जरा पेरूची फोड,
आणि बोल माझ्याशी गोड गोड."

कधी तो असतो घाण्याला बांधलेला बैलोबा, फिरत असतो वर्तुळात, पण त्याच्या जूं वाहाणारयां खांद्यावरच्या जखमेवर कोणी कधी तेलाची घडी घालत नाही.

कधी तो असतो राजेशाही बगीला बांधलेला, डोळ्याना झडपा लावलेला उमदा घोडा -- माहीत नसते त्याला तो कुठे कशासाठी सतत धावत असतो.

शेवटी, आजच्या आधुनिक सुधारलेल्या सुसंस्कृत समाजात परावलंबी आयुष्य काढायचे असले तर अशा या सर्व भूमिका नकोत का निभावायला? इथे परस्परावलंबी समष्टीला कुठे थारा?


रेमीजीयस डिसोजा । मुंबई

~~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

July 23, 2012

आज मध्यान्ही हसलो माझ्या मढ्यावर

आज मध्यान्ही हसलो माझ्या मढ्यावर
माहित झाले यात माझ्या सुखाची ग्यारंटी आहे.
टळली नव्हती दुपार तरी
डामरी रस्ते  आपलेसे वाटले —
रामबोलोच्या नादात.
काळ्या दुपारी काजवे कवडसे
हरवणाऱ्या शुध्दीचे  
पराकाष्टा करतात वाट उजवायची  
— रेमीजीयस डिसोजा   

~ ~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape